(नंदुरबार) तोरणमाळ फेस्टिव्हल हे नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या पर्यटनाचे प्रतीक असून, प्रशासनाने या महोत्सवाच्या माध्यमातून पहिले तोरण बांधले आहे. आगामी काळात तोरणमाळ फेस्टिव्हल अधिक भव्यदिव्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याच्या प्रतिक्रिया मान्यवरांनी तोरणमाळ फेस्टिव्हल उद्घाटनाच्या प्रसंगी व्यक्त केल्या.
जिल्ह्यातील पहिल्या वहिल्या तीन दिवसीय तोरणमाळ फेस्टिव्हलचे उद्घाटन आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर, नियोजन अधिकारी शशांक काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वर पवार, धडगावचे प्रभारी गटविकास अधिकारी संगीता नाईक, तोरणमाळ वन अधिकारी महेश चव्हाण, कांतीलाल टाटीया, सिताराम पावरा तसेच स्थानिक गावांचे सरपंच उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार आमश्या पाडवी यांनी तोरणमाळची ओळख जुनी असून, येथे भरणाऱ्या यात्रेसाठी पाच लाखांहून अधिक लोक येत असल्याचे सांगितले. गुजरात, मध्यप्रदेशसोबतच जिल्ह्यातील स्थानिक पर्यटकांनीदेखील येथे पर्यटनाचा आनंद घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जिथे अधिकारी चांगले असतील आणि त्यांचे विचार सकारात्मक असतात, तिथे विकास नक्की घडतो. त्यामुळे यंदा तोरणमाळच्या विकासाची प्रचिती येथील ग्रामस्थांना आल्याखेरीज राहणार नाही, असा विश्वासदेखील आमदार आमश्या पाडवींनी व्यक्त केला. तोरणमाळमध्ये अशा प्रकारच्या महोत्सवाची गरज होती, त्यामुळे सुरुवात झाली असून आता पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तोरणमाळच्या पर्यटन विकासासाठी राज्याच्या पर्यटन मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. पर्यटन मंत्र्यांनीदेखील येथील पर्यटन स्थळांचे सर्वेक्षण केले आहे. तसेच केंद्र शासनाला तोरणमाळच्या विकासासाठी सादर केलेल्या 100 कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळाल्यास या पर्यटन क्षेत्राचा कायापालट होणार असल्याचा विश्वास आमदार आमश्या पाडवी यांनी व्यक्त केला.
या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटन वाढीस चालना मिळून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होऊन स्थलांतर रोखण्यास मोठी मदत होईल, असा विश्वासदेखील आमदार आमश्या पाडवी यांनी व्यक्त केला. तोरणमाळचा यशवंत तलाव हा शेकडो लोकांना उपजीविका देणारा असून या तलावातील गाळदेखील उपसण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी सांगितले की, या महोत्सवासाठी आम्ही खूप दिवसांपासून तयारी करत होतो. तोरणमाळमध्ये सुविधा तोकड्या असतानाही ग्रामस्थांच्या मदतीने गावाचा विकासात्मक कायापालट करण्यासाठीच या महोत्सवाचे आयोजन हा प्रमुख उद्देश आहे. तोरणमाळ फेस्टिव्हल हा फक्त तोरणमाळपुरता मर्यादित नसून तो जिल्ह्याच्या पर्यटनाचे प्रतीक असल्याने येथे विकासाचे टिकाऊ मॉडेल उभे करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. 2026 हे वर्ष तोरणमाळच्या विकासाचे वर्ष असणार असल्याचे सांगत स्थानिकांनी या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या आदिवासी संस्कृती, बोलीभाषा व परंपरेचे दर्शन आपल्या कलेतून पर्यटकांना घडवून तोरणमाळची ओळख निर्माण करण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले.
खरंतर अतिशय खडतर भौगोलिक परिस्थिती असलेल्या तोरणमाळमध्ये स्थानिकांनी दाखवलेला उत्साह आणि पाठबळ यांच्या जोरावरच तोरणमाळ फेस्टिव्हल यशस्वी होत असल्याचे मत जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांनी व्यक्त केले. पहिल्या वर्षात या महोत्सवात काही कमतरता राहिल्या असतील तर आगामी काळात त्या सर्व भरून काढण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनातर्फे केला जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
विशेष म्हणजे पारंपरिक आदिवासी ढोल आणि वाद्ये मान्यवरांच्या हस्ते वाजवून पारंपरिक आदिवासी पद्धतीने या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक आदिवासी कलाकारांनी आपापल्या भागातील आदिवासी नृत्याविष्कार सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
या महोत्सवात स्थानिक महिला बचत गटांसह जिल्ह्यातील महिला बचत गटांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच आदिवासी खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी स्थानिक महिला बचत गटांना खाद्य स्टॉलदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या महोत्सवात आदिवासी संस्कृती आणि निसर्गाशी निगडित बांबूपासून अनेक वस्तू, शोभेच्या वस्तू तसेच स्टेज पोडियमदेखील नैसर्गिक पद्धतीने बनविल्याचे दिसून आले.
या महोत्सवाच्या निमित्ताने तोरणमाळच्या झिप लाईन सुविधेचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून पर्यटकांना आता झिप लाईन सुविधेचा आनंदही घेता येणार आहे.
