
हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० योजना विभागाने प्रभावीपणे राबविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश कृषी, वित्त व नियोजन, मदत व पुनर्वसन, कामगार आणि विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत दिले. यावेळी प्रकल्प संचालक परिमल सिंह, कृषी विभागाचे उप सचिव श्री. चंदनशिवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या टप्प्यात शाश्वत व हवामान परिणामांना सक्षमपणे सामोरे जाणाऱ्या शेतीला अधिक व्यापक स्वरूप देण्यावर भर देण्यात यावा. जो शेतकरी केवळ शेतीच्या उत्पन्नावरच अवलंबून असतो अशा शेतकऱ्यास नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० मधील विविध योजनेचा लाभ मिळवून देऊन त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे. या योजनेच्या लाभापासून मूळ लाभार्थी वंचित रहाणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असेही निर्देश राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी यावेळी दिले.