
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या १४३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन तसेच महिला प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नायगाव येथे उभे राहणारे उचित स्मारक हे त्यांच्या कार्याची आठवण देईल, त्यामुळे लढण्याची प्रेरणा तर मिळेलच परंतु समाजातील विषमतेच्या विरोधात क्रांतीची बिजे तयार होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महिलांना अधिकारिता देण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी येथे उभ्या राहणाऱ्या महिला प्रशिक्षण केंद्रात आवश्यक सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, हे शासन महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या मार्गाने चालण्याचे काम करेल, त्यामुळेच आम्ही मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याच्या योजनेला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले. महात्मा फुले यांनी समाजाला मोकळा श्वास देण्याचे काम केले. त्या अनुषंगाने मोफत उपचार देण्याच्या जन आरोग्य योजनेला महात्मा फुले यांचे नाव दिले. संत सावता माळी यांचे अरण येथील स्मारकही भव्य दिव्य करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक त्या व्यवस्था उभ्या करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
नायगावचे नाव सावित्रीबाई फुले यांच्या नावाने करण्याची मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. त्या अनुषंगाने ग्रामसभेने तसा निर्णय घेऊन ग्राम विकास विभागामार्फत पाठवल्यास त्याला विनाविलंब मान्यता देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नायगावच्या सरपंच स्वाती जमदाडे आदी उपस्थित होते.