चांद्रयान-3 हे इस्त्रो (ISRO) भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे तिसरे अभ्यासात्मक चांद्र यान हे बुधवार, 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. त्यामुळेच चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला. सोबतच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. (Nandurbar News)
चांद्रयान 3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर होणाऱ्या लॅंडींगच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरनसिंगच्या माध्यमातून इस्रोच्या टीमसोबत सहभागी झाले होते. चांद्रयानच्या यशस्वी लॅंडींगनंतर लगेचच, पंतप्रधानांनी इस्रोच्या टीमशी संवाद साधला आणि या ऐतिहासिक यशासाठी त्यांचे अभिनंदन केले.
आपल्या शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमाने आणि प्रतिभेने भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचला आहे, जिथे आजपर्यंत जगातील कोणताही देश पोहोचू शकलेला नाही. आजपासून आता चंद्राशी संबंधित मिथके बदलतील, कथाही बदलतील आणि नव्या पिढीसाठी म्हणीही बदलतील. भारतात आपण सगळे पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो. कधी म्हटले जात असे, “चंदा मामा बहुत ‘दूर’ के हैं” पण आता हा दिवसही येईल, जेव्हा भारतातली मुलं म्हणतील, – ‘चंदा मामा बस एक ‘टूर’ के हैं’ !
आजच्या ह्या आनंदाच्या प्रसंगी, मला जगभरातील लोकांना, प्रत्येक देशातील, प्रत्येक प्रदेशातील लोकांनाही काही सांगायचे आहे. भारताचे हे यशस्वी चांद्रयान अभियान केवळ भारताचे एकट्याचे नाही. ह्या वर्षात आपण सगळे भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचे साक्षीदार आहोत. आमचा दृष्टिकोन, “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” हा असून जगभरात आता त्याचा नाद घुमतो आहे. आम्ही ज्याचे प्रतिनिधित्व करतो आहोत, अशा या मानवकेंद्री दृष्टिकोनाचे जगभर स्वागत होत आहे. आमचे चांद्रयान अभियान देखील, याच मानवकेंद्री दृष्टिकोनावर आधारलेले आहे. म्हणूनच, हे यश, संपूर्ण मानवतेचे यश आहे. आणि हे यश भविष्यात इतर देशांनाही त्यांच्या चांद्र मोहिमा यशस्वी करण्यात मदत करेल. मला विश्वास आहे, की जगातील सर्व देश, ज्यात ग्लोबल साऊथ मधील देशांचाही समावेश आहे, त्यांच्यातही असे यश मिळवण्याची क्षमता आहे. आपण सगळेच चंद्राची आणि त्याच्या पलिकडची इच्छा बाळगू शकतो.
चांद्रयान महाअभियानाचे हे यश, भारताच्या उड्डाणाला चंद्राच्या कक्षेच्याही पलीकडे घेऊन जाईल. आम्ही आपल्या सौरमालिकेच्या सीमांचे सामर्थ्यही आजमावणार आहोत, आणि मानवासाठी ब्रह्मांडाच्या असीम संधी प्रत्यक्षात साकार करण्यासाठी देखील आम्ही काम करणार आहोत.
आम्ही भविष्यासाठी अनेक मोठी आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवली आहेत. सूर्याचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी इस्रो लवकरच ‘आदित्य एल-1’ मोहीम सुरू करणार आहे. यानंतर शुक्र हे देखील इस्रोच्या उद्दिष्टांपैकी एक आहे. गगनयानद्वारे, देश आपल्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत पुन्हा पुन्हा हेच सिद्ध करत आहे, की ‘ ‘स्काय इज नॉट द लिमिट’
विज्ञान आणि तंत्रज्ञान हा देशाच्या उज्ज्वल भविष्याचा आधार आहे. त्यामुळेच आजचा दिवस देशाच्या कायम स्मरणात राहील. हा दिवस आपल्या सर्वांना उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देईल. हा दिवस आपल्याला आपले संकल्प साध्य करण्याचा मार्ग दाखवेल. पराभवातून बोध घेऊन विजय कसा मिळवला जातो, याचे प्रतीक म्हणजे हा दिवस. देशाच्या सर्व शास्त्रज्ञांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन, आणि भविष्यातील अभियानांसाठी अनेक शुभेच्छा! मनःपूर्वक धन्यवाद!
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चांद्रयान-3 अंतराळयानाचे निर्विघ्न उतरण पूर्ण झाल्यानंतर सुमारे चार तासांनंतर प्रतिमा शेअर केल्या. लँडरच्या कॅमेर्याने चार प्रतिमांचा पहिला संच चंद्राच्या पृष्ठभागाजवळ असल्याने घेतला होता. ( Image Source : ISRO )
प्रज्ञान नावाचा छोटा रोव्हर चांद्रयान-3 वर तैनात आहे आणि तो चंद्रावरील रोमांचक प्रदेशाचा शोध सुरू करणार आहे.त्यामुळे आणखी अनेक आकर्षक प्रतिमा चंद्रावरुन लवकरच येण्याची शक्यता आहे. तथापि, रोव्हर आणि लँडर दोन्ही दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ कार्यरत राहण्याची शक्यता नाही.
विक्रम लँडरच्या चंद्राच्या पृष्ठभागावरील यशस्वी लँडिंगचे थेट प्रक्षेपण पाहिल्यानंतर,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इस्त्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि चांद्रयान-3 मोहिमेशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन केले आहे. आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, “असे काही दिवस असतात जेव्हा इतिहास घडतो. आज, चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीरित्या उतरल्यामुळे, आपल्या शास्त्रज्ञांनी केवळ इतिहासच नव्हे, तर भूगोलाच्या संकल्पनेचीही पुनर्निर्मिती केली आहे! हा खरोखरच एक महत्त्वाचा प्रसंग आहे. या अविस्मरणीय घटनेचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. इस्त्रो आणि या अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे मी अभिनंदन करते, आणि पुढील यशासाठी त्यांना शुभेच्छा देते. चांद्रयानचे यश हे संपूर्ण मानवजातीचे मोठे यश आहे, असे मला वाटते. भारताने मानवतेच्या सेवेसाठी आधुनिक विज्ञानाबरोबरच आपल्या समृद्ध पारंपरिक ज्ञानाच्या पुंजीचा कसा वापर केला आहे, याचे हे उदाहरण आहे.”
इतर लोक स्वप्नरंजनात गढले असताना, चांद्रयान 3 ने स्वप्न साकार केले आहे. तिरंगा चंद्राच्या अवकाशात डौलाने फडकत आहे आणि भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार करत आहे , ‘स्काय इज नॉट द लिमिट’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका संक्षिप्त निवेदनात डॉ जितेंद्र सिंह यांनी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ, मोहिमेचे संचालक मोहन कुमार आणि इस्रोच्या संपूर्ण टीमचे चंद्रावर दक्षिण ध्रुवीय प्रदेशात सर्वप्रथम सॉफ्ट लँडिंगचा मान भारताला मिळवून दिल्याबद्दल कौतुक केले. आतापर्यंत अन्य कोणत्याही अंतराळ मोहिमेला हे यश मिळाले नाही.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन आणि बारीकसारीक तपशील सुनिश्चित करण्यासाठी कित्येक महिने आणि वर्षे रात्रंदिवस काम करताना किती सातत्यपूर्ण मेहनत, कठोर परिश्रम, बांधिलकी आणि तळमळ असते हे समजून घेणे सामान्य नागरिकांसाठी कठीण गोष्ट आहे असे ते म्हणाले.
आजच्या यशस्वी कामगिरी नंतर डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, अंतराळ क्षेत्रात जगातील आघाडीचे राष्ट्र म्हणून भारताने आपले स्थान आणखी भक्कम केले आहे. भारताचे अंतराळ क्षेत्र “खुले ” करून भारताच्या अंतराळ शास्त्रज्ञांना त्यांचे संस्थापक जनक विक्रम साराभाई यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सक्षम बनवण्याचे आणि भारताच्या प्रचंड क्षमता आणि प्रतिभा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि जगासमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याचे संपूर्ण श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. आता यापुढील प्रवासाचा क्रम सांगताना, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, चांद्र दिन पुढील 14 दिवस राहील, तोपर्यंत विक्रम आणि प्रग्यान वरील प्रयोग चालतील आणि सर्व उपकरणांमधून जास्तीत जास्त माहिती संकलित केली जाईल.