‘मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर’च्या गोरेगाव–मुलुंड लिंक रोड (GMLR), अमरनाथ टॉवर, वर्सोवा (पॅकेज-A), लोखंडवाला रोटरी मिल्लतनगर नर्सरी (पॅकेज-A), माइंड स्पेस इंटरचेंज, मालाड (पॅकेज-B), मरिना एन्क्लेव्ह, चारकोप (पॅकेज-C&D) आणि सेक्टर-८, चारकोप (पॅकेज-E) येथील कामाचीही पाहणी त्यांनी केली.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार अमीत साटम व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध!
(नंदुरबार) “शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. प्रत्येक विद्यार्थी सक्षम, सुसंस्कृत आणि राष्ट्रभक्त नागरिक घडला पाहिजे. शिक्षण हाच दऱ्याखोऱ्यांतील आदिवासी बांधवांच्या प्रगतीचा सर्वात प्रभावी मार्ग आहे,” असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या शुभारंभानिमित्त आणि प्रवेशोत्सव-आनंदोत्सव कार्यक्रमानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील दुर्गम तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना ते बोलत होते. यावेळी आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मुंबईच्या उपसंचालक भावना राजनूर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भानुदास रोकडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वंदना वळवी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट)चे प्राचार्य डॉ. दीपक साबळे, रमेश चौधरी, माजी शिक्षण सभापती गणेश पराडके, सीताराम पावरा, राकेश पावरा, जीवन रावतळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात प्रवेशोत्सव आणि आनंदोत्सवाच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत असल्याचे सांगत मंत्री श्री. भुसे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा आनंद पोहोचावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. तोरणमाळ येथील आवासीय विद्यालयाचा विशेष उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, 20 शाळांचे एकत्रीकरण करून उभारण्यात आलेले हे शिक्षणकेंद्र दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही येथे ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू असून, दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळत आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी स्वतःच्या जुळ्या मुलांना शासकीय शाळेत प्रवेश देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केल्याचे सांगत शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्या या निर्णयाचे विशेष कौतुक केले. शासनाच्या शाळांबाबत समाजामध्ये विश्वास निर्माण करणारे हे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांबाबत बोलताना श्री. भुसे यांनी आवासीय विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बेड, शुद्ध पिण्याचे पाणी, सौरऊर्जा यंत्रणा आणि स्वच्छतागृहांच्या सुविधा येत्या सहा महिन्यांत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेण्यासाठी दरमहा आरोग्य तपासणी करण्यात येईल आणि शाळेसाठी रुग्णवाहिकेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘राणी लक्ष्मीबाई स्वसंरक्षण प्रशिक्षण’, सैनिक शिक्षण, योगासने आणि विविध व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम राबविले जात असल्याची माहिती देत त्यांनी क्रीडा क्षेत्रातील संधी वाढविण्यावर शासनाचा विशेष भर असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याचा शासनाचा मानस असून, तोरणमाळ येथे क्रीडा अकादमी उभारण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात काळाची गरज ओळखून सकारात्मक बदल करण्यात आले असून, महान क्रांतिकारक, समाजसुधारक आणि राष्ट्राच्या मानबिंदूंचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करून त्यांना अध्यापनासाठी अधिक वेळ उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. पालकांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करताना श्री. भुसे म्हणाले की, विद्यार्थ्यांची स्वच्छता, शिस्त आणि नियमित उपस्थिती यासाठी पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक आहेत. स्थानिक बँका, उद्योगसंस्था आणि माजी विद्यार्थी संघटनांच्या सहकार्याने या ज्ञानमंदिराचा अधिक विकास साधला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अतिदुर्गम धडगाव-अक्कलकुवा भागात शिक्षणासह क्रीडा व पर्यटनाची नवी पहाट: आमश्या पाडवी
राज्याचे शिक्षणमंत्री पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या भेटीचा उपयोग करत आमदार आमश्या पाडवी यांनी या अतिदुर्गम भागाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्यांचा आणि आवश्यक बाबींचा आढावा मांडला. धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील 29 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देतानाच, त्यांनी या भागातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा व पर्यटन विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.
याबाबत बोलताना आमदार आमश्या पाडवी म्हणाले की, “राज्याचे शिक्षणमंत्री पहिल्यांदाच आमच्या या अतिदुर्गम भागात आल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. आमच्या भागातील आदिवासी मुले प्रतिकूल परिस्थितीतही खेळांच्या मैदानात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर धडाडीने चमकत आहेत. त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी येथे अद्ययावत क्रीडा संकुल उभारणे अत्यंत गरजेचे आहे. हे ठिकाण थंड हवेचे असल्याने ते खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी अतिशय पूरक ठरेल आणि भविष्यात हे एक आदर्श क्रीडा केंद्र म्हणून विकसित होईल. शिक्षणासोबतच, येथील महादेव मंदिर आणि यशवंत तलाव परिसराच्या पर्यटन विकासातून स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे शक्य आहे. शिक्षणमंत्र्यांनी या भागाकडे विशेष लक्ष दिल्याने, केवळ विद्यार्थ्यांचे भविष्यच नव्हे, तर या संपूर्ण आदिवासी क्षेत्राचे नशीब पालटून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा आमचा मानस आहे. मला खात्री आहे की, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यापासून ते क्रीडा व पर्यटनापर्यंतच्या आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक पुढाकार घेईल.”
आमदार पाडवी यांनी मांडलेली ही विकासाची दूरदृष्टी केवळ शिक्षण क्षेत्रापुरती मर्यादित नसून, ती आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक उत्थानासाठी एक आश्वासक दिशा देणारी ठरत आहे. या भेटीमुळे दुर्गम भागातील विकासाच्या अपेक्षांना नवी पालवी फुटली असून, शासनाकडून ठोस मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘टॉप-नॉच’ शिक्षण देण्यावर आमचा भर : डॉ. मित्ताली सेठी
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रशासनाच्या कटिबद्धतेचा व ‘टॉप-नॉच’ शिक्षण देण्यावर भर असल्याचा पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की, शिक्षण मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन या भागातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष सर्वेक्षण करत आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक मुलाच्या गरजा समजून घेऊन, त्यांना योग्य त्या सोयीसुविधा पुरवण्याचा आमचा मानस आहे.
डॉ. सेठी यांनी तोरणमाळ येथील इंटरनॅशनल स्कूलचा दर्जा उंचावण्यावर भर देत स्पष्ट केले की, येथील विद्यार्थ्यांना केवळ पारंपारिक शिक्षण न देता, विज्ञान, तंत्रज्ञान आणि साक्षरतेवर आधारित ‘टॉप-नॉच’ शिक्षण देण्यावर आमचा भर आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत क्रीडा अकॅडमी, अत्याधुनिक स्पोर्ट्स ट्रॅक, विज्ञान प्रयोगशाळा आणि ‘मेकर्स लॅब’ यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे विशेष महत्त्व लक्षात घेता त्यांना योग्य मार्गदर्शन पुरवण्यात येणार आहे.
या शैक्षणिक उपक्रमात संगीत आणि इतर अभ्यासेतर उपक्रमांचा समावेश करून शाळेचे वातावरण अधिक चैतन्यमय करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शाळेतील उत्तम पायाभूत सुविधा आणि तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांमध्ये ‘पिअर लर्निंग’ (सहकाऱ्यांकडून शिकणे) वाढवण्यावर आम्ही भर देत आहोत. आपल्या भाषणाच्या शेवटी, डॉ. सेठी यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी आणि पालकांना शुभेच्छा दिल्या आणि तोरणमाळच्या या शैक्षणिक प्रवासाला एका नवीन उंचीवर नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, शैक्षणिक साहित्य आणि शुभेच्छांच्या माध्यमातून उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी दुर्गम तोरणमाळमध्ये पोहोचून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
शाळेच्या पहिल्याच दिवशी दुर्गम तोरणमाळमध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे करणार नवागतांचे स्वागत
(नंदुरबार) शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक बालकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. नव्या गणवेशातील उत्साह, हातातली नवी पुस्तके, डोळ्यांतली स्वप्ने आणि शाळेच्या उंबरठ्यावर ठेवलेले पहिले पाऊल… या भावविश्वाचा आनंद अधिक संस्मरणीय करण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी यंदाच्या शाळा प्रवेशोत्सवासाठी नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयाची निवड केली आहे.
शाळा प्रवेशोत्सव हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नसून प्रत्येक बालकाच्या शैक्षणिक प्रवासाच्या प्रारंभाचा आनंदोत्सव आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी जाणीवपूर्वक दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्यतः अशा कार्यक्रमांसाठी शहरांतील किंवा सहज पोहोचता येणाऱ्या शाळांची निवड केली जाते. मात्र तोरणमाळसारख्या डोंगर-दऱ्यांतील आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेत जाऊन त्यांचे स्वागत करण्याचा निर्णय हा शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि शिक्षणावरील दृढ बांधिलकीचा प्रत्यय देणारा आहे.
शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे हे सोमवार, 15 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय, तोरणमाळ, ता. धडगाव, जि. नंदुरबार येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पवर्षाव, टाळ्यांच्या गजरात स्वागत, गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण अशा विविध उपक्रमांद्वारे आनंददायी वातावरण निर्माण केले जाणार आहे. यावेळी मंत्री श्री.भुसे विद्यार्थ्यांच्या स्वागताबरोबरच त्यांच्याशी थेट संवाद साधून शिक्षणाची प्रेरणा देणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ स्वागतापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाविषयी आत्मीयता, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्याची उमेद जागविणारा ठरणार आहे.
तोरणमाळसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आनंदात राज्याचे शिक्षणमंत्री स्वतः सहभागी होत असल्याने हा क्षण विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांसाठी विशेष अभिमानाचा ठरणार आहे. शिक्षणाचा प्रकाश शेवटच्या वाडी-पाड्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधीपासून कोणतेही बालक वंचित राहू नये, या शासनाच्या भूमिकेचे हे जिवंत उदाहरण मानले जात आहे.
शिक्षणाचा अधिकार, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा शासनाचा संकल्प या कार्यक्रमातून अधिक दृढ होणार असून, ‘प्रत्येक बालक महत्त्वाचे आहे’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणारा शाळा प्रवेशोत्सव 2026 नंदुरबार जिल्ह्यात प्रेरणादायी ठरणार आहे.
जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिन
ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख.
कुटुंबांवरील आरोग्य खर्चाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण वाटचाल.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ₹१.२५ लाख कोटींहून अधिक किमतीचे कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्यात आले.
जनऔषधी केंद्रांमधून उपलब्ध परवडणाऱ्या औषधांमुळे नागरिकांचे ₹४०,००० कोटींहून अधिक बचत झाली आहे.
Reducing the burden of healthcare costs on families.
Under Ayushman Bharat, over ₹1.25 lakh crore worth of cashless treatment has been provided, ensuring financial protection during medical emergencies.
Affordable medicines through Jan Aushadhi Kendras have helped citizens save more than ₹40,000 crore.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी व्हावे : अपर मुख्य सचिव मा.विकास खारगे
महसूल विभाग हा केवळ जमिनींच्या नोंदींचा विषय नसून नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण, आदिवासी व वंचित घटकांना न्याय देणे आणि विकासकामांना गती देणारी महत्त्वपूर्ण यंत्रणा आहे. नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ व्हावा यासाठी महसूल विभागाने अधिक संवेदनशीलता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाने कार्य करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव (महसूल) मा.विकास खारगे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी महसूल अभिलेखांचे अद्ययावतीकरण, शासकीय जमिनींचे व्यवस्थापन, अतिक्रमण निर्मूलन, स्वामित्व योजना, आदिवासी जमीन हस्तांतरण प्रकरणे, हक्क अभिलेख, भूसंपादन, तक्रार निवारण व्यवस्था तसेच ई-कार्यालय प्रणालीच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला.
फेरफार, वारस नोंदी व इतर प्रलंबित प्रकरणे कालबद्ध पद्धतीने निकाली काढण्याचे निर्देश.
शासकीय जमिनींचे संरक्षण व विकासकामांसाठी प्रभावी वापर करण्यावर भर.
जमीन बँक उपक्रमांतर्गत उपलब्ध जमिनींची प्रत्यक्ष पडताळणी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना.
आदिवासी जमीन हस्तांतरण व हक्क अभिलेखाशी संबंधित प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याचे निर्देश.
नागरिकांच्या तक्रारींसाठी प्रभावी ऑनलाइन मागोवा प्रणाली विकसित करण्यावर भर.
सर्व महसूल कार्यालयांमध्ये ई-कार्यालय प्रणालीचा १०० टक्के वापर सुनिश्चित करण्याच्या सूचना.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी सर्व तसेच महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
“शासनाच्या सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि नागरिककेंद्रित करण्यासाठी महसूल यंत्रणेने सक्रिय भूमिका बजावली पाहिजे,” असेही मा.विकास खारगे यांनी यावेळी नमूद केले.
#Nandurbar#RevenueDepartment#VikasKharge#DrMittaliSethi#GoodGovernance#TransparentAdministration#DigitalGovernance#LandRecords#SwamitvaYojana#CitizenCentricGovernance#MaharashtraGovernment#NandurbarDevelopment#JansamparkNandurbar
‘हरित नंदुरबार’ अभियानांतर्गत नवापूर चौफुली परिसरातील हरितीकरण उपक्रमास प्रारंभ
(नंदुरबार) पर्यावरणपूरक, सुंदर आणि राहण्यायोग्य शहराच्या निर्मितीसाठी सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘हरित नंदुरबार’ अभियानाला आज नवापूर चौफुली परिसरातून हिरवी सुरुवात मिळाली. शहरातील प्रमुख मार्गांचे हरितीकरण करून पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव (महसूल) मा.विकास खारगे, जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी तसेच वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण), नाशिक गजेंद्र हिरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या अभियानांतर्गत नवापूर चौफुलीपासून विविध दिशांना जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा स्थानिक व पर्यावरणपूरक वृक्षप्रजातींची लागवड करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील हरित क्षेत्र वाढण्यास, हवेची गुणवत्ता सुधारण्यास, कार्बन शोषण वाढण्यास तसेच जैवविविधतेच्या संवर्धनास मोठी मदत होणार आहे.
उपक्रमांतर्गत वड, पिंपळ, शिरस, अमलतास, जारूळ आणि निंब यांसारख्या स्थानिक वृक्षप्रजातींची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्षांमुळे पक्षी, फुलपाखरे आणि इतर जीवसृष्टीला नैसर्गिक अधिवास उपलब्ध होऊन पर्यावरणीय समतोल अधिक बळकट होणार आहे.
‘हरित नंदुरबार’ ही केवळ वृक्षारोपण मोहीम नसून भावी पिढ्यांसाठी स्वच्छ, हिरवेगार आणि शाश्वत पर्यावरण निर्माण करण्याचा व्यापक संकल्प आहे. वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत मान्यवरांनी नागरिकांनाही या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी डॉ. मकरंद गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक वनसंरक्षक अपर्णा पाटील व स्नेहल अवसरमल यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
एक वृक्ष – अनेक पिढ्यांचे संरक्षण!
चला, ‘हरित नंदुरबार’च्या संकल्पाला बळ देत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून पार पाडूया.
#HaritNandurbar#GreenNandurbar#TreePlantation#EnvironmentDay#SocialForestry#Nandurbar#EcoFriendlyCity#SustainableDevelopment#GreenInfrastructure#EnvironmentalConservation#Maharashtra#ViksitNandurbar#SaveEnvironment#PlantTrees#HaritMaharashtra![]()
![]()
![]()
महाराष्ट्र शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशनमध्ये दंत पर्यटनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार
मुंबई: विकसित महाराष्ट्र 2047 या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेच्या अनुषंगाने राज्यात दंत पर्यटन (डेंटल टुरिझम) क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. राजशिष्टाचार, परकीय गुंतवणूक, डायसपोरा आणि आऊटरीच विभागाच्या पुढाकाराने हा करार करण्यात आला.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनातर्फे सचिव डॉ. राजेश गवांदे आणि उप सचिव अविनाश सोलावट तसेच इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे मानद सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
राज्यात पर्यटनाच्या नव्या संधी निर्माण करणे, विविध क्षेत्रांमध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करणे आणि महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील आरोग्यसेवा केंद्र म्हणून विकसित करणे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या कराराद्वारे महाराष्ट्राला दंत आरोग्य आणि उपचारांसाठी सुरक्षित, पारदर्शक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या सामंजस्य कराराअंतर्गत देश-विदेशातील रुग्णांना महाराष्ट्रातील दंत उपचार सुविधा, टेलि-कन्सल्टेशन सेवा आणि अन्य आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच दंत आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षण, उपचार, संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देण्यासाठी दोन्ही संस्था परस्पर सहकार्य करणार आहेत.
मार्गदर्शन, संवाद सहाय्य आणि विविध विभागांशी समन्वय साधण्यासाठी शासन मदत करेल. तर इंडियन डेंटल असोसिएशन प्रशिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि हितधारकांच्या सहभागासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देईल. दंत पर्यटनाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी विविध बैठका, कार्यशाळा, परिषद आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे.
यामुळे महाराष्ट्राच्या आरोग्य पर्यटन क्षेत्राला नवी दिशा मिळण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासालाही हातभार लागणार आहे.
हा करार तीन वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार असून तो अबाध्य (Non-Binding) आणि गैर-आर्थिक स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक बांधिलकी या करारातून निर्माण होणार नसून विशिष्ट प्रकल्पांसाठी स्वतंत्र करार करण्यात येणार आहेत. हा करार केवळ सहकार्याची रूपरेषा निश्चित करणारा इच्छापत्र स्वरूपाचा असून त्यातून कोणतेही कायदेशीर अथवा आर्थिक बंधन निर्माण होणार नाही. कराराचा कालावधी तीन वर्षांचा असून कोणत्याही पक्षाला 30 दिवसांची लेखी नोटीस देऊन करारातून बाहेर पडता येणार आहे.
या उपक्रमामुळे महाराष्ट्राला दंत पर्यटनाच्या क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे स्थान प्राप्त होण्यास मदत होईल, तसेच राज्यातील आरोग्य पर्यटनाला चालना मिळून रोजगार, गुंतवणूक आणि आरोग्यसेवा क्षेत्राच्या विकासाला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
‘पु.ल. कट्टा’ उपक्रमाच्या वर्षपूर्ती निमित्त १२ जून रोजी पुलंच्या साहित्याची अक्षरमैफल
मुंबई : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडून सुरू करण्यात आलेल्या ‘पु. ल. कट्टा’ या अभिनव उपक्रमाला १२ जून २०२६ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीनिमित्त १२ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे ‘अक्षरमैफल’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या निवडक पत्रांचे आणि लेखांचे अभिवाचन प्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे, प्रसिद्ध अभिनेते संजय मोने, मीना नाईक, उत्तरा मोने करणार आहेत.
१२ जून २०२५ रोजी सुरू झालेल्या या उपक्रमाने अवघ्या एका वर्षात कलाकार आणि रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. कला, साहित्य, संगीत, नाट्य, अभिवाचन, सुलेखन, चर्चासत्रे, लोककला आणि विविध सांस्कृतिक अभिव्यक्तींना एकाच व्यासपीठावर आणत ‘पु. ल. कट्टा’ खऱ्या अर्थाने कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ ठरला आहे.
गेल्या वर्षभरात या कट्ट्यावर अनेक मान्यवर कलाकार, लेखक, दिग्दर्शक, संगीतकार आणि साहित्यिकांनी उपस्थिती लावली. त्याचबरोबर अनेक नवोदित कलाकारांनाही आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. त्यामुळे ‘पु. ल. कट्टा’ हा केवळ कार्यक्रमांचा मंच न राहता नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देणारे आणि विविध कलाप्रकारांना जोडणारे एक समृद्ध सांस्कृतिक केंद्र बनले आहे.
या वर्षभरात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांनी रसिकांना वैचारिक आणि कलात्मक मेजवानी दिली. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते उपेंद्र दाते यांच्यासोबत झालेल्या ‘नवा नटसम्राट’ या विशेष संवाद कार्यक्रमात त्यांच्या कलाप्रवासातील अनुभव, अभिनय क्षेत्रातील संघर्ष आणि पडद्यामागच्या अनेक आठवणी उलगडल्या. ‘अक्षरांचे संगती’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात पद्मश्री अच्युत पालव यांच्या सुलेखन कलेचा आणि प्रसाद फणसे यांच्या आवाजाच्या जादूचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. अक्षर, रेषा आणि स्वर यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ज्येष्ठ लेखक शिरीष कणेकर यांच्या गाजलेल्या लेखनावर आधारित ‘वेचक कणेकरी’ या कार्यक्रमात त्यांच्या निवडक लेखांचे अभिवाचन, किस्से आणि गप्पागोष्टी रंगल्या. साहित्यप्रेमींसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षणाचा ठरला. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्य विभागाच्या दुर्मिळ नाटक जतन योजनेअंतर्गत सादर झालेल्या जयवंत दळवी लिखित ‘मुक्ता’ आणि मधुसूदन कालेलकर लिखित ‘झुंज‘ या नाटकांचं ध्वनिचित्रमुद्रण ही रसिकांसाठी एक आगळी मेजवानी ठरली. या नाटकांच्या प्रयोगानंतर कलाकारांशी झालेल्या मुक्त संवादाने रंगभूमीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेतील महान सुरबहार वादिका विदुषी अन्नपूर्णादेवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘A-6 आकाशगंगा’ या विशेष कार्यक्रमाने संगीत रसिकांना एक वेगळाच अनुभव दिला. अन्नपूर्णादेवींचे विचार, त्यांचे गुरुतत्त्व आणि संगीत क्षेत्रातील योगदान यांचा उहापोह या कार्यक्रमातून करण्यात आला. तर ‘जादू अशी घडे ही…’ या सुरेल मैफिलीत हिंदी आणि मराठी प्रेमगीतांनी सजलेली बहारदार संगीत मैफल रंगली. युवा गायक आणि वादक कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांची मनं जिंकली.
या सर्व कार्यक्रमांमधून ‘पु. ल. कट्टा’ने विविध कलाशाखांना एकत्र आणण्याचे आणि कलाकार-रसिक यांच्यात थेट संवाद घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. ज्येष्ठ कलाकारांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनाचा लाभ नवोदितांना मिळाला, तर नव्या पिढीतील कलाकारांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले.
‘कलेचा आनंद, विचारांची मेजवानी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत ‘पु. ल. कट्टा’ने अवघ्या एका वर्षात सांस्कृतिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कलाकार आणि रसिक यांच्यातील हा सांस्कृतिक सेतू पुढील काळातही अधिक व्यापक आणि समृद्ध होत राहील, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला असून आज अखेर राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे २५ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्ड्स लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत.
दरम्यान, स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा वितरण परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावे, या उद्देशाने स्मार्ट कार्ड प्रणाली राबविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी १ ऑगस्टपूर्वी आपले स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.