Home शैक्षणिक इयत्ता ११ वी प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरीची प्रक्रिया १२ ऑगस्टपासून

इयत्ता ११ वी प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरीची प्रक्रिया १२ ऑगस्टपासून

0
Process for the final special round of Class 11 admissions begins on August 12.

मुंबई – शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत १५ लाख ४५ हजार ६४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १३ लाख २६ हजार ३९७ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी १२ ऑगस्टपासून अंतिम विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिक्षण संचालनालयामार्फत कळविण्यात आले आहे.

या विशेष फेरीमध्ये विद्यार्थ्यांना किमान १० कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती नोंदविणे बंधनकारक असून प्रवेश अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ लॉक करणे आवश्यक राहणार आहे. तसेच १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन नोंदणी, अर्ज भरणे तसेच पसंतीक्रम निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

वेळापत्रकानुसार १७ ऑगस्ट रोजी प्रवेशाची अंतरिम यादी जाहीर करण्यात येणार असून १८ ऑगस्ट रोजी वाटप यादी प्रसिद्ध होईल. वाटप झालेल्या विद्यार्थ्यांनी १८ ऑगस्ट सकाळी ११ वाजल्यापासून २० ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा. कोटा प्रवेश प्रक्रियेसाठीही स्वतंत्र कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी अंतिम विशेष फेरीच्या वेळापत्रकाची नोंद घेऊन सर्व कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत पोर्टल mahafyjcadmissions.in ला भेट द्यावी किंवा हेल्पलाईन क्रमांक ८५३०९५५५६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.