Home महाराष्ट्र ग्रामीण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अजित पवारांचा मोठा वाटा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

ग्रामीण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अजित पवारांचा मोठा वाटा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

Ajit Pawar's big contribution in the formation of rural Maharashtra - Legislative Council Chairman Prof. Ram Shinde

मुंबई:- ग्रामीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील प्रभावी आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. कृषी, जलसंपदा आणि सिंचन या क्षेत्रांमध्ये त्यांनी सातत्याने पुढाकार घेत ग्रामीण भागाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम केले. ग्रामीण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा वाटा होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्याने अभ्यासू, निर्णयक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व गमावले अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधानपरिषदेत श्रद्धांजली अर्पण केली.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, माजी विधान परिषद सदस्य अशोक गजानन मोडक, गंगाधर पटने, श्रीमती निला देसाई यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला त्यावर उपसभापती शिंदे बोलत होते.

सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, राज्याचा अर्थसंकल्प ११ वेळा मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून वित्तीय शिस्त आणि वास्तववादी नियोजनाचा आग्रह त्यांनी कायम ठेवला. दुष्काळी भागांसाठी पाणी उपलब्ध करून देणे, कालवे व धरणे उभारणे, तसेच सिंचन प्रकल्पांना गती देणे यावर त्यांनी विशेष भर दिला. शेती हा केवळ व्यवसाय नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, या भूमिकेतून त्यांनी पाणी व्यवस्थापन आणि कृषी विकासाच्या योजनांना प्राधान्य दिले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शोकप्रस्तावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ‘विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही’ ही दादांची घोषणा आम्ही सत्यात उतरवू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती. फाईल हातात घेतल्यावर काही सेकंदात त्यांची नजर कागदावरून स्कॅन व्हायची आणि त्यातील चुका ते चटकन शोधायचे. साध्या वायर लटकत असल्या किंवा पायरी नीट बसवलेली नसली तरी ते संबधितांना सुनावत असत. ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. बाहेरून फणसासारखे काटेरी वाटत असले तरी आतून ते अत्यंत मृदू मनाचे होते. लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करताना त्यांनी अर्थकारणाचा समतोल उत्तम राखला होता.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, जनतेच्या प्रश्नांबाबत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. नागरिकांच्या निवेदनांचे बारकाईने परीक्षण करून योग्य ती कार्यवाही करण्याची त्यांची कार्यपद्धती उल्लेखनीय होती. कधी मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर सौजन्यपूर्ण संबंध त्यांच्या सोबत कायम राहिले, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, माजी विधान परिषद सदस्य अशोक गजानन मोडक, गंगाधर पटने, श्रीमती निला देसाई या दिवंगत सदस्यांच्या वाटचालीला सभापती प्रा. राम शिंदे यांनी उजाळा दिला. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून या दिवंगत सदस्यांना सर्व उपस्थित सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.

विधान परिषद सदस्य सर्वश्री उद्धव ठाकरे, प्रवीण दरेकर, सतेज पाटील, विक्रम काळे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, संजय खोडके, प्रसाद लाड, भाई जगताप, निरंजन डावखरे, पंकज भुजबळ, चित्रा वाघ, अभिजित वंजारी, मनिषा कायंदे, सचिन अहिर, किरण सरनाईक यांनी मनोगत व्यक्त करीत सहवेदना व्यक्त केल्या.

error: Content is protected !!
Exit mobile version