Home ‘उमेद’च्या साथीने ‘अन्नपूर्णा फूड ॲण्ड प्रॉडक्टस’ ची लक्षवेधी घौडदौड

‘उमेद’च्या साथीने ‘अन्नपूर्णा फूड ॲण्ड प्रॉडक्टस’ ची लक्षवेधी घौडदौड

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील रेणापूरच्या मीराबाई स्वय सहायता संघ, संविधान महिला ग्रामसमूह, सिद्धिविनायक प्रभागसंघ, पाळज येथील  इयत्ता १० वी नापास असलेल्या विशेष म्हणजे उद्योगाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या अन्नपूर्णा फूड अँड प्रॉडक्ट्सच्या सर्वेसर्वा सुनीता अशोक कावळे यांचा उद्योजिका म्हणून सुरु असलेला यशस्वी प्रवास प्रेरणादायी आणि अभिनंदनीय आहे.

सुनीता कावळे त्यांच्या अन्नपूर्णा फूड ॲण्ड प्रॉडक्स अंतर्गत ११ प्रकारची आवळ्याची उत्पादने बनवतात. त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली ती फक्त ५०० रुपयाच्या भांडवलावर आणि आजघडीला अन्नपूर्णा फूड प्रॉडक्टस ९ लाखा रुपयांपर्यंतची उलाढाल करत आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत स्वावंलबनाचा मार्ग शोधण्याच्या धडपडीत आवळ्यासारख्या आरोग्यवर्धक फळातून खाद्य पदार्थ तयार करुन त्याच्या विक्रीतून काही करता येईल या विचाराने अवघ्या पाचशे रुपयात व्यवसाय करु पाहणाऱ्या सुनीता यांचा प्रवास सोपा नव्हता, कारण आर्थिक पाठबळ तर काही नव्हतेच मात्र त्यांच्या आत्मविश्वासाला पूरक पाठिंबा देणारे वातावरण ही  घरात नव्हते उलट अवतीभवतीच्या महिलांकडूनही  त्यांच्या या प्रयत्नांना टिकेच्या नजरेतून बघितल्या गेले, त्यांच्या धडपडीला गांभिर्याने घेतल्या गेले नाही, तर उलट त्यांना हे जमू शकणार नाही, असे म्हटले गेले, मात्र त्यांच्या मुलींने त्यांना प्रोत्साहन देत पाठिंबा दिल्याने त्या हिमतीने आपल्या व्यवसायात जम बसवण्यासाठी प्रयत्न करत राहिल्या.

आज अकरा प्रकारच्या पदार्थांची निर्मिती करणाऱ्या अन्नपूर्णा फूड प्रॉडक्टस्‌ची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सुनीता यांनी  २०१७ साली आवळ्यावर प्रक्रिया करून छोटेसे उत्पादन सुरू केले. गावात सहज मिळणाऱ्या कच्च्या मालावर आधारित आवळा कँडी, मुरंबा, चूर्ण, लोणचं इत्यादी पदार्थ बनवण्यास त्यांनी सुरवात केली. प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वतःच्या हातांनी बनवली. या व्यवसायासाठी आवश्यक कच्चा माल असलेला आवळा आणण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली, कधी कधी तर ५०, ६० कि.मी. लांबपर्यंत  जाऊन आवळा आणण्यापासून ते तो वाळवणे, त्याच्यापासून उत्पादन तयार करण्यासाठीची सर्व मेहनत घेऊन तो तयार माल बाजारपेठेत विक्री करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया पार पाडत पुढे जात असताना सुनीता यांना अनेक अडथळे, अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र तरी त्या जिद्दीने पुढे जात राहिल्या, त्यांच्या या संघर्षात त्या २०१९ मध्ये उमेद (एमएसआरएलएम) अभियानाच्या माध्यमातून  जोडल्या गेल्या. याठिकाणी  त्यांच्या  उद्योग उभारणीच्या प्रयत्नांना व्यावसायिक कौशल्य देणारे ब्रँडिंग, पॅकेजिंग, मार्केटिंग याची उपयुक्त माहिती देणारे प्रशिक्षण मिळाले.

सरस प्रदर्शनातून उत्पादनाची सरस विक्री

ग्रामविकास विभागाच्या मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात सुनीता यांना विक्रमी विक्रीचा अविस्मरणीय अनुभव प्रत्यक्ष घेता आला, या प्रदर्शनात अन्नपूर्णा फूड प्रॉडक्टसच्या उत्पादनांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यातून सुनीता यांनी आपल्या उत्पादनांची थोडी थोडकी नव्हे तर थेट  १२ लाख रुपयांची विक्री केली, रेणापूर तालुक्यातील छोट्याशा गावातून सुरु केलेल्या व्यवसायाच्या उत्पादनांची इतकी मोठी विक्री होणे हे त्यांचे मोठे यश होते, कारण या विक्रीतून त्यांचा आत्मविश्वास वृद्धीगंत होऊन उद्योगाचे नवीन दालन त्यांच्यासमोर खुले झाले. व्यापक स्वरुपातील बाजारपेठेची ओळख आणि प्रत्यक्ष सहभागी होण्याचा अनुभव त्यांना पुढील वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणा देणारा आहे.

आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सुनीता यांना व्यवसाय वाढवण्यासाठी शासन योजनांच्या माध्यमातून उत्तम सहकार्य मिळत असून (पीएमएफएमई) योजना, शासकीय अनुदान, मशिनरी, पॅकेजिंग यूनिट यासाठी अर्थसहाय्य मिळण्यासाठीची प्रक्रिया त्यांनी सुरु केली आहे. आवळ्याचे उत्पादन आरोग्यदायी आहे, त्याला मोठी मागणी आहे, आणि भविष्यात ‘अन्नपूर्णा’ हा ब्रँड संपूर्ण भारतात पोहोचेल या विश्वासातून कार्यरत सुनीता यांचा हा प्रेरणादायी प्रवास इतरांच्या उमेदीला निश्चितच बळ देणारा आहे.

आपल्याला स्वावलंबनाची मिळालेली संधी अन्य महिलांच्या ही वाट्याला यावी, ही प्रामाणिक इच्छा असेलल्या सुनीता यांना स्वतःच्या यशाप्रमाणे इतर महिलांनीही यशाची चव चाखावी, असे प्रकर्षाने वाटत. म्हणूनच त्यांनी महिलांना  विशेषतः विधवा, परित्यक्ता, गरजू महिलांना स्वअनुभवातून व्यवसायाचे मार्गदर्शन केले, त्यांच्या हाताला काम दिले. “एक बाई सक्षम झाली, की ती इतरांना मदतीचा हात देऊ शकते.” या व्यापक जाणीवेतून सुनीता यांच ‘अन्नपूर्णा’ हे केवळ फूड ब्रँड नाही, तर महिलांना स्वाभिमानाने उभे करणारे एक व्यासपीठ आहे. आर्थिक, शैक्षणिक भांडवलाचा अभाव असताना अडचणींतून मार्ग काढत स्वकष्टाने आणि जिद्दीने सुनीता यांनी इथपर्यंतचा गाठलेला टप्पा हा निश्चितच यशाच्या प्रवासातील मैलाचा दगड आहे.

Home सामाजिक व वर्तन बदल उपक्रम बळकट करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत सामंजस्य करार

सामाजिक व वर्तन बदल उपक्रम बळकट करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत सामंजस्य करार

मुंबई: सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम लोककेंद्रित व अधिक परिणामकारकपणे राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्य  शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्ड्रेन्स्‌इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन (सीआयएफएफ), युनायटेड किंगडमसोबत सामाजिक व वर्तन बदल संप्रेषण उपक्रम बळकट करण्यासाठी नुकताच सामंजस्य करार केला आहे. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारासाठी विशेष पुढाकार घेतला.

या करारावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, उपसचिव चंद्रकांत विभुते, सीआयएफएफ कडून डॉ. हेमांग शाह व डॉ. अस्मिता जैन, तसेच आयपीआयकडून राघवेश राजन आणि अविधा यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या भागीदारीअंतर्गत सामाजिक व वर्तन बदल उपक्रम अधिक नाविन्यपूर्ण, पुराव्यावर आधारित व संशोधनाधारित पद्धतीने राबविले जाणार असून, समुदाय सहभाग व प्रभावी संवाद यावर विशेष भर दिला जाणार आहे. या सहकार्याचा उद्देश आरोग्यविषयक वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे आणि राज्यातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राज्यभर पोहोचविणे व त्याची परिणामकारकता वाढविणे हा आहे.

हा उपक्रम माता व बाल आरोग्य, पोषण, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि रोग नियंत्रण यांसारख्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीस बळकटी देईल. विशेषतः वंचित व दुर्लक्षित घटकांपर्यंत महत्त्वाचे आरोग्य संदेश व सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

कराराच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक परिणामकारक

या कराराच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संवाद माध्यमे आणि समुदाय सहभाग यांचा वापर केला जाणार आहे. विशेषतः कुपोषण, स्वच्छता, लसीकरण आणि आरोग्यदायी सवयी याबाबत जनजागृती वाढवण्यावर भर दिला जाईल.

राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये सामाजिक वर्तन बदल उपक्रम मजबूत करण्यासाठी CIFF तांत्रिक आणि धोरणात्मक सहकार्य करणार आहे. यामुळे आरोग्य योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक होऊन नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा अपेक्षित आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने हा करार आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सांगितले असून, या उपक्रमामुळे राज्यात दीर्घकालीन सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्यास मदत होणार आहे

या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य संप्रेषणाला धोरणात्मक बळ मिळेल व सातत्यपूर्ण सामाजिक व वर्तन बदलाच्या माध्यमातून अधिक चांगले आरोग्य परिणाम साध्य करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Home मिलेटचे महत्त्व लक्षात घेऊन महोत्सवाची व्याप्ती राज्यभर वाढविणार – पणन मंत्री जयकुमार रावल

मिलेटचे महत्त्व लक्षात घेऊन महोत्सवाची व्याप्ती राज्यभर वाढविणार – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक असण्याबरोबरच आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या मिलेट्सना शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने मिलेट्स महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने मिलेट्स महोत्सव राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगत या महोत्सवास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

बोरीवली पश्चिम येथील कोरा केंद्र मैदानावर आयोजित तिसऱ्या मिलेट्स महोत्सवाचे उद्घाटन मंत्री रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार मनीषा चौधरी, नगरसेवक शिवानंद शेट्टी, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सर-व्यवस्थापक विनायक कोकरे आदी उपस्थित होते. २२ मार्च २०२६ पर्यंत हा महोत्सव नागरिकांसाठी खुला असणार आहे.

राज्यात ‘महाराष्ट्र श्री अन्न (मिलेट) अभियान’

पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, जगभरातील तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन मिळावे, या भूमिकेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने संयुक्त राष्ट्रात २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करावे, असा ठराव मांडला होता. या ठरावाला ७१ सभासद देशांनी पाठिंबा दिल्याने संयुक्त राष्ट्राच्या वतीने जगभरात २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) २०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या उपक्रमाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन कृषी आणि अन्न प्रणालीतील महिलांचे अमूल्य योगदान, सक्षमीकरण आणि त्यांच्यासमोरील आव्हानांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. या निमित्ताने राज्यात ‘महाराष्ट्र श्री अन्न (मिलेट) अभियान’ सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बदलत्या जीवनशैलीमुळे जगभरातील लोकांना स्थूलपणाचा तसेच त्यासोबत येणारा उच्च रक्तदाब, मधुमेहासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यावर ‘पौष्टिक तृणधान्य’ रामबाण उपाय ठरू शकतात. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षामुळे देशभर तृणधान्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. विशेषतः सामान्य ग्राहकांमधूनही मागणी वाढत आहे. यामुळे राज्यात तृणधान्यापासून उत्पादने तयार करणारे नवउद्योजक मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. या उत्पादनांची प्रसिद्धी, ग्राहकांमध्ये जागरुकता व बाजार साखळी तयार करणे यावर भर देण्यात येणार असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

मॅग्नेट अंतर्गत एकात्मिक मूल्य साखळीचा विकास

आशियाई विकास बँक (एडीबी) अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत, राज्यातील प्रमुख १५ फलोत्पादन पिकांसाठी उत्पादन ते ग्राहकांपर्यंत वितरण अशा एकात्मिक मूल्य साखळीचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

मॅग्नेट प्रकल्पाच्या विस्तारीत टप्पा २.० अंतर्गत, पौष्टीक घटकावर विशेष भर देण्यात येणार असून फलोत्पादन पिके तसेच मिलेट उत्पादनांचा वापर वाढविणे, मूल्यवृद्धी व व्यवसायवृद्धीसाठी ब्रॅण्डिंग व प्रोत्साहन उपक्रमांद्वारे महाराष्ट्र शासनामार्फत आशियाई विकास बँकेचे सहकार्याने विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी पणन मंडळातर्फे दरवर्षी विविध फळ व धान्य महोत्सवांचे एकत्रितपणे आयोजन केले जाते. तथापि असे एकत्रित महोत्सव न घेता, मिलेटचे आरोग्यविषयक असलेले महत्व व मिलेट उत्पादकांना एक व्यासपीठ देण्याच्या दृष्टिकोनातून गतवर्षीपासून स्वतंत्रपणे मिलेट महोत्सवाची सुरूवात करण्यात आली आहे. मागील वर्षी पुणे शहरात यास चांगला प्रतिसाद मिळाल्याने या वर्षी मुंबईत आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात राज्यभरातून उत्पादक, प्रक्रियादार, नवउद्योजक सहभागी झाले असून या अभियानाची व्याप्ती वाढविण्याकरिता पणन मंडळामार्फत आगामी काळात राज्यात पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर या ठिकाणी मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, असे मंत्री रावल यांनी यावेळी जाहीर केले.

आमदार मनिषा चौधरी यांनी महोत्सवात सहभागी महिला शेतकरी तसेच उत्पादकांचे कौतुक केले. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्वांनी मिळून विशेषतः महिला शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी काम करूया, असे सांगून स्थानिक नागरिकांनी महोत्सवास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले.

कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रास्ताविकाद्वारे महोत्सव आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तर, सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी महोत्सवास पाठबळ दिलेल्या सर्वांचे आभार मानले.

Home केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना माहिती भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना माहिती भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

मुंबई: पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ चा निकाल जाहीर केला असून तो परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी अथवा सीटीईटी उत्तीर्ण झाल्याची माहिती भरण्यासाठी २२ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ घेण्यात आली होती. ही ऑनलाईन परीक्षा ३ ते ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान तीन सत्रात पार पडली. परीक्षेसाठी एकूण ४६०६८ परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते, त्यापैकी ३८५५९ परीक्षार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित होते.

परिषदेकडून हा निकाल १३ मार्च २०२६ रोजी परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ www.mscepune.in  वर जाहीर करण्यात आला. परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांनी महाटीईटी अथवा सीटीईटी ही सर्वांत पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती पूर्वी १६ मार्च ते २१ मार्च २०२६ या कालावधीत https://mscepune.in/dtedola/KP२०२६Info.aspx  या लिंकवर भरायची होती. मात्र, उमेदवारांकडून मुदतवाढीची मागणी झाल्याने आता ही माहिती २२ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत भरण्याची अतिरिक्त संधी देण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे.

Home डोक्यावरचा हंडा काढा; पाणीपुरवठ्याचे नियोजन करा

डोक्यावरचा हंडा काढा; पाणीपुरवठ्याचे नियोजन करा

२२ मार्च : जागतिक जल दिवस

स्वयंपाकापासून ते सांडपाण्यापर्यंत घरात पाणी आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी भारतातील पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पिढ्यानपिढ्या महिलांनी सांभाळली आहे. आजही अनेकांना आपली आई, बहीण किंवा आजी डोक्यावर हंडा, कळशी किंवा घागर घेऊन लांबवरून पाणी आणतानाचे प्रसंग आठवते. भारतात आता हे चित्र कालबाह्य झाले तरी जगभरात अधिकही अनेक देशात नागरिक शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्यापासून वंचित आहेत. त्यामुळे यंदा 22 मार्चला जागतिक जल दिवस साजरा करताना संयुक्त राष्ट्राने पाणी व्यवस्थापनात महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहे.

भारताने पेयजलाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे.घराघरांत नळाद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी जलजीवन मिशन प्रभावीपणे राबविण्यात आले. तरीही काही भागांत पाणीटंचाई कायम आहे आणि त्याचा सर्वाधिक भार महिलांवरच पडतो. ही समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नसून जागतिक पातळीवरही ती तितकीच गंभीर आहे. म्हणूनच यंदाचा जागतिक जल दिवस “पाणी आणि महिला सक्षमीकरण” या व्यापक संकल्पनेशी जोडून साजरा केला जात आहे.

 जलसंकट : असमानतेचा प्रश्न

पृथ्वीवरील सुमारे ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला असला, तरी त्यातील केवळ २.५ टक्के पाणी गोड आहे. त्यातीलही अत्यल्प भाग मानवाच्या वापरासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे पाण्याची विपुलता ही केवळ भास आहे. हवामान बदल, लोकसंख्यावाढ,औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे पाण्याची मागणी वाढत असताना उपलब्धतेत आणि वितरणात मोठी असमानता निर्माण झाली आहे. या असमानतेचा सर्वाधिक फटका स्त्रिया आणि मुलींना बसतो.

 पाणीटंचाईत महिलांचे सर्वाधिक शोषण

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालांनुसार, जगभरातील १ अब्जाहून अधिक स्त्रिया अजूनही सुरक्षित पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. सुमारे १.८ अब्ज लोकांच्या घराजवळ पाणी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक तीन घरांपैकी दोन घरांमध्ये पाणी आणण्याची जबाबदारी महिलांवर असते. ५३ देशांतील आकडेवारीनुसार स्त्रिया आणि मुली दररोज एकत्रितपणे सुमारे २५० दशलक्ष तास पाणी आणण्यात खर्च करतात. ही वेळ शिक्षण, रोजगार किंवा वैयक्तिक विकासासाठी वापरता आली असती.

अशुद्ध पाणी आणि स्वच्छतेच्या अभावामुळे दररोज सुमारे १,००० बालकांचा मृत्यू होतो. याशिवाय जगातील सुमारे १४ टक्के देशांमध्ये पाणी व्यवस्थापनाच्या निर्णयप्रक्रियेत महिलांचा समान सहभाग निश्चित करणारी ठोस यंत्रणा नाही.

हे आकडे स्पष्ट करतात की जलसंकट हा केवळ नैसर्गिक प्रश्न नसून तो सामाजिक, आर्थिक आणि लिंगभेद करणारा आहे.

 महिला जलव्यवस्थापनाच्या केंद्रस्थानी हव्यात

भारतीय संविधानामुळे स्त्री-पुरुष समानतेचा पाया मजबूत झाला आहे.आज महिला उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांत नेतृत्व करत आहेत. पाणी व्यवस्थापनातही त्यांचा अनुभव अमूल्य आहे.मात्र ही स्त्री समानता आत्ता जलव्यवस्थापनातही आणणे केवळ आपल्याच देशाची नाही तर जगभराची गरज बनली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या मते, जलव्यवस्थापनात महिलांचा सहभाग वाढल्यास सेवा अधिक शाश्वत, समावेशक आणि प्रभावी ठरतात. त्यामुळे महिलांना ‘पाणी आणणाऱ्या भूमिकेतून ‘पाणी नियोजन करणाऱ्या भूमिकेत आणणे आवश्यक आहे.

 पाणी आणि अर्थव्यवस्था : अदृश्य नाते

पाणी हे जीवनाचेच नव्हे तर अर्थव्यवस्थेचेही मूलभूत साधन आहे. जगभरात उपलब्ध शुद्ध पाण्यापैकी सुमारे ७० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते, तर उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते.

ज्या देशांनी प्रभावी जलव्यवस्थापन केले, तेथे आर्थिक प्रगती वेगाने झाली. इस्रायलने ठिबक सिंचन, सिंगापूरने सांडपाण्याचा पुनर्वापर, नेदरलँडने पूर नियंत्रण आणि ऑस्ट्रेलियाने जलसंधारण धोरण यशस्वीपणे राबविले. ही उदाहरणे योग्य नियोजनाचे महत्त्व अधोरेखित करतात.

 जागतिक उपाययोजना : बदलाची दिशा

पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर (डिसॅलिनेशन), सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर, तसेच नदी पुनरुज्जीवन प्रकल्प यांवर भर दिला जात आहे.

महाराष्ट्रातील नागपूर येथे सांडपाण्याचा औद्योगिक वापर केला जातो, तर नवी मुंबईचे सांडपाणी व्यवस्थापन आदर्श मानले जाते. याशिवाय वृक्षारोपण आणि जलसंधारण हे पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यावश्यक उपाय आहेत.

 पाणी अडवा – पाणी जिरवा : प्रभावी उपाय

पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे ही जलसंधारणाची सर्वात प्रभावी पद्धत आहे. यामुळे भूजल पातळी वाढते, विहिरी जिवंत राहतात आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध होते.

शहरी भागातही रेनवॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करणे आवश्यक आहे. शासनाने नव्या बांधकामांसाठी ही अट बंधनकारक केली आहे, ही सकारात्मक बाब आहे.

भारतातील प्रयत्न : धोरण आणि अंमलबजावणी

भारत सरकारने पाणी व्यवस्थापनासाठी विविध योजना राबवल्या आहेत—जल जीवन मिशन – प्रत्येक जल जीवन मिशन, अटल भूजल योजना,जलशक्ती अभियान,स्वच्छ भारत मिशन,महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा योजना,मुख्यमंत्री जलसंधारण योजना,नमामि गंगे योजना अशा कितीतरी योजनांमधून केंद्र व राज्य शासन जनतेला शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

प्रत्येक नागरिकाची भूमिका

शासन स्तरावर विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी सामान्य नागरिकांनीही या मोहिमेत एक जबाबदार नागरिक म्हणून पुढे येणे गरजेचे आहे.पाणी वाचवण्याची सुरुवात शासनाकडून नव्हे, तर घरापासून होते. आपण काही सोपे उपाय अवलंबू शकतो.जसे की,नळ आणि पाईप गळती त्वरित दुरुस्त करणे,रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे, सांडपाण्याचा पुनर्वापर,ठिबक सिंचनाचा वापर पाण्याचा अपव्यय टाळणे,वृक्षारोपण करणे,घरातील पाणी व्यवस्थापनात महिलांचा निर्णयाधिकार मान्य करणे,पाणी हा केवळ नैसर्गिक संसाधन नसून तो मानवी हक्क, सामाजिक न्याय आणि लिंगसमतेचा आधार आहे. जलसंकटाचा विचार करताना समतेचा दृष्टिकोन आवश्यक आहे. तसा विचार रुजवणे.यासोबतच घराघरात केवळ पाण्याच्या उपलब्धतेसाठी महिलांचे शोषण होणार नाही याची काळजी घेण्याचाही आजचा दिवस आहे. चला !तर महिलांच्या डोक्यावरचा हंडा काढूया आणि जल जीवन मिशन, अटल भूजल योजना,जलशक्ती अभियान,स्वच्छ भारत मिशन,महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा योजना, विविध जलसंधारण योजनेच्या माध्यमातून पाणी टंचाई मुक्त समाज निर्मितीसाठी पुढे येऊया..

Home चारित्र्यनिर्मिती हाच भक्कम नेतृत्वाचा पाया – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

चारित्र्यनिर्मिती हाच भक्कम नेतृत्वाचा पाया – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

नागपूरउपराष्ट्रपती म्हणाले की, कोणत्याही देशाची क्षमता आणि सामर्थ्य हे त्या देशाच्या तरुण लोकसंख्येच्या आकारावर आणि ताकदीवर अवलंबून असते. भारताकडे तरुणांची मोठी संख्या ही जमेची बाजू आहे. आज देशातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांखालील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली केंद्र सरकारने तरुणांच्या शिक्षण, कौशल्य आणि नेतृत्व विकासासाठी अनेक उपक्रम सुरू केले असल्याचे ते यावेळी म्हणाले.

भारतीय युवा संसद नॅशनल ट्रस्टच्या गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या अविरत सेवेचे त्यांनी यावेळी कौतुक केले. भारतीय युवा संसदेच्या देशाच्या कानाकोपऱ्यात परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत. देशातील तरुणांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ते यावेळी म्हणाले.

देशाच्या अमृत काळात आपण सर्वजण मिळून 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. यशाचा हा आलेख गाठण्यात युवकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. अधिक मजबूत, सर्वसमावेशक आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी भक्कम चारित्र्य आणि नेतृत्वाच्या बळावर सक्रिय सहभागी होण्याची संधी युवकांना असून त्यांनी या संधीचे सोने करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. : भारतीय युवा संसद परिषद हे केवळ चर्चेचे व्यासपीठ नसून ते भविष्यातील जबाबदार नागरिक घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. या परिषदेच्या माध्यमातून तुमच्या विचारांना आकार दिला जातो. चारित्र्याची जडणघडण होते. चारित्र्यनिर्मिती हाच भक्कम नेतृत्वाचा पाया आहे. जर आपले आयुष्य चारित्र्य संपन्न असेल, तर आपले नेतृत्व प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात 29 व्या भारतीय युवा संसद परिषदेचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, भारतीय युवा संसद परिषदेचे राष्ट्रीय संयोजक आशुतोष जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.

विकसित भारत घडविण्यात सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानही महत्त्वाचे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

भारताची युवा पिढी ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. ही उत्साही व गतिमान पिढी राष्ट्र निर्माणात मोलाची ठरणार आहे. 2047 या वर्षापर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी केवळ आर्थिक योगदानापुरते मर्यादित राहता येणार नाही. यासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिकही योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज येथे केले.

विविधतेत एकता हे आपल्या देशाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. भाषा, धर्म, जात, पंथ देशातील विविध भागात वेगवेगळ्या असल्या तरी देश एकसंघ असल्याचे दिसून येतो. आजवर देशावर अनेक आक्रमणे झाली आहेत. मात्र आपल्या एकसंघतेच्या बळावर ही आक्रमणे परतवून लावल्याचे ते म्हणाले.

भारतीय युवा संसद परिषदेला सहाव्यांदा उपस्थित राहात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तीत ही परिषद आयोजित करण्यात येत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

देशातील सर्वच भागातील युवा नेते आणि तरुण या परिषदेला येऊन राष्ट्रनिर्मितीची चर्चा करीत असतात. आजच्या ‘स्क्रीन टाईम’च्या काळात ही फलदायी चर्चा महत्वाची ठरत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

Home ऐतिहासिक ‘चवदार तळे सत्याग्रहा’च्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त समता

ऐतिहासिक ‘चवदार तळे सत्याग्रहा’च्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त समता

सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार करुया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला ‘चवदार तळे’ सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाड (जि. रायगड) येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाड चवदार तळे सत्याग्रह – शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्या’चा प्रारंभ करण्यात आला. यावेळी चवदार तळ्याचे जलशुद्धीकरण आणि परिसर सुशोभीकरणासाठी ५५ कोटी ८० लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

#चवदारतळे

#ChavdarTale

Home मतदारयादी अद्ययावत आणि अचूक तयार करावी – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

मतदारयादी अद्ययावत आणि अचूक तयार करावी – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

नाशिक: जिल्ह्यातील मतदारयादी अद्ययावत आणि अचूक अशी तयार करावी. मतदारयादी तयार करताना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी ठेऊ नयेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी येथे दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता (इगतपुरी), कश्मिरा संखे (कळवण), मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी सांगितले की, सन 2002 च्या यादीतोल नावांची स्वयंजुळवणी तसेच कुटुंबातील एका मतदाराच्या नावावरून अन्य सदस्यांच्या नावांची जळवणीच्या कामाला गती द्यावी. मतदार यादीतील मतदारांची अस्पष्ट छायाचित्र, निरर्थक नोंदी दुरुस्तीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी घरोघरी प्रत्यक्ष भेट देत मतदारांची सुस्पष्ट आणि रंगीत छायाचित्र संकलित करून बीएलओ अॅपमध्ये अपलोड करावीत. तसेच समान नाव आणि छायाचित्र असलेल्या मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधत आवश्यक त्या दुरुस्ती करून घ्याव्यात, मतदारांचे अर्ज क्रमांक सहा, सात आणि आठवर तत्काळ कार्यवाही करावी. कोणतेही अर्ज 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. मतदारांनी संपर्क केल्यावर त्यांना तत्काळ प्रतिसाद द्यावा. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. मतदार नोंदणीबाबत नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृ‌ती करावी, असही निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी दिले.

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, जिल्ह्यात विधानसभेचे 15 मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात एकूण 51 लाख 56 हजार मतदार आहेत, या मतदारांपैकी 2002 मध्य विशेष सखोल पुनरीक्षण करून तयार झालेल्या मतदार यादीशी विद्यमान मतदारांची जुळवणी करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 15 लाख 16 हजार मतदारांच्या जुळवणीचे काम पूर्ण झाल आहे. या कामाचा नियमितपणे आढावा घेण्यात येईल, असेही त्यानी सांगितले.

Home माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे हस्ते आधार संच वितरण

माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे हस्ते आधार संच वितरण

सोलापूर: सध्याच्या संगणकाच्या युगात आधार ही मूलभूत ओळख असून आधार क्रमांकाविना कोणतेही शासकीय कामकाज होत नाही. यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने सुधारित सॉफ्टवेअर तयार करून आधार केंद्रांना अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून अद्यावत आधार संच तयार करण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने  आधार संच वितरण कार्यक्रम शुक्रवार पेठ येथे ठेवण्यात आला होता. यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात पाच आधार केंद्रांना आधार संचचे वितरण करण्यात आले.

मंत्री ॲड. शेलार यांनी पुढे सांगितले की, शासनाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून १००० सेवा थेट नागरिकांच्या व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील १३१ आधार केंद्रांपैकी १०६ किट वितरित झाले असून, प्रतिनिधिक स्वरूपात पाच किट आज देण्यात आले. उर्वरित २५ किट एप्रिल-मे महिन्यात वितरित करण्यात येणार आहेत.उत्तर तहसीलदार निलेश पाटील यांनी आधार संचाबद्दल माहिती देऊन सांगितले की, या किटमुळे आधार नोंदणी करताना कमीत कमी अडचणी येतील आणि कामकाज अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.या कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शहाजी पवार, मोहन डांगरे, तहसीलदार निलेश पाटील तसेच इतर पदाधिकारी, आधार केंद्र चालक व कर्मचारी उपस्थित होते.

Home माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे हस्ते आधार संच वितरण

माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे हस्ते आधार संच वितरण

सोलापूर: सध्याच्या संगणकाच्या युगात आधार ही मूलभूत ओळख असून आधार क्रमांकाविना कोणतेही शासकीय कामकाज होत नाही. यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने सुधारित सॉफ्टवेअर तयार करून आधार केंद्रांना अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून अद्यावत आधार संच तयार करण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने  आधार संच वितरण कार्यक्रम शुक्रवार पेठ येथे ठेवण्यात आला होता. यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात पाच आधार केंद्रांना आधार संचचे वितरण करण्यात आले.

मंत्री ॲड. शेलार यांनी पुढे सांगितले की, शासनाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून १००० सेवा थेट नागरिकांच्या व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील १३१ आधार केंद्रांपैकी १०६ किट वितरित झाले असून, प्रतिनिधिक स्वरूपात पाच किट आज देण्यात आले. उर्वरित २५ किट एप्रिल-मे महिन्यात वितरित करण्यात येणार आहेत.उत्तर तहसीलदार निलेश पाटील यांनी आधार संचाबद्दल माहिती देऊन सांगितले की, या किटमुळे आधार नोंदणी करताना कमीत कमी अडचणी येतील आणि कामकाज अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.या कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शहाजी पवार, मोहन डांगरे, तहसीलदार निलेश पाटील तसेच इतर पदाधिकारी, आधार केंद्र चालक व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!