Home महाराष्ट्र एसटी महामंडळाने प्रवाशांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

ST Corporation should focus on solving the problems of passengers - Deputy Chief Minister Sunetra Pawar

बारामती: बारामती आगारात नव्याने दाखल दहा  ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक स्मार्ट बससेवेचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील पायाभूत सुविधा विकासाला नेहमीच प्राधान्य दिले. त्यापैकीच एक आणि देशात मॉडेल बनलेल्या बारामती बसस्थानकाचा परिसर, बसमधील स्वच्छता राखणे, बस वेळेवर सोडण्यासह प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांच्या समस्या सोडविण्यावर राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) भर द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी दिले.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २०२५’ मध्ये अव्वल स्थान पटकावल्याबद्दल बारामती बसस्थानक येथे आयोजित एसटी महामंडळाच्या अधिकारी व  कर्मचाऱ्यांच्या अभिनंदन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, बारामती ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, एसटी महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया, गट विकास अधिकारी किशोर माने, न.प. मुख्याधिकारी पंकज भुसे, विभागीय कामगार अधिकारी सचिन भुजबळ, आगार व्यवस्थापक प्रविण शिंदे, माजी सहाय्यक वाहतूक अधिक्षक घनश्याम सदाशिव शिंदे यांच्यासह महामंडळाचे  कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २०२५’ मध्ये अव्वल स्थान पटकावल्याबद्दल बारामती बसस्थानकाला रुपये १ कोटींचे बक्षीस आणि स्मृतिचिन्ह मुंबई येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीकोनातून बारामती तालुक्यात विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. या कामांची निगा राखत तालुका विकासाच्या बाबतीत कायम प्रथमस्थानी राहण्यासाठी प्रयत्नशील राहावे. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या बसस्थानकाला राज्यास प्रथम बक्षीस मिळणे ही संपूर्ण बारामतीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे आता बारामतीच्या मानात आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे. या बक्षीसाच्या माध्यमातून नागरिकांची जबाबदारी वाढलेली आहे, असे सांगून त्यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बारामतीकरांचे आणि महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!
Exit mobile version