Home आमझरी बनणार ‘मधाचे गाव’ पर्यटन आणि रोजगारासाठी त्रिपक्षीय करार

आमझरी बनणार ‘मधाचे गाव’ पर्यटन आणि रोजगारासाठी त्रिपक्षीय करार

अमरावती: मेळघाटातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा शाश्वत वापर करून स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चिखलदरा तालुक्यातील आमझरी येथे ‘मधाचे गाव’ ही योजना राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, वन विभाग आणि आमझरी ग्रामपंचायत यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार (MoU) पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महसूल भवन येथे करण्यात आला.

 यावेळी आमदार केवळराम काळे, प्रवीण तायडे, संजय खोडके, सुलभा खोडके, राजेश वानखडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे आणि आमझरीचे सरपंच व लाभार्थी उपस्थित होते. खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाणार असून, वन विभाग पायाभूत सुविधांची जबाबदारी सांभाळेल, तर ग्रामपंचायत स्थानिक स्तरावर प्रकल्पाचे दैनंदिन संचालन व देखभाल करणार आहे.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वाखाली हा अभिनव प्रकल्प ‘संयुक्त उपक्रम’ म्हणून राबविला जाणार आहे. निसर्ग पर्यटनासोबतच मधमाशी पालन, प्रक्रिया आणि विक्रीची एक सक्षम मूल्यसाखळी निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून 54 लक्ष रुपये आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत 27 लक्ष रुपये असा एकूण 81 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या करारांतर्गत आमझरी येथील वन विभागाच्या पर्यटन संकुलात सामूहिक सुविधा केंद्र, मध प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट, आणि माहिती केंद्र उभारले जाईल. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘हनी थीम’ आधारित सेल्फी पॉईंट आणि मधुबन निर्मितीसह पर्यावरणपूरक सौंदर्याकरण करण्यात येणार आहे. यामुळे ‘मधुपर्यटन’ ही नवी संकल्पना चिखलदऱ्यात रुजणार असून स्थानिक स्वयंसहायता गट, महिला आणि युवकांना उत्पन्नाचे मोठे साधन उपलब्ध होणार आहे.

Home कर्तृत्वाचा महामेरू : नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कर्तृत्वाचा महामेरू : नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिंधुदुर्गनगरी :- “महाराष्ट्राच्या विधानसभेतील माझी कारकीर्द ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि ज्यांनी माझ्या पहिल्याच भाषणावर ‘छान बोललास’ अशी चिठ्ठी पाठवून मला शाबासकी दिली, ते नारायण राणे साहेब माझ्या राजकीय वाटचालीत सदैव मार्गदर्शक राहिले आहेत,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कणकवली येथे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी राणे साहेबांच्या संसदेतील आणि विधानसभेतील अभ्यासू वृत्तीचा गौरव करताना सांगितले की, अर्थसंकल्पावर भाषण करताना राणे साहेब एखाद्या अर्थतज्ज्ञाप्रमाणे आकड्यांची जी चिरफाड करायचे, त्याने संपूर्ण सभागृह स्तब्ध व्हायचे. माझ्या संसदीय यशाचे आणि मी लिहिलेल्या ‘बजेट कसं वाचावं’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे श्रेयही राणे साहेबांच्या पुढाकारालाच जाते, अशी कृतज्ञता मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कणकवली येथे माजी मुख्यमंत्री,  खासदार नारायण राणे यांच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळ्यासाठी  उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ उदय सामंत, खासदार सुनील तटकरे,आमदार दीपक केसरकर , आमदार रविंद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, निलेश राणे आदी उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खासदार नारायण राणे यांच्या जीवनपटावर आधारित ‘तुफान’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पार पडले.

राणे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू उलगडताना मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, साहेब म्हणजे एक अत्यंत ‘दिलदार’ व्यक्तिमत्त्व असून त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे. त्यांच्या प्रत्येक कामात कमालीची शिस्त आणि गुणवत्तेला प्राधान्य असते, ज्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज आणि गोशाळा होय. साहेबांच्या या यशस्वी प्रवासात त्यांच्या पत्नी नीलम ताई यांचा मोठा सहभाग असून, निलेश आणि नितेश राणे यांनी त्यांचा राजकीय वारसा योग्य प्रकारे पुढे चालविला आहे. स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणा ही साहेबांची ओळख असली, तरी त्यांच्या मनात कार्यकर्त्यांबद्दल आणि माझ्यासारख्या सहकाऱ्यांबद्दल नेहमीच मायेची ओढ राहिली आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले

या सोहळ्याला उपस्थित असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही राणे साहेबांच्या जिद्दीचे कौतुक केले. राजकीय जीवनात अनेक चढ-उतार आले तरी राणे साहेबांनी कधीही हार मानली नाही, उलट प्रत्येक संकटावर जिद्दीने मात केली, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. एक प्रभावी आणि आदर्श विरोधी पक्षनेता म्हणून आजही त्यांची ओळख कायम असून, त्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणांचा अभ्यास नवीन सदस्यांनी करायला हवा, इतके ते मार्गदर्शनपर असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग मंत्री डॉ उदय सामंत यांनी अत्यंत भावनिक शब्दांत सांगितले की, कोकणातील जनतेने राणे साहेबांना आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याप्रमाणे मान दिला आहे. त्यांच्या धाकातही माया आहे आणि मार्गदर्शनातही आपुलकी आहे. माझ्या राजकीय प्रवासात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यांच्यासारखा मार्गदर्शक लाभणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अशा या लोकनेत्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असेही त्यांनी नमूद केले.

खासदार सुनील तटकरे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, वरवडे सारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेली राणे साहेबांची वाटचाल ही प्रेरणादायी आहे. शाखा प्रमुखापासून ते मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा जिद्दीचा आणि कर्तृत्वाचा आदर्श नमुना आहे. त्यांनी दिलेले मार्गदर्शन माझ्यासाठी अमूल्य ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाची नवी ओळख मिळाली असून, मेडिकल कॉलेजसारख्या प्रकल्पांमुळे जिल्ह्याची प्रगती अधिक वेगाने झाली आहे. अशा या जननेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असे त्यांनी सांगितले.

आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, राणे साहेबांनी कार्यकर्त्यांना बळ देण्याचे, त्यांना उभारी देण्याचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आम्हाला प्रेरणा आणि दिशा मिळते. त्यांच्या नेतृत्वामुळेच अनेक कार्यकर्ते आज आत्मविश्वासाने काम करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

कोकणच्या विकासाला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचे काम राणे साहेबांनी केले असून, त्यांच्या स्पष्ट विचारांमुळेच या भागाचा कायापालट झाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

खासदार नारायण राणे यांनी यावेळी अत्यंत भावनिक शब्दांत या गौरव सोहळ्यानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, आयुष्य हे केवळ यश-अपयशाचा प्रवास नसून, प्रामाणिक प्रयत्नांची एक अखंड साधना आहे. प्रत्येकाने आपल्या प्रयत्नांना प्रामाणिकपणाची जोड दिली, तर यश नक्कीच आपल्या पावलांशी येते. मी राजकारणात जे काही मिळवलं, ते कोणाच्या आधारावर नाही, तर माझ्या जिद्दीवर आणि कठोर परिश्रमांवर मिळवलं आहे. मी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले, अनेक प्रसंगांना सामोरे गेलो, पण एक गोष्ट कधीच सोडली नाही—ती म्हणजे हार मानण्याची वृत्ती. संकटे आली, अडचणी आल्या, पण प्रत्येक वेळी नव्या उमेदीने उभा राहिलो. आज जे माझं कौतुक होत आहे, ते माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर आयुष्यभर जपून ठेवावी अशी अमूल्य संपत्ती आहे. हा सन्मान, हे प्रेम मी कधीच विसरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श माझ्या आयुष्याचा आधार राहिला आहे. त्यांच्या विचारांनी आणि कर्तृत्वाने मला नेहमीच प्रेरणा दिली. त्यांच्या शिकवणुकीतूनच मी माणुसकी, कर्तव्य आणि स्वाभिमान यांना सर्वोच्च स्थान दिलं आहे.  माझ्या आयुष्यात मी नेहमी माणुसकीला महत्व दिलं, कारण माणूस म्हणून जगणं हेच खऱ्या अर्थाने मोठं यश आहे. राज्यातील जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करत राहा, लोकांच्या हिताचा विचार करा—यश तुमच्या पाठीशी उभं राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Home बाह्ययंत्रणेद्वारे २ हजार ८४३ पदे; अंगणवाडी सेविका व मदतनीस २ लाख २१ हजार ३२८ पदास मंजुरी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

बाह्ययंत्रणेद्वारे २ हजार ८४३ पदे; अंगणवाडी सेविका व मदतनीस २ लाख २१ हजार ३२८ पदास मंजुरी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई: महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे निरसित (रद्द) करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत.

याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका व १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, २३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल.

Home नदी सुशोभीकरणापेक्षा प्रदूषणमुक्तीवर अधिक भर; स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ लवकरच – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

नदी सुशोभीकरणापेक्षा प्रदूषणमुक्तीवर अधिक भर; स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ लवकरच – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

पुणे: नदी सुशोभिकरणापेक्षा नदीच्या प्रदूषणमुक्तीवर अधिक भर दिला पाहिजे, अशी भूमिका राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडली. राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नदी पुनरुज्जीवन कामासाठी समर्पित असे स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला आमदार उमा खापरे, आमदार शंकर जगताप, महापौर रवी लांडगे, ‘पीएमआरडीए’ चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे सहसचिव रमेश मनाले, ‘पीएमआरडीए’ चे अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक जे. एस. साळुंके, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता नीलेश बोडवे, पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. डुबल, पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे आदी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी संस्था व उद्योगांकडून सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाल्याचे पंकजा मुंडे यांनी नमूद केले. अनेक उद्योगांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले जातात; मात्र योग्य देखभालीअभावी ते बंद अवस्थेत असतात. यापुढे अशा उद्योगांवर केवळ नोटीस न बजावता थेट व कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांनी नदीपात्रातील अतिक्रमणे तातडीने काढावीत, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या. प्रत्येक गृहनिर्माण संस्थेस (सोसायटी) ‘एसटीपी’ सक्तीचा करावा व आपल्या हद्दीतील प्रत्येक नाला ‘एसटीपी’ला जोडून केवळ प्रक्रिया केलेलेच पाणी नदीत जाईल, याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

जलप्रदूषणासोबतच वाढत्या वायुप्रदूषणाच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाली. बांधकामाच्या ठिकाणी इमारती योग्य प्रकारे झाकल्या (कव्हर केल्या) न गेल्याने हवेतील धुलीकणांचे प्रमाण वाढते. त्यामुळे अशा उघड्यावर सुरू असलेल्या बांधकामांना तत्काळ नोटिसा बजावून हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना सक्ती करण्याचे निर्देश मंत्री मुंडे यांनी ‘पीएमआरडीए’ व महानगरपालिकेला दिले.

बैठकीत ‘पीएमआरडीए’ व पिंपरी-चिंचवड महापालिका (पीसीएमसी) यांच्या वतीने इंद्रायणी, पवना व मुळा-मुठा नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले.‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता रिनाज पठाण व महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सविस्तर तांत्रिक माहिती दिली. बैठकीदरम्यान लोकप्रतिनिधींनी शहरातील जल व वायुप्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत राज्यशासनाने भरीव सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर मंत्री मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून तळवडे आणि रावेत येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनची पाहणी
मंत्री पंकजा मुंडे यांनी इंद्रायणी नदीवरील तळवडे येथील ‘रॉ वॉटर पंपिंग स्टेशन’ची आणि पवना नदीवरील रावेत येथील ‘रॉ वॉटर पंपिंग स्टेशन’ची पाहणी केली तसेच नद्यांच्या प्रदूषण सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी शासन स्तरावर ठोस पावले उचलली जात असून, नदी स्वच्छ आणि प्रवाही ठेवण्यासाठी केवळ सरकारी प्रयत्न पुरेसे नाहीत, तर नागरिकांचे सहकार्य आणि औद्योगिक नियमांचे काटेकोर पालनही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या.

पवित्र इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखणे आणि जलस्रोतांचे जतन करणे ही आपली प्राथमिकता आहे, असे सांगून इंद्रायणी नदीपात्रातील फेस, सांडपाणी आणि वाढती जलपर्णी या गंभीर समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले. तसेच पवना आणि इंद्रायणी नदीपात्रात वाढलेली जलपर्णी आणि सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण ही गंभीर बाब आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे आणि नदीचे पर्यावरण टिकून राहावे, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी विभागाला दिल्या.

याप्रसंगी तळवडे येथे आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Home सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा ज्योतिराव फुले

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा ज्योतिराव फुले

भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे. समाजातील समता, शिक्षण, स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे. त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा पुनर्विचार करणे म्हणजे केवळ इतिहासाचे स्मरण नसून वर्तमानाला दिशा देण्याचे कार्य आहे.

महात्मा फुले यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिंदू म्हणजे “मानव हा सर्वात मोठा धर्म आहे” ही भूमिका. त्यांनी धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन माणुसकीचा विचार मांडला. त्यांच्या लेखनात आणि कृतीतून सतत दिसून येते की, समाजातील अन्याय आणि विषमता दूर केल्याशिवाय खरी प्रगती होऊ शकत नाही. त्यांनी मांडलेली समतेची संकल्पना ही केवळ तात्त्विक नव्हती, तर ती प्रत्यक्ष कृतीतून साकारलेली होती.

शिक्षणाची ज्योत : अज्ञानातून मुक्तीचा मार्ग

महात्मा फुले यांनी घेतलेला सर्वात क्रांतिकारी निर्णय म्हणजे शिक्षणाचा प्रसार. त्यांनी प्रथम स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले आणि त्यानंतर १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. सावित्रीबाईंनीही समाजाच्या विरोधाला न जुमानता स्वतःला शिक्षणासाठी वाहून घेतले. शेण गोट्याचा मार सहन करत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. जोतीबा आणि सावित्री या दांपत्याच्या त्या काळातील सामाजिक बंडामुळे शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली.त्या काळात स्त्रीशिक्षणाला तीव्र विरोध असतानाही त्यांनी मागे हटणे स्वीकारले नाही. शिक्षण हेच शोषणाविरुद्धचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, ही त्यांची धारणा होती. या कार्यातून त्यांनी समाजातील अज्ञानाची बेडी तोडण्याचा प्रयत्न केला.अविद्या हेच शोषणाचे मुख्य कारण आहे हे सांगताना त्यांनी समाजाला याबाबतचा कठोर संदेश दिला…

‘विद्येविना मती गेली,

मतीविना नीती गेली,

नितीविना गती गेली,

गती विना वित्त गेले,

वित्तविना शूद्र खचले,

इतके अनर्थ एका अविद्येने केले’…

अन्यायाविरुद्ध बंड

त्या काळातील समाज रुढी-परंपरांच्या कठोर बंधनात अडकलेला होता. बालविवाह, सतीप्रथा, स्त्रीदास्य आणि अस्पृश्यता यांसारख्या प्रथांनी समाजाला जखडून ठेवले होते. महात्मा फुले यांनी या सर्व प्रथांविरुद्ध उघडपणे आवाज उठवला. त्यांनी विधवांसाठी आश्रयस्थळे उभारली, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या कृतीतून समाजातील महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा मिळाली.

सत्यशोधकांचा मार्ग : समतेची संघटित चळवळ

सन १८७३ मध्ये त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज हा भारतीय सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जातीभेद,अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांविरुद्ध संघटित लढा उभारला. सत्यशोधक समाजाने समाजाला विचार करण्याची नवी दिशा दिली. ज्यामध्ये सत्य, समता आणि बंधुता यांना केंद्रस्थानी ठेवले आहे.सत्यशोधक समाजाच्या मार्फत त्यांनी एक समांतर विज्ञानवादी भूमिका समाजापुढे मांडली.तत्कालीन ब्राह्मण्यवादाला झुगारून नव्या चालीरीती समाजाला दिल्या.

शेतकऱ्यांचा आवाज : अन्यायाविरुद्धचा प्रहार

महात्मा फुले यांनी केवळ सामाजिकच नव्हे, तर आर्थिक विषमतेवरही भाष्य केले.त्यांच्या “शेतकऱ्यांचा आसूड” या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाचे अत्यंत वास्तव चित्रण केले आहे. महसूल व्यवस्थेतील अन्याय, सावकारशाहीचे शोषण आणि प्रशासनातील दुर्लक्ष यावर त्यांनी कठोर टीका केली. शेतकरी हा समाजाचा कणा असूनही त्याचे जीवन दारिद्रयात का अडकले आहे, हा प्रश्न त्यांनी समाजासमोर उभा केला.

विचारांची शस्त्रे: लेखनातून घडवलेले परिवर्तन

महात्मा फुले हे केवळ कृतीशील समाजसुधारक नव्हते, तर प्रभावी लेखकही होते. “गुलामगिरी” या ग्रंथातून त्यांनी जातीव्यवस्थेवर प्रखर प्रहार केला, तर “सार्वजनिक सत्यधर्म” मधून मानवतावादी धर्माची संकल्पना मांडली. त्यांच्या लेखनातून समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे कार्य झाले. यातून त्यांच्या विचारांची व्यापकता स्पष्ट होते.याशिवाय त्यांनी गुलामगिरी,शेतकऱ्यांचा आसूड,ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न,सार्वजनिक सत्य धर्म,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा लिहून शिवरायांच्या कार्यकर्तुत्वाची ओळख करून दिली.रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीची स्वच्छता केली.शिवाजी महाराजांच्या स्मृती पुनरुज्जीवनाच्या प्रारंभीच्या प्रयत्नांपैकी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व त्यांना मानले जाते.

सार्वजनिक जीवनातील योगदान

महात्मा फुले यांनी सार्वजनिक जीवनातही सक्रिय सहभाग घेतला. पुणे महानगरपालिकेच्या कार्यातून त्यांनी नागरी प्रश्नांवर काम केले. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे त्यांनी लक्ष दिले. त्यांनी ब्रिटिश प्रशासनाशी संवाद साधून सामाजिक प्रश्न मांडले आणि वंचित घटकांसाठी न्यायाची मागणी केली. शासन कोणतेही असो, ते न्याय्य आणि लोकहितकारी असले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. हंटर शिक्षण आयोगाकडे त्यांनी निवेदन सादर केले. सार्वत्रिक शिक्षणाचा पुरस्कार केला.

सामाजिक सुधारणा स्वीकारल्या

इंग्रजांच्या काही सामाजिक सुधारणांना स्वीकारताना त्यांनी इंग्रजांच्या अन्यायकारक नीतीवर सडकून टीका केली. एवढेच काय इंग्रजांना समजेल अशा भाषेत त्यांनी त्याची उत्तरे दिली. कोणताही पहिला प्रयोग स्वतःच्या घरी, स्वतःच्या कुटुंबावर करून ‘बोले तैसा चाले ,त्याची वंदावी पाऊले’, असा आदर्श त्यांनी समाजामध्ये निर्माण केला आहे. स्वतःच्या पत्नीला शिकवले. स्वतःची विहिर मागास वर्गीयांसाठी खुली केली. ब्राह्मण्यवादाचा आयुष्यभर विरोध करुनही त्यांनी  एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला.त्या मुलाचे आंतरजातीय लग्न लावून देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. महात्मा जोतीबा फुले यांनी घेतलेले निर्णय अशा प्रकारे कायम प्रेरणादायी आहेत. महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतःच्या मुलाचा आंतरजातीय विवाह करणारे पहिले पालक ठरले आहेत. काळाची पावले ओळखून नवनव्या प्रयोगाद्वारे सामाजिक सुधारणा करण्यात भारतातल्या सर्व सामाजिक सुधारणा करणाऱ्या थोर पुरुषांमध्ये त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले वेगळे ठरले आहेत.

यशस्वी व्यावसायिक

सामाजिक कार्य, संघटना सुरु ठेवण्यासाठी आर्थिक स्त्रोत मजबूत असणे आवश्यक असते. त्यासाठी अंगी व्यावसायिक कसब बाळगणे खूप गरजेचे असते. संघटना, चळवळी, सुधारणांचा डोलारा चालविण्यासाठी पैशाची गरज असते. त्यासाठी आदर्श पद्धतीने व्यवसाय करुन स्वयंपूर्ण होणे गरजेचे असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सोदाहरणासह मांडून ठेवले. त्यांनी कंत्राटदार म्हणून अतिशय उत्तमपणे काम केले.  आजही त्यांच्या सहभागात तयार झालेल्या वास्तू प्रेरक आहेत. पूल, धरणे, कालवे या बांधकामात कंत्राटदार म्हणून त्यांनी काम केले.

आजच्या काळातील विचारांची प्रासंगिकता

महात्मा फुले यांच्या कार्याला दीडशे वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी त्यांच्या विचारांची प्रासंगिकता आजही तितकीच आहे. शिक्षणातील विषमता, सामाजिक भेदभाव आणि स्त्रीसमानतेचे प्रश्न अद्यापही पूर्णतः संपलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रसार आणि आचरण करणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या कार्याचा अभ्यास केल्यास समाजपरिवर्तनासाठी आवश्यक असलेली दृष्टी मिळते.

ज्योतिराव परिवर्तनाची अखंड प्रेरणा

महात्मा ज्योतिराव फुले हे एक व्यक्तिमत्त्व नसून एक चळवळ, एक विचारधारा आणि एक प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या कार्यातून राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रेरणा घेतली.त्यांच्या कार्यामुळेच महाराष्ट्राला फुले–शाहू–आंबेडकरांचा महाराष्ट्र ही ओळख प्राप्त झाली आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करणे म्हणजे केवळ आदर व्यक्त करणे नव्हे, तर त्या मूल्यांना आपल्या जीवनात रुजवण्याचा संकल्प करणे होय.

महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात विशेष समिती स्थापन केली असून वर्षभर महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्याला साजेशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार करून सामाजिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरणार आहे.

Home महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त विधानभवनात अभिवादन

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त विधानभवन येथे आज त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव ४ शिवदर्शन साठ्ये व उपसचिव विजय कोमटवार, विधानपरिषदेच्या उपसभापतींचे खासगी सचिव अविनाश रणखांब, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Home महात्मा ज्योतिराव फुले यांना मंत्रालयात आदरांजली

महात्मा ज्योतिराव फुले यांना मंत्रालयात आदरांजली

मुंबई:  महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात आदरांजली वाहण्यात आली.सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार यांनी मंत्रालयातील महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विजय शिंदे, निलेश हरड, अमोल चव्हाण आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आदरांजली वाहिली.

Home मुंबईत उद्यापासून ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ ची अंतिम फेरी

मुंबईत उद्यापासून ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ ची अंतिम फेरी

मुंबई: भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘माय युवा भारत’द्वारे ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ मुंबई झोनच्या अंतिम फेरीची घोषणा करण्यात आली आहे. या झोनमध्ये महाराष्ट्र, गोवा आणि पुदुच्चेरीचा समावेश आहे. ही दोन दिवसीय अंतिम फेरी १२ व १३ एप्रिल २०२६ दरम्यान नवी मुंबईतील नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे होणार असल्याची माहिती माय युवा भारत महाराष्ट्र व गोवा चे राज्य संचालक अमित पुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माय युवा भारत मुंबई चे उपसंचालक अनुप इंगोले उपस्थित होते.

अमित पुंडे यांनी सांगितले की, या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात देशभरातून राष्ट्रीय स्पर्धेतून निवड झालेले उत्कृष्ट युवा सहभागी एकत्र येणार आहेत. दोन दिवसीय विचारमंथन सत्रात शिक्षणतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विषयविशेषज्ज्ञ सहभागी होऊन केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ शी निगडित विषयांवर चर्चा करतील. देशभरातील १७ ठिकाणांहून १५,००० हून अधिक युवक या संवादात सहभागी होणार आहेत.

देशभरातून १२ लाखांहून अधिक युवकांनी सहभाग नोंदवला असून ४६,५०० पेक्षा अधिक निबंध प्राप्त झाले आहेत. मुंबईतील अंतिम फेरीत सहभागी युवक विकसित कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी कल्याण बळकटीकरण तसेच मानवी संसाधन शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार या विषयांवर चर्चा पुढे नेतील. १२ एप्रिल रोजी सहभागींचे आगमन व नोंदणी होईल आणि दुपारी महिला युवा संसद आयोजित केली जाईल. १३ एप्रिल रोजी उद्‌घाटन समारंभ, माय भारत सत्र आणि दोन तज्ज्ञ पॅनल चर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘नारी शक्तीः विकसित भारत की आवाज’ या विषयावर आधारित महिला युवा संसद हा कार्यक्रमाचा विशेष भाग असेल. या सत्रात महिला सहभागी महिला आरक्षण विधेयकावर संसदीय पद्धतीने चर्चा करतील. पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी १२ एप्रिलच्या सायंकाळी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने ‘संडे ऑन सायकल’ हा उपक्रम नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम येथे आयोजित करण्यात येणार आहे.

१३ एप्रिल २०२६ रोजी निवडलेल्या  ९११ सहभागींचा केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध क्षेत्रांवर सखोल संवाद होईल. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांसह हा संवाद होणार आहे.

२ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. माय भारत बजेट क्वेस्ट 2026 हा उपक्रम केंद्रीय अर्थसंकल्प 2026 आणि युवकांच्या आकांक्षा यांना जोडणारा एक परिवर्तनशील मंच ठरला आहे. विशेषतः विकसित भारत युवा लीडर्स डायलॉगमधून आलेल्या अनेक कल्पनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला असून, यामुळे धोरणनिर्मितीत युवांना केंद्रस्थानी ठेवण्याच्या सरकारच्या बांधिलकीला अधोरेखित केले आहे, असेही श्री. पुंडे यांनी सांगितले.

Home इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळांमध्ये इयत्ता पहिलीचे प्रवेश सुरू

इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळांमध्ये इयत्ता पहिलीचे प्रवेश सुरू

(नंदुरबार) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या नंदुरबार, नवापूर आणि शहादा या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळांमध्ये इयत्ता पहिलीचे प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती ठाणेपाडा शासकीय आश्रमशाळचे मुख्याध्यापक संतोष पैठणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

शासकीय इंग्रजी माध्यम प्राथमिक आश्रमशाळा, ठाणेपाडा, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार, व शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नवापूर, ता. नवापूर जि. नंदुरबार या शाळेत शासनाच्या धोरणानुसार आणि अटी-शर्तींच्या अधीन राहून प्रवेश दिले जाणार आहे.

तारखा आणि वेळ:

• अर्ज वाटप व स्वीकृती: 10 ते 25 एप्रिल 2026 पर्यंत.

• वेळ (सोमवार ते शुक्रवार): सकाळी 09.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत.

• वेळ (शनिवार): सकाळी 08.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत.

• टीप: सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज मिळतील.

इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी वर नमूद केलेल्या शाळांमध्ये जाऊन विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज प्राप्त करून घ्यावेत आणि वेळेत सादर करावेत, असेही आवाहन शासकीय आश्रमशाळचे मुख्याध्यापक संतोष पैठणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Home ज्येष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन

ज्येष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन

(नंदुरबार) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राज्यात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’ 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर, नागरिक मेळावा आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे हे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी नियम 2010 तसेच राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण 2013 बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे तसेच सामाजिक ऋणाची जाणीव ठेवून नागरिकांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हा कार्यक्रमाचे मुख्य उद्देश असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या मेळाव्याला व रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त, श्री. वसावे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

error: Content is protected !!