Home आरोग्य रुग्णांकडून कामाची पोचपावती मिळणे हीच खरी सेवा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

रुग्णांकडून कामाची पोचपावती मिळणे हीच खरी सेवा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

Getting acknowledgement of work from patients is the true service – Health Minister Prakash Abitkar

कोल्हापूर: कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून सेवांबाबत चांगल्या प्रतिक्रिया आणि समाधान व्यक्त व्हायला हवे, हेच आमच्या कामकाजाचे यश असेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे केले. शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आयोजित महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (ESIC) आणि संलग्न रुग्णालयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीत श्री. आबिटकर यांनी ईएसआय योजनेशी संलग्न असलेल्या खाजगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. विशेषतः रुग्णांना उपचार देताना उद्भवणारे प्रशासकीय अडथळे, प्रलंबित देयकांचे प्रश्न आणि तांत्रिक प्रक्रियेबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन देतानाच, त्यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावर त्वरित उपाययोजना करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

 कामगारांना आरोग्य सेवा देताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. विमाधारक कामगारांना अधिक व्यापक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज नव्याने पात्र ठरलेल्या २५ रुग्णालयांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. वैद्यकीय प्रशासन अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात यापूर्वी ६२ रुग्णालये संलग्न होती, आता या नवीन २५ रुग्णालयांच्या समावेशामुळे ही संख्या ८७ झाली आहे. या विस्तारामुळे कामगारांना आता अधिक खाजगी रुग्णालयांमध्ये ‘कॅशलेस’ आणि दर्जेदार उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रामुख्याने गंभीर आजारांवरील उपचारांसाठी कामगारांना आता स्थानिक स्तरावरच तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध होणार असून, यामुळे त्यांची आरोग्य सुरक्षा अधिक भक्कम झाली आहे.

या बैठकीला कोल्हापूरचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. मिलिंद चौधरी यांनी विभागाच्या कामकाजाचा अहवाल सादर केला. यावेळी संचालक डॉ. अशोक थोरात, प्रशासन अधिकारी डॉ. घोंडगे, बाळासो जाधव यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version