राज्यातील शहरी भागांचा सुनियोजित विकास व्हावा, यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी १० नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली. यामुळे या नगरपरिषदांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
यामध्ये जिवती (चंद्रपूर), शिरूर अनंतपाळ, रेणापूर (लातूर), सोयगाव (छत्रपती संभाजीनगर), पालम (परभणी), उमरखेड (यवतमाळ), बीड, कोरपना, गडचांदूर (चंद्रपूर) आणि पुलगाव (वर्धा) यांचा समावेश आहे. गेल्या वर्ष दीड वर्षात राज्य शासनाने सुमारे १०० पेक्षा अधिक शहरांच्या विकास योजनांना मान्यता दिली आहे.
गेल्या काही वर्षांत राज्यातील नागरी सुविधा सुधारण्यासह आणि शहरीकरणाला शिस्तबद्ध रूप देण्यावर भर देण्यात येत आहे. या अंतर्गत विकास आराखड्यांना मंजुरी दिली जात असून, शहरांचा नियोजनबद्ध विकास आणि पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण करणे हे उद्दिष्ट आहे. यामुळे रस्ते, बगीचा, क्रिडांगण, ग्रंथालय, दुकाने, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन सार्वजनिक सुविधांसाठी जागा आरक्षित करून त्यांचा नियोजित विकास शक्य होणार आहे. शाळा, रुग्णालये आणि उद्यानांसाठी योग्य जागा उपलब्ध होऊन नागरिकांना मूलभूत सुविधा त्याद्वारे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
