
पुणे शहर व परिसरात औद्योगिकरण वाढत आहे. नागरीकरणाचा वेगही गतिमान आहे, अशा परिस्थितीत भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर विमानतळ कामाच्या आढावा बैठकीत दिले. विमानतळासाठी भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कालमर्यादेत पूर्ण करून विमानतळ विकासाचा मोठा टप्पा पार करावा,असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
राज्यातील विमानतळाचा विकास करण्याची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे आहे. कंपनीची क्षमता वृद्धी करून राज्यातील निर्माणाधीन असलेली सर्व विमानतळे विकासाकरिता कंपनीकडे देण्यात यावीत. पुरंदर विमानतळाच्या उर्वरित भूसंपादनाची अधिसूचना ‘एमआयडीसी’ने काढावी तसेच निधीची उपलब्धतेबाबत विशिष्ट पद्धत ठरवण्यात यावी. विमानतळ विकासासाठी निधी उपलब्धतेचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत आणावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, प्रधान सचिव (उद्योग) पी. अन्बळगन, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू आदी उपस्थित होते. दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी बैठकीत सहभाग घेतला.