Home नंदुरबार जिल्हा नंदुरबारवासीयांना बारमाही व 24 तास पाणी देण्यासाठी प्रयत्नशील-डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबारवासीयांना बारमाही व 24 तास पाणी देण्यासाठी प्रयत्नशील-डॉ. विजयकुमार गावित

Dr Vijaykumar Gavit Nandurbar

(नंदुरबार) नंदुरबार शहर व परिसरातील खेड्यांमधील वाढते शहरीकरण, लोकसंख्या व गेल्या तीन वर्षांपासून झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे नंदुरबार शहर, आसपासच्या ग्रामीण क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणी पातळीत सातत्याने घट होत असल्याने, नंदुरबार शहरासाठी तापी नदीवरून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच वर्षभरात या योजनेला मंजूरी घेऊन नंदुरबारवासीयांना बारमाही, 24 तास पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती, राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

विरचक धरणात अतिशय कमी जलसाठा : डॉ. विजयकुमार गावित

ते या संदर्भात नंदुरबार शासकीय विश्रामगृहात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले की, यंदा पर्जन्यमान कमी असून नंदुरबार शहराला व आसपासच्या ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करण्याऱ्या स्रोतांमध्ये व प्रामुख्याने विरचक धरणात जलसाठा अतिशय कमी आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षात शहराला एक किंवा दोन दिवसाआड पाणी पुरवठा होताना दिसतो. शहराची वाढती लोकसंख्या आणि त्याचबरोबर शहरानजीकच्या ग्रामीण भागाचे मोठ्या प्रमाणावर होणारे नागरीकरण त्यामुळे एकट्या विरचक धरणावर येणाऱ्या काळात अवलंबून राहता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जीवन प्राधिकारणाचे अधिकारी यांना तापी नदीवरून नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचा आराखडा तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या वर्षाच्या आत या योजनेला शासनाची मंजूरी घेवून, नंदुरबार शहराचा पाणी प्रश्न शाश्वत स्वरूपात सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ( Nandurbar News )

Dr Vijaykumar Gavit Nandurbar

तापी नदी हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे, त्याचा उपयोग भविष्यकाळासाठी करून घेण्यात येईल

आपल्या जिल्ह्यातून तापी नदी वाहते, गेल्या कित्येक वर्षांपासून या नदीने आपल्याला सुजलाम-सुफलाम केले आहे. जिल्ह्यातील शहादा, तळोदा यासारख्या शहरांनाही तापी नदीवरून पाणी पुरवठा केला जातो. नंदुरबार हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने त्यासाठीही तापी नदी हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे, त्याचा उपयोग भविष्यकाळासाठी करून घेण्यात येईल. तसेच येणाऱ्या काळात तापी नदीवरून ग्रामीण भागासाठी काही विभागीय पाणी पुरवठा योजना प्रस्तावित असल्याचेही मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले. टंचाई लक्षात घेवून पेयजल व ‘रोहयो’ चे नियोजन करावे. ( Nandurbar News )

जिल्ह्यात टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

जिल्ह्यात झालेल्या अल्प पावसामुळे टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पाणी पुरवठा विभाग, कृषि, पशुसंवर्धन, पाटबंधारे विभाग यांना पेयजलाची परिस्थिती, गरजेचा अंदाज घेवून नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच टंचाईचा अंदाज घेऊन रोजगार हमीची कामे सुरू करण्याचेही नियोजन करण्याचे निर्देश दिले असल्याचे मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री म्हणाले…
💧वाढते शहरीकरण व कमी पर्जन्यमानामुळे विरचक धरणाचा जलस्रोत अत्यल्प
💧नंदुरबार शहरासाठी स्वतंत्र तापी पाणी पुरवठा योजना तयार करणार
💧बारमाही व 24 तास पाणी नंदुरबारवासीयांना मिळणार
💧 वर्षभराच्या आत नवीन पाणी पुरवठा योजनेच्या आराखड्यास शासनाची मान्यता घेणार
💧तापी नदीवरून ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या विभागीय योजनांचीही आखणी करणार
💧 शहादा, तळोदा पाठोपाठ आता नंदुरबार शहरासाठीही तापी नदीवरून पाणी पुरवठा योजना
💧 टंचाईचा अंदाज घेवून पेयजल व ‘रोहयो’ च्या कामांचे नियोजन करण्याच्या सूचना

error: Content is protected !!
Exit mobile version