
मुंबई : सभागृहाची परंपरा ही केवळ औपचारिक निरोप देण्याची नसून, सदस्यांनी पुन्हा जनतेच्या सेवेसाठी सभागृहात यावे, अशी सदिच्छा व्यक्त करण्याची आहे, असे सांगून विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी विधान परिषदेत निवृत्त होणाऱ्या सदस्यांना पुनरागमनासाठी शुभेच्छा दिल्या.
सभापती प्रा.राम शिंदे म्हणाले निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी आपल्या कार्यकाळात विविध सामाजिक, आणि जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे भूमिका मांडल्या. सभागृहातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांच्या अनुभवाचा लाभ सार्वजनिक जीवनात पुढेही समाजाला होत राहील.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २४ वर्षे सातत्याने सभागृहात कार्य करत महिलांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविला, तर अमोल मिटकरी यांनी प्रभावी वक्तृत्व आणि संत साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले.
शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि संजय केणेकर यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.