
राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दमणगंगा–वैतरणा–गोदावरी नदीजोड प्रकल्प, दमणगंगा–एकदरे– गोदावरी नदीजोड प्रकल्प तसेच कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा नदी खोऱ्यात वळविण्यासाठी सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जलसंपदा सचिव संजय बेलसरे, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोकणातील जलसमृद्ध खोऱ्यांमधील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून नाशिक व मराठवाडा भागातील पाणीटंचाई दूर करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील अतिरिक्त जमिनी पर्यावरणपूरक व पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून महामंडळाचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यात येणार आहेत. धरण क्षेत्रालगतच्या या जमिनी सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर विकसित व व्यवस्थापित करण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्यांत कार्यवाही सुरू झाली असून या धोरणानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.