विद्यार्थिनीं व कर्मचारी यांच्या उपस्थितीत वसतिगृह ते नेरळ बाजारपेठ अशी प्रभातफेरी काढण्यात आली.
“हिंद-दी चादर”गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खालापूर डोलीवली येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त भाग
सुरक्षित इंटरनेट दिवसानिमित्त जनजागृती कार्यशाळा संपन्न
(नंदुरबार) डिजिटल युगात सुरक्षित इंटरनेट वापराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता नंदुरबार येथे सुरक्षित इंटरनेट दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यशाळेस विविध विभाग प्रमुख तसेच त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली रंगवली सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत इंटरनेटचा जबाबदारीने व सुरक्षित पद्धतीने वापर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता सायबर सुरक्षेचे महत्त्व, ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे उपाय, डेटा सुरक्षितता तसेच शासकीय कामकाजात सुरक्षित डिजिटल प्रणालीचा वापर याबाबत माहिती देण्यात आली.
कार्यशाळेदरम्यान इंटरनेटचा वापर करताना घ्यावयाची काळजी, मजबूत पासवर्ड तयार करण्याची पद्धत, संशयास्पद लिंक किंवा संदेशांपासून सावध राहण्याचे मार्ग तसेच अधिकृत संकेतस्थळांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी सतर्कता व जागरूकता हीच प्रभावी उपाययोजना असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शासकीय विभागांमध्ये डिजिटल प्रणालीचा वापर वाढत असताना माहितीची गोपनीयता व सुरक्षितता राखणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी सुरक्षित इंटरनेट वापराची जबाबदारी पार पाडावी, असा संदेश कार्यशाळेतून देण्यात आला.
या उपक्रमामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षा विषयक जागरूकता वाढण्यास मदत होऊन शासकीय कामकाज अधिक सुरक्षित व कार्यक्षम होण्यास चालना मिळणार आहे..
#SafeInternetDay#CyberSecurity#DigitalAwareness#SafeBrowsing#Nandurbar#DigitalIndia#CyberSafety#GovernmentInitiative#SecureInternet#ITAwareness
संगणक कक्षाच्या उद्घाटनाने ठाणेपाडा शाळेचा डिजिटल प्रवास सुरू
नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा, ठाणेपाडा येथे संगणक कक्षाच्या उद्घाटनाने शिक्षण क्षेत्रात एक नवे पाऊल टाकण्यात आले. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या शुभहस्ते आणि मा. सरपंच विशाल पवार यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मा. केंद्रप्रमुख जुबेर तांबोळी यांनी केंद्रातील व ठाणेपाडा शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या अभिनव उपक्रमांची आणि गुणवत्तावृद्धीच्या प्रयत्नांची माहिती दिली. तत्कालीन मुख्याध्यापक प्रकाश लांबोळे यांनी सन 2023-24 व 2024-25 मध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानातून मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेचा शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी केलेला प्रभावी वापर सादर केला.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या गुणवत्तेची पाहणी केली. शाळेच्या उत्कृष्ट कार्याचा उल्लेख करत त्यांनी ठाणेपाडा शाळेला ‘मॉडेल स्कूल’ म्हणून गौरविले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन ‘स्टार ऑफ द स्कूल’ म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गणेश महारु चौधरी, मुख्याध्यापिका सुनंदा चौरे व शिक्षकवृंद यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी जि.प. सदस्य देवमन पवार, सेवानिवृत्त उपायुक्त यशवंत पवार, माजी जि.प. सदस्य जयंतीलाल घुगे, मा. शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. पाटील, मा. केंद्रप्रमुख जुबेर तांबोळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गणेश महारु चौधरी, माजी अध्यक्ष श्री. दशरथ गावित, श्री. गणपत पवार तसेच शिक्षणप्रेमी श्री. गांगुर्डे सर, चैत्राम चौधरी, राजू घुगे, गावातील ज्येष्ठ नागरिक, पालक व आष्टे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
मा. गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. श्री. गणेश चौधरी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
ठाणेपाडा शाळेचा हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडणारा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
#QualityEducation#EducationDevelopment#collectorofficenandurbar#zillaparishadnandurbar
नंदुरबार तालुक्यातील वाघाळे गावात युवकांच्या पुढाकारातून ग्रामसभा
‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ या उपक्रमांतर्गत नंदुरबार तालुक्यातील वाघाळे गावात युवकांनी विशेष ग्रामसभा आयोजित केली. या ग्रामसभेत गावातील युवक, नागरिक व अभ्यासिकेचे वापरकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या बैठकीत —
गावातील अभ्यासिकेचे नियमित निरीक्षण (Monitoring) कसे करावे
अभ्यासिकेचा योग्य व प्रभावी वापर कसा वाढवावा
युवक, युवती तसेच सर्व ग्रामस्थांचा सहभाग कसा वाढवता येईल
अभ्यासिकेच्या दैनंदिन कार्यपद्धतीत युवकांची, गावकऱ्यांची भूमिका
या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
युवकांच्या पुढाकारामुळे अभ्यासिका ही ग्रामस्तरावर समुदायाच्या सहभागातून चालणारी जबाबदार शैक्षणिक व्यवस्था म्हणून आकार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.
#collectorofficenandurbar#amachiabhyasikapunhafulale#rurallibraries
‘वंदे मातरम् सुरक्षित तटम् समृद्ध भारतम्’ सायक्लोथॉन २०२६ या उपक्रमानिमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ मध्ये डेप्युटी कमांडंट विजय चकोर यांची विशेष मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित लोकप्रिय ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतून ‘वंदे मातरम सुरक्षित तटम् समृद्ध भारतम्’ सायक्लोथॉन २०२६ या उपक्रमावर आधारित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) डेप्युटी कमांडंट विजय चकोर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या सायक्लोथॉन उपक्रमाअंतर्गत सीआयएसएफच्या ६५ सायकलपटूंचे पथक १० ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्राच्या किनारपट्टी मार्गावर प्रवास करणार आहे. वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सायक्लोथॉनद्वारे किनारी भागातील नागरिकांमध्ये अमली पदार्थ, शस्त्रास्त्र आणि स्फोटकांच्या तस्करीविरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, परंपरा तसेच किनारी सुरक्षेचे महत्त्व याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या सायक्लोथॉनच्या राज्यातील प्रवासादरम्यान तारापूर, गेटवे ऑफ इंडिया, कुरूळ, लोणेरे, अंजनवेल आणि रत्नागिरी येथे विविध सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर हे पथक पुढील प्रवासासाठी गोवा राज्याकडे रवाना होणार आहे. या उपक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी आणि रूपरेषा याविषयी विजय चकोर यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमधून सविस्तर माहिती दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातील ही मुलाखत मंगळवार, १० आणि बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार असून, ती ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवर देखील उपलब्ध राहणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येणार आहे.
स्वच्छ पर्यावरणासाठी सक्षम अभियानाचा संकल्प!
भारत सरकारच्या ऊर्जा सुरक्षितता, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘सक्षम २०२५-२६ (संरक्षण क्षमता महोत्सव)’ हे राष्ट्रीय अभियान १ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत (तेल आणि गॅस वाचवा, हरित ऊर्जा स्वीकारा)” या घोषवाक्यासह संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे त्यानिमित्त…
जागतिक पातळीवर वेगाने बदलणाऱ्या हवामानामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे मानवासमोर आज मोठे आव्हान उभे राहिले आहे. पारंपरिक इंधनांचा वापर दिवसागणिक वाढत गेल्याने निसर्गावर मोठा ताण पडत असून, त्याचे दुष्परिणाम आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर ठळकपणे दिसू लागले आहेत. भविष्यात हे संकट आणखी भयावह होवू नये यासाठी समाजाने स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जेकडे प्राधान्याने वळणे, ही काळाची गरज बनली आहे.
कोळसा, पेट्रोल, डिझेल यासारखी पारंपरिक इंधने मर्यादित स्वरूपाची आहेत. त्यांच्या ज्वलनामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड आणि इतर घातक वायू वातावरणात मिसळतात. यामुळे जागतिक तापमानवाढ, हवामानातील टोकाचे बदल, पावसाचे असमतोल स्वरूप तसेच आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. श्वसनविकार, हृदयविकार आणि त्वचारोग यांसारखे आजार याच प्रदूषणाशी थेट जोडलेले आहेत. यावर उपाय म्हणून नवी ऊर्जा क्रांती आकार घेत आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत, बायोगॅस, बायो-इंधन आणि हरित हायड्रोजन यांसारखे पर्याय आज प्रभावीपणे पुढे येत आहेत. या ऊर्जास्रोतांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे, ते अक्षय आहेत आणि पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचवता. पवन ऊर्जा निर्मितीमुळे इंधन आयातीवरील खर्च कमी होऊन देशाची आर्थिक बचतही होते. ऊसाच्या चिपाडापासून बनविल्या जाणाऱ्या इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाकडेही आपला देश गांभीर्याने पाहू लागला आहे.
अलीकडच्या काळाचा विचार केल्यास, वाहतूक क्षेत्रातही मोठे बदल होतांना दिसत आहेत. इलेक्ट्रिक वाहने, हायब्रिड वाहने आणि पर्यायी इंधनावर चालणारी वाहने यांचा वापर वाढत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्राधान्याने स्वच्छ इंधनाचा समावेश केल्यास प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते. यासोबतच इंधन बचतीच्या सवयी, कार पूलिंग, सायकलचा वापर आणि पायी चालण्यास प्रोत्साहन देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
घरगुती पातळीवरही स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवता येऊ शकतो. सौर पॅनल्सद्वारे वीज निर्मिती, बायोगॅस प्रकल्प, ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर आणि विजेचा अपव्यय टाळणे या छोट्या गोष्टी मोठा बदल घडवू शकतात. शाश्वत जीवनशैली स्वीकारणे म्हणजे केवळ पर्यावरणाचे संरक्षण नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य घडवण्याच्या दृष्टीने या ऊर्जा क्रांतिकडे पाहायला हवे.
या दिशेने केंद्र व राज्य सरकारांकडून विविध अभियानांद्वारे जनजागृती केली जात आहे. ‘सक्षम’सारख्या मोहिमा नागरिकांना पर्यायी इंधनांचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करत आहेत. उद्योग क्षेत्र, तसेच शहरे आणि ग्रामीण भागातही हरित ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली जात आहेत. यामध्ये संशोधन, नवतंत्रज्ञान आणि स्थानिक सहभाग आदिला विशेष महत्त्व दिले जात आहे.
स्वच्छ पर्यावरण हा केवळ सरकारचा किंवा एखाद्या संस्थेचा विषय नसून, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आज प्रत्येक स्तरावर घेतलेले छोटे निर्णय उद्याच्या मोठ्या संकटांना टाळू शकतात. पर्यायी ऊर्जेचा वापर, इंधन बचत, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारल्यास हरित, सुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठी आपण भक्कम पायाभरणी करू शकतो. हीच खरी ऊर्जा क्रांती असून तिच्यात आपण सर्वांनी सहभागी होणे, ही काळाची गरज आहे.
कामठी येथे पोलिस उपायुक्त कार्यालयासाठी मेट्रो स्टेशनजवळ पर्याप्त जागेबाबत तत्काळ प्रस्ताव तयार करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : नागपूर शहरासह जवळील ग्रामीण भागापर्यंत मेट्रोचे सक्षम जाळे व सेवा सुविधा आपण निर्माण केल्या आहेत. लवकरच रामटेकच्यादिशेने कामठीसह कन्हानपर्यंतचा टप्पा मेट्रोशी जोडला जाणार आहे. या विस्तारात सुरक्षिततेच्यादृष्टीने योग्य ती सुविधा व कामठी येथे पोलिस उपायुक्त कार्यालयासाठी पर्याप्त पुरेशी जागा कशी उपलब्ध होऊ शकेल याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. सद्यास्थितीत ऑटोमोटीव्ह चौकापर्यंत मेट्रो धावत असून कामठीपर्यंतचे काम पूर्णत्वास येत आहे.
जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीत आढावा घेतला. या बैठकीस आमदार कृष्णा खोपडे, महा मेट्रोचे महाव्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मलिक विराणी, डब्ल्यूसीएलचे वरीष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, संजय पवार व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वेणा प्रकल्पासाठी संपादीत झालेल्या जमिनीचे मूळ मालकांना हस्तांतरण कायद्याच्या चौकटीत झाले का हे तपासून योग्य तो न्यायनिवाडा करणे क्रमप्राप्त आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येऊन याबाबत आहे ती वस्तुस्थिती समितीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मौजा सुराबर्डी येथे पोलिस महासंचालनालय नक्षल विरोधी पथक यांना आवंटीत करण्यात आलेल्या शासकीय जमिनीचा नकाशा दुरुस्ती व रेखांकन करुन देण्याबाबत पालकमंत्री श्री.बावनकुळे यांनी निर्देश दिले. याचबरोबर झुडपी जंगलाच्या प्रश्नाचे सोडवणूक न्यायलीन आदेशान्वये तत्काळ करावी असे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरंभता की ‘अरदास’; जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
नवी मुंबई :- ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची आरंभता की ‘अरदास’ संत समाजचे प्रधान संत ज्ञानी हरनाम सिंघ जी, मुखी दमदमी टकसाल यांच्या हस्ते ओवे मैदान, सेक्टर 29, खारघर, नवी मुंबई येथे करण्यात आली.
अल्पसंख्याक विकास विभाग, राज्य समन्वय समिती आणि सिख, सिकलगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तथा भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय अशा नऊ समाजाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, लाखोंच्या संख्येने भाविक राज्य तसेच देशातून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी रवींद्र राठोड, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजा दयानिधी, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, अपर आयुक्त फरोग मुकादम, उपायुक्त विजय म्हसाळ, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, रश्मी नांदेडकर, वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे, हिंद दी चादर कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, क्षेत्रिय आयोजन समिती, नवी मुंबईचे अध्यक्ष अमरपाल सिंघ रंधावा, सुप्रीम कॉन्सील, नवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष जसपाल सिंघ सिद्धू, खारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग बल, महाराष्ट्र राज्य सिख समन्वय समितीचे चरणदीप सिंग (हॅप्पी सिंग), राज्यस्तरीय समितीचे निमंत्रक तथा महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष बल मिलकित सिंग, प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांच्यासह शीख, सिकलगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तथा भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.
संत ज्ञानी हरनाम सिंघजी यांनी ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या बलिदानाविषयीचे माहात्म्य सांगितले. पुढील पिढीपर्यंत श्री गुरु तेग बहादूर यांच्या शौर्याचा इतिहास पोहचवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून शहादतविषयी जागर करणे का महत्वाचे आहे, याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन दिले.
नागपूर आणि नांदेड या ठिकाणी “हिंद दी चादर” या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रशासनाच्या सहकार्याची खूप मोठी जोड होती. आणि आज खारघर, नवी मुंबई येथे देखील आरंभता की “अरदास” कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या उत्साहातून हे स्पष्ट होत आहे की, येथील कार्यक्रम देखील खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्याने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, खारघर येथे श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या 350 व्या शहीदी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कार्यक्रमासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून तयारी महिनाभरापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. रायगड व ठाणे जिल्हा प्रशासनाने 25 समित्यांची स्थापना करून विविध जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. नागपूर आणि नांदेड येथील यशस्वी कार्यक्रमांनंतर आता खारघर येथील कार्यक्रमाकडे देश-विदेशातील भाविकांचे लक्ष लागले आहे.
कार्यक्रमासाठी प्रशासन, पोलीस व महानगरपालिका यंत्रणा समन्वयाने दिवसरात्र कार्यरत असून भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सूर्यवंशी यांनी दिली.
गुरु नानक नामलेवा समिती, शीख समुदाय तसेच विविध समाजघटकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात पार पडणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी गुरु तेग बहादुरजी यांच्याशी लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तथा भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय यांच्याशी निगडीत असलेला इतिहास सांगितला. तसेच त्यांनी नागपूर आणि नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्व समाजबांधवांनी नि:स्वार्थ सेवाभाव ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
‘ओटीएम २०२६’; महाराष्ट्र पर्यटन दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई: वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे आशियातील सर्वात मोठा ट्रॅव्हल ट्रेड शो ‘आऊटबाऊंड ट्रॅव्हल मार्ट २०२६’चे (ओटीएम) आयोजन करण्यात आले होते. जागतिक स्तरावर पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी मुंबईत या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनात ४० हून अधिक पर्यटन भागधारकांनी सहभाग घेतला. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालक डॉ.बी. एन.पाटील,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे,महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यावेळी उपस्थित होते. दालनामध्ये उपस्थित असलेल्या पर्यटन भागधारकांशी संवाद त्यांनी साधला.
राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटनस्थळांची माहिती देखील ‘ओटीएम’च्या माध्यमातून देण्यात आली. महाराष्ट्र पर्यटन दालनाद्वारे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्र, त्या ठिकाणी जाण्याची सोय, उपलब्ध सेवा सुविधा इ. माहिती पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आली.
महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या युवा पर्यटन राजदूत नवेली देशमुख यांनीही ‘ओटीएम’ कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पर्यटन दालनाला भेट देऊन दालनामध्ये सहभागी झालेल्या भागधारकांशी संवाद साधला. तसेच नवेली देशमुख यांनी महाराष्ट्र पर्यटन दालनाला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत कौतुक केले.
पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे म्हणाले की, “‘ओटीएम’मधील सहभागाने निश्चितच महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेल. तसेच जगाच्या नकाशावर पर्यटनासाठी महाराष्ट्र नवी उंची गाठेल असा विश्वास आहे. या माध्यमातून पर्यटनाला गती मिळून अधिकाधिक रोजगाराची निर्मिती करण्यात येणार आहे. ‘ओटीएम’ने पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी दिलेल्या या व्यासपीठाबाबत आयोजकांचे आभार मानतो.”
पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन.पाटील म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात सध्या पर्यटनाचा वाटा ७ ते ८ टक्के आहे. भविष्यात तो १५ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे राज्यभरात विविध कार्यक्रम आणि उत्सव आयोजित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘आउटबाऊंड ट्रॅव्हल मार्ट’ (ओटीएम). राज्यातील पर्यटन उत्पादनांच्या प्रसारासाठी हे एक प्रभावी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ ठरले आहे. या कार्यक्रमाद्वारे भागधारकांना जगभरातील कंपन्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली. या उपक्रमांमुळे येत्या काळात महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रात जागतिक भरारी घेईल.”
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे म्हणाले की, “‘ओटीएम २०२६’ प्रदर्शन जागतिक पर्यटनाचे महाद्वार आहे. या प्रदर्शनाद्वारे पर्यटन व्यावसायिक क्षेत्राला नवे व्यासपीठ मिळाले आहे. जागतिक पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटनाच्या माध्यमातून राज्याचा सांस्कृतिक वारसा, गडकिल्ले, विविध पर्यटन स्थळे यांची नव्याने ओळख होईल. ‘ओटीएम’मधील सहभागामुळे निश्चितच महाराष्ट्रातील पर्यटनाला अधिक चालना मिळेल. शिवाय या माध्यमातून पर्यटनाला गती मिळण्याबरोबरच अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. जगाच्या नकाशावर महाराष्ट्र पर्यटनासंबंधित नवी उंची गाठेल असा आम्हाला विश्वास आहे”.



