
महाराष्ट्रातील जलवाहतूक व्यवस्था अधिक सुखकर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा. पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करून सौर ऊर्जेच्या माध्यमातून जलवाहतुकीला चालना देण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
यावेळी महाराष्ट्रातील जलवाहतुकीसाठी अद्ययावत सोलार तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी बोटी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नावाल्ट बोटस् कंपनीकडून सादरीकरण करण्यात आले. सौरऊर्जेसह विविध आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बोटींची माहिती देण्यात आली.
वर्सोवा-मढ रो-रो सेवेसाठी ४९ प्रवासी क्षमतेची स्पीड बोट, गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग-मांडवा मार्गासाठी २० प्रवासी क्षमतेची बोट, तसेच मुंबई ते सिंधुदुर्ग जलप्रवासासाठी आधुनिक बोटी उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते















