
नवी दिल्ली : मराठी भाषेचा जागतिक विस्तार करण्यासह देशाच्या राजधानीत मराठी भाषा, संस्कृती व परंपरेचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यासाठी कार्य करणाऱ्या दिल्लीतील सर्व मराठी मंडळांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे राहिल, अशी ग्वाही मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
येथील महाराष्ट्र सदन येथे मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली व परिसरातील विविध मराठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राज्यसभा खासदार रामराव वडकुते, कर्नाटकचे आमदार डॉ. मारोतीराव मुळे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार आणि समन्वयक लेशपाल जवळगे यांसह दिल्ली व परिसरातील मराठी मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत दिल्लीतील मराठी मंडळींचे संघटन, सार्वजनिक गणेशोत्सवाचे नियोजन, मराठी भाषा व संस्कृतीचे जतन, तसेच मराठी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी दिल्लीमध्ये सुमारे साडेचार लाख मराठी भाषिक वास्तव्यास असून त्यांनी राजधानीत आपले स्वतंत्र सांस्कृतिक अस्तित्व निर्माण केले असल्याचे सांगितले. मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत संस्थांना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक व संस्थात्मक पाठबळ मिळावे, अशी मागणी त्यांनी मंत्री सामंत यांच्याकडे केली.