
मुंबई : जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त वांद्रे येथील कार्टर रोड ॲम्फीथिएटर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक जनसहभागाचे महत्त्व अधोरेखित करत, ‘आजच्या काळात पर्यावरण आणि विकास हे परस्परविरोधी नसून पर्यावरण म्हणजेच विकास आहे,’ असे प्रतिपादन केले.
आपल्या भाषणात राज्यपाल वर्मा म्हणाले की, त्यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात पर्यावरणवादी कार्यकर्ता म्हणून केली असून ईशान्य भारतातील संस्कृतीत ‘प्रकृती देवो भव’ ही भावना खोलवर रुजलेली आहे. निसर्ग हा दैवी अंश असलेला असून त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.
पूर्वी ‘पर्यावरण की विकास’ हा चर्चेचा विषय होता. मात्र आज शाश्वत विकासाची संकल्पना जगभर स्वीकारली जात असून पर्यावरण संरक्षणाशिवाय विकासाची कल्पनाच करता येत नाही. पर्यावरणीय असंतुलनाचा सर्वाधिक फटका समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांना बसतो. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही केवळ नैसर्गिक साधनसंपत्ती जपण्याची बाब नसून सामाजिक न्यायाची आहे, असे राज्यपालांनी नमूद केले.