
महेश पाटील, नंदुरबार: बाहेरगावी आश्रम शाळेत शिकणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी आई वडील गावाहून निघाले. मात्र रस्त्यातच काळाने घाला घातला. पिकअपच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे या आई-वडिलांचे मुलाला भेटण्याची इच्छा अपूर्णच राहिली.
मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील विसरवाडीजवळील आमलीपाडा येथील रहिवासी संदीप दासू गावित हे विसरवाडी येथील महापारेषण के. व्हि. केंद्रात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मुलगा येवला येथील एका नामांकित आश्रम शाळेत इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. संदीप दासू गावित (वय ३५) आणि त्यांच्या पत्नी आशा संदीप गावित (वय ३२) हे दाम्पत्य दुचाकीने ( क्र. एम. एच.39, ए. एफ.2840) येवला येथील शाळेत शिकणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी जात होते. सटाणा ते ताराबाद दरम्यान असलेल्या ढोलबारे परिसरातून जात असताना पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात संदीप दासू गावित व आशा संदीप गावित या दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलीस स्टेशनचे कर्मचारी निंबा खैरनार आणि गणेश गरुड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कल्पेश निकम व चंद्रकांत देवरे यांच्या रुग्णवाहिकेतून दोघांना सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
संदीप गावित हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. या घटनेची माहिती बाल अमराई आणि आमलीपाडा गावांत मिळताच परिसरात शोककळा पसरली आहे. नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या अपघाताप्रकरणी सटाणा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत वाहनधारकाचा शोध सुरू होता.