Home भंडारदरा शताब्दी महोत्सवाचा सर्वंकष आराखडा तयार‌ करा‌ – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील; शिर्डी विकासात आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवा

भंडारदरा शताब्दी महोत्सवाचा सर्वंकष आराखडा तयार‌ करा‌ – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील; शिर्डी विकासात आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवा

भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त महोत्सवाचा सर्व विभागांनी समन्वयातून सर्वंकष कृती आराखडा तयार करावा, तसेच शिर्डी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने भाविकांची सोय लक्षात घेऊन आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवत शिर्डीचा विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात भंडारदरा, निळवंडे पर्यटन विकास योजना, शिर्डी विकास योजना व सीना नदी विकास प्रकल्पाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी पालकमंत्री डॉ. विखे पाटील बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले , भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या परिसरात विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचा बारा महिन्यांचा कार्यक्रम तयार करण्यात यावा. हे करत असताना स्थानिक लोककलांचा यात सहभाग घ्यावा, जेणेकरून स्थानिक लोककलेला वाव मिळण्याबरोबरच रोजगार निर्मितीमध्ये वाढ होण्यास मदत होईल. या ठिकाणी तंबू निवास व्यवस्था, विद्युत रोषणाई यांसारख्या आकर्षक बाबींचा समावेश करावा. परिसरात जागेची कमतरता असल्याने त्याबाबत सुयोग्य नियोजन करावे. वन विभागानेही पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक तो आराखडा तयार करावा.

शिर्डी विकास योजनेबाबत बोलताना श्री.विखे पाटील म्हणाले, शिर्डी येथील साईबाबा हे लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहे. शिर्डी ही एक आध्यात्मिक नगरी असून या ठिकाणी विकासकामे करताना आध्यात्मिक दृष्टिकोन समोर ठेवत कामांचा आराखडा तयार करावा. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला मनशांती देणाऱ्या ध्यानकेंद्रासारख्या बाबींचा समावेश करण्यात यावा.

शिर्डीमध्ये येणारे रस्ते सुसज्ज करण्याबरोबरच मनाला प्रसन्नता देणारी कारंजी उभारण्यात यावीत. शहरामध्ये वाहनांचे व गर्दीचे नियमन, रस्त्याच्या कडेला उद्याने, आवश्यकतेनुसार प्रसाधनगृहांची उभारणी करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

या वेळी पालकमंत्र्यांनी हवाई व संरक्षण परिषद (एरोस्पेस व डिफेन्स कॉनक्लेव्ह) तसेच धर्मवीर गडाच्या संवर्धनाबाबतच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला.

Home अक्कलकुवा एस. टी. कामगार संघटनेचा अध्यक्षपदी शकील पिंजारी यांची निवड

अक्कलकुवा एस. टी. कामगार संघटनेचा अध्यक्षपदी शकील पिंजारी यांची निवड

अक्कलकुवा आगार येथे महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेची २०२६ साठी आगार कार्यकारिणी निवड व बैठक विभागीय सचिव संतोषभाऊ वाडिले यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी सर्व कामगारांच्या एकमताने आगाराचा अध्यक्ष पदासाठी शकील शब्बीर पिंजारी व आगार सचिव पदासाठी गणेश मराठे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
     या प्रसंगी विभागाकडून निवडणूक निरीक्षक म्हणून  संतोषभाऊ वाडीले,  राजेंद्र पवार, ज्ञानेश्वर पैठणे यांनी अध्यक्ष निवड व पदाधिकारी चे निवडीचे बैठकीचे काम पाहिले.
सदर या निवडीचा कार्यक्रमाला बहुसंख्य कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभा.सचिव  संतोषभाऊ वाडिले यांनी आगाराचे सभासदांच्या येणाऱ्या विविध अडीअडचणी समजून घेत, सदर अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी याप्रसंगी योग्य ते मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमाचे शेवटी आभारप्रदर्शन मनोजभाऊ खैरनार यांनी केले. बिनविरोध निवड झालेल्या मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या

सदर या निवडी प्रसंगी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना,
युनिट-अक्कलकुवा आगाराचे कर्मचारी चेतन सोनार, संदीप जावरे, तोसीब शेख, मोहन चव्हाण, शरद वसावे, मनोज खैरनार, पी. जी. सोनवणे, डि. ए. भदाणे, वसावे भाऊ, भोपे भाऊ, संगपाल भाऊ, प्रविण खराडे, रामचंद्र पंडित आदीसह महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना युनिट अक्कलकुवा आगाराचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Home संगीत विशारद परीक्षेत अनोखी गुरव हिने मुंबई केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला

संगीत विशारद परीक्षेत अनोखी गुरव हिने मुंबई केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत (गायन) या विषयातील संगीत विशारद परीक्षेत अमळनेर (जि. जळगाव) येथील कु. अनोखी गुरव हिने मुंबई केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवत राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

     कु. अनोखी गुरव ही संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध शहनाई वादक स्व. वसंतराव गुरव यांची नात असून, शहनाई वादनाचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे प्रसिद्ध कलाकार प्रबल उर्फ चिमु गुरव यांची सुकन्या आहे. संगीत परंपरेचा वारसा जपत तिने गायन क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे.
              या कठीण परीक्षेत तिने सभागायनात “शुद्ध कल्याण” राग आणि उपशास्त्रीय प्रकारात ठुमरी सादर करून परीक्षकांना मंत्रमुग्ध केले. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून संगीत शिक्षणास सुरुवात करून, पूर्व प्राथमिक ते विशारद अशा आठ स्तरांच्या परीक्षांमध्ये सलग ‘विशेष योग्यता’ प्राप्त करत तिने डिसेंबर 2025 मध्ये 17व्या वर्षी संगीत विशारद ही पदवी मिळवली आहे.
        या यशाबद्दल राज्यभरातून तिचे अभिनंदन होत असून, या यशाचे संपूर्ण श्रेय तिने आपल्या गुरूंना, आई-वडील व कुटुंबीयांना दिले आहे. गुरव कुटुंबाचा समृद्ध संगीत वारसा पुढील पिढीतही तेजस्वीपणे पुढे नेत असल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Home पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटून निर्माण झालेल्या गंभीर आपत्कालीन पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन वांद्रे–वरळी सी लिंक

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटून निर्माण झालेल्या गंभीर आपत्कालीन पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन वांद्रे–वरळी सी लिंक

वर्सोवा–वांद्रे वरळी सी लिंक तसेच संपूर्ण कोस्टल रोडवरील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यादृष्टीने यासंदर्भातील प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी सादर करण्याची कार्यवाही करण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

पालकमंत्री ॲड.शेलार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात, अशा महत्त्वाच्या मार्गांवर अपघात, आग किंवा नैसर्गिक आपत्ती घडल्यास तातडीने व प्रभावी प्रतिसाद देणे मोठे आव्हान ठरू शकते, असे नमूद करुन विशेषतः कोस्टल रोड हा भुयारी व समुद्रावरून जाणारा मार्ग असल्याने जखमींना त्वरित रुग्णालयात हलवणे, सुरक्षा यंत्रणांची जलद हालचाल आणि आपत्कालीन सेवा पोहोचवणे या बाबी महत्वपूर्ण असल्याचे नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर वांद्रे रेक्लेमेशन परिसरात, सी लिंकजवळ हेलिपॅड उभारणी, हेलिपॅडसाठी आवश्यक जागा यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही नमूद करण्यात आले आहे.

Home बौद्धिकदृष्ट्या अक्षम व मानसिक आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

बौद्धिकदृष्ट्या अक्षम व मानसिक आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

बौद्धिकदृष्ट्या अक्षम आणि मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद व नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय, खाणापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय, खाणापूर येथे करण्यात आले.हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा न्यायाधीश श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मानसिक आजार व बौद्धिक अक्षमता असलेल्या व्यक्तींसाठी शासनाच्या विविध योजना,त्यांचे हक्क व संरक्षण याबाबत सखोल मार्गदर्शन केले. दिव्यांग व्यक्तींनी कायदेशीर सल्ला व मार्गदर्शनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा,असे आवाहन त्यांनी केले.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा मोफत टोल फ्री क्रमांक १५१००,तसेच बौद्धिकदृष्ट्या अक्षम व मानसिक विकलांग व्यक्तींसाठी मदत क्रमांक १४४४६ याबाबत उपस्थितांमध्ये जागृती करण्यात आली. तसेच बालकांसाठीच्या मदत वाणी (हेल्पलाईन) १०९८ विषयी माहिती देऊन दिव्यांग बालकांच्या प्रलंबित प्रश्नांची माहिती जाणून घेऊन ते प्रश्न संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती त्यांनी केली.

या कार्यक्रमास अखिल भारतीय अपंग कल्याणकारी प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव,नागनाथ निवासी मतिमंद विद्यालयाचे सचिव राजेंद्र जाधव, मुख्याध्यापिका जयश्री कदम, नवनाथ निवासी विद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग जाधव,उपमुख्य न्यायरक्षक अभय पाथ्रूडकर,सहाय्यक न्यायरक्षक शुभम गाडे,पॅनल विधिज्ञ विश्वजीत शिंदे आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कायद्याची माहिती नसल्यामुळे अनेकजण आपल्या हक्कांपासून वंचित राहतात. त्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सर्वसामान्य नागरिकांसाठी सदैव उपलब्ध असून मोफत विधिज्ञ व मोफत कायदेविषयक सल्ल्यासाठी नागरिकांनी संपर्क साधावा,असे मार्गदर्शन उपमुख्य न्यायरक्षक ॲड.अभय पाथरूडकर यांनी केले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या दिव्यांगांसाठीच्या योजना,विविध उपक्रम तसेच बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सहाय्यक न्यायरक्षक ॲड. शुभम गाडे यांनी आपल्या भाषणातून दिली.

अन्न हे शरीराचे पोषण करते आणि शिक्षण हे मनाचे पोषण करते.दोन्ही हक्क एकमेकांना पूरक असून भुकेले मूल शाळेत लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि अशिक्षित व्यक्ती स्वतःसाठी पुरेसे अन्न मिळवू शकत नाही,असे महत्त्वपूर्ण विचार ॲड. विश्वजित शिंदे यांनी आपल्या भाषणात मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक विनोद लांडगे यांनी केले,तर कार्यक्रमाच्या फलप्राप्तीचे महत्त्व सांगून शिक्षक सुधाकर कोळगे यांनी आभार मानले.या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक,विद्यार्थी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Home गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा

गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा

ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी दिली आहे.

राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या सर्व अधिकृत एकविध क्रीडा संघटनांनी स्पर्धा संपल्यानंतर ७ दिवसांच्या आत स्पर्धेचा अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची यादी तसेच गुणपत्रिका अभिलेख जतनासाठी संचालनालयाकडे अपलोड करणे बंधनकारक आहे. ही सर्व माहिती संबंधित क्रीडा संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांनी डिजिटल स्वाक्षरीद्वारे प्रमाणित करणे आवश्यक आहे.

निर्धारित कालावधीत माहिती अपलोड न केल्यास संबंधित क्रीडा संघटनांचा डिफॉल्टर यादीत समावेश करण्यात येणार आहे. तसेच खेळाडूंनी आपले ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूंनी अपलोड करण्यात आलेल्या माहितीची ऑनलाईन पद्धतीने पडताळणी केली जाणार आहे. या नव्या प्रणालीमुळे खेळाडूंना पडताळणीसाठी प्रत्यक्ष विभागीय कार्यालयात येण्याची किंवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक जलद व सुलभपणे मिळणार आहे. यासाठी खेळाडू व संबंधित क्रीडा संघटनांनी क्रीडा विभागास पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Home जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

राज्यातील सर्व नागरिकांना उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

#जिल्हा_परिषद

#पंचायतसमिती

#निवडणूक

Home उमेद अभियानातून महिला उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणास मिळणार चालना – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

उमेद अभियानातून महिला उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणास मिळणार चालना – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती उमेद अभियानांतर्गत मिनी सरस प्रदर्शनातून महिला स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थ विक्रीसाठी शहरी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. यातून महिला उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

डोंगरे वसतिगृह मैदान येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषद नाशिक यांच्या विद्यमाने आयोजित विभागीय, मिनी व जिल्हास्तरीय सरस वस्तू विक्री व प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी मंत्री श्री. महाजन बोलत होते.

यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, अपर आयुक्त (महसूल) रवींद्र पाटील, माजी आमदार बाळासाहेब सानप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, हे प्रदर्शन जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी उत्पादित केलेल्या गुणवत्तापूर्ण वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. ग्राहकांना थेट उत्पादकांकडून दर्जेदार वस्तू खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणासाठी अधिक पाठबळ दिले आहे. महिलांसाठी उज्वला गॅस योजना, जलजीवन मिशन, लखपती दीदी योजनेयासारख्या अनेकविध योजनांच्या माध्यमातून महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. कर्जाची नियमित परतफेड केल्यामुळे बचत गटांना व्यवसायासाठी बँका कर्ज उपलब्ध करून देत आहेत. स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांची उत्पादक क्षमता, व्यवस्थापन कौशल्य व उद्योजकीय दृष्टीकोन अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानातून स्वयंसहाय्यता बचतगटांना उभारी देण्याचे काम अविरत केले जात आहे. या बचतगटांच्या उत्पादनांना जिल्हा व तालुकास्तरावर कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील. अन्न पदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीमुळे आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात, परंतु बचतगटातील उत्पादनातून निर्भेळ खाद्यपदार्थ मिळण्याची शाश्वती असल्याने येणाऱ्या काळात या उत्पादनांना महत्त्व प्राप्त होणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाच्या उमेद अभियानातून मोठ्या प्रमाणावर बचत गटांच्या महिलांचे एक सामाजिक आणि आर्थिक बळकटीकरण करण्याचा उपक्रम सुरू आहे. नाशिक विभागात जवळपास सव्वा लाख समूहातून 50 ते 60 लाख व्यक्ती या अभियानातून पाच जिल्ह्यांमध्ये जोडली गेली आहेत. लखपती दीदी योजनेतून विभागात जवळपास 7 लाख 88 हजार लखपतींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत साडे पाच लाख उद्दिष्टपूर्ती झाली आहे. या उपक्रमांना त्यांचे ब्रँडिंग करणे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हे खूप महत्त्वाचं काम जिल्हा परिषद आणि मार्फत होत असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.

या महोत्सवाच्या ठिकाणी ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांकडून उत्पादित वस्तू व साहित्य विक्रीसाठी १४५ स्टॉल तसेच खाद्यपदार्थ विक्रीसाठी ४० स्टॉल, अशा एकूण १८५ स्टॉलची उभारणी करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यात उमेद अभियानांतर्गत एकूण ३१ हजार ७८५ महिला स्वयंसहाय्यता समूह कार्यरत असून, त्याद्वारे ३ लाख ०४ हजार ५८३ कुटुंबे या अभियानाशी जोडली गेलेली आहेत. महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या आर्थिक बळकटीसाठी शासनाने फिरता निधी रुपये १५ हजारांवरून रुपये ३० हजार इतका वाढविला आहे. नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत २६ हजार ४३७ समूहांना ३९ कोटी ६५ लाख रुपयांचा फिरता निधी वितरित करण्यात आला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले.

एकल महिला उद्योजक व बँक सखी, पशू सखी यांचा मान्यवरांच्या हस्ते झाला सत्कार

  1. प्रतिभा केदा निकम (एकल महिला), कौळाणे, ता.मालेगाव, जि.नाशिक
  2. विजया एकनाथ सहाने (एकल महिला), हिवरे गाव, ता.सिन्नर, जि.नाशिक
  3. अर्चना मनीष खराडे (एकल महिला), पारेगाव, ता.येवला, जि.नाशिक
  4. धनश्री सतीश परदेशी (एकल महिला), कळवण तालुका, जि.नाशिक
  5. स्वाती महेंद्र महानुभाव (बँक सखी), हिरापूर, ता.चांदवड, जि.नाशिक
  6. सलमा आसिफ शेख (बँक सखी), पाटोदा, ता.येवला, जि.नाशिक
  7. साधना नामदेव कांडळकर (बी सी सखी), खडकजांब, ता.चांदवड, जि.नाशिक
  8. अनुसया रवींद्र काळे (पशू सखी), वाखारी गाव, ता.देवळा, जि. नाशिक

सिन्नर तालुक्यातील एकता प्रभाग संघ, नायगाव, हिरकणी महिला प्रभाग ठाणगाव, शिवनेरी महिला प्रभाग संघ, प्रगती महिला प्रभाग संघ, चास, राजमाता जिजाऊ प्रभाग संघ,नांदूर शिंगोटे यांना ग्रामीण विकास योजना अंतर्गत रोजगार वृद्धीकरिता पिकप वाहन वितरण करण्यात आले. यावेळी मंत्री महोदयांनी स्टॉल्सला भेट देत उत्पादनांची माहिती घेतली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. प्रकल्प संचालक श्रीमती संगमनेरे यांनी आभार मानले.

Home परदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला पहिली पसंती

परदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला पहिली पसंती

नवी दिल्ली: भारतातील पर्यटन क्षेत्रासाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे राज्य ठरत असून, गेल्या तीन वर्षांत राज्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. सन २०२२ मध्ये महाराष्ट्रात १.५१२ दशलक्ष परदेशी पर्यटकांनी भेट दिली होती, हा आकडा २०२४ मध्ये वाढून ३.७०५ दशलक्षवर पोहोचला असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना  दिली.

केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील परदेशी पर्यटकांचा ओघ सातत्याने वाढत आहे. २०२२ मध्ये १.५१२ दशलक्ष असलेला हा आकडा २०२३ मध्ये थेट ३.३८८ दशलक्षवर गेला आणि २०२४ मध्ये तो ३.७०५ दशलक्ष इतका नोंदवला गेला. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये भारतात आलेल्या एकूण परदेशी पर्यटकांपैकी १७.६९ टक्के पर्यटकांनी महाराष्ट्राला पसंती दिली असून, पर्यटनाच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक राहिला आहे.

जागतिक स्तरावर भारताला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रस्थापित करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शने, परदेशी टूर ऑपरेटर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सहली, रोड शो आणि भारतीय खाद्य महोत्सवांचा समावेश आहे. हे सर्व प्रयत्न राज्य सरकारे आणि भारतीय दूतावासांच्या मदतीने केले जात असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

पर्यटन स्थळांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून ‘स्वदेश दर्शन २.०’ आणि ‘प्रसाद’ (PRASHAD) सारख्या योजनांतर्गत आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांचा विकास आणि आध्यात्मिक वारसा स्थळांच्या संवर्धनावर भर दिला जातो. महाराष्ट्रातील पर्यटन विकासासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नियमितपणे चर्चा आणि समन्वय बैठका घेतल्या जातात, ज्यामुळे पर्यटनाला अधिक चालना मिळत आहे.

Home वांद्रे-वरळी सी लिंक व कोस्टल रोडसाठी हवाई आपत्कालीन सुविधांवर भर – पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

वांद्रे-वरळी सी लिंक व कोस्टल रोडसाठी हवाई आपत्कालीन सुविधांवर भर – पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटून गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत कित्येक तासांहून अधिक काळ प्रवासी अडकले. या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन वांद्रे–वरळी सी लिंक, वर्सोवा–वांद्रे वरळी सी लिंक तसेच संपूर्ण कोस्टल रोडवरील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर देत यासंदर्भातील प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी सादर करण्याची कार्यवाही करण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

पालकमंत्री ॲड. शेलार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात, अशा महत्त्वाच्या मार्गांवर अपघात, आग किंवा नैसर्गिक आपत्ती घडल्यास तातडीने व प्रभावी प्रतिसाद देणे मोठे आव्हान ठरू शकते, असे नमूद करुन विशेषतः कोस्टल रोड हा भुयारी व समुद्रावरून जाणारा मार्ग असल्याने जखमींना त्वरित रुग्णालयात हलवणे, सुरक्षा यंत्रणांची जलद हालचाल आणि आपत्कालीन सेवा पोहोचवणे या बाबी महत्वपूर्ण असल्याचे नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर वांद्रे रेक्लेमेशन परिसरात, सी लिंकजवळ हेलिपॅड उभारणी, हेलिपॅडसाठी आवश्यक जागा यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही नमूद करण्यात आले आहे.

हेलिपॅड उभारणीद्वारे कोस्टल रोड व सी लिंकवरील आपत्कालीन परिस्थितीत जखमींना एअर अँब्युलन्सद्वारे तातडीने रुग्णालयात हलविणे. आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ व इतर यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी करणे. मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आपत्कालीन आराखडा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे पालकमंत्री ॲड.शेलार यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!