
ऊर्जा विभागाच्या या प्रकल्पामुळे सुमारे ५ मेगावॅट वीज नुकसान कमी होणार असून मुंबई महानगर प्रदेशातील विद्युत दाबामध्ये योग्य ती सुधारणा होणार आहे. तसेच या द्विपथ वाहिनीवरून सुमारे ३००० अतिरिक्त वीज वहन क्षमता उपलब्ध होणार असून मुंबई, ठाणे, पालघर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती महापारेषणकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या वेगाने निर्णय प्रक्रियेत महापारेषणचे संचालक (प्रकल्प/संचलन) सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता महेंद्र वाळके, वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता महेश भागवत व परिमंडळातील अधिकारी कर्मचारी यांनी कामगिरी पूर्ण केली. यंत्रणांच्या समन्वयामुळे अखेर मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले.
या प्रकल्पांतर्गत एकूण ७१५ मनोरे उभारण्यात आले असून द्विपथ वाहिनीची लांबी सुमारे २२८ कि.मी. आहे. यापैकी नाशिक विभागात ४८५ मनोरे उभारणी आणि ३०४ सर्किट कि.मी. तारा ओढण्याचे काम, तर वाशी विभागात २३० मनोरे उभारणी आणि १५२ सर्किट कि.मी. तारा ओढण्याचे काम पूर्ण झाले आहे.
या वीजवाहिनीमुळे सद्यस्थितीतील पडघे–बाभळेश्वर १ व २ या वीजवाहिनीवरील ताण कमी होणार असून प्रणालीची विश्वासार्हता वाढणार आहे. कुडूस उपकेंद्राला अतिरिक्त वीज स्रोत उपलब्ध होऊन मुंबई परिसरातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता सुलभ होणार आहे. हा भव्य प्रकल्प २०१० मध्ये मंजूर करण्यात आला पण विविध अडचणींमुळे लांबला होता. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, महसूल विभाग, पोलिस आणि वनविभाग यांच्या सहकार्य व मदतीमुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी मेसर्स कल्पतरू प्रोजेक्टस इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात आल्याचे महापारेषणने म्हटले आहे.