(मुंबई) नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणी या गावाला ऐतिहासिक महत्व आहे. या गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास व मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत सांगितले. (fund for rawalapani tourism development)
आमदार राजेश पाडवी यांनी रावळापाणी या आदिवासी पाड्याच्या पर्यटन विकासासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. याबाबत मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणी या पाड्यात बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेअंतर्गत रस्ते बांधण्यात येणार आहेत. या पाड्यात पर्यटन विभागाच्या 30 मार्च 2017 रोजीच्या निर्णयान्वये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ऐतिहासिक, सामाजिक धार्मिक पर्यटन स्थळांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मुख्य इमारत, आवार भिंत, बाग-बगीचा, प्रवेशद्वार अंतर्गत सुशोभीकरण पाणीपुरवठा व स्वच्छता या बाबींचा अंतर्भाव असून मुख्य इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सहभाग घेतला.
रावलापाणी हे ठिकाण सातपुडा पर्वतातील तिसर्या पर्वतरांगेत वसलेले छोटसे गाव आहे. रावळापाणी येथे २ मार्च १९४३ साली १४ जणांवर ब्रिटिश अधिकारी कॅप्टन ड्युमन यांनी गोळीबार केला होता. स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक आदिवासी क्रांतीकारक शहीद झाले. स्वातंत्र्यासाठी लढा देणारे संत रामदास महाराज दि. २ मार्च १९४३ रोजी आपल्या अनुयायींसह (रंजनपूर) आताचे मोरवड येथे आले होते. याची भनक लागलेल्या इंग्रज सरकारने या आदिवासी क्रांतीकारांवर बेछुट गोळाबार केला. या घटनेत शेकडो आदिवासी क्रांतीकारक शहिद झाले होते. आजही या ठिकाणी दगडांवर गोळीबाराचे निषाण दिसून येतात. रावळापाणी ही शाहिदांची भूमी म्हणून ओळखली जात आहे. आदिवासी क्रांतीकारांची चळवळ नष्ट करण्यासाठी ब्रिटीश सरकारने बेछुट गोळीबार करुन अनेकांचे प्राण घेतले होते.
देशातील स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी वीरांच्या यादीत नंदुरबार जिल्ह्यातील गुलाम महाराज, रामदास महाराज व रावलापाणी हत्याकांडाचा देखील समावेश व्हावा अशी मागणी यापुर्वी आमदार राजेश पाडवी यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, दिल्ली यांच्याकडे केली आहे. मतदार संघातील विकासाच्या पायाभरणी बरोबरच जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जननायकांचा खऱ्या अर्थाने सन्मान व्हावा. येणाऱ्या पिढीला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहासातील आपल्या परिसरातील जननायकांचे समाजाला स्मरण व्हावे, यासाठी सातत्याने आग्रही भूमिका आमदार राजेश पाडवी घेत असतात. अशाच पद्धतीने राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, दिल्ली. यांनी जाहीर केलेल्या स्वातंत्र लढ्यातील देशातील आदिवासी वीरांच्या यादीत नंदुरबार जिल्ह्यातील गुलाम महाराजरामदास महाराज व रावळापाणी हत्याकांडाचा समावेश व्हावा अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांच्या वतीने करण्यात आली आहे. गुलाम महाराज व रामदास महाराज हे एक आदिवासी नेते भारतात ब्रिटिश राजवटी विरुद्ध प्रखरपणे लढा देऊन ब्रिटिश राजवटीला सळो की पळो करणारे शूर म्हणून ओळखले जात होते. तसेच 1943मध्ये रावळापणी हत्याकांड हि घडलेली एक भयानक घटना आहे. ब्रिटिश सैनिकांनी परिसरातील निरपराध आदिवासींना ठार केले. जालियनवाला बाग हत्याकांडचं सारखे दडपशाहीचे क्रूर कृत्य इंग्रजांनी त्यावेळी केले त्याचे सबळ पुरावे सरकारी संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत. अशा,नंदुरबार जिल्ह्यातील गुलाम महाराज, रामदास महाराज व रावलापाणी हत्याकांड यांची माहिती जगासमोर यावी व राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने याची नोंद घेऊन आपल्या यादीत समाविष्ट करावी अशी मागणी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश दादा पाडवी यांनी केली.