Home आरोग्य राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ‘टीबीमुक्त मुंबई’ जनजागृती पदयात्रेला संबोधित केले

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ‘टीबीमुक्त मुंबई’ जनजागृती पदयात्रेला संबोधित केले

0
Governor Jishnu Dev Varma addressed the 'TB-free Mumbai' public awareness walkathon.

मुंबई विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि भामला फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त श्री नारायण गुरु महाविद्यालय, चेंबूर येथे याचे आयोजन करण्यात आले होते.

‘क्षयरोग (टीबी) केवळ वैद्यकीय विषय नसून समाजापुढील आर्थिक आणि सामाजिक आव्हान आहे. आधुनिक वैद्यकीय उपचारांनी टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर तपासणी, नियमित उपचार आणि व्यापक जनजागृतीच्या माध्यमातून ‘टीबीमुक्त मुंबई’ आणि ‘टीबीमुक्त भारत’ घडविण्यासाठी लोकचळवळ उभी करणे, काळाची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

मानवतेसाठी एक जात, एक धर्म आणि एक ईश्वर हा श्री नारायण गुरु यांचा संदेश आजही समाजाला समानता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याची प्रेरणा देतो. टीबीविरोधातील लढा अधिक प्रभावी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे. मुंबई आणि परिसरातील दोन कोटी नागरिकांपर्यंत टीबीविषयी योग्य माहिती पोहोचविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः तरुणांनी शॉर्ट फिल्म्स, पोस्टर्स, पॉडकास्ट आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून टीबीमधून बरे झालेल्या रुग्णांच्या प्रेरणादायी यशोगाथा समाजापर्यंत पोहोचवाव्यात. चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील कलाकारांनीही सामाजिक जबाबदारी स्वीकारून या अभियानाला बळ द्यावे. जनजागृतीचे हे कार्य कौतुकास्पद आहे. ही पदयात्रा केवळ जनजागृतीचा कार्यक्रम नसून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. शासन, स्वयंसेवी संस्था, आरोग्य यंत्रणा, विद्यार्थी, कलाकार आणि सामान्य नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘टीबीमुक्त महाराष्ट्र’ आणि ‘टीबीमुक्त भारत’ हे राष्ट्रीय ध्येय निश्चितपणे साकार होईल- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

अभिनेता राकेश बेदी, अभिनेता शिव ठाकरे यांनीही या पदयात्रेत क्षयरोगविषयक जनजागृती केली. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, भामला फाउंडेशनचे अध्यक्ष असिफ भामला, प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री व्यंकटाचलम, एनएसएसचे विशेष कार्य अधिकारी सुनील शिंदे, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक तसेच एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.

#क्षयरोग#क्षयरोगनियंत्रण#टीबी#पदयात्रा#टीबीमुक्तमहाराष्ट्र#टीबीमुक्तमुंबई#टीबीमुक्तभारत#EndTB#TBAwareness#NSS#TuberculosisAwareness