
‘नशामुक्त मुंबई’ अभियानात मुंबईकर, विशेषतः युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नशामुक्त समाज घडविण्यासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. या अभियानांतर्गत वर्षभर विविध उपक्रम होणार आहेत.
अमली पदार्थांच्या विळख्यात युवक सापडू नयेत यासाठी आणि समाजात नशामुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी शासनाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या अभियानाद्वारे शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, नागरिक तसेच विविध सामाजिक घटकांना जोडून नशामुक्त मुंबईचे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. नशेच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहणे आवश्यक असून, सुरक्षित आणि सशक्त मुंबई घडविण्यासाठी नागरिकांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा – मंत्री लोढा