Home महाराष्ट्र डोंगरी भागातील लोकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती देणारा ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव’...

डोंगरी भागातील लोकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती देणारा ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव’ – पालकमंत्री शंभूराज देसाई

'Koyna Daulat Dongri Festival' to give people in the hilly areas a taste of the cultures of various places – Guardian Minister Shambhuraj Desai

सातारा: मरळी तालुका पाटण येथे आयोजित कोयना-दौलत डोंगरी महोत्सवाच्या निमित्ताने डोंगरी भागातील लोकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने या परिसरातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांचाही अनुभव घेता येणार असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

कोयना-दौलत डोगरी महोत्सवाचे उद्‌घाटन पाटण तालुक्यातील नाडे येथे पालकमंत्री श्री. देसाई यांच्याहस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशानी नागराजन, प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पंचायत समिती सभापती सरिता पवार, उपसभापती विजय पवार, श्रीमती विजयादेवी देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवीराज देसाई, प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव आदी उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, या महोत्सवाच्या निमिताने डोंगरी भागातील नागरीकांना पर्यटनासोबतच राज्यातील विविध भागातील खाद्यसंस्कृती, कला यांचाही अनुभव महोत्सव कालावधीत घेता येणार आहे. तसेच शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये महिला बचत गटांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. याशिवाय बोटिंग, पॅराग्लायडिंग, संगीत कारंजे, लेझर शो, घोडा व उंट सफारी यांचाही अनुभव घेता येणार आहे.
नागरीकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री देसाई यांनी यावेळी केले.

तसेच २ ते ६ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या महोत्सवामध्ये शस्त्र प्रदर्शन, लावणी महोत्सव, पोवाडा सादरीकरण, मर्दानी खेळ, भजन किर्तन, ब्रास बँड पथक, हिंदी व मराठी संगीताचा सांस्कृतिक कार्यक्रम यांचाही समावेश आहे. या कार्यक्रमांचाही लाभ घ्यावा, असे सांगून महोत्सवादरम्यान सर्वांनी शिस्तीचे पालन करावे, महिला, लहान मुले, वृद्ध यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी असेही आवाहन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद शाळा नाडेच्या विद्यार्थ्यांनी शौर्य गीत सादर केले. तसेच उद्घाटन कार्यक्रम समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळांचे सादरीकरणही केले. यावेळी परिसरातील नागरिक विविध पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version