नंदुरबार तालुक्यातील ऑक्टोबर 2025 मधील पीक नुकसान भरपाईच्या रकमेचे वितरण प्रशासकीय स्तरावर सुरू झाले असून या प्रक्रियेअंतर्गत, लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) आणि पोर्टलवरील माहिती भरण्यासाठी 28 फेब्रुवारी 2026 ही अंतिम तारीख असून, त्यानंतर सर्व रक्कम शासनाकडे व्यपगत होईल व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही, अशी माहिती नंदुरबार तहसिलदार प्रदीप पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
सदर प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी गावातील नियुक्त ग्राम महसुल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांना माहिती संकलनाचे आदेश देण्यात आले आहेत. तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पुढील 4 दिवसांच्या आत खालील कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावीत:
• बँक पासबुकची छायांकित प्रत (बँक तपशीलासाठी)
• आधार कार्डची छायांकित प्रत
• आधार लिंक असलेला मोबाईल नंबर
विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही माहितीचा विचार केला जाणार नाही. जर एखाद्या शेतकऱ्याने वेळेत माहिती सादर केली नाही किंवा ई-केवायसी पूर्ण केली नाही आणि ते लाभापासून वंचित राहिले, तर त्यास सर्वस्वी संबंधित शेतकरी जबाबदार राहतील, असेही तहसिलदार श्री. पवार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
