Home महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवरील नऊ सदस्यांच्या निवडीकरिता २६ एप्रिल, २०२६ रोजी निवडणुकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवरील नऊ सदस्यांच्या निवडीकरिता २६ एप्रिल, २०२६ रोजी निवडणुकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणांतर्गत निवडणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हानिहाय निवडणूक केंद्र व मतदारयादी यांचा तपशील महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या www.maharashtramedicalcouncil.in या संकेतस्थळावार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/198910/

#महाराष्ट्रवैद्यकीयपरिषद

Home महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व मनमुक्त फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मानस प्रकल्प-सुरक्षित बालपण

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व मनमुक्त फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मानस प्रकल्प-सुरक्षित बालपण

समृद्ध महाराष्ट्र’ अंतर्गत बालकांच्या मानसिक आरोग्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे, याची सुरुवात प्रायोगिक तत्वावर राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती राज्य हक्क बाल संरक्षण आयोगाचे अध्यक्ष डॉ. संजय पुराणिक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/198917/

Home धुळे व नंदुरबार जिल्हे भविष्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धुळे व नंदुरबार जिल्हे भविष्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धुळे : शिरपूर तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल आणि अरुणावती नदीवर बंधारे बांधण्यास मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या दीड वर्षात तब्बल ४० हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक आली असून, भविष्यात धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे राज्याची प्रमुख औद्योगिक केंद्रे बनतील, असा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी स्व. तपनभाई पटेल मेमोरिअल हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. त्यानंतर आर. सी. पटेल औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक उपक्रमांचे उद्घाटन व‌ भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, आमदार शिरीष नाईक, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राजेश पाडवी, आमदार मंजुळा गावित, आमदार आमश्या पाडवी, धुळ्याच्या महापौर माया परदेशी, माजी खासदार डॉ.सुभाष भामरे, डॉ. हीना गावित, शिरपूरचे नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, भुपेशभाई पटेल आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाने विकसित एआय आधारित ई-सुविधा पोर्टलचे लोकार्पण, आयुर्वेदिक कॉलेज, ॲग्रीकल्चर कॉलेज व फार्मसी कॉलेज, तरडी, आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल, निमझरीचे सुदूर यंत्रणेद्वारे उद्घाटन, खर्दे येथील वैद्यकीय महाविद्यालय  इमारत, नटवाडे येथील याहामोगा माता मंदिर, क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा स्मारक आणि क्रांतिवीर खाज्या नाईक स्मारक आणि दहिवदच्या मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे  भूमिपूजन करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या काळात अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच आता शिक्षण, आरोग्य व रोजगार या प्रमुख गरजा बनल्या आहेत. याच त्रिसूत्रीवर भर देत शिरपूरने साधलेला विकास राज्यासाठी दिशादर्शक आहे. एकविसाव्या शतकात उद्योग केवळ पैशावर नाही, तर कुशल मनुष्यबळावर चालतात. शिरपूरमध्ये उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषी महाविद्यालयांमुळे हे शहर आता उत्कृष्ट मानवी संसाधन पुरवणारे मोठे केंद्र बनले आहे. तसेच, मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांच्या तोडीचे अत्याधुनिक रुग्णालय आदिवासी भागात उभारून जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. शिरपूर येथे आयटी पार्कसाठी अँकर इन्व्हेस्टर शोधून त्याच्याशी आयटी पार्कबाबत चर्चा करण्यात येईल व आयटी पार्क उभारण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिरपूर येथे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी ‘सुपर ५०’ योजना त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण करत आहे. खऱ्या अर्थाने आदिवासी कल्याणाची संकल्पना येथे प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. यासोबतच, जगातील प्रगत देशांना दर्जेदार कापड पुरवणारा वस्त्रोद्योग प्रकल्प आणि ‘शिरपूर पॅटर्न’च्या जलसंधारण कामांमुळे दुष्काळी भाग पाणीदार होण्यासोबत परिसराचा विकास झाल्याचा विशेष उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, धुळे जिल्ह्याचा आकांक्षीत जिल्ह्यांमधील समावेशानंतरच्या गेल्या दीड वर्षांत जिल्ह्यात तब्बल ४० हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक आली आहे. यात प्रामुख्याने रसायन व अन्नप्रक्रिया क्षेत्रात १ हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित झाली असून, केवळ सामंजस्य करार न करता हे उद्योग प्रत्यक्ष उभारले जातील. याशिवाय, दोंडाईचा येथील २५० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प हरित ऊर्जेच्या दृष्टीने एक मोठा टप्पा ठरणार आहे. महामार्गांचे जाळे, सिंचन व्यवस्था, मुंबई-दिल्ली औद्योगिक पट्टा आणि इंदूर-मनमाड रेल्वेमुळे या भागात एक मोठी व सक्षम औद्योगिक परिसंस्था तयार झाली आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

महसुली जमिनीच्या पट्ट्यांवर मिळणाऱ्या सर्व शासकीय योजना लवकरच वन जमिनीच्या पट्ट्यांवरही लागू केल्या जातील, अशी घोषणा करून यामुळे आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिरपूर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासात आपण तालुक्याच्या पाठीशी एका ‘भावासारखे’ पूर्ण ताकदीने उभे राहू, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

पालकमंत्री श्री.रावल म्हणाले,शिरपूरमध्ये शिक्षण, सिंचन व उद्योग क्षेत्रात मोठे काम उभे राहिले आहे. देशात प्रथमच सुरू झालेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रशासकीय प्रणाली व नव्याने सुरू झालेले वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. तपनभाई पटेल यांच्या नावाने सुरू झालेले हे अद्ययावत रुग्णालय खान्देशातील लोकांसाठी मोठी आरोग्य सुविधा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी धुळ्याचा आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत समावेश केल्याने जिल्ह्याला न्याय मिळाला आहे. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी नरडाणा-शिरपूर परिसरातील दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेला चालना देण्यासह शिरपूर व धुळे येथील विमानतळांचा विकास, मालवाहतूक केंद्र व सिंचनाच्या सुलवाडे-जामफळ, प्रकाशा-बुराई, अक्कलपाडा यांसारख्या अपूर्ण प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने चालना देण्यासाठी विशेष निधीची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या प्रशासनातील रिक्त पदेही तातडीने भरावीत, अशी मागणी श्री. रावल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्याचे ते म्हणाले. लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी सन्मान योजना व कृषी पंपांना मोफत वीज देण्याच्या निर्णयामुळे महिला व शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने यापूर्वीही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती व आताही हे शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

वस्त्रोद्योग मंत्री श्री.सावकारे म्हणाले, शिरपूर येथील हे नवे रुग्णालय केवळ शिरपूर किंवा धुळे जिल्ह्यासाठीच नव्हे, तर जळगाव, नंदुरबार व शेजारील मध्य प्रदेशातील रुग्णांसाठीही जीवनदान ठरेल. शिरपूर येथील शिक्षणाचा दर्जा उत्तम असून संस्थांमध्ये प्रवेशासाठी गुणवत्ता निकष काटेकोरपणे पाळले जातात. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या शहरांत जाण्याऐवजी येथेच शिक्षण घेण्यास प्राधान्य देतात. नगरपालिकेने राबवलेले उपक्रम व निर्माण केलेल्या रोजगाराच्या संधींमुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेनुसार राज्याची वाटचाल सुरू आहे. प्रत्येक शहराची व तालुक्याची क्षमता ओळखून तिथे विकासकामे केली जात आहेत, ज्यामुळेच गडचिरोलीसारखा जिल्हा आज देशाचे ‘पोलाद केंद्र’ म्हणून उदयास येत आहे. प्रशासकीय कामांचा सूक्ष्म पाठपुरावा करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत, असेही श्री.सावकारे यांनी सांगितले.

आमदार श्री.पटेल म्हणाले, शिरपूरमध्ये सर्वसामान्यांना अत्यंत कमी खर्चात आरोग्य सेवा देण्यासाठी १ हजार २०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयाचा फायदा धुळे, नंदुरबार, जळगाव व खंडवा परिसरातील गरिबांना होईल. परिसरातील शेती, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मिती क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला.  सुमारे पंधरा ते सतरा हजार तरुणांना वस्त्रोद्योग प्रकल्पामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे जीवनमान सुधारले आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात आमदार श्री. पावरा म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. पटेल कुटुंबामुळे शिरपूर तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. शिरपूर तालुका आदिवासीबहुल आहे. या भागासाठी रस्ते करण्यासाठी वन विभागाच्या अटी शिथिल व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Home धुळे जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ई-सुविधा पोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

धुळे जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ई-सुविधा पोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

धुळे : धुळे जिल्हा प्रशासनाने एआय आधारित तयार केलेल्या ई-सुविधा पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथील कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले.

यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, महापौर मायादेवी परदेशी, आमदार अमरिशभाई पटेल, आमश्या पाडवी, राजेश पाडवी, काशीराम पावरा, मंजुळा गावित,  राघवेंद्र भदाणे, अनुप अग्रवाल,  जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी धुळे जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या या पोर्टलबद्दल पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांचे अभिनंदन केले. धुळे जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या एआय आधारित इंजिनमुळे प्रशासनाचा कारभार गतिमान होऊन पारदर्शकता वाढेल. यामुळे लोकांची कामे सुलभ होतील, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी या पोर्टलची माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम, १०० टक्के ई-गव्हर्नन्स, टीसीएच तत्त्वे, तहसील ते मंत्रालय कार्यक्षमता या दृष्टीकोनातून प्रेरणा घेऊन पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाने, जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांनी ई-सुविधा हे कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित जिल्हा व्यवस्थापन पोर्टल विकसित केले आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा धुळे हा देशातील पहिला जिल्हा आहे.

Home देशाच्या प्रगतीमध्ये विधि शिक्षणाची भूमिका महत्त्वपूर्ण : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

देशाच्या प्रगतीमध्ये विधि शिक्षणाची भूमिका महत्त्वपूर्ण : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई : देशाच्या प्रगतीमध्ये विधि शिक्षणाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले.राज्यपालांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. २५) मुंबई येथे १५ व्या वार्षिक ‘लीगल इरा इंडियन लीगल अवॉर्ड्स’ समारंभाला सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते.

एसोसिएशन ऑफ इंडियन लॉ फर्म्स आणि लीगल इरा मीडिया ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेले हे पुरस्कार विधि क्षेत्रातील व्यावसायिक आणि फर्म्सना प्रदान केले जातात. देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या उंबरठ्यावर उभा असताना, विधी व नियामक चौकटीची ताकद हा निर्णायक घटक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताची आर्थिक प्रगती, डिजिटल पायाभूत सुविधा आणि आत्मनिर्भर भारतांतर्गत उत्पादन क्षेत्रातील उद्दिष्टपूर्ती या सर्व बाबी आपल्या विधी व्यवस्थेची गुणवत्ता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता यावर अवलंबून असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

करारांचे मसुदे तयार करणे, वादांचे निराकरण करणे, उद्योगांना सल्ला देणे आणि हक्कांचे संरक्षण करणे या माध्यमातून विधी क्षेत्रातील व्यावसायिक देशाला गुंतवणूक, व्यापार आणि विकासाचे दृष्टीने आकर्षक गंतव्य बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असेही राज्यपालांनी नमूद केले. असोसिएशन ऑफ इंडियन लॉ फर्म्सने राज्यातील विद्यापीठांशी सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

उदयोन्मुख क्षेत्रांशी सुसंगत, व्यवहाराभिमुख अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी तसेच तंत्रज्ञानाधारित कायदा, नियामक चौकट आणि बदलत्या व्यावसायिक वातावरणाशी सुसंगत शिक्षणासाठी उद्योग–शैक्षणिक सहकार्य अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कायदा फर्म्सनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण व उमेदवारीच्या (अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिपच्या) संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन राज्यपालांनी केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा मौलिक अनुभव मिळेल, त्यांची रोजगारक्षमता वाढेल आणि विधी क्षेत्रासाठी सक्षम व भविष्योन्मुख मनुष्यबळ तयार होईल, असे त्यांनी सांगितले.

उद्घाटन सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजय करोल व न्या. उज्जल भुयान, राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मनीष पितळे व न्या. हितेन वेणेगावकर, सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती हिमा कोहली,  एसोसिएशन ऑफ इंडियन लॉ फर्म्सचे अध्यक्ष निलेश त्रिभुवन,  लीगल इरा मीडिया ग्रुपच्या संस्थापिका आकृती रायजादा, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच वरिष्ठ वकील, जनरल काउन्सेल्स आणि विधी फर्म्सचे भागीदार उपस्थित होते.

Home शासन आणि ‘युनिसेफ’मार्फत खेळ आणि संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लिंग समभावाचे धडे

शासन आणि ‘युनिसेफ’मार्फत खेळ आणि संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लिंग समभावाचे धडे

मुंबई: लिंग भेद दूर करण्याबाबत राज्य शासनाच्या सहाय्याने अंगाई आणि युनिसेफतर्फे लिंग समभाव या विषयावर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना प्रबोधनपर प्रशिक्षण दिले जात आहे.   युनिसेफ आणि अंगाई (UNGEI) यांच्या सहकार्याने देशात पहिल्यांदा धाराशीव जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या लिंग समभाव शिक्षण उपक्रमामुळे ग्रामीण मुलींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येत आहे. खेळाधारित शिक्षण, संवाद आणि सहभागात्मक उपक्रमांच्या माध्यमातून किशोरवयीन मुला-मुलींमध्ये समानतेची जाणीव निर्माण होत आहे.

हा प्रकल्प  महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण आणि प्रशिक्षणाची जिल्हा संस्था डाएटच्या (डीआयईटी) सहकार्याने राबवण्यात आला. संपूर्ण भारतामध्ये केवळ धाराशिव जिल्ह्यात हा प्रकल्प राबवला असून त्यामध्ये १२० शाळा, ८००हून अधिक शिक्षक आणि १८,००० हून अधिक मुलांचा सहभाग होता. धाराशिवमध्ये प्रायोगिकतत्वावर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील धाराशिवमध्ये, अंगाई-युनिसेफतर्फे लिंग समभाव हा विषय खेळाधारित शिक्षणाद्वारे किशोरवयीन मुले-मुली, शिक्षक आणि गावातील समुदायांना शिकवण्यात आला. मीना राजू मंच हा इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला असून लिंग समभावाशी संबंधित विविध पैलूंची माहिती त्यांना करून देण्यात आली. त्यामध्ये संवाद, खेळ, चर्चा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमाला स्थानिक संस्था स्वयं शिक्षण प्रयोग (एसएसपी), कोरो आणि मावा या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता.

“मी माझ्या आईशी आणि काकूशी याबद्दल बोलले. त्यांनाही हा भेदभाव जाणवला नव्हता. त्या जुन्या परंपरेनुसार मुलींना कमी अन्नाची गरज असते, असंच मानून चालल्या होत्या. पण मी त्यांना समजावून सांगितले की आम्हा दोघांनाही समान अन्नाची गरज आहे, कारण आम्ही दोघेही समान कामं करतो,” आर्णी गावातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या प्रज्ञा पाटोळे हिने स्वअनुभव कथन केला. शासन आणि युनिसेफ, अंगाई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उपक्रमामुळे मुलींना लिंग समभावाचे शिक्षण मिळाले. यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या सहायाने कुटुंबीयांच्या विचारसरणीत सकारात्मक फरक पडत आहे.

या उपक्रमामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले आहे. अनेक मुली उच्च शिक्षण घेऊ इच्छितात…प्रज्ञा संवाद साधताना म्हणाली, भविष्यात डॉक्टर बनून विशेषतः महिलांच्या आरोग्य, पोषण आणि मासिक पाळी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याची इच्छा आहे. समाजात अजूनही दुर्लक्षित असलेल्या या विषयांवर काम करण्याचा तिचा निर्धार आहे.

आज प्रज्ञा गावातील बालसभा, शाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लिंग समभावाबाबत जागृती करते. “बदल सोपा नाही, पण लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे,” असे ती ठामपणे सांगते. एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेली ही मुलगी आता समानता आणि न्याय्य समाजाचे स्वप्न पाहत आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी धाडसाने पुढे जात आहे. या उपक्रमामुळे समाजात स्त्री-पुरूष समानतेचे धडे बालपणी मिळत असल्याने लवकरच मोठ्या प्रमाणात बदल घडू शकेल, असा विश्वास शासन आणि संस्थांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.

Home मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास; ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास; ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार असल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. “मी स्वतः येथे येऊन कामाची गुणवत्ता तपासली असून काम समाधानकारक झाले आहे. उर्वरित किरकोळ कामे पुढील काही दिवसांत पूर्ण होतील. वेळेत आणि उच्च दर्जाने काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत,” असे त्यांनी सांगितले.

सुमारे १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. ७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे, हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हान होते मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हे मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक पूर्णपणे बायपास होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे २० ते ३० मिनिटांनी कमी होईल. “या प्रकल्पामुळे घाटातील अपघात जवळपास शून्यावर येतील,” असा ठाम दावा शिंदे यांनी केला. यामुळे इंधनाची बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे.

या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात बस आणि हलक्या वाहनांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.

टोलवाढीबाबत स्पष्ट करताना शिंदे म्हणाले की, “मिसिंग लिंक प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. खालापूर टोल नाक्यावरही सध्या कोणतीही वाढ प्रस्तावित नाही.”

सुमारे ६७०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला २०१९ साली मंजुरी देण्यात आली होती. त्या वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तर आता त्यांच्या उपस्थितीतच या प्रकल्पाचे लोकार्पण होणार असल्याने हा एक विशेष योगायोग असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील पहिला ॲक्सेस कंट्रोल मार्ग ठरला होता. या मार्गामुळे आयटी, सेवा क्षेत्र, उद्योग आणि रिअल इस्टेटमध्ये मोठी वाढ झाली. आता मिसिंग लिंक प्रकल्पामुळे या मार्गाची कार्यक्षमता आणखी वाढणार आहे.

तसेच या प्रकल्पामुळे लोहगड, विसापूर किल्ले आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार असून पर्यटनालाही चालना मिळेल. यासाठीच या प्रकल्पातील बोगद्यांना देखील गडकिल्ले आणि कार्ला लेण्याच्या प्रतीकृतीप्रमाणे सजवण्यात आले असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. कामाचा दर्जा उत्तम ठेवून ही शिल्प खराब होऊ नयेत याची पुरेशी खबरदारी घेण्यात आली असल्याचे यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले.

“अशा प्रकारचे प्रकल्प हे केवळ रस्ते नसून राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे असतात. कनेक्टिव्हिटी मजबूत असेल तर उद्योग, आयटी, सेवा क्षेत्र आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतात,” असे शिंदे यांनी सांगितले.

पुढील काळात समृद्धी महामार्ग, कोकण कोस्टल रोड, वसई-विरार मल्टीमोडल कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना जोडून राज्यात ऍक्सेस कंट्रोल रस्त्यांचे जाळे उभारण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात ७ ते ८ तासांत पोहोचता येईल, अशी सक्षम दळणवळण व्यवस्था उभारत आहोत,” असे त्यांनी सांगितले.

मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे यांच्यातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असून हा प्रकल्प राज्याच्या विकासाला गती देणारा ठरणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक आबासाहेब बागुल, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि एमएसआरडीसी, एफ्कॉन आणि नवयुग कंपनीचे सर्व प्रमुख अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते.

Home महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत नागरिकांना शासनाच्या अधिसूचित सेवा कालमर्यादेत, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळणे हा आपला हक्क आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत नागरिकांना शासनाच्या अधिसूचित सेवा कालमर्यादेत, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळणे हा आपला हक्क आहे.

“आपली सेवा – आमचे कर्तव्य” या भावनेतून प्रशासन नागरिकांसाठी कटिबद्ध आहे.

👉 आता विविध शासकीय सेवा सहजपणे ऑनलाइन मिळवा –

“आपले सरकार पोर्टल” आपल्या सेवेत उपलब्ध आहे.

🔗 आपले सरकार पोर्टल:

https://aaplesarkar.mahaonline.gov.in

📄 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015:

https://www.maharashtra.gov.in/…/Maharashtra_Right_to…

📜 अधिनियम नियम (राजपत्र):

https://www.maharashtra.gov.in/…/Pdf/RTS_Rules_Gazette.pdf

📋 अधिसूचित सेवांची यादी:

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/…/ViewAllServices

👉 नागरिकांनी आपल्या हक्काच्या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार

#SevaHakkDin#RTSAct2015#AapleSarkar#Nandurbar#PublicServices#CitizenRights#DigitalGovernance#GoodGovernance#Maharashtra

Home महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

पुणे: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार,अस्थिरोग आणि कर्करोगसारख्या गंभीर आजारांवर जनसामान्यांसाठी उपचार उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज केली.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या ३१ व्या स्थापना दिन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राज्याचे अपारंपरिक ऊर्जा व दुग्धविकास, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, यावेळी उपस्थित होते.

भारती हॉस्पिटल येथील नूतनीकरण केलेल्या एकत्रित महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्यालय, अत्याधुनिक नेत्ररोग विभाग व नेत्रपेढी तसेच आय. व्ही. एफ. केंद्राचे उद्घाटन आणि विद्यापीठाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

श्री.आबिटकर म्हणाले, दर्जेदार शिक्षणातून गुणवत्ता जपत समाज घडविण्याचे कार्य भारती विद्यापीठामार्फत घडत आहे.

श्री.सावे म्हणाले, छत्रपती संभाजीनगरचा विकास झपाट्याने होत असून एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक उद्योग व्यवसायात होणार आहे. अशा वेळी कुशल, अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर असणार आहे. तसेच आरोग्य व्यवस्थेचीही मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. भारती विद्यापीठाने छत्रपती संभाजीनगरमध्ये शैक्षणिक तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असेही श्री. सावे म्हणाले.

डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, भारती विद्यापीठाचे लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे भव्य शैक्षणिक संकुल उभे राहणार असून  पुण्यात भव्य क्रीडासंकुल उभारण्यात येणार आहे, असेही श्री. कदम म्हणाले.

डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, शिक्षणात तंत्रज्ञान हे सहाय्यक साधन आहे, पर्याय नाही. शिक्षणामध्ये मानवीमूल्य, नैतिकता आणि संवेदनशीलता टिकवून ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

कुलगुरू डॉ. विवेक सावजी म्हणाले, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाने २०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या संस्थांशी आणि विद्यापीठांशी शैक्षणिक सहयोग करार केले आहेत. यावर्षी विश्वविद्यालयाला महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पांसाठी २८ कोटी हून अधिक अनुदान नामवंत संस्थांकडून मिळाले आहे. सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र उत्तुरकर, प्रा. डॉ. ज्योती मंडलिक यांनी केले.

Home सत्यनारायण नुवाल, दक्ष खंते यांचे यश अत्यंत प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सत्यनारायण नुवाल, दक्ष खंते यांचे यश अत्यंत प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : खासगी क्षेत्राच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनाच्या क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान देणारे पद्मश्री सत्यनारायण नुवाल आणि तरुण पीढीचे आदर्श प्रतिनिधी ठरलेले दक्ष खंते या दोघांचेही यश आम्हा साऱ्यांसाठीच अत्यंत प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे बोलताना काढले.

नाग भूषण अवॉर्ड फाउंडेशनच्या वतीने हॉटेल रेडिसन ब्लू येथील समिट सभागृहात आयोजित आयोजित नाग भूषण पुरस्कार-२०२५ समारंभात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत तसेच अर्थ व नियोजन राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल यावेळी मंचावर उपस्थित होते. या समारंभात सोलर इंडस्ट्री इंडियाचे अध्यक्ष पद्मश्री सत्यनारायण नुवाल यांना प्रतिष्ठित अशा नाग भूषण पुरस्कार २०२५ ने, तर ‘आयरन मॅन ऑस्ट्रेलिया’स्पर्धेचे विजेते दक्ष खंते यांना युवा नाग भूषण पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते त्यांना हे सन्मान प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अत्यंत विपरित, खडतर आणि आव्हानात्मक परिस्थितीत किती मोठे कार्य होऊ शकते आणि यशाचे शीखरही गाठता येते, याचे उदाहरणच सत्यनारायण नुवाल यांनी सर्वांपुढे घालून दिले आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनाच्या क्षेत्रात खासगी क्षेत्र कितपत प्रगती साधेल, याची कुठलीही शाश्वती नसतानाच्या काळात नुवाल यांनी या क्षेत्रात पदार्पण केले आणि आता हा उद्योग यशाचे शीखर गाठतो आहे. जगातील सर्वोत्तम दर्जाची शस्त्रास्त्रेही भारत तयार करु शकतो, हे यानिमित्ताने आम्ही दाखवून दिले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्येही सोलर इंडस्ट्रीच्या योगदानाची अत्यंत मोलाची भूमिका राहिलेली आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

दक्ष खंते हे भारताच्या नव्या पीढीचे आदर्श असे प्रतिनिधी असून त्यांनी साध्य केलेले यश हे अवर्णनीय आहे. आजच्या तरुण पीढीसाठी ते रोल मॉडेल आहेत. त्यांनी याचप्रकारे नव्या पीढीला प्रेरित करावे, अशी अपेक्षाही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

जगात शांतता नांदावी, सज्जनशक्तीचा प्रभाव कायम रहावा आणि दुर्जनशक्तींवर कायम अंकूश असावा, यासाठी भारताचे संरक्षण सामर्थ्य वाढणे अत्यंत आवश्यक असून त्यादृष्टीने देशात संरक्षण तंत्रज्ञानाचा विकास साधला जात आहे. या कार्यात संशोधन आणि निर्मितीच्या क्षेत्रात सोलर इंडस्ट्री अत्यंत मोलाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी बोलताना गडकरी यांनी सत्यनारायण नुवाल आणि दक्ष खंते या दोन्ही मानकऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. या दोघांचे आपापल्या क्षेत्रातील यश कायम इतरांना प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

सत्यनारायण नुवाल आणि दक्ष खंते यांनी साध्य केलेली कामगिरी कायम इतरांना प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कामगिरीतील सार्थकता ही त्यांच्या यशातील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या दोन्ही मान्यवरांचा गौरव हा एकप्रकारे समाजाचाच गौरव आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. सत्काराला उत्तर देताना पद्मश्री सत्यनारायण नुवाल व दक्ष खंते या दोघांनीही आपल्या हृदय भावना व्यक्त केल्या. नाग भूषण फाउंडेशनचे अध्यक्ष अजय संचेती, कार्याध्यक्ष विलास काळे, फाउंडेशनचे सचिव निशांत गांधी यावेळी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी उपस्थित होते. आगामी काळात नाग भूषण पुरस्कारांना देशव्यापी स्वरुप दिले जाणार असल्याची योजना यावेळी फाऊंडेशनच्या वतीने मांडण्यात आली.

error: Content is protected !!