नंदुरबार येथे आयोजित केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात हजारो तरुणांनी सहभागी होत रोजगाराच्या संधींना गवसणी घातली. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नंदुरबार, कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, आणि गजमल तुळशिराम पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांनी एकत्र येऊन हा भव्य मेळावा आयोजित केला.
उत्साही विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावत रोजगाराच्या दिशेने पहिले पाऊल उचलले. या मेळाव्यात ११२३ विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपले कौशल्य सादर केले. त्यापैकी ३२ विद्यार्थ्यांची त्वरित निवड करण्यात आली, तर ५२६ विद्यार्थ्यांना पुढील मुलाखतीसाठी संधी देण्यात आली.
विशेष म्हणजे नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव आणि गुजरात येथील ३८ प्रतिष्ठित कंपन्यांनी मेळाव्यात भाग घेतला. या कंपन्यांनी तरुण प्रतिभेला ओळखून त्यांना करिअरची नवी दालने उघडली. उपस्थित उमेदवारांना सरकारी महामंडळांच्या विविध योजनांचीही माहिती देण्यात आली.
या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरु विजय माहेश्वरी, विधायक समितीचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी, सहायक आयुक्त विजय रिसे, मार्गदर्शन अधिकारी शंकर जाधव, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.