Home महाराष्ट्र ‘भारत रंग महोत्सव २०२६’ मुंबईत ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत

‘भारत रंग महोत्सव २०२६’ मुंबईत ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत

'Bharat Rang Mahotsav 2026' to be held in Mumbai from February 9 to 13

मुंबई : राष्ट्रीय नाट्य विद्यालय, भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारत रंग महोत्सव २०२६’ या भव्य नाट्य महोत्सवाचे आयोजन दि. ९ ते १३ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता होणार आहे. या नाट्य महोत्सवात देश-विदेशातील नामांकित नाट्यसंस्थांची पाच नाटके सादर करण्यात येणार आहेत. या सादरीकरणांद्वारे विविध भारतीय भाषांमधील नाट्य परंपरा, सर्जनशीलता आणि प्रयोगशीलतेचा संगम प्रेक्षकांना अनुभवता येईल.

या सर्व नाटकांचे प्रयोग प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुले असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. नाट्यरसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

भारत रंग महोत्सवात दि. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे तमास (राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली) या नाटकाचे सादरीकरण होईल. दि. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे बाबुजी-राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली मार्फत हिंदी नाटकाचे सादरीकरण होईल. दि. ११ फेब्रुवारी रोजी मिनी थिएटर येथे सायंकाळी ४:३० वाजता ‘ब्रेस्ट ऑफ लक’ या कॅन्सर विषयावर जनजागृती करणाऱ्या नाटकाचे सादरीकरण करण्यात येईल. तसेच याच दिवशी रवींद्र नाट्य मंदिर येथे सायंकाळी ६:३० वाजता थिव्हज् कार्निव्हल या नाटकाचे राष्ट्रीय नाट्य विद्यालयामार्फत सादरीकरण होईल. दि. १२ फेब्रुवारी रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे लाईफ ऑफ ड्रिम या स्पॅनिश भाषेत स्पेन येथील कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या महोत्सवातील शेवटचे नाटक आधे अधुरे हे नाटक दि. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता सादर होणार आहे. रसिक प्रेक्षकांनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version