Home महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत निंबूत येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत निंबूत येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

Deputy Chief Minister Ajit Pawar inaugurated various development works at Gram Panchayat Nimbut

बारामती, दि.३१: राज्याचा विकास हाच राज्य शासनाचा अजेंडा असून त्यादृष्टीने सर्वसमावेशक, शाश्वत, वेगवान विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. देशाच्या विकासाबाबत अग्रेसर असलेली महाराष्ट्राची परंपरा अधिक बळकट करूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

श्री. पवार यांच्या हस्ते निबूंत येथील जुन्या ग्रामपंचायत विहिरी शेजारील सभामंडप, मुस्लिम प्रार्थनास्थळ (मस्जिद) चे लोकार्पण, श्री भैरवनाथ देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत भक्तीनिवास, स्वच्छतागृह विविध विकासकामाचे भूमिपूजन आणि बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचे वितरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार नवाब मलिक, माजी खासदार राजू शेट्टी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, श्री भैरवनाथ देवस्थान व इतर देवस्थान ट्रस्ट व सतीशभैया कल्याणकारी संघाचे संस्थापक -अध्यक्ष सतीश काकडे देशमुख, सदस्य, ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, महात्मा गांधी यांच्या ‘ग्राम स्वराज्य’  संकल्पपूर्तीकडे वाटचाल करीत असताना गाव स्वयंपूर्ण केल्यास करुन देश आत्मनिर्भर होईल. याकरिता ग्रामपंचायतींना सक्षम करणे राज्य शासनाची जबाबदारी असून त्यादृष्टीने केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्याद्वारे गावाचा विकास करण्याचा करण्यावर भर देण्यात येत आहे.

ते पुढे म्हणाले, शेतकरी, कष्टकरी आणी सर्व सामान्य नागरिकांकरीता काम करण्यात येत आहे. कामगार वर्गाच्या कल्याणाकरिता राज्य शासन नेहमीच पुढाकार घेत आहे, कामागाराचे आरोग्य, शिक्षण, विमा, पाल्याच्या विवाह आदी विषयात त्यांना मदत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता प्राधान्य देण्यात येईल.

निबूंत ग्रामपंचायतीने विविध योजनांच्या माध्यमातून गावाचा विकास केला आहे. विकासकामे उत्तम, दर्जेदार करून गावाच्या वैभवात भर घालणारी वास्तू उभारण्यात आल्या आहेत. यापुढेही अशाप्रकारची दर्जेदार कामे करण्याकरिता निबूंत व परिसराच्या विकासाकरिता सहकार्य करण्यात येईल.

सहकारी चळवळ अधिक मजबूत करण्यासोबतच शेतकऱ्यांना अडीअडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्यशासन नेहमीच प्रयत्नशील आहे. सहकाराला अर्थ विभागाची जोड देवून सहकार चळवळ अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही श्री. पवार म्हणाले.

श्री. मलिक म्हणाले, ‘बारामती मॉडेल’च्या माध्यमातून मानवी जीवनात बदल घडविण्याकरीता उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यामुळे या मॉडेलची देशभरात चर्चा होत असते. बांधकाम मजुरांच्या कल्याणाकरिता राज्यशासन काम करीत आहे. निंबूत ग्रामस्थांनी समाजात धार्मिक, सामाजिक एकोपा प्रस्थापित करण्याचे काम करीत असल्याबद्दल श्री. मलिक यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन करुन कौतुक केले.

श्री. शेट्टी म्हणाले, निंबूत ग्रामस्थांनी आज सामाजिक एकोपा निर्माण करणारा कार्यक्रम आयोजित केला आहे, ही चांगली बाब आहे. राज्य शासनाने कर्जमाफीबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल श्री. शेट्टी यांनी आभार मानले.

श्री. काकडे यांनी प्रास्ताविकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग आणि निबूंत येथील विविध विकास कामाकरिता पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला आहे. ही कामे ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात येत असल्याचे श्री. काकडे म्हणाले.

error: Content is protected !!
Exit mobile version