नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज ओझर विमानतळावर आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले.
यावेळी आमदार ॲड राहुल ढिकले, महापौर हिमगौरी आडके-आहेर, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, महानगर पालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे आदी उपस्थित होते.
ॲसिड हल्ला पीडितेस शासन सर्वतोपरी मदत करणार – महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे
शिर्डी: संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील ॲसिड हल्ल्यातील पीडित मुलीची महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी रविवारी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या अत्यंत निंदनीय घटनेतील पीडित मुलीच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे आणि तिच्या पुढील उपचारांचा संपूर्ण खर्च शासन करेल, अशी ग्वाही कु. तटकरे यांनी दिली.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, तिचे वय लहान असून त्वचा संवेदनशील असल्याने तिला आणखी काही दिवस उपचारांची तसेच एका शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. डॉक्टर व प्रशासन तिची पूर्ण काळजी घेत आहेत. मुलीचे विशेष समुपदेशकाकडून समुपदेशन करण्यात आले असून, स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने हे समुपदेशन पुढेही प्रभावीपणे सुरू ठेवण्याबाबत चर्चा झाली आहे.
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, या उपचारांचा कोणताही आर्थिक भार पीडितेच्या कुटुंबावर पडू दिला जाणार नाही. पीडितेस महिला व बालविकास विभागाच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य तात्काळ देण्यात येईल. यासोबतच, न्याय विभागाच्या ‘व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम २०२२’ अंतर्गत तिच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून ३ लाख रुपये आधीच देण्यात आले आहेत.
घटनेच्या दिवसापासूनच आपण पोलीस अधीक्षकांच्या संपर्कात असल्याचे सांगून मंत्री तटकरे म्हणाल्या, स्थानिक आमदारांनीही हा मुद्दा सभागृहात मांडला होता. सध्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून, विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे. कुटुंबाकडे काही अतिरिक्त माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी, तसेच त्यांच्या काही अपेक्षा असल्यास त्या सांगाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
या सांत्वनपर भेटीदरम्यान पीडित मुलीच्या कुटुंबातील तिची आई, मावशी व मामा उपस्थित होते. तसेच, आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम हेही याप्रसंगी उपस्थित होते.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व अविस्मरणीय करण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात येत आहेत. भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून या प्रक्रियेत साधू- महतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अखिल भारतीय संत समिती-राष्ट्रीय कार्य समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप तपोवनातील श्री स्वामी नारायण मंदिर येथे झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अखिल भारतीय संत समिती अध्यक्ष अविचल देवाचार्यजी, महंत श्री ग्यान देवसिंग महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रविंद्रपुरी महाराज, संत निवृत्ती महाराज, रावसाहेब महाराज गोसावी, पुरुषोत्तम महाराज देहूकर, अशोक तिवारी, श्री यतिंद्रानंद गिरीजी महाराज, जनार्दनहरी महाराज, स्वामी संविदानंद सरस्वती, जितेंद्रानंद स्वामी, ब्रह्मेशनंद महाराज, राजेंद्र दास, महंत दुर्गादास महाराज, भक्तिचरणदास महाराज आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भाविकांना गोदावरीच्या निर्मळ आणि प्रवाही पाण्यात स्नान करता यावे, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्र्यंबकेश्वर येथे गोदावारीचा प्रवाह बारमाही व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कुशावर्तासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर रस्ता, नाशिक परिक्रमा मार्ग, रेल्वे स्थानकावरील सुविधा, घाटांची संख्या आणि लांबी वाढविणे, जुन्या मंदिरांचे संवर्धन, मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांचे रुंदीकरण, ओझर विमानतळाचे विस्तारीकरण आदी विकास कामे सुरू आहेत. साधूग्रामसाठी कायमस्वरूपी जमीन अधिग्रहणाचा निर्णय घेण्यात आला आहे. साधूग्राममध्ये आवश्यक सर्व पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
तसेच कुंभमेळ्याकरीता प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या सूक्ष्म आणि नेटक्या नियोजनासाठी नाशिक येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रयागराजचा दौरा केला होता. मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यंदा दहा पट अधिक भाविक येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. विकासकामे करतांना साधू, महंत आणि आखाड्यांकडून आलेल्या सूचनांचाही स्वीकार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
संत शक्ती ही सज्जनशक्ती असून साधू संतांनी भारतीय संस्कृती टिकवून ठेवल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, जगातील अन्य संस्कृती नामशेष होत असताना भारतीय संस्कृती टिकून राहिली. ही प्राचीन असण्यासोबतच नित्यनूतनही आहे. हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. साधू संतांनी या प्रवाहातील वाईट बाबी बाजूल्या सारल्याने संस्कृतीची निरंतरता टिकून आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायानेदेखील अनेक आक्रमणांना सामोरे जात वारीची परंपरा टिकवून ठेवली. हीच परंपरा कुंभमेळ्यात प्रतिबिंबीत होते.
कुंभमेळा भारतीय अध्यात्मिक संस्कृतीचा सर्वात मोठा सोहळा आहे. मन आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचा हा सोहळा आहे. विचारांच्या प्रदूषणाला दूर सारून भारतीय संस्कृतीला प्रवाहीत करण्याचे हे पर्व आहे. या सोहळ्यात सर्व जाती-धर्माचे भाविक सहभागी होत असल्याने कुंभमेळा हा राष्ट्रीय एकात्मतेचे आणि भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे, असेही त्यांनी सांगितले. कुंभमेळ्यात केवळ पवित्र स्नान होत नाही, तर साधू – संतांचे मार्गदर्शन, विचारांचे आदान- प्रदान होत असल्याने पुढील वर्षी होणारा कुंभमेळा अविस्मरणीय होईल, असा विश्वास श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे समाजातील गैरप्रकारांना आळा बसेल तसेच भोंदूगिरी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी अविचल देवाचार्य, जितेंद्रानंद स्वामी, रवींद्रपुरी महाराज, तुषार भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार ॲड. राहुल ढिकले, महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, माजी आमदार बाळासाहेब सानप, महानगरपालिकेचे नगरसेवक यांच्यासह देशभरातून आलेले साधू, संत, महंत उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चामोर्शी तालुक्यातील (जि. गडचिरोली) शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने रामगिरी निवासस्थान येथे भेट घेतली.
चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित उद्योगासाठी जमीन संपादन करताना शेतकऱ्यांचे हित अबाधित ठेवले जाईल. कोणत्याही परिस्थितीत जबरदस्ती केली जाणार नाही व संबंधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योग्य मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जनगणनेचे काम अचूक पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
अहिल्यानगर: आगामी जनगणना-२०२७च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तयारीला वेग आला असून यावेळची जनगणना पूर्णपणे कागदरहित व डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. त्यामुळे नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाद्वारे तांत्रिक बाबी सखोल समजून घेऊन जनगणनेचे कार्य अचूक व वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
अहिल्यानगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी येथे जनगणनेचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण सुरू आहे. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी प्रशिक्षण केंद्राला भेट देत तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून मार्गदर्शन केले.
जनगणनेचे काम करताना कोणतीही त्रुटी राहू नये व प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी, यावर त्यांनी विशेष भर दिला. कर्मचाऱ्यांनी डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करावा. तसेच डेटा संकलनाची पद्धत नीट समजून घेऊन फिल्डवर काम करताना येणाऱ्या अडचणींवर तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. सर्वांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करण्याचेही त्यांनी आवाहन केले.
या मोहिमेअंतर्गत ६ ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत तीन टप्प्यांत अधिकाऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे. चार मास्टर ट्रेनर्समार्फत एकूण १४२ फिल्ड ट्रेनर्सना प्रशिक्षण दिले जाणार असून प्रत्यक्ष कामाची प्रात्यक्षिकेही दाखविण्यात येत आहेत.
यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, तहसीलदार नागेश गायकवाड, जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय महादेव साळवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, मास्टर ट्रेनर्स व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Census2027#जनगणना२०२७#DigitalIndia#AhilyanagarUpdate#PankajAshiya#डिजिटलजनगणना#GovernmentOfIndia#अहिल्यानगर#DataCollection#PaperlessGovernance#MasterTrainers#जिल्हाधिकारी#AdministrativeUpdate#TrainingProgram#CensusIndia#यशवंतडांगे#SmartAdministration#PublicAdministration
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “प्रकाश वाटा” उपक्रमासाठी निवड चाचणीचे Hall Ticket लवकरच उपलब्ध होणार आहेत.
नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला Register केलेला Email Address नियमित तपासावा.
Hall Ticket संदर्भातील अधिक माहिती लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
#PrakashVata#HallTicketUpdate#StudentNotice#Nandurbar#DistrictAdministration#ExamUpdate#NEET#JEE#CET#GovernmentInitiative
आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
खेळातून आरोग्य, आनंद आणि शिस्त
निरोगी जीवनाची गुरुकिल्ली ![]()
![]()
#InternationalDayOfSport#FitIndia#SportsForAll
‘इंडिया स्किल्स’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; ४ सुवर्ण पदकांसह एकूण १७ पदक केली प्राप्त
मुंबई: ‘वर्ल्ड स्किल्स’ स्पर्धेसाठी रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या ‘इंडिया स्किल्स २०२५-२६’ स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी ४ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची अशी एकूण १७ पदके प्राप्त केली आहेत. उत्तर प्रदेश येथे ग्रेटर नोएडा मधील इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट येथे ही स्पर्धा पार पडली. आगामी २०२७-२०२८ ची ही स्पर्धा मुंबईत होण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. या यशाबद्दल कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संपूर्ण चमूचे आणि विजेत्या खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केले आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ पार पडला आहे. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये अफाट कौशल्य आहे, हे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जागतिक स्तरावर भारताचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्या तरुणांमध्ये आहे. पदके जिंकणाऱ्या सर्व उमेदवारांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांचे मी अभिनंदन करतो. आगामी वर्ल्ड स्किल्स स्पर्धेतही महाराष्ट्र अशीच उत्तुंग कामगिरी करेल, याची मला खात्री आहे. महाराष्ट्र २०२७ मध्ये राज्यस्तरीय महिला कौशल्य चॅम्पियन्स ही स्पर्धा सुरू करणार आहे.
कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, उद्योग भागीदार व तांत्रिक संस्था यांनी हे यश मिळवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून विशेष मेहनत घेतली होती. सुमारे १५,२७५ नोंदणीकृत उमेदवारांमधून जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावरील चाळणी परीक्षेतून ५४ सर्वोत्तम उमेदवारांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली होती. स्पर्धेपूर्वी या उमेदवारांना तज्ज्ञांमार्फत विशेष ‘बूटकॅम्प’ प्रशिक्षण आणि मानसिक तयारीसाठी समुपदेशनही देण्यात आले होते. इंडिया स्किल्स स्पर्धेतील या विजयामुळे महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. २०२६ मध्ये चीनमधील शांघाय येथे सप्टेंबर मध्ये होणाऱ्या ‘वर्ल्ड स्किल्स’ स्पर्धेसाठी आता या विजेत्यांच्या प्रशिक्षणाची पुढील फेरी लवकरच सुरू होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ०३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असून, यावर्षीही विविध विभागांच्या समन्वयातून तो अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरा करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल, २०२६ रोजीच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस बैठकीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी राज्यमंत्री भाई गिरकर, माजी आमदार प्रकाश गजभिये, मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, भन्ते डॉ. राहूल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी यांच्यासह विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यामागील उद्देश केवळ औपचारिकता नसून त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे असा आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक असून, त्यातील समावेशकतेच्या तत्त्वामुळे भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. समाजाला मिळणाऱ्या संधी, हक्क आणि प्रगती यामागे कोणाचे योगदान आहे, हे नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे. त्यामुळे जयंती सोहळा हा केवळ उत्सव न राहता विचारांचा प्रसार करणारा पर्व ठरतो.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.१४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायी आणि नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची सर्वंकष व्यवस्था करण्यात यावी. उष्णतेपासून संरक्षण मिळावे यासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात यावेत. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध ठेवावी. तसेच, दादर आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून नियंत्रण ठेवावे, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.
नागरिकांना मार्गदर्शन होण्यासाठी विविध ठिकाणी सूचना फलक लावावेत. बेस्ट प्रशासनाने दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी दरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशासह जगभर मोठ्या प्रमाणावर साजरी होत असल्याचा उल्लेख करत, हा सोहळा अधिक उत्तम पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले,भारतीय संविधान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम विभागामार्फत हाती घेण्यात आला असून, जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वसतिगृहांची उभारणी करण्यात येत आहे. जयंती सोहळ्याच्या निमित्ताने यावर्षी काही विशेष उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ड्रोनच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित भव्य ड्रोन शो चैत्यभूमी परिसरात सादर करण्यात येणार आहे.
या बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, लोकराज्य मासिकाचा विशेषांक, शासकीय जाहिरात व प्रसिध्दी याबाबत चर्चा झाली व याबाबत निर्देश देण्यात आले.
बैठकीत मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.
पतसंस्थांच्या प्रगतीसाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा लवकरच – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर: सहकार क्षेत्रात महिलांचे योगदान अमूल्य असून, सत्कारमूर्ती महिला भविष्यातील या क्षेत्राच्या ‘आयडॉल’ आहेत. महिलांच्या माध्यमातून सहकार चळवळीला नवी गती देण्यासाठी राज्य शासन आणि फेडरेशन एकत्रितपणे प्रयत्नशील असून, पतसंस्थांच्या प्रगतीसाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा लवकरच केल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य नागरी पतसंस्था फेडरेशन, मुंबई आणि भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महिला सहकार मेळावा’, एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आणि ‘सहकार सम्राज्ञी सक्षम महिला, सक्षम सहकार पुरस्कार’ वितरण सोहळा सायबर कॉलेज येथील आनंद भवन सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पालकमंत्री आबिटकर यांनी सहकार क्षेत्रातील महिलांच्या वाढत्या प्रभावाचे कौतुक केले. याप्रसंगी कोल्हापूर महापालिकेच्या महापौर रूपाराणी निकम, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा उर्फ काका कोयते, भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, सहसचिव भारतीताई मुथा, संचालिका नीलिमा बावणे, उपकार्याध्यक्ष अंजलीताई पाटील, गोदावरी अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांसह राज्यभरातील पतसंस्थांच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सहकारी पतसंस्थांच्या बळकटीकरणावर भर देताना पालकमंत्री पुढे म्हणाले की, राज्यातील पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. नागरी सहकारी पतसंस्थांकडून सोने तारण कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना ‘नाममात्र सभासद’ करून त्यांच्याशी व्यवहार सुलभ करण्यासाठी सहकार कायद्यात आवश्यक त्या सुधारणांचा प्रस्ताव सहकार आयुक्तांमार्फत शासनास सादर झाला आहे. तसेच तरलता निधीची गुंतवणूक जिल्हा बँकांव्यतिरिक्त अन्य बँकांमध्ये करण्याची मुभा मिळावी, यासाठीही पाठपुरावा सुरू असून लवकरच या संदर्भात शासन निर्णय जाहीर केला जाईल.
बचत गटांच्या चळवळीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या युनूस खान यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी अधिक सक्षम व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, यावेळी भागीरथी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना ‘सहकार श्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महापौर रूपाराणी निकम यांनी महिलांच्या मानसिक स्वास्थ्यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, महिलांना सध्याच्या काळात मोठे स्वातंत्र्य मिळत आहे, मात्र आर्थिक सक्षमीकरणासोबतच मानसिक संतुलन राखणेही महत्त्वाचे आहे. उद्योग-व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सातत्य आणि चिकाटीचा मंत्र त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमात अरुंधती महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महिलांच्या आर्थिक विकासासाठी अशा चर्चासत्रांचे आयोजन महत्त्वाचे आहे. ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी मोठ्या संधी उपलब्ध होत असून, प्रशिक्षणाच्या जोरावर जिल्ह्याच्या विकासामध्ये महिलांचा वाटा निश्चितच वाढणार आहे.



