
मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. चिरागनगर येथे त्यांच्या स्मारक व संशोधन केंद्राच्या उभारणीसह भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण हा त्या दिशेने महत्त्वाचा टप्पा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हे नाट्यगृह त्यांचा विचार आणि साहित्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, बृहन्मुंबईतील लोकप्रतिनिधी, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, महानगरपालिका समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, स्थानिक नगरसेवक यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.