
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘व्हिजन फॉर क्वांटम टेक्नॉलॉजी इकोसिस्टम इन महाराष्ट्र’ या विषयावरील आयआयएसईआर, पुणे येथील क्वांटम टेक्नॉलॉजी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जग अतिशय वेगाने बदलत असून डेटा-आधारित अर्थव्यवस्थेपासून आता उच्च गतीच्या डेटा प्रोसेसिंगच्या युगात प्रवेश होत आहे. भविष्यातील जागतिक स्पर्धेत एआय, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान निर्णायक भूमिका बजावणार आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणेच क्वांटम क्षेत्रातही भारताने कुशल मनुष्यबळाच्या बळावर जागतिक नेतृत्व मिळविण्याची संधी साधली पाहिजे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय ‘क्वांटम मिशन’साठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याचे स्वतंत्र क्वांटम मिशन राबवत असून, प्रशिक्षित प्राध्यापकांच्या माध्यमातून राज्यात मजबूत क्वांटम इकोसिस्टीम उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील टप्प्यात ५०० प्रशिक्षक आणि त्यानंतर किमान ५ हजारांहून अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल बी. रेड्डी, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, आयसर, सी-डॅक तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे प्राध्यापक आणि अधिकारी उपस्थित होते.