Home नंदुरबार जिल्हा वेठबिगार पद्धत नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारची सुधारित मानक कार्यपद्धती लागू

वेठबिगार पद्धत नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारची सुधारित मानक कार्यपद्धती लागू

2
Central Government's revised Standard Operating Procedure implemented to eradicate the bonded labour system.

(नंदुरबार) भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाने वेठबिगार पद्धती (निर्मूलन) अधिनियमाची प्रभावी व कडक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी 14 मे 2026 रोजी वेठबिगार मजुरांची ओळख, सुटका, पुनर्वसन आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सुधारित मानक कार्यपद्धती (Revised Standard Operating Procedure – SOP) जारी केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना जागरूक राहण्याचे व वेठबिगारीबाबत तक्रारी नोंदवण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्रीमती मधुरा सुर्यवंशी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

सुधारित कार्यपद्धती (SOP) चे उद्दिष्ट:

नवीन कार्यपद्धतीचा मुख्य उद्देश वेठबिगार मजुरांची त्वरीत ओळख पटवून त्यांची तातडीने व सुरक्षित सुटका करणे हा आहे. सुटका केलेल्या मजुरांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देऊन त्यांचे त्वरित पुनर्वसन करणे आणि जबाबदार दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करणे हे या नियमावलीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

वेठबिगारी हा गंभीर व दंडनीय अपराध:

वेठबिगार पद्धती ही कायद्याने पूर्णतः बंद असून, कोणत्याही व्यक्तीस जुने कर्ज, दिलेली आगाऊ रक्कम (Advance), सामाजिक बंधने किंवा इतर कोणत्याही कारणास्तव बळजबरीने वा सक्तीने काम करण्यास भाग पाडणे हा गंभीर गुन्हा आहे.

प्रशासनाकडून त्वरित सुटका व पुनर्वसन कार्यवाही:

अशा स्वरूपाच्या प्रकरणांची माहिती मिळाल्यास अथवा तक्रार प्राप्त झाल्यास:

• जिल्हा प्रशासनामार्फत घटनास्थळी तात्काळ तपासणी केली जाईल.

• आवश्यक बचाव (Rescue) मोहीम राबवून मजुरांची सुटका केली जाईल.

• मजुरांना बंधनातून मुक्त करण्यासाठी त्वरित ‘मुक्ती प्रमाणपत्र’ (Release Certificate) दिले जाईल.

• शासनाच्या योजनांतर्गत तात्काळ पुनर्वसन व आर्थिक मदत पुरवली जाईल.

• संबंधित दोषी मालक किंवा कंत्राटदाराविरुद्ध वेठबिगार पद्धती (निर्मूलन) अधिनियमासह इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला जाईल.

नागरिकांना आणि स्वयंसेवी संस्थांना आवाहन:

जिल्ह्यातील सर्व नागरिक, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था (NGOs), उद्योग क्षेत्र आणि कंत्राटदारांनी वेठबिगार पद्धतीबाबत सतर्क राहावे. कुठेही असा गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, धुळे अथवा जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्रीमती सुर्यवंशी यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.