
तसेच शहरातील अंतर्गत रस्ते विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे हे दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित राहिले. या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डी. गोविंदराज, मुंबई मनपा आयुक्त अश्विनी भिडे, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे, यांच्यासह एमएमआर क्षेत्रातील कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर,वसई – विरार, भिवंडी, पनवेल तर राज्यातील पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली मिरज कुपवाड, लातूर, नांदेड, अहिल्यानगर, अकोला, इचलकरंजी, सोलापूर यासह अन्य प्रमुख महानगरपालिकांचे आयुक्त या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमधून रस्त्यावरील खड्ड्यांच्या बाबतीत अनेक तक्रारी येत असून, या खड्ड्यांची माननीय उच्च न्यायालयानेदेखील दखल घेऊन ते तातडीने बुजवण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत. त्यामुळे शहरात जागोजागी पडलेले खड्डे तातडीने बुजवायला सुरुवात करावी असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व मनपा आयुक्तांना सांगितले. गणेशोत्सव हा राज्यातील एक प्रमुख उत्सव असून तो सुरू व्हायला अगदी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे त्यामुळे शहरातील रस्ते नवीन तंत्रज्ञानाची मदत घेऊन तातडीने बुजवावे असे आदेश शिंदे यांनी या बैठकीत दिले.