कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. देशभरातून लाखो भाविक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या तयारीस गती देत सुरक्षा, पाणीपुरवठा, भोजन, निवास, वाहतूक, स्वच्छता आदी बाबींची चोख व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भातील बैठकीत दिले.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 साठी नामांकने सादर करण्याचे आवाहन
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयामार्फत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 साठीची नामांकन प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची नामांकने सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कारांतर्गत दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार (DDUPSVP) देण्यात येणार असून, ग्रामीण भागात शाश्वत विकासासाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण व परिणामकारक उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे.
ग्रामपंचायतींचे मूल्यमापन हे पंचायत प्रगती निर्देशांक (PAI 2.0) अंतर्गत सन 2023-24 मधील कामगिरीच्या आधारे करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारांनी त्यांच्या सर्वोत्तम ग्रामपंचायतींच्या यशोगाथा तसेच विकासकामांवर आधारित लघुपट (Short Videos) सादर करणे आवश्यक आहे.
इच्छुक ग्रामपंचायती व संबंधित संस्थांना आपला PAI स्कोअर pai.gov.in या पोर्टलवर पाहता येणार आहे. तर अधिकृत नामांकने panchayataward.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावीत, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या आणि स्थानिक पातळीवर परिवर्तन घडवून आणणाऱ्या नेतृत्वाचा योग्य सन्मान होणार असल्याचे पंचायती राज मंत्रालयाने नमूद केले आहे.
गुन्हा कोणताही असुदे पण सतर्कता
योग्य माहितीचे ज्ञान असणे केव्हाही चांगलेच.
आपला वैयक्तिक पासवर्ड कोणाला सांगू नका
सायबर फसवणुकीला बळी पडू नका!
सायबर घोटाळेबाजांना खाते रिकामे करण्याची संधी देऊ नका
योग्य निर्णय घ्या.
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी वैयक्तिक वनहक्क पट्टे वाटप मेळावा
(नंदुरबार) राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ तसेच नियम २००८ व सुधारीत नियम २०१२ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक वनहक्क (I.F.R.) पट्टे वाटप मेळावा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी कळविले आहे.
हा वनपट्टे वाटप कार्यक्रम रविवार, ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजता, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पात्र आदिवासी व इतर पारंपारिक वननिवासी लाभार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक वनहक्कांचे अधिकृत पट्टे वितरित करण्यात येणार आहेत.
वनहक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे आदिवासी बांधवांना त्यांच्या पारंपरिक उपजीविकेच्या साधनांवर कायदेशीर हक्क मिळावा, आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावे आणि सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पात्र लाभार्थ्यांनी, वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
‘ॲडव्हांटेज विदर्भ 2026 : खासदार औद्योगिक महोत्सव’ अंतर्गत आयोजित ‘इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.
ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे जागतिक अध्यक्ष जितेंद्र जोशी, असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांच्यासह तब्बल २२ देशांचे राजदूत, उच्चायुक्त व बिझनेस प्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे याच परिषदेत गुंतवणुकीचे तीन सामंजस्य करारही पार पाडण्यात आले.
येत्या काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर राहणार आहे. यासाठी आम्ही अनेक धोरणे आखली असली, तरी काही धोरणे जुनी झाली असल्याने भविष्यातील गरजा, बदल आणि आव्हाने लक्षात घेऊन येत्या दोन-तीन महिन्यात विविध क्षेत्रांतील भविष्योन्मुख (फ्युचर रेडी पॉलिसी) धोरणे आणली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्य शासनाने गेल्या काही महिन्यांमध्ये जीसीसी पॉलिसी, जेम्स अँड ज्वेलरी पॉलिसी, बांबू पॉलिसी जाहीर केली आहे. नवे औद्योगिक धोरण आले आहे. त्यानंतर आता सात नवीन धोरणांची घोषणा येत्या दोन-तीन महिन्यांत होणार आहे. यामध्ये टेक्सटाइल्स अँड ॲपरल, लेदर अँड फूटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स अँड फॅब, एरोस्पेस अँड डीफेन्स, एमएसएमई, फार्मास्युटिकल बायोटेक अँड मेडिकल डीव्हायसेस, सर्क्युलर इकॉनॉमी, बायो प्लास्टिक या क्षेत्रांतील धोरणांचा समावेश असेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
ॲडव्हांटेज विदर्भ-खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तीन महत्त्वाचे सामंजस्य करार झालेत. यामध्ये पहिला करार महामेट्रो आणि केअर हॉस्पिटलमध्ये झाला. या प्रकल्पातून सुमारे पंधराशे ते अठराशे रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.
दुसरा करार गॅलक्सी सोलर कंपनीसोबत झाला. कंपनीद्वारे १० हजार कोटींची गुंतवणूक करत सोलर सेल, बॅटरी स्टोअरेज सिस्टीमची निर्मिती होईल. या प्रकल्पाद्वारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा सुमारे चार हजार रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.
तिसरा करार टेलिकॉम टॉवरची निर्मिती करणाऱ्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चरसोबत झाला आहे. कंपनीने २०० कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली असून याद्वारे सुमारे पाचशे रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.
स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी
तंत्रज्ञान हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून, काळानुसार त्यात सातत्याने बदल होत आहेत. यांत्रिक उपकरणांपासून ते डिजिटल आणि स्मार्ट तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास आपण सर्वच क्षेत्रांत अनुभवत आहोत. घड्याळ, टीव्ही, रेडिओ, कॉम्प्युटर, मोबाईल यांसारख्या साधनांप्रमाणेच आता वीज मोजणीच्या क्षेत्रातही स्मार्ट तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर महावितरणकडून राज्यातील ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (टाईम आंफ डे) वीजमीटर बसवण्यात येत आहेत. 9 ते 23 फेब्रुवारीदरम्यान स्मार्ट मीटर पंधरवडा साजरा होत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया स्मार्ट मीटरचे फायदे.
महावितरण ही राज्यातील सुमारे 3 कोटी 16 लाख वीजग्राहकांना वीजपुरवठा करणारी शासकीय कंपनी असून, वीजबिलांच्या अचूकतेला आणि पारदर्शकतेला तिने नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापूर्वी फोटो मीटर रीडिंग, मोबाईल अॅपद्वारे रीडिंग, केंद्रीकृत बिलिंग प्रणाली यांसारखे उपक्रम राबवून ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे. आता त्याच प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे स्मार्ट टीओडी मीटर होय.
स्मार्ट टीओडी मीटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्वयंचलित आणि अचूक मीटर रीडिंग. जुन्या पद्धतीत मानवी हस्तक्षेपामुळे चुकांची शक्यता असायची, अंदाजे बिल दिले जायचे किंवा रीडिंग न मिळाल्यास तक्रारी निर्माण व्हायच्या. स्मार्ट मीटरमुळे हे सर्व प्रश्न संपुष्टात येणार असून, दरमहा अचूक वापरानुसारच बिल तयार होणार आहे. घर बंद असले, कंपाउंड लॉक असले तरीही रीडिंग आपोआप घेतले जाणार आहे.
या मीटरमधील टीओडी प्रणालीमुळे वीजदरात थेट सवलत मिळणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी या कालावधीत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत देण्यास महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. ही सवलत 1 जुलै 2025 पासून लागू झाली असून, घरगुती ग्राहकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. घरगुती ग्राहकांचे वीजबिल स्मार्ट टीओडी मीटरमुळे आणखी कमी होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे हे स्मार्ट मीटर महावितरणकडून शंभर टक्के मोफत बसवण्यात येत आहेत. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. तसेच हे मीटर पोस्टपेडच असून, सध्याप्रमाणेच मासिक बिलिंग प्रणाली कायम आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजदर वाढतील, असा काही लोकांमध्ये गैरसमज पसरवला जात आहे; मात्र प्रत्यक्षात घरगुती ग्राहकांचे वीजदर प्रथमच कमी झाले आहेत.
सौर ऊर्जेच्या दृष्टीनेही स्मार्ट टीओडी मीटर अत्यंत उपयुक्त आहेत. नेटमीटर प्रणालीमुळे छतावरील सौर प्रकल्पातून निर्माण होणारी व वापरली जाणारी वीज तसेच ग्रीडला दिलेली अतिरिक्त वीज याचा अचूक हिशेब ठेवता येतो. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सौर प्रकल्प बसवणाऱ्या ग्राहकांसाठी हे मीटर विशेष फायदेशीर ठरणार आहेत.
एकूणच, स्मार्ट टीओडी मीटर म्हणजे अचूक बिलिंग, पारदर्शकता, वीजदरातील सवलत आणि ग्राहक-सुविधांचा संगम आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्मार्ट मीटर बसविणे ही काळाची गरज असून, त्याचा थेट फायदा वीजग्राहकांनाच होणार आहे. ग्राहकांनी हे मीटर बसवण्यासाठी सहकार्य करून अचूक बिलांचा व सवलतींचा लाभ घ्यायला हवा.
मानवी मूल्य, मानवतेचा संदेश देणारी ‘णमोकार भूमी’ समाजाला प्रेरणा देणारी ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवात केले.
महोत्सव धार्मिक अनुष्ठान नाही, तर देशाच्या प्राचीन, आध्यात्मिक, परंपरा, शांती, करुणा आणि साधनेच्या उत्सवाचे प्रतीक आहे. तीर्थकारांनी दिलेला अहिंसा, शांती आणि करुणेचा संदेश जैन बांधवासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
चांदवड तालुक्यात मालसाणे येथील णमोकार तीर्थ येथे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव’मध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार दिलीप बनकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते सेलू तालुक्यातील विविध कामाचे लोकार्पण व भूमीपूजन
वर्धा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते आज सेलू तालुक्यातील आमगाव (ख) ते गणेशपूर खापरी (ढोणे) येथील 30 लक्ष रुपयाच्या खडीकरण रस्ता बांधकाम, हिंगणी येथील आपले सरकार सेवा केंद्र, पांदन रस्ता, पुलाचे बांधकाम, नाली बांधकामाचे भूमीपूजन तसेच घनकचरा व्यवस्थापन अशा 1 कोटी 37 लक्ष रुपये व येळाकेळी येथील 40 लक्ष रुपयाच्या रस्ता बांधकामाचे भूमीपूजन व महिला बचत गट भवनाचे लोकार्पण करण्यात आले.
विविध कामाच्या भूमीपूजन व लोकार्पण कार्यक्रमाचे खडकी येथील हनुमान देवस्थान येथे सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार सुधाकर कोहळे, तहसिलदार शंकुतला पाराजे, अशेाक मुडे, अशोक कलोडे, प्रफुल खोडे, आमगावचे सरपंच राजेश लोणकर, हिंगणीच्या सरपंच दामिनी डेकाटे, ज्योती घंगारे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. पंकज भोयर म्हणाले, हिंगणी या छोट्या ग्रामपंचायतींनी व्यवस्थित नियोजन करुन घनकचरा व्यवस्थापन केले, ही ग्रामपंचायतींसाठी अभिमानाची बाब आहे. हिंगणी येथे नव्याने बांधण्यात आलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भातील सुसज्ज इमारत असल्याचे सांगून येथे येणाऱ्या रुग्णांसाठी अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्षाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार. लवकरच सिंदी ड्रायपोर्ट तयार होणार असून या ड्रायपोर्ट मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी सेलू तालुक्यातील पदवीधरांनी पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
वर्धा जिल्ह्यात 20 कोटी रुपये खर्च करुन उमेद मॉल तयार करण्यासाठी शासनाने मंजूरी दिली असून भविष्यात यामध्ये वाढ करुन 50 कोटी रुपये मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार. यामुळे जिल्ह्यातील बचत गटाच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळून गटातील महिला सक्षम होण्यास मदत होईल, असेही पुढे बोलतांना डॉ. पंकज भोयर म्हणाले.
माजी आमदार सुधाकर कोहळे म्हणाले, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीमध्ये वर्धा जिल्ह्यातील नोंदणी कमी असून यासाठी जिल्ह्यातील पदवीधरांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज भरुन घ्यावे, असे आवाहन केले. येळाकेळी येथील रस्त्याच्या भूमीपुजन व बचतगट भवन कार्यक्रमास येळाकेळीच्या सरपंच भारती चलाख, उमरीचे सरपंच सचिन खोसे, सयाजी महाराज, सोनाली कलोडे आदी उपस्थित होते.



