
२१ ऑगस्ट ‘जलसंधारण दिन’ आणि १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ साजरा करण्याबाबत मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. माती आणि पाणी ही नैसर्गिक संसाधने असून त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक जनसहभाग आवश्यक आहे. राज्यातील नागरिक, विशेषतः युवकांमध्ये मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय ठेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांचा २१ ऑगस्ट हा जन्मदिन ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. मृद व जलसंधारण हे शेती, पर्यावरण आणि शाश्वत विकासाचा पाया आहे. माती आणि पाणी ही नैसर्गिक संसाधने परस्परांशी अवलंबून असून भविष्यातील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये याबाबतची जागरूकता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत – मंत्री राठोड
यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर उपस्थित होते, तर सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित अधिकारी दूरस्थ पद्धतीने सहभागी झाले होते.