
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा योजनानांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जनजीवन मिशन अंतर्गत महाड व माणगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत दिले.
जिल्हा परिषद रायगड यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत व नळ पाणीपुरवठा योजना अंतर्गत किती नळ जोडणी बाकी आहे याचा आढावा घेऊन त्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव द्यावा व त्यातून नळ पाणी पुरवठा योजनेची नळ जोडणी पूर्ण करून घ्यावी. रायगड जिल्ह्यामधील मंजूर योजनेमध्ये असलेल्या त्रुटी पूर्ण करून सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी व योजना पूर्ण कराव्यात, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.
बैठकीस रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन – नैनुटीया, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता मोहन सरावदे, आदी उपस्थित होते.
यावेळी दाभोळ व टोळा (बु), दासगाव – वहुर, खैरे व २१ गावे, पोलादपूर व १४ योजना यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.