
राज्यशासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत आहे. उद्योगाला चालना देत विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून त्यात एक्सएसआयओ कंपनीने महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ.आशिष देशमुख आणि आमदार चरणसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल ॲण्ड लॉजिस्टिक पार्क चे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल आदी उपस्थित होते.
भारतासारख्या लोकशाही देशाला ग्लोबल सप्लाय चेनमध्ये सशक्तपणे उभे करण्यासाठी निर्मिती क्षेत्र अधिक बळकट करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या उद्योगस्नेही धोरणामुळे राज्यात निर्मिती क्षेत्र नवे वळण घेत आहे त्यात सकारात्मक बदल घडत आहेत. निर्मिती क्षेत्राला ऑटोमेशन, एआय व अन्य तंत्रज्ञानाद्वारे गती मिळत आहे.
ग्लोबल कॅपिबिलिटी सेंटरमध्ये देशाला व महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी व तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे ध्येय देशासमोर ठेवले असताना हे साध्य करण्यासाठी एक्सएसआयओ सारख्या उद्योग समूहाची भूमिका महत्त्वाची ठरते. आर्थिक स्थितीत महाराष्ट्र हे जगात ३० व्या क्रमांकावर आहे. येत्या काळात देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने महाराष्ट्र प्रयत्नरत आहे. त्यासाठी शासनाने रोडमॅप तयार केला आहे यास प्रत्यक्षात आणण्यात आजच्या लॉजिस्टिक पार्कची महत्त्वाची भूमिका आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातील औद्योगिक पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या पार्कच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. हे पार्क ७०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीतून साकारले जात आहे. तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे राज्यातील पहिलेच ‘इंटेलिजन्स-इंटिग्रेटेड’ औद्योगिक संकुल आहे. या प्रकल्पामुळे नागपूर आणि परिसरात सुमारे २,५०० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.