
महर्षि गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने चतुर्वेद संमेलन तथा राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, वेदाचार्य रवींद्र पैठणे, प्रतिष्ठानचे संस्थापक, ब्रह्मर्षी पंडित शिवकुमार शर्मा, हरिद्वार येथील उत्तराखंड संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रमाकांत पांडे, केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नाशिक परिसराचे संचालक डॉ. नीलाभ तिवारी, धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार स्वागत समितीचे अध्यक्ष प्रा. जयंत भातांबरेकर, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दीप्ती देशपांडे आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले, युवकांनी आपली संस्कृती समजून घेण्यासोबतच जागतिक दर्जाचे शिक्षण घ्यावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० या दिशेने एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देते. आधुनिक विज्ञान आणि प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा यांचा समन्वय भारताला अधिक सामर्थ्यवान बनवू शकतो. महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान समर्पण भावाने वेदपरंपरेच्या संरक्षण व संवर्धनाचे कार्य करीत आहे. हे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे. ही संस्था युवकांना आपल्या मुळांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात हे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रतिष्ठानने राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांसोबत काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.