(नवापूर) शबरी घरकुल योजना अंतर्गत ‘मागेल त्याला घर’ हे धोरण आदिवासी विकास विभागाने अंगिकारले असून जिल्ह्यातील सर्व बेघ नागरिकांनी या धोरणाचे संधीत रूपांतर करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. (Nandurbar News)
स्वातंत्र्यापासून आजपर्यंत देशाच्या आणि राज्याच्या सर्व महत्वाकांक्षी योजनांचा पथदर्शी जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे, त्याबरोबरच आता कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत नंदुरबार जिल्ह्याचा आदर्श राज्यासाठी निर्माण करू असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते आज नवापूर येथे शबरी घरकुल योजनेच्या आदेश वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती संगिता गावित, नवापूर पं.स. सभापती बबिता वसावे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी (नवापूर) चंद्रकांत पवार, गटविकास अधिकारी डी. एम.देवरे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, तसेच पदाधिकारी उपस्थित होते. (Shabri Gharkul Yojana) Distribution of Gharkul orders to 1314 homeless in Navapur Taluka under Shabari Gharkul Yojana
पालकमंत्री डॉ. गावित पुढे म्हणाले, येत्या दोन वर्षात केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या काही योजना जिल्ह्यातील नागरिकांसाठी आहेत, त्या सर्व योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांला होण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. एकही नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची ग्वाही देताना ते म्हणाले, स्वच्छ पाणी, चकचकीत रस्ते, स्वमालकिचे घर, दर्जेदार शिक्षण, रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारित शिक्षण, शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणतानाच प्रत्येक सामाजिक समुदायाला सर्व शासकीय योजनांचा लाभ, सोयीसुविधा देण्यासाठी सर्व पातळींवर प्रयत्न सुरू असून येणाऱ्या काळात राज्यातील विकासात आघाडीवर असलेल्या प्रथम तीन जिल्ह्यात नंदुरबार जिल्हा आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी मनोगत व्यक्त करत असताना केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची एक लेककल्याणकारी, समृद्ध व सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून प्रतिमा जगासमोर निर्माण झाली आहे,अशीच समृद्ध, सामर्थ्यवान प्रतिमा आपल्या जिल्ह्याची भविष्यात निर्माण करू, असेही त्या यावेळी म्हणाल्या.यावेळी १ हजार ३१४ लाभार्थ्यांना शबरी घरकुल योजनेच्या आदेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी केले.
आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा-मातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यात राहतात, अशा अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हयासाठी एकूण १२ हजार १९४ घरकुलांचे उदिष्ट देण्यात आले होते. त्यात नंदुरबार प्रकल्पसाठी ६ हजार ६३० शबरी घरकुलांचे लक्ष प्राप्त झाले होते. ३ हजार ५८३ घरकुलांचे उदिष्ट साध्य झाले असून उर्वरित ३ हजार ४७ घरकुले पंचायत समिती नंदुरबार, नवापुर, शहादा यांचेकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांनुसार मंजूर केली जाणार आहेत.
जिल्ह्यातील एकही बेघर नागरिक घरकुलापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व जाती-जमातीच्या नागरिकांना घरकुल देण्याचा निश्चय शासनाने केला आहे. ज्याला घर नाही, ‘ड’ यादीत नाव नाही अशा प्रत्येक नागरिकास घर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी अनुसूचित जातीच्या बांधवांसाठी रमाई घरकुल योजना, अनुसूचित जमातीसाठी शबरी घरकुल योजना, भटक्या विमुक्तांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजना, अस्पसंख्यांकांना स्वतंत्र योजनेतून व इतर मागसवर्गीय बांधवांसाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेतून ३ वर्षात १० लाख घरकुले दिली जाणार असून ज्यांनी कामगार कल्याण मंडळाकडे आपली नोंदणी केली आहे, त्या बेघर पात्र कामगार बांधवांना घरकुलासाठी २ लाख रूपये दिले जात आहेत, असेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले. (Shabri Gharkul Yojana)
आदिवासी समाजाचा बहुविध वारसा आणि संस्कृतीचे जतन करत त्यांना सक्षम करणे आणि त्यांचे हित जोपासण्यासाठी चालना देणे, हे केंद्र व राज्य शासनाचे ध्येय आहे. मागील वर्षभरात आदिवासी विकास विभागाने घेतलेल निर्णय असोत किंवा पुढील काळात घेण्यात येणारे निर्णय, या प्रत्येकाचा उद्देश हा आदिवासी समाजाचा विकास हाच आहे. आदिवासीची लोकसंख्या जास्त प्रमाणात असलेले नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य व केंद्र स्तरावरुन विविध योजना व उपक्रम राबविले जात आहेत. (Nandurbar News)