Home शेती गाव नकाशावरील अतिक्रमित झालेले शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे करून त्या ठिकाणी...

गाव नकाशावरील अतिक्रमित झालेले शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे करून त्या ठिकाणी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्ते तयार करण्यात येणार आहेत.

Encroached farm roads and Panand roads on the village map will be cleared and quality roads will be constructed in those areas.

अमरावती: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची शेतात ये-जा करण्याची अडचण दूर करण्यासाठी आणि शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजना’अमरावती जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारामाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज असून, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले.

या योजनेअंतर्गत गाव नकाशावरील अतिक्रमित झालेले शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे करून त्या ठिकाणी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्ते तयार करण्यात येणार आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी इच्छुक कंत्राटदारांकडून दि. 14 जानेवारी ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदा प्रक्रियेची जबाबदारी कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, अमरावती यांच्या कार्यालयाकडे सोपवण्यात आली असून, प्राप्त झालेल्या निविदा 27 जानेवारी 2026 रोजी उघडण्यात येतील.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, कामाचा दर्जा राखण्यासाठी आणि वेळेत रस्ते पूर्ण करण्यासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय जिल्हास्तरावर मशिनरीचे (अर्थमुव्हर उत्खनन यंत्रसामुग्री) प्रति तास दर निश्चित केले जाणार आहेत. यामध्ये खोदकाम यंत्रे, माती-मुरुम वाहतूक आणि रोड रोलरचा समावेश असून, डिझेलसह दरांचे कंत्राटदार पॅनल तयार केले जाणार आहे. या प्रशिक्षण वर्गाला उपजिल्हाधिकारी (महसूल व रोहयो), कार्यकारी अभियंता (सा.बां. विभाग व जि.प.), उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version