महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व ATMA यांच्या संयुक्त विद्यमाने वैजाली काथर्दे पुनर्वसन येथे ‘किसान गप्पा–गोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम प्रकल्प संचालक, ATMA श्री. दीपक पटेल व तालुका कृषी अधिकारी श्री. के. एस. वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथील विषय विशेषज्ञ श्री. उमेश पाटील आणि कृषी महाविद्यालयाचे श्री. कुणाल पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. लालसिंग वसावे, श्री. गणेश वसावे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मंडळ कृषी अधिकारी श्री. एस. बी. बागुल होते. यावेळी उप कृषी अधिकारी श्री. अशोक महिरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. रविंद्र बच्छाव तसेच सहाय्यक कृषी अधिकारी श्री. वाय. एस. मिस्त्री उपस्थित होते.
प्रास्ताविकात मंडळ कृषी अधिकारी श्री. एस. बी. बागुल यांनी पीक स्पर्धा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महाकृषिविस्तार AI ॲप, MahaDBT याबाबत सविस्तर माहिती दिली.
मार्गदर्शन सत्रात श्री. उमेश पाटील यांनी जमिनीचे आरोग्य, हरभरा व गहू पिकांच्या उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, बीजप्रक्रिया व पंचसूत्री तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले. योग्य तंत्रज्ञानाच्या अवलंबाने उत्पादनात लक्षणीय वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच शेतीपूरक व्यवसायांच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. श्री. कुणाल पाटील यांनी हरभरा पिकावरील एकात्मिक कीड–रोग व्यवस्थापन व अन्नद्रव्य व्यवस्थापनावर सविस्तर माहिती दिली.
परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष अडचणी मांडल्या असता तज्ज्ञांनी तत्काळ निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी श्री. योगेश मिस्त्री यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. रविंद्र बच्छाव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कृषी अधिकारी दीपिका ठाकरे, मंजुळा पवार, श्री. कृष्णाजी पाटील, पंकज देसले, कृषी मित्र नितीन पाटील, मधुकर पाटील, जितेंद्र पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
