(नंदुरबार) महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून, आता लाभार्थ्यांना दरमहा २ हजार ५०० रुपये अनुदान थेट बँक खात्यात हस्तांतरणाद्वारे (D.B.T. द्वारे) जमा होणार आहे. या वाढीव लाभासाठी आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले युडीआयडी कार्ड, (दिव्यांग प्रमाणपत्र) पोर्टलवर अपडेट करणे आणि आधार संलग्निकरण करणे अनिवार्य आहे, अशी माहिती नंदुरबारचे नायब तहसिलदार (संगायो) मदन कावळे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
पूर्वीच्या अनुदानात १ हजार रुपयांची वाढ करून ते आता २ हजार ५०० रुपये करण्यात आले आहे. नंदुरबार तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील ५४४ आणि श्रावणबाळ योजनेतील ५७ लाभार्थ्यांचे युडीआयडी (UDID) कार्ड व आधार कार्ड अद्याप लिंक नसल्याचे समोर आले आहे.
सर्व संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांनी आपली युडीआयडी (UDID) कार्डाची झेरॉक्स प्रत, आधार कार्ड क्रमांक आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत आदि कागदपत्रे गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे किंवा तहसील कार्यालय, नंदुरबार (संजय गांधी योजना शाखा) येथे २० मार्च २०२६ पूर्वी सादर करावे. तसेच अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार लाभार्थ्यांनी दिव्यांग युडीआयडी (UDID) पोर्टलवरून आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया देखील पूर्ण करून घ्यावी.
दिव्यांग लाभार्थ्यांनी या वाढीव लाभापासून वंचित राहू नये, यासाठी मुदतीपूर्वी कागदपत्रे सादर करावीत, असेही आवाहन नायब तहसीलदार (संगायो) श्री. कावळे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
