Home महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान यांचा संगम—जागरूक, संवेदनशील आणि जबाबदार पत्रकारितेकडे एक पाऊल!

महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान यांचा संगम—जागरूक, संवेदनशील आणि जबाबदार पत्रकारितेकडे एक पाऊल!

✔️ तथ्याधारित व संवेदनशील वृत्तांकन

✔️ एआयमधील पूर्वग्रहांपासून सावध वापर

✔️ महिलांच्या कायदेशीर हक्कांची जनजागृती

✔️ मदतीसाठी हेल्पलाइन (१८१ / ११२) प्रचार

✔️ सकारात्मक कथा आणि यशोगाथांना प्राधान्य

समाज बदलतो, जेव्हा माध्यमे जबाबदारीने बोलतात.

#महिला_सक्षमीकरण#जबाबदारपत्रकारिता#DigitalIndia

Home ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाने वैद्यकीय सेवा, शिक्षण क्षेत्रातील निस्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेल्याची शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत

ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाने वैद्यकीय सेवा, शिक्षण क्षेत्रातील निस्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेल्याची शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत

डॉ. गोपाळराव पाटील यांना आपल्या परिसराविषयी मोठी तळमळ होती. ते व्यवसायाने बालरोग तज्ज्ञ होते, पण ग्रामीण भागात चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले. वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी भरीव असे योगदान दिले. बालरोग तज्ज्ञांच्या संघटनात्मक बांधणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

#गोपाळरावपाटील

Home नवीन प्रयोग करणाऱ्या युवा शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करा

नवीन प्रयोग करणाऱ्या युवा शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करा

Ø युवा शेतकऱ्यांच्या समस्याबाबत आढावा बैठक

Ø शेती क्षेत्रातील समस्यांसाठी समिती करण्याचे निर्देश

वर्धा : जिल्ह्यातील अनेक युवा शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आहे. या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनासोबतच आवश्यक सुविधा निर्माण करून दिल्यास हे शेतकरी जिल्ह्यात चांगला बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यावर भर द्या, असे निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी युवा शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडचणी व त्यांना अपेक्षित आवश्यक सुविधांची माहिती घेतली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.जगदीश बुकतरे, सहाय्यक आयुक्त डॉ. संजय खोपडे, कृषि विभागाचे अधिकारी, युवा कृषि संघाचे युवा शेतकरी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील तरुण शेतकरी आता पारंपारीक शेती सोडून बागायत आणि तंत्रज्ञानयुक्त आधुनिक शेतीकडे वळत आहे. मात्र पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अडचणी येत आहे. विशेषत: पांदन रस्ते, कोल्ड स्टोरेज आणि वेळेवर मिळणारे अनुदान यावर तातडीने काम करण्याची गरज असल्याचे युवा शेतकऱ्यांच्यावतीने पालकमंत्री डॉ.भोयर यांना सांगण्यात आले.

यावेळी पालकमंत्री डॉ.भोयर म्हणाले, पांदन रस्ते बांधकाम मोहिम हाती घेण्यात आली असून पहिल्या टप्प्यात 25 किमी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील कोरडवाहू शेतीला सिंचनाखाली आणण्यासाठी हिंगणघाट तालुक्यात आजनसरा बॅरेज प्रकल्प, वर्धा तालुक्यातील धाम, बोर व आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत शेतीसिंचन वाढविण्याचा प्रयत्न सुरु आहे. सोबत वैनगंगा- नळगंगा हा राज्य शासनाने महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून प्रकल्पांतर्गत जोडल्या जाणाऱ्या गावातील तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

युवा शेतकरी राहुल वांदिले यांनी युवा शेतकऱ्यांच्यावतीने कोरडवाहू शेती विकास, पांधनरस्ते खडीकरण, दिवसा 12 तास वीज पुरवठा, एपीएमसी पारदर्शकता, शेती फेन्सींग अनुदान, रोपवाटिका प्रमाणिकरण, नेट पॉलीहाऊस व ठिबक, पशुपालन व दुग्धविकास, पीक विमा तक्रार निवारण, गावपातळीवर वेधशाळा, कृषि प्रशिक्षण संस्था, फळ व फुल बाजार निर्मिती, अनुदान प्रक्रिया सुलभता, कोल्ड स्टोरेज साखळी, मुल्यवर्धन व प्रक्रिया उद्योग व प्रकल्प आधारित कर्ज पुरवठा आदी विषय व समस्या पालकमंत्री डॉ. भोयर यांच्याकडे मांडल्या.

युवा शेतकऱ्यांच्या मागण्या, अडचणी व त्यांनी सुचविलेल्या बाबींवर चर्चा व निर्णय घेऊन ठोस उपाय करण्यासाठी समिती नेमण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. या समितीमध्ये विविध विभागाचे संबंधित अधिकारी तसेच युवा शेतकऱ्यांचा समावेश करावा, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.

Home मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य एलनिनो च्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य एलनिनो च्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली.

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार या योजनांची कामे तातडीने आणि मोठ्या प्रमाणात पूर्ण करावीत. या कामांसाठी वित्त विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच जुन्या जल स्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवनाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

पाणी बचतीसाठी आणि इतर पूरक उपाययोजनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्यात यावे. जिल्हाधिकारी, सिंचन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समन्वयातून पाण्याचा काटेकोर वापर आणि साठवणूक सुनिश्चित केली जावी, असेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

पशुधनासाठी चारा टंचाई होऊ नये याकरिता आतापासूनच उपाययोजना कराव्यत. एल निनोचा परिणाम इतर राज्यांवरही होण्याची शक्यता असल्याने बाहेरील राज्यांवर अवलंबून न राहता राज्यातच वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत. धरणांच्या बॅक वॉटर क्षेत्रात वैरण विकास कार्यक्रम हाती घेण्यात यावा. मोठ्या प्रमाणात पशुधन असणाऱ्या तसेच चारा टंचाई जाणविणाऱ्या सोलापूर, सांगली आणि मराठवाडा या भागांमध्ये चारा उपलब्ध कसा होईल, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषि राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्यासह कृषी, मदत व पुनर्वसन, वित्त, जलसंपदा, जलसंधारण, भारतीय हवामानशास्त्र विभाग, वित्त व नियोजन विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#ElNino

Home मोई येथील बंजारा महिला शेतकरी गटाची गटशेती

मोई येथील बंजारा महिला शेतकरी गटाची गटशेती

वर्धा : महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिला विविध क्षेत्रात भरारी घेत आहे. अतिशय दुर्गम आणि सर्वच घटकातील महिला अभियानाच्या साथीने आर्थिक प्रगती साधत असल्याचे दिसून येते. आष्टी तालुक्यातील मोई या दुर्गम गावातील महिलांनी गटशेतीच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग शोधला आहे. सुमारे पाचशे लोकवस्ती असलेले बंजारा समाजबहुल हे गाव उमेदच्या प्रोत्साहनाने बदलत आहे.

उमेद अभियानाने गावात महिलांना एकत्र करून गटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. गावात महिला एकत्र येऊ लागल्या. याच काळात उमेद व पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून फार्मर कप स्पर्धा तालुक्यात सुरु झाली होती. सुरुवातीला या स्पर्धेबद्दल फारशी माहिती नव्हती. कुठलेही प्रशिक्षण नव्हते, पण मनात जिद्द होती काहीतरी करून दाखवायची. आजूबाजूच्या गावातील महिलांकडून माहिती घेत, बंजारा समाजातील बारा महिलांनी एकत्र आणून बंजारा महिला शेतकरी गट तयार करण्यात आला.

सुरुवातीला गटशेती, सेंद्रिय शेती पद्धती याबद्दल काहीच माहिती नव्हती. समाजातील परंपरेमुळे घुंगट घेऊन राहणाऱ्या, बाहेर पडायला संकोच करणाऱ्या महिलांना एकत्र आणणे मोठे आव्हान होते. पण समजावून सांगत, एकमेकांचा आधार घेत उमेदने महिलांना सोबत घेत कामाला सुरुवात केली. पानी फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी माती परीक्षण केले, दशपर्णी तयार केले, उगवणक्षमता तपासली, चिकट सापळे लावले. हळूहळू प्रत्येक गोष्ट शिकत त्यांनी कमी खर्चात शेती करण्याचे तंत्र आत्मसात केले. खर्च कमी आणि उत्पादन जास्त हेच त्यांचे ध्येय बनले.

एकमेकींच्या शेतात जाऊन काम करणे, नवीन तंत्र शिकणे, सातत्य ठेवणे सुरु झाले. या मेहनतीचे फळ मिळाले. शेतीतील उत्पादन वाढले आणि महिलांचा आत्मविश्वासही दुप्पट झाला. या यशस्वी प्रवासाचा परमोच्च क्षण म्हणजे पुण्यात झालेल्या कार्यक्रमात आमिर खान यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे होय. हा सन्मान फक्त बक्षीस नव्हता, तर त्यांच्या जिद्दीचा आणि मेहनतीचा गौरव होता.

आज या महिला आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. समाजात ठामपणे उभ्या आहेत. गटशेतीतून एकत्र काम करत, विषमुक्त शेती करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. पानी फाऊंडेशन आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून गावाबाहेर पडण्याची, शिकण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली, याबद्दल मोई गावातील सर्व महिला आज आनंदी आणि समाधानी आहेत.

00000

Home पुण्यात भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.

पुण्यात भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.

सोशल मीडियावर शेअर केली जात असलेली छायाचित्रे २०२०, २०२१ आणि २०२३ मधील वेगवेगळ्या जुन्या घटनांशी संबंधित आहेत. ही छायाचित्रे सध्याच्या घटनेशी जोडून अफवा पसरवली जात आहे.

#FactCheck

#DGIPRFactCheck

१७ एप्रिल २०२६ च्या रात्री पुण्यात भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे हार्ड लँडिंग झाले. लँडिंगच्या वेळी विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये (अंडरकॅरेज) बिघाड झाल्यामुळे ते धावपट्टीवरच थांबले. यामुळे पुणे विमानतळाची धावपट्टी काही तासांसाठी तात्पुरती बंद ठेवावी लागली. त्यामुळे अनेक उड्डाणांवर परिणाम झाला. यामध्ये कोणालाही इजा झाली नाही.

Home कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे होणाऱ्या नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी उपलब्ध करून दिला जाईल.

कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे होणाऱ्या नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी उपलब्ध करून दिला जाईल.

फिश मार्केट इमारत उभारण्यासाठी आवश्यक प्रकिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भात मंत्रालय येथे आयोजित बैठकीत दिले.

यावेळी आमदार अमल महाडिक, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Home बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 कायद्याची माहिती आणि जनजागृती

बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 कायद्याची माहिती आणि जनजागृती

1. बालविवाह म्हणजे काय?

जर लग्नाच्या वेळी मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि मुलाचे वय 21 वर्षांपेक्षा कमी असेल, तर त्याला ‘बालविवाह’ मानले जाते. असा विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे आणि यासाठी संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.

2. कायद्यानुसार शिक्षेच्या तरतुदी

पुरुषासाठी शिक्षा:18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवयीन मुलीशी लग्न केल्यास, त्याला 2 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपये दंड होऊ शकतो.

विवाह लावणाऱ्यांसाठी शिक्षा: जो कोणी बालविवाह घडवेल, पार पाडेल किंवा त्याला प्रोत्साहन देईल (उदा. आई-वडील, नातेवाईक, भटजी, वाजंत्रीवाले इत्यादी), त्यांनाही 2 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपये दंड होऊ शकतो.

3. बालविवाहाचे दुष्परिणाम

कमी वयात लग्न झाल्यामुळे मुलींचा शारीरिक आणि मानसिक विकास पूर्ण झालेला नसतो.

कमी वयात मातृत्व आल्याने मातामृत्यू किंवा अर्भक मृत्यूचा धोका वाढतो. तसेच कुपोषणाची समस्या निर्माण होते.

4. तक्रार कोठे करावी?

चाइल्डलाईन (CHILDLINE):कोणत्याही बालविवाहाची माहिती देण्यासाठी किंवा मदतीसाठी 1098 या टोल-फ्री क्रमांकावर फोन करा. हा नंबर 24 तास उपलब्ध असतो.

याशिवाय तुम्ही पोलिस स्टेशन 112, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधू शकता.

थोडक्यात संदेश:

खेळण्याचे आणि शिकण्याचे वय असताना मुला-मुलींचे लग्न लावणे हा गुन्हा आहे. आपण सर्वांनी मिळून बालविवाह थांबवला पाहिजे.

संपर्क:

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, नंदुरबार

पत्ता: मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, खोली क्रमांक 226, जिल्हाधिकारी कार्यालय, टोकनलाव रोड, नंदुरबार

☎ 02564-210047

✉ wcdnandurbar@gmail.com/ dcpunandurbar20@gmail.com

#बालविवाहबंद#StopChildMarriage#SaveGirlChild#BetiBachao#LetGirlsLearn#ChildRights#WomenEmpowerment#EndChildMarriage#SpreadAwareness#BeTheChange

Home २३ एप्रिल रोजी लोकशाही जागरातून शंभर टक्के मतदानाचे आवाहन राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती उपक्रम

२३ एप्रिल रोजी लोकशाही जागरातून शंभर टक्के मतदानाचे आवाहन राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती उपक्रम

अहिल्यानगर- राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे यासाठी जिल्हा स्वीप समितीच्या वतीने “२३ एप्रिलचा लोकशाही जागर” हा व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.

मतदानाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून निर्भय, निष्पक्ष व सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन स्वीप समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

​भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संध्या गायकवाड यांच्या संकल्पनेतून दि. १८ ते २२ एप्रिल या कालावधीत राहुरी विधानसभा मतदारसंघातील शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, महिला बचत गट तसेच आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

​या उपक्रमांतर्गत दि. १८ एप्रिल रोजी मतदानाची शपथ दिली जाणार असून, १९ एप्रिल रोजी मतदान जनजागृतीसाठी डीपी स्टेटस ठेवणे, २० एप्रिल रोजी प्रसिद्ध व्यक्तींचे जनजागृतीपर व्हिडिओ प्रसारित करणे आणि २१ एप्रिल रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्भय मतदानासाठी आवाहन करणे इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच २२ एप्रिल रोजी मतदानाची तारीख, वेळ व आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती देण्यात येणार आहे.

​यावेळी नागरिकांना “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निष्पक्ष व शांततापूर्ण निवडणुकीचे पावित्र्य राखू तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदान करू” अशी शपथ देण्यात येत आहे.

​राहुरी विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांनी २३ एप्रिल रोजी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) आकाश दरेकर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) मीना शिवगुंडे, मतदारदूत डॉ. अमोल बागूल तसेच स्वीप समितीच्या इतर सदस्यांनी केले आहे.

#RahuriVotes#LokshahiJagar#SVEEP#Election2026#CentPercentVoting#VoterAwareness#RahuriByePoll#DemocracyFestival#BeAnEnlightenedVoter#EthicalVoting#GoVote#अहिल्यानगर#राहुरी#मतदान_जागर#लोकशाहीचा_उत्सव#निर्भय_मतदान

Home संघर्षातून उभारला ‘अद्विक गृहउद्योग’:आर्णीतील बोरगाव येथील उद्योजक जयश्री पुनवटकर यांची प्रेरणादायी वाटचाल

संघर्षातून उभारला ‘अद्विक गृहउद्योग’:आर्णीतील बोरगाव येथील उद्योजक जयश्री पुनवटकर यांची प्रेरणादायी वाटचाल

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील जयश्री जितेंद्र पुनवटकर यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अत्यंत कठीण परिस्थितीतून यशाचा मार्ग शोधला आहे. बारावी (कला) पर्यंत शिक्षण घेतलेल्या जयश्री पुनवटकर यांनी ‘अद्विक गृहउद्योग’ नावाने ‘हळद प्रक्रिया उद्योग’ उभारून केवळ स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही, तर इतरांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

जयश्री पुनवटकर यांचे कुटुंब मजूर वर्गातील होते. आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी कपडे शिवण्याचे काम सुरू केले होते, परंतु त्यातून महिन्याला केवळ ३ ते ४ हजार रुपये उत्पन्न मिळत होते. हा व्यवसाय स्थिर नव्हता आणि नियमित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण होत होते.

कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी नवीन आणि दीर्घकाळ टिकणारा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी निर्धार केला. “स्वतःचा उद्योग सुरू करायचा” हे त्यांचे ध्येय होते. या प्रवासात कुटुंबियांनी त्यांना साथ दिलीच, पण जिल्हाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील तज्ञांनीही मार्गदर्शन केले. विशेषतः राजहंस मॅडम आणि हिरोळकर सर यांच्या प्रशिक्षणामुळे त्यांना योग्य दिशा मिळाली.

पीएमएफएमई योजनेचा लाभ

जयश्री पुनवटकर यांनी आपल्या उद्योगासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजनेचा लाभ घेतला. या योजनेअंतर्गत त्यांना २ लाख ८० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. यासोबतच त्यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन घेतले, ज्यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य विकसित झाले.

सुरुवातीला त्यांनी ५० किलो मिरच्या खरेदी करून छोट्या प्रमाणात प्रक्रिया उद्योग सुरू केला. या क्षेत्राची पूर्वी कोणतीही माहिती नसल्यामुळे अनेक अडचणी आल्या, परंतु त्यांनी हार मानली नाही. आवश्यक यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी हळूहळू व्यवसाय उभा केला. आता त्या उच्च प्रतिचे मिरची पावडर, मसाला, चना, हळद आणि घना पावडरची विक्री करुन व्यवसायात वाढ करत आहेत.

यशाची कहाणी
जयश्री पुनवटकर यांच्या उत्पादनांना बाजारातून चांगला प्रतिसाद मिळू लागला. मागणी वाढली आणि नियमित ऑर्डर मिळू लागल्या. त्यांच्या मेहनतीमुळे आज त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पूर्वीच्या तुलनेत उत्पन्न दुप्पट-तिप्पट झाले आहे. याशिवाय त्यांनी इतरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

सामाजिक प्रतिष्ठा
त्यांच्या यशाची दखल गाव पातळीवर घेतली गेली असून त्यांचा सत्कार करण्यात आला. समाजात त्यांना मान-सन्मान मिळू लागला आहे.

सध्याची स्थिती व विस्तार
आज जयश्री पुनवटकर यांचा व्यवसाय उत्तम चालू असून त्या सातत्याने प्रगती करत आहेत. बाजारपेठ, प्रदर्शने, पॅम्पलेट व बॅनर यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. सध्या त्यांचे मासिक उत्पन्न ३० ते ४० हजार रुपये असून वार्षिक उत्पन्न लाखोंमध्ये पोहोचले आहे.

प्रेरणादायी संदेश
जयश्री पुनवटकर म्हणतात, “घरातून बाहेर पडल्याशिवाय आपल्याला जगाची ओळख होत नाही. कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. शासकीय योजनांचा योग्य वापर केल्यास यश मिळवणे सोपे होते.”

जयश्री पुनवटकर यांची ही यशोगाथा प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी आहे.  योग्य दिशा, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते आणि यशस्वी उद्योजक बनता येते. हे त्यांनी दाखवून दिले आहे.

error: Content is protected !!