
नंदुरबार जिल्ह्यात माता व नवजात बालकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि नागरिकाभिमुख सुधारणा अमलात आणण्यात आली आहे. मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आणि मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आता प्रसूतीनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याच्याच दिवशी जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
आतापर्यंत जन्म नोंदणीसाठी पालकांना रुग्णालय, ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचे अनेक फेरे मारावे लागत होते. यामुळे वेळेचा अपव्यय, कागदपत्रांची अडचण आणि विलंब होत असे. ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभाग व जन्म-मृत्यू नोंदणी यंत्रणेमध्ये समन्वय साधत ही नवी व्यवस्था कार्यान्वित केली आहे.
या उपक्रमामुळे:
⦁ नवजात बालकाचे जन्म प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध होणार
⦁ पालकांना वेगळी प्रक्रिया किंवा कार्यालयीन फेऱ्यांची गरज नाही
⦁ शासकीय योजनांचा लाभ (आधार, आरोग्य योजना, शालेय प्रवेश इ.) वेळेत मिळण्यास मदत
⦁ जन्म नोंदणीचे प्रमाण १००% करण्याच्या दिशेने मोठे पाऊल
जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक झाली असून नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होणार आहे.
नवजात बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि माता-बाल सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने नंदुरबार जिल्ह्याचा हा उपक्रम सुशासनाचा आदर्श नमुना ठरत आहे.
(CollectorOfficeNandurbar)