नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयामार्फत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 साठीची नामांकन प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची नामांकने सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कारांतर्गत दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार (DDUPSVP) देण्यात येणार असून, ग्रामीण भागात शाश्वत विकासासाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण व परिणामकारक उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे.
ग्रामपंचायतींचे मूल्यमापन हे पंचायत प्रगती निर्देशांक (PAI 2.0) अंतर्गत सन 2023-24 मधील कामगिरीच्या आधारे करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारांनी त्यांच्या सर्वोत्तम ग्रामपंचायतींच्या यशोगाथा तसेच विकासकामांवर आधारित लघुपट (Short Videos) सादर करणे आवश्यक आहे.
इच्छुक ग्रामपंचायती व संबंधित संस्थांना आपला PAI स्कोअर pai.gov.in या पोर्टलवर पाहता येणार आहे. तर अधिकृत नामांकने panchayataward.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावीत, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या आणि स्थानिक पातळीवर परिवर्तन घडवून आणणाऱ्या नेतृत्वाचा योग्य सन्मान होणार असल्याचे पंचायती राज मंत्रालयाने नमूद केले आहे.
