
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील कात्री गावातील सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या उपक्रमांना राज्य शासनाकडून मोठे प्रोत्साहन मिळणार असल्याचे संकेत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले. कात्री येथील अझोला युनिटला भेट देत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि महिला बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधत त्यांच्या कामाचे कौतुक केले.
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. या योजनेअंतर्गत महिलांना वैयक्तिक स्वरूपात ५० हजार रुपये तर महिला बचत गटांना ७.५० लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार असून राज्य स्तरावर या योजनेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
यावेळी मंत्री उईके यांनी सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनीने उभारलेल्या सिताफळ पल्पिंग युनिटलाही भेट देत सविस्तर माहिती घेतली. स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या सिताफळाचा पल्प तयार करून त्याची शीतगृहात साठवणूक केली जाते. त्यापासून सिताफळ आईस्क्रीम, कुल्फी यांसारख्या विविध खाद्यपदार्थांची निर्मिती केली जात असल्याची माहिती कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
या प्रसंगी आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा, नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबारचे कृषी तज्ञ डॉ.राजेंद्र दहातोंडे यांच्यासह नंदुरबार जिल्हा अधिकारी डॉ. मिताली शेट्टी मॅडम, व जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे साहेब व कर्मचारी उपस्थित होते.
आदिवासी भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांचा सामाजिक सन्मान वाढवणे हे शासनाचे ध्येय असल्याचे मंत्री डॉ.अशोक उईके यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी कंपनीचे अध्यक्ष सौ.अनिता संदिप वळवी, सचिव अरुणा मोहन वळवी, संचालक शिवा बोंडा वळवी, संचालक संदिप मोहन वळवी, संचालक सुभाष केल्ला पाडवी, सीईओ उदेसिंग रावल्या पाडवी, संयोजक नथमल भगतसिंग पटले, रविंद्र झिंग्या पाडवी, भरतसिंग पिसा पाडवी, माकत्या भुऱ्या वळवी, गुलाबसिंग जेगला वळवी, सीआरपी खाअल्या टेंबऱ्या वळवी,
कुवरसिंग रामदास वळवी, यशवंत रामदास वळवी, दिपक पोहल्या पाडवी, विनोद गुलाबसिंग वळवी तसेच महिला बचत गट व कात्री परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.