
शासनाच्या सर्व सेवांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे, कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा आणि सायबर सुरक्षा यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे यास शासनाचे प्राधान्य आहे. यासाठी सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत माहिती तंत्रज्ञान हा महत्वाचा विभाग आहे. राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सेवा या विभागामार्फत नागरिकांना पुरविल्या जातात. त्या सुविधा अधिक गतिमान पद्धतीने देण्यासाठी येत्या काळात माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.