(तळोदा ) ग्रामपंचायत दसवड ता तळोदा येथे दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आझादी का अमृत महोत्सव समारोपीय ‘मेरी माटी मेरा देश’ राबविण्यात आले. यात ग्रामपंचायत मार्फत शिलाफलक तयार करणे, वसुंधा वंदन, अमृत वाटिका देशी रोपांची लागवड, चित्रकला / निंबध / रांगोळी स्पर्धा, पंचप्राण शपथ , देश वीरांना मातीचे दिवे लावून वंदन केले तसेच गावातील मातीचे पूजन करण्यात आले. ( ‘Meri Mati Mera Desh’ Campaign at Gram Panchayat Daswad)
सदर उपक्रमात लोकनियुक्त सरपंच सौ मोनिका ठाकरे, उपसरपंच श्री दीपक वसावे, सदस्य श्री सौरव ठाकरे, श्री नंदकीशोर ठाकरे, मुख्याध्यापक श्री उमेश पाडवी,ग्रामसेवक लिलेश्वर खैरनार, उपशिक्षक चेतन इंगळे , अंगणवाडी सेविका , आशा वर्कर, मदतनीस , शिपाई व समस्त ग्रामस्थ या अभियानात सामील झाले होते.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच आगामी काळात देशाची वाटचाल कशी असावी, यावर मंथन व्हावे, भविष्याचा वेध घेताना या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचेही स्मरण व्हावे आणि 2047 पर्यंत आपला देश विकसित देश म्हणून नावारुपाला यावा, यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे. आपल्या देशाच्या मातृभूमीविषयीची कायम कृतज्ञता आणि या वीरांना योगदानाचे स्मरण व्हावे म्हणून देशात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियान दिनांक 09 ऑगस्ट, 2023 पासून सुरु झाले आहे.
राज्यात ग्रामपंचायत, तालुकास्तर, जिल्हास्तर असे विविध उपक्रम त्यानिमित्त आयोजित केले जात आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकसहभाग अशा सर्वांचा सहभाग यामध्ये राहणार आहे. पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जात आहेत.
दिल्लीत ‘अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून 7500 कलशांमध्ये माती घेऊन ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येत असून ही ‘अमृत वाटिका’ ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या वचनबद्धतेचे प्रतीक असणार आहे. जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी नागरिक या संकेतस्थळावर अपलोड करू शकणार आहेत. या उपक्रमात सर्वांचा सक्रीय सहभाग आणि आपल्या देशाच्या वीरांप्रतीची कृतज्ञता प्रत्येकाने व्यक्त करावयाची आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या अमृतमहोत्सवी काळात देशाने अनेक बाबतीत उत्तुंग झेप घेतली आहे. आता विकसित देश बनण्याच्या दृष्टीने प्रत्येकाचे या देशासाठी योगदान, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, समृद्ध वारशाचा अभिमान, एकता आणि बंधुता टिकवणे, नागरिकाची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्यां प्रति आदर व्यक्त करणे यावर आधारित पंचप्रण प्रतिज्ञा या उपक्रमात घेण्यात येणार आहे.
केवळ एखादा कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता गाव ते शहरांपर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी याबाबत अभियान स्वरुपात कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या अभियानात ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसेच, नागरी भागात नगरपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका यांनी त्यांच्या स्तरावर अधिकाधिक लोकसहभागातून उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपीय उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान नंदुरबार जिल्ह्यातील ६३९ ग्राम पंचायतींमध्ये ९ ते ३० ऑगस्ट २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार आहे त्यासाठी जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत पातळीपर्यंतचे सुक्ष्म नियोजन करून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
त्यासाठी ग्रामसभा घेऊन सर्व कृती आराखडा तयार करुन ठराव करुन नियोजन करण्यात आलेले आहे. ९ ते १४ ऑगस्ट २०२३ या दरम्यान कोणत्याही एका दिवशी खालील शिलाफलक लावणे, वसुधरा वंदन, स्वातंत्र सैनिक/विरांना वंदन, पंचप्रण ( शपथ) घेणे, ध्वजारोहण कार्यक्रम असे ०५ उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या संदर्भात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब या प्रत्येक उपक्रमाच्या आयोजनात केला जाणार आहे. जि.प. च्या वतीने प्रत्येक कार्यक्रम निहाय आयोजनाचे पुढील प्रमाणे नियोजन करण्यात आले असल्याचे श्री. सावन कुमार यांनी कळविले आहे.
#nandurbar #nandurbarnews #nandurbardistrict #nandurbarjilla #MeriMatiMeraDesh