
आगामी काही वर्षांत संगणक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता असलेले क्वांटम संगणन वेगाने विकसित होत असून जागतिक स्तरावर संशोधन व गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे. या प्रगतीमुळे भविष्यातील सायबर सुरक्षेसमोर गंभीर आव्हाने उभी राहत असून यासाठी ‘क्वांटम-सेफ’ म्हणजेच क्वांटम-सुरक्षित धोरणात्मक सज्जता आवश्यक असल्याचे मत आयबीएम रिसर्चचे संचालक अमित सिंघी यांनी व्यक्त केले.
क्वांटम संगणन ही केवळ तांत्रिक क्रांती नसून आर्थिक, औद्योगिक आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे. योग्य वेळी पावले उचलल्यास भारताला या क्षेत्रात आघाडी घेण्याची मोठी संधी उपलब्ध असल्याचे मत सिंघी यांनी यावेळी व्यक्त केले. जागतिक स्तरावर क्वांटम संशोधनात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असताना भारतात या क्षेत्रात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. २०३५ पर्यंत भारताला ‘क्वांटम सक्षम अर्थव्यवस्था’ बनविण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने ठेवले असून त्यासाठी रोडमॅप तयार करण्यात आल्याचेही सिंघी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर आदी उपस्थित होते.