सातारा : शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर आज शहापूर ता. कराड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.
यावेळी आमदार मनोज घोरपडे, आमदार डॉ. अतुल भोसले, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओमकार कापले, गटशिक्षणाधिकारी प्रताप पाटील यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी शहीद जवान अर्जुन जाधव यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.
यानंतर वीर पत्नी सायली, मुलगा सर्वेश, वीर पिता राजेंद्र, वीर माता सुरेखा, भाऊ ऋषिकेश, बहिणी रेश्मा चव्हाण, पूनम पाटील यांनी अंतिम दर्शन घेतले. यानंतर शहीद अर्जुन जाधव यांच्या पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दक्षिण मुंबई विभागातील अनधिकृत शाळा व वर्ग बंद करण्याचे निर्देश
मुंबई : दक्षिण मुंबई विभागातील काही शाळा व शाळांमधील काही वर्ग अनधिकृतरीत्या चालविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी संबंधित शाळांना नोटीस बजावून अनधिकृतरीत्या चालविण्यात येत असलेल्या शाळा व वर्ग तात्काळ बंद करण्याबाबत निर्देश दक्षिण मुंबई विभागाच्या शिक्षण निरीक्षक यांनी दिले आहेत.
या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. एकही वर्गास मान्यता नसलेल्या मुंबईतील अनधिकृत शाळांमध्ये मदनी हायस्कूल (क्रॉफर्ड मार्केट, मस्जीद), युसुफ मेहर अली हायस्कूल (नारायण तावडे चौक, तुळशीवाडी ताडदेव), मदर तेरेसा हायस्कूल (ब्लॉक नं 11, 90 फिट, धारावी), गणेश विद्यामंदीर (संत कक्कैया मार्ग, धारावी), ऑक्झिलम इंटरनॅशनल स्कूल (बलराम बाबू खाडेकर मार्ग, वडाळा पूर्व) फिनलँड इंटरनॅशनल स्कूल (माहेश्वरी निकेतन, गोपालराव देशमुख मार्ग) यांचा समावेश आहे.
अनधिकृतरित्या वर्ग चालविण्यात येत असलेल्या मुंबईतील शाळांमध्ये मोहम्मदीया हायस्कूल (27 मस्जीद मार्ग) येथील इयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग अनधिकृत आहेत. या शाळेत इयत्ता 1 ली ते 5 वी व 9 वी ते 10 वी पर्यंतच्या वर्गांनाच मान्यता आहे. गोल्डन स्पायरल हायस्कूल, परेल (4 बी, ॲडव्हान्स्ड हाऊस, ताडदेव) या शाळेत इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंतचे वर्ग अनधिकृत आहेत. येथील इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंतच्या वर्गांनाच मान्यता आहे, असे शिक्षण निरीक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित, सन्मानजनक आणि भयमुक्त वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे.
‘पॉश’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक कार्यस्थळ अधिक सुरक्षित आणि संवेदनशील बनवूया.
#POSHकायदा#महिलासुरक्षा#सुरक्षितकार्यस्थळ#महिलासन्मान#कामगारविभाग#Maharashtra#WomenSafety#POSHAct2013#SafeWorkplace#GenderEquality#महिलाशक्ती
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील बालकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
मानसिक आरोग्य हा सामाजिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक जबाबदारीचा महत्त्वपूर्ण भाग बनला असून, राज्य बाल हक्क आयोगामार्फत राज्यातील दहा जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणारा ‘मानस’ प्रकल्प बालकांना भावनिकदृष्ट्या सक्षम, मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यातील बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नाशिक येथे आयोजित करण्यात येणारा बालस्नेही कुंभमेळा देखील महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
बाल संरक्षण, बालमजुरी प्रतिबंध, बाल आरोग्य व पोषण, बालविवाह प्रतिबंध, बाल तस्करी व बाल शोषण प्रतिबंध तसेच पोक्सो कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे. बालकांना सर्वोतोपरी सुरक्षा मिळावी यासाठी आवश्यक उपाययोजना, धोरणात्मक सूचना आणि शिफारशी करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकांवर वधू-वरांची जन्मतारीख नमूद करणे सक्तीचे करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या महिलांच्या वयाचा आधार कार्ड हा पुरावा ग्राह्य न धरता जन्मतारखेचा दाखला वैध मानण्याबाबत आवश्यक प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे सचिव पंकज देवरे, आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक आदी उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना
प्रत्येक बालकाला कुटुंबाचा आधार, उज्ज्वल भविष्यासाठी शासनाचा हातभार!
मन मे है विश्वास’… आणि त्या विश्वासाला भेटले ‘विकास’!
(नंदुरबार) जीवनात काही क्षण असे असतात की ते फक्त घडत नाहीत, तर आयुष्यभरासाठी मनात कोरले जातात. नंदुरबार तालुक्यातील वाघाळे गावातील एका साध्यासुध्या अभ्यासिकेत आज असाच एक क्षण घडला आणि त्याचा साक्षीदार झाला संपूर्ण गाव.
महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे जिल्हा दौऱ्यावर होते. विविध कामांची पाहणी करत असताना त्यांनी वाघाळे येथील जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभ्यासिकेला भेट दिली. गावातील युवक-युवती स्पर्धा परीक्षांच्या तयारीत मग्न होते. शांत वातावरण, पुस्तकांत हरवलेली स्वप्ने आणि भविष्य घडविण्याची धडपड सुरू होती.
याच वेळी श्री. खारगे यांची नजर एका युवकावर गेली. त्या युवकाचे नाव होते अक्षय गांगर्डे अक्षय आपल्या अभ्यासात इतका तल्लीन होता की त्याला सभोवतालचे भानही नव्हते. त्याच्या हातात भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी विश्वास नागरे-पाटील यांचे ‘मन मे है विश्वास’ हे पुस्तक होते.
श्री. खारगे काही क्षण त्या पुस्तकाकडे पाहत राहिले. ते अक्षयच्या शेजारी जाऊन उभे राहिले आणि प्रेमाने विचारले,
“या पुस्तकाचे लेखक तुला माहिती आहेत का?”
अक्षयने तत्परतेने उत्तर दिले,
“हो सर, विश्वास नागरे-पाटील!”
“कधी भेटला आहेस का त्यांना?”
“नाही सर.”
“मग बोलला आहेस का?”
अक्षय थोडासा संकोचला.
“नाही सर… बोलायची भीती वाटते.”
हे उत्तर ऐकताच श्री. खारगे यांनी तत्काळ आपला मोबाईल काढला आणि विश्वास नागरे-पाटील यांना मोबाईल कॉल केला. काही क्षणांतच त्यांनी अक्षयचा संवाद त्याच्या प्रेरणास्थानाशी घडवून आणला.
फोनवरील संवाद सुरू झाला आणि अक्षयचा आनंद गगनात मावेनासा झाला. ज्या व्यक्तीचे पुस्तक हातात घेऊन तो स्वप्ने रंगवत होता, ज्या अधिकाऱ्याच्या कार्यातून तो प्रेरणा घेत होता, त्या विश्वास नागरे-पाटील यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी त्याला मिळाली होती.
याच संवादादरम्यान विश्वास नागरे-पाटील यांनी अक्षयला एक अशी गोष्ट सांगितली, ज्याने उपस्थित सर्वांनाच सुखद धक्का दिला.
ते म्हणाले,
“अक्षय, तुझा रोल मॉडेल जरी मी असलो, तरी माझे रोल मॉडेल आदरणीय विकास खारगे सर आहेत.”
हे शब्द ऐकताच अभ्यासिकेत एक वेगळीच भावना दाटून आली. ज्यांना आदर्श मानून अक्षय स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता, त्या विश्वास नागरे-पाटील यांचेही आदर्श स्वतः समोर उभे आहेत, हे ऐकून अक्षय भारावून गेला. उपस्थित युवकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, आनंद आणि प्रेरणेचे भाव एकाच वेळी उमटले.
एका बाजूला आपल्या आदर्शाशी बोलण्याचे स्वप्न पूर्ण होत होते आणि दुसऱ्या बाजूला यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीदेखील कोणाकडून प्रेरणा घेतात, हा जीवनाचा मोठा धडा त्या क्षणी युवकांना मिळत होता.
त्या काही मिनिटांच्या संवादाने केवळ अक्षयच नव्हे, तर उपस्थित प्रत्येक युवकाच्या मनात आत्मविश्वासाची नवी ज्योत पेटली. स्वप्नांना आकार देण्यासाठी मेहनतीसोबत विश्वासही तितकाच महत्त्वाचा असतो, याची जाणीव त्या क्षणी सर्वांना झाली.
उपस्थित ग्रामस्थांसाठीही हा अनुभव वेगळाच होता. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतात, त्यांची छोटीशी इच्छा ओळखतात आणि ती पूर्ण करण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेतात, हे पाहून सर्वांनाच प्रशासनाचा संवेदनशील चेहरा अनुभवायला मिळाला.
या प्रेरणादायी भेटीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, प्रांताधिकारी उषाराणी देवगुणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, तहसीलदार प्रदीप पवार तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह जवळून अनुभवला.
योगायोग असा की अक्षयच्या हातात होते ‘मन मे है विश्वास’ आणि त्याच्या स्वप्नांना नवी ऊर्जा देण्यासाठी सोबत होते राज्या्सा महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे.
म्हणूनच त्या भेटीनंतर उपस्थितांच्या मनात एकच भावना दाटून आली…
“मन मे है विश्वास… आणि साथ मे है विकास!”
वाघाळेच्या त्या छोट्याशा अभ्यासिकेत घडलेला हा प्रसंग केवळ एका विद्यार्थ्याचा आणि त्याच्या प्रेरणास्थानाचा संवाद नव्हता; तो शासन,प्रशासन, प्रेरणा, संवेदनशीलता आणि माणुसकी यांचा सुंदर संगम होता.
अक्षय गांगर्डेच्या आयुष्यातील हा क्षण कदाचित कधीही विसरला जाणार नाही. कारण आज त्याने केवळ आपल्या आवडत्या अधिकाऱ्याशी संवाद साधला नाही, तर स्वतःच्या स्वप्नांवरचा विश्वासही अधिक दृढ केला.
आणि कदाचित म्हणूनच आजच्या दिवसाची आठवण त्याच्या मनात कायम राहील…
कारण कधी कधी एका फोन कॉलपेक्षाही मोठी गोष्ट असते ती म्हणजे, एखाद्याच्या स्वप्नांवर ठेवलेला अक्षय विश्वास.
श्री रामाच्या जयघोषासह मंत्रोच्चारात सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा संपन्न
नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्याने शुभारंभ झाला आहे. आगामी कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित व भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन, साधू-संत, महंत, विविध सामाजिक, धार्मिक संघटना आणि नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
श्री गंगा गोदावरी पंचकोठी (तीर्थ) पुरोहित संघ, नाशिकच्यावतीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामाच्या जयघोषात आणि वेद मंत्रोच्चारात सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा आज सकाळी कमला एकादशीच्या पर्वावर पवित्र रामकुंड, नाशिक येथे कुंभमेळा मंत्री श्री. महाजन यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, माजी आमदार बाळासाहेब सानप, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांच्यासह विविध आखाड्यांचे प्रमुख साधू-संत, महंत उपस्थित होते.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, पुढील वर्षी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत असून मागील कुंभमेळ्यापेक्षा चार ते पाच पट अधिक, म्हणजेच 12 कोटींपेक्षा जास्त भाविकांच्या आगमनाची अपेक्षा आहे. त्यामुळे कुंभमेळा यशस्वी करण्याची जबाबदारी शासन, प्रशासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाची आहे. गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी विविध संघटनांनी आणि भक्तगणांनी पुढाकार घेतला असून ही स्वच्छता केवळ एका दिवसापुरती नसून सातत्याने राखली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी प्रत्येक नाशिककराने स्वयंसेवक बनून पुढाकार घ्यावा.
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि जिल्ह्यात विविध विकासकामांना वेग आला आहे. रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि नागरी सुविधांसाठी सुमारे 35 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची अंमलबजावणी सुरू आहे. या विकासकामांमुळे पुढील वर्षी नाशिकचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कुंभमेळ्याच्या तयारीत साधू-संत, महंत, आखाडे, लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगून मंत्री श्री. महाजन यांनी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे नमूद करुन त्यांनी कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, संजयदत्त महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी दिगंबर आखाड्याचे महंत वैष्णवदास महाराज, मंगल पीठाधीश्वर माधवाचार्य महाराज, निर्वाणी आखाड्याचे महंत मुरलीधरदास महाराज, महंत मोहनदास महाराज, महंत राजेंद्रदास महाराज, महंत रामजीदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, रामकिशोरदास शास्त्री महाराज, महंत रामस्नेहीदास महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे संत-महंत, भाविक, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजा करुन गंगा गोदावरीचे पूजन करण्यात आले. शंखनाद आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन समारंभ भक्तीमय वातावरणात पार पडला. पुरोहित संघाच्या सदस्यांनी मंत्रोच्चार केले.
‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’द्वारे व्यापक जनजागृती, अन्न व औषध प्रशासनाचा सुरक्षित अन्न, निरोगी समाजासाठी पुढाकार
मुंबई: ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ या विशेष उपक्रमांतर्गत बृहन्मुंबई परिसरात १ ते १५ जूनपर्यंत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांमध्ये सुरक्षित अन्नाविषयी जागरूकता निर्माण करणे, अन्नभेसळीमुळे होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी आवश्यक खबरदारीची माहिती देणे आणि जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, रेल्वे स्थानके आणि इतर गर्दीच्या परिसरांमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. फिरत्या अत्याधुनिक प्रयोगशाळेद्वारे विविध अन्नपदार्थांचे ६९ नमुने जागेवरच तपासण्यात आले. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, अन्नविक्रेते आणि अन्न व्यवसायिक यांच्याशी थेट संवाद साधून अन्न सुरक्षा, स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी, अन्न साठवणूक, अन्नपदार्थांवरील लेबलची माहिती, कालबाह्य अन्नपदार्थ टाळण्याचे महत्त्व तसेच भेसळयुक्त अन्न ओळखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
राज्यात अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याबरोबरच जनतेमध्ये अन्न सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती करण्यावर विशेष भर दिला जात आहे. केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता नागरिकांना मार्गदर्शन, शिक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून सुरक्षित अन्नाच्या संकल्पनेशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून अन्न व औषध प्रशासनामार्फत राबविले जात आहे.
कार्यक्रमादरम्यान दुग्धजन्य पदार्थ, मसाले, खाद्यतेले आणि इतर अन्नपदार्थांमधील संभाव्य भेसळ ओळखण्यासाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. घरच्या घरी करता येणाऱ्या प्राथमिक चाचण्यांची माहिती नागरिक, विद्यार्थी आणि अन्नविक्रेत्यांना देण्यात आली. त्यामुळे अन्नभेसळीविषयी जागरूकता वाढण्यास आणि सुरक्षित अन्न निवडण्याबाबत मदत होईल.
याशिवाय विविध दूध संकलन केंद्रांना भेटी देऊन दूधाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीच्या माध्यमातून दूधाची गुणवत्ता, शुद्धता आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात आली तसेच भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या सुरक्षा मानकांचे पालन करण्याबाबत बृहन्मुंबई विभागाचे सहआयुक्त म. ना. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली.
मोहिमेदरम्यान नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्नपदार्थांची निवड करणे, अन्नपदार्थ खरेदी करताना उत्पादन व कालबाह्यता दिनांक तपासणे, शिजविलेले अन्न योग्य तापमानात साठवणे, वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे आणि अन्न सुरक्षा संदर्भातील तक्रारी संबंधित यंत्रणेकडे नोंदविणे याबाबत विशेष आवाहन करण्यात आले.
‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ हा उपक्रम केवळ विशेष मोहिमेपुरता मर्यादित नसून बृहन्मुंबई परिसरात सातत्याने राबविण्यात येत आहे. आगामी काळातही विविध भागांमध्ये अशाच जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून अधिकाधिक नागरिक, विद्यार्थी आणि अन्न व्यवसायिकांपर्यंत अन्न सुरक्षा विषयक माहिती पोहोचविण्यात येणार आहे.
अन्न सुरक्षा नियमांचे पालन आणि जनसहभाग यांमधूनच सुरक्षित व निरोगी समाजाची निर्मिती शक्य असल्याने प्रत्येक नागरिकाने अन्न सुरक्षेबाबत सजग राहून सुरक्षित अन्नाचा स्वीकार करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
साने गुरुजी पुण्यतिथी
“प्रेमाचा धडा देणारे हात थांबले,
पण मानवतेची शिकवण आजही जिवंत आहे.”
साने गुरुजींना भावपूर्ण अभिवादन. ![]()
जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार
#सानेगुरुजी#पुण्यतिथी#भावपूर्णअभिवादन#मानवता#करुणा#विनम्रअभिवादन
माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परिक्षा शुल्क भरण्यासाठी 18.06.2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1981 कलम 6 अन्वये स्थापित विविध सुरक्षा रक्षक मंडळे व महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1969 कलम 6 अन्वये स्थापित विविध माथाडी मंडळे यांचे आस्थापनेवरील सेवाप्रवेश नियम शासन परिपत्रक क्र.युडब्लूए-2016/प्र.क्र.01/कामगार-5, दिनांक 11 फेब्रुवारी, 2021 नुसार खालील संवर्गातील एकूण 22 माथाडी मंडळे व 12 सुरक्षा रक्षक मंडळांतर्गत निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक संवर्गातील पदांच्या सरळसेवा पध्दतीने गट-क मधील रिक्त पदे भरती जाहिरात 13.05.2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
त्यानुसार उमेदवारांचे अर्ज 11.06.2026 रोजी 23.55 वाजेपर्यंत यशस्वीपणे दाखल झाले असतील अशा उमेदवारांना अर्जाचे परीक्षा शुल्क भरण्याकरिता 12.06.2026 रोजी 23.55 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेली होती. तथापि, शुल्क भरण्याकरिता काही तांत्रिक अडचणी उमेदवारांना येत असल्यामुळे शुल्क भरण्याच्या कालावधीमध्ये 18.06.2026 रोजी23.55 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. ही मुदतवाढ 11.06.2026 रोजी पर्यंत अर्ज भरण्यात आलेल्या उमेदवारांना केवळ शुल्क भरण्याकरिता देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी, असे सह आयुक्त कामगार तथा सदस्य सचिव, माथाडी व सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया समिती, मुंबई यांनी कळविले आहे.
अधिक माहितीकरीता https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे