
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या काही महत्त्वपूर्ण उपक्रमांचा हा आढावा.
१. एकल महिलांचा आधार : सन्मान आणि सुरक्षा
समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक असलेल्या एकल महिलांच्या (विधवा, परितक्त्या व अविवाहित) जीवनात सन्मान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद गडचिरोलीने विशेष मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील सुमारे २५ हजार एकल महिलांचे सर्वेक्षण करून त्यांच्या गरजांचे मूल्यांकन करण्यात येत आहे. या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तालुका व बिट स्तरावर विशेष मेळावे आयोजित केले जात आहेत. या मेळाव्यांमध्ये शासनाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून महिलांच्या समस्या ऐकून त्यांचे मार्गदर्शन करतात.
२. मिशन संपूर्ण : कुपोषणाविरुद्ध प्रभावी लढा
पेसा क्षेत्रातील गर्भवती व स्तनदा मातांसाठी राबविण्यात येणारी ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना’ जिल्ह्यातील मातांसाठी मोठे वरदान ठरत आहे. मात्र गडचिरोली जिल्हा परिषदेने एक पाऊल पुढे टाकत WCL CSR च्या माध्यमातून पेसा क्षेत्राबाहेरील महिलांनाही या योजनेचा लाभ देण्याचे नियोजन केले आहे. ‘मिशन संपूर्ण’ अंतर्गत जिल्ह्यातील एकही माता पोषक आहारापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
३. उमेद अभियान : १५ हजार बचत गट, दीड लाख स्वप्ने
ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण आणि कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीसाठी राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान (NRLM) महाराष्ट्रात “उमेद अभियान” या नावाने राबविण्यात येत आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासी व दुर्गम जिल्ह्यात या अभियानाने महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.
उमेद अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण गरीब महिलांना स्वयं-सहाय्य बचत गटांमध्ये संघटित करून त्यांना आर्थिक, सामाजिक आणि नेतृत्व विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. बचत, कर्ज, लघुउद्योग, अन्नप्रक्रिया, हस्तकला, शेतीपूरक व्यवसाय तसेच बाजारपेठ उपलब्धता यांसारख्या विविध माध्यमांतून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आज जिल्ह्यातील हजारो महिला कुक्कुटपालन, मत्स्यपालन, बकरीपालन, अन्नप्रक्रिया आणि विविध लघुउद्योगांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालत आहेत. विविध उपजीविका उपक्रमांना चालना देण्यासाठी खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी, बँक कर्ज तसेच प्रभाग संघांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
यासोबतच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पीएमईजीपी, पीएमएफएमई, जिल्हा खनिज प्रतिष्ठान, मानव विकास योजना आदी विविध योजनांची सांगड घालून महिलांच्या आर्थिक विकासाला चालना दिली जात आहे.
महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रदर्शने, मेळावे, बाजारपेठ जोडणी कार्यक्रम तसेच ऑनलाईन विक्रीची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
तसेच ज्या महिलांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले असून त्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ शकल्या नाहीत, अशा महिलांना किमान दहावीपर्यंतचे शिक्षण देण्याचा अभिनव उपक्रमही राबविण्यात येत आहे. महिला शिक्षित झाल्यास तिच्या कुटुंबातील पुढील पिढीलाही शिक्षणाची प्रेरणा मिळते, या विचारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्हा खनिज प्रतिष्ठान, जिल्हा परिषद आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदिशा प्रकल्प (नवी सुरुवात)’ माध्यमातून महिलांच्या व्यवसाय वृद्धीसाठी आर्थिक पाठबळ देण्यात येत आहे. मालवाहतूक व प्रवासी वाहतूक साधने उपलब्ध करून देऊन महिलांच्या उद्योजकतेला चालना दिली जात आहे.
आज गडचिरोलीतील महिला केवळ बचत गटांच्या सदस्य राहिलेल्या नाहीत, तर उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक संघांच्या संचालक मंडळावरही सक्रिय भूमिका बजावत आहेत. दुर्गम भागातील महिलाही व्यवसायिक उपक्रमांमध्ये आत्मविश्वासाने पुढे येत असून त्या स्थानिक तसेच इतर तालुक्यांमध्येही आपल्या उत्पादनांची विक्री करत आहेत.
४. कुपोषणमुक्त आणि रक्तक्षयमुक्त गडचिरोली
महिला व बालकांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष उपक्रम राबविले आहेत.
किशोरवयीन मुली व महिलांची नियमित तपासणी करून जिल्हा रक्तक्षयमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
अति कुपोषित बालकांना तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दत्तक घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. या बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा करण्यासाठी वैयक्तिक लक्ष दिले जात आहे.
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कुपोषित बालकांसाठी विशेष पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
५. मुलींचे आरोग्य आणि स्वच्छता : स्वतंत्र स्वच्छतागृहे
शाळांमधील मुलींची गळती रोखण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र व सुसज्ज स्वच्छतागृहे उभारण्यावर भर दिला जात आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला मोठी चालना मिळत आहे.
६. आधुनिक अंगणवाडी : शिक्षणाचे नवे दालन
अंगणवाडी केंद्रांना केवळ पोषण आहार केंद्र न ठेवता त्यांना पूर्वप्राथमिक शिक्षणाची केंद्रे म्हणून विकसित केले जात आहे. BaLA (Building as Learning Aid) पद्धतीनुसार अंगणवाडीच्या भिंतींना शिक्षणाचे माध्यम बनविण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अंगणवाडी केंद्रे उभारण्याचा अभिनव प्रयोगही सुरू करण्यात आला आहे.
७. ग्रामीण पाळणाघर : कष्टकरी मातांना दिलासा
शेतात किंवा मजुरीसाठी जाणाऱ्या महिलांची सर्वात मोठी चिंता त्यांच्या लहान मुलांच्या संगोपनाची असते. ही गरज लक्षात घेऊन ग्रामीण भागात पाळणाघर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे कामावर जाताना मातांना दिलासा मिळणार असून बालकांना सुरक्षित आणि पोषक वातावरण उपलब्ध होणार आहे.
जिल्हा परिषद गडचिरोलीचे हे सर्व उपक्रम महिलांना केवळ लाभार्थी न मानता विकास प्रक्रियेतील सक्रिय भागीदार बनवत आहेत. महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन या सर्व क्षेत्रांत जिल्हा परिषद गडचिरोलीने केलेली ही प्रगती निश्चितच प्रेरणादायी आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गडचिरोलीची ही ‘नवलारी’ भरारी राज्यासाठी एक आदर्श ठरत आहे.
— श्री. दीपक बानाईत
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (महिला व बालकल्याण)
जिल्हा परिषद, गडचिरोली.