
सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ अंतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी विभागासाठी निश्चित करण्यात आलेले टप्पे व त्यांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेली कार्यवाही यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली.
नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध, दुग्धजन्यपदार्थ भेसळखोरांविरुद्ध संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणादरम्यान उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.
अन्नात भेसळ करणे हा केवळ साधा गुन्हा नसून तो थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. लहान मुले मोठ्या प्रमाणावर दूध पितात, तर बनावटपनीर आणि भेसळयुक्तअन्नपदार्थ मुळे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला तोंड द्यावे लागू शकते. भेसळखोर थेट या लहान मुलांच्या आयुष्याशी खेळत आहेत. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कोणत्याही प्रकारची नरमाई न दाखवता अशा गुन्हेगारांवर अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावा, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
बैठकीस सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, विधि व न्याय विभागाचे सचिव उदय शुक्ला, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.