मुंबई: पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प व अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन यासंदर्भात सकारात्मक तोडगा काढण्याच्या निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला दिले.
राहुरी-शनी शिंगणापूर प्रस्तावित रेल्वे मार्ग आणि पुणे-नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प यामुळे निर्माण झालेले अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, तसेच पुणतांबा जंक्शनवर शिर्डीकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याबाबतच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली.
जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, रेल्वे प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी दिल्या आहेत. आता प्रकल्प झाला म्हणून त्यांचा त्याग विसरणे इष्ट नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने तोडगा काढावा. तसेच पुणतांबा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या प्रवेशमार्गाचा प्रश्न सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री विखे-पाटील यांनी दिले.
पुणतांबा-शिर्डी मार्गावरील रेल्वे गाड्यांना पुणतांबा जंक्शन येथे थांबा देण्यात यावा, तसेच रेल्वे दुहेरीकरणाच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांवर परिणाम होऊ नये अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. काही ठिकाणी रेल्वे प्रशासनाने कुंपण घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा मार्ग बंद झाल्याची तक्रारही मांडण्यात आली.
बैठकीत रेल्वे प्रशासनाकडून पुणे–नाशिक रेल्वे मार्गाबाबत सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पात खोडद येथील जीएमआरटी वेधशाळेच्या कार्यावर परिणाम होऊ नये यासाठी रेल्वे मार्गाचे संरेखन बदलण्याचा पर्याय विचारात घेतल्याची माहिती देण्यात आली. वेधशाळेच्या अँटेना परिसरापासून किमान अंतर राखण्यासाठी मार्गात बदल करण्याबाबतही चर्चा झाली.
शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्ता, बोगदा किंवा इतर सोयी उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीस आमदार अमोल खताळ आणि आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह पुण्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार शर्मा, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) भुवनेश कुमार गुप्ता, मुख्य अधिकारी विजय कुमार राय तसेच रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, पुणतांबा, राहुरी, संगमनेर, अकोले परिसरातील शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाचे चार, १५, २१, २६ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या चार वर्षे मुदतीच्या 1500 कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी प्रसिद्धी पत्रकाने दिली आहे.
अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.
17 मार्च 2026 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् 17 मार्च 2026 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.
यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 18 मार्च 2026 रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.
कर्जरोख्याचा कालावधी चार वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी 18 मार्च 2026 पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक 18 मार्च 2030 रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी सप्टेंबर 18 आणि दिनांक मार्च 18 रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.
शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अर्थसंकल्पावरील घडी पुस्तिकेचे प्रकाशन
मुख्यमंत्री यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी आयोजित अनौपचारिक कार्यक्रमात हे प्रकाशन पार पडले. नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, सहायक संचालक पल्लवी धारव, माहिती अधिकारी रितेश भुयार, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रसिद्धी समन्वयक अविनाश महालक्ष्मे, रमाकांत दाणी, अनिल गडेकर यावेळी उपस्थित होते.
अर्थसंकल्पात विदर्भातील कृषी, आरोग्य, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा आदींबाबत करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती वैविध्यपूर्ण ग्राफिक्सद्वारे घडी पुस्तिकेत देण्यात आली आहेत. उत्तम रंगसंगती आणि मांडणीमुळे घडी पुस्तिका आकर्षक झाली आहे. विविध शासकीय कार्यालये आणि प्रसार माध्यमांसाठी ही घडी पुस्तिका संदर्भ म्हणून उपयुक्त ठरणार आहे.
भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर: देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. याची सदैव जाण ठेवून नागपुरात उभारण्यात आलेला हा भव्य राष्ट्रध्वज येथील जनतेच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.येथील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर नागपूर महानगरपालिका आणि लोकमत वृत्तपत्र समूह यांनी साकारलेल्या २०० फूट उंच भारतीय राष्ट्रध्वजाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार संदीप जोशी आणि विकास ठाकरे, महापौर नीता ठाकरे, प्रभारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत आणि वैष्णवी बी, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, परदेशात त्या – त्या देशांचे राष्ट्रध्वज उभारल्याचे दिसत होते. राष्ट्रभिमान जागविण्यासाठी भारतातही राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत, अशी मागणी व्हायची मात्र, त्यास फ्लॅग कोडची अडचण येत असे. ती अडचण दूर झाल्याने देशात भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात येत आहेत. नागपुरातील या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर उभारण्यात आलेला हा राष्ट्रध्वज प्रत्येक नागपूरकराचा राष्ट्रभिमान जागविणारा असा आहे. याचे उत्तम आरेखन करण्यात आले आहे. नागपुरातून अन्य राज्याकडे जाणाऱ्या शहरांचे शहरांचे प्रतीकही येथील भिंतींवर दिसून येत आहेत. या शहरात असा भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात आला ते अभिमानास्पद आहे. हा राष्ट्रध्वज बघून देशाभिमाने उर भरून येतो, असेही त्यांनी सांगितले. लोकमत वृत्तपत्र समूहाने हा राष्ट्रध्वज उभारण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी कौतुक केले.डॉ. विजय दर्डा यांनी स्वागत पर भाषण केले. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येथील कोनशिलेचे अनावरण झाले. त्यांनी राष्ट्रध्वजवंदन व राष्ट्रध्वजाचे अनावरण केले.२००९ मध्ये कस्तुरचंद पार्क येथे राष्ट्रध्वज उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली. 2016 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. या राष्ट्रध्वजाचे वास्तूविशारद शांतनू भाल्ला आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अर्थसंकल्पावरील घडी पुस्तिकेचे प्रकाशन
नागपूर: माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर विभागीय माहिती संचालक कार्यालयाने महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी सादर अर्थसंकल्पामध्ये विदर्भासाठी करण्यात आलेल्या तरतुदींवर आधारित घडी पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.मुख्यमंत्री यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी आयोजित अनौपचारिक कार्यक्रमात हे प्रकाशन पार पडले. नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, सहायक संचालक पल्लवी धारव, माहिती अधिकारी रितेश भुयार, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रसिद्धी समन्वयक अविनाश महालक्ष्मे, रमाकांत दाणी, अनिल गडेकर यावेळी उपस्थित होते.
अर्थसंकल्पात विदर्भातील कृषी, आरोग्य, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा आदींबाबत करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती वैविध्यपूर्ण ग्राफिक्सद्वारे घडी पुस्तिकेत देण्यात आली आहेत. उत्तम रंगसंगती आणि मांडणीमुळे घडी पुस्तिका आकर्षक झाली आहे. विविध शासकीय कार्यालये आणि प्रसार माध्यमांसाठी ही घडी पुस्तिका संदर्भ म्हणून उपयुक्त ठरणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात उन्हाचा तडाखा: शासकीय रुग्णालयांमध्ये १८ ‘उष्माघात कक्ष’ सज्ज!
नंदुरबार: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवू लागली आहे. तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली असून जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह १८ रुग्णालयांमध्ये स्वतंत्र ‘उष्माघात कक्ष’ (Heatstroke Ward) कार्यान्वित केले आहेत.
आरोग्य यंत्रणेची जय्यत तयारी
जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
विस्तारित सुविधा: नंदुरबार जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, तळोदा व नवापूर उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्ह्यातील १३ ग्रामीण रुग्णालयांमध्ये (उदा. धडगाव, मोलगी, अक्कलकुवा, शहादा, तळोदा इ.) हे कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
प्रत्येकी ५ बेडची सोय: प्रत्येक कक्षात किमान पाच खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, रुग्णांना तातडीने उपचार मिळतील याची खात्री करण्यात आली आहे.
थंडाव्यासाठी उपाययोजना: कडक उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी या कक्षांमध्ये कुलर, पंखे आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती: उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून, आवश्यक औषधसाठा पुरेसा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र: येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही (PHC) असे कक्ष सुरू करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
तज्ज्ञांचा सल्ला: उष्माघाताकडे दुर्लक्ष करू नका!
डॉ. संजय राठोड (अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) आणि डॉ. विनय सोनवणे (जिल्हा शल्यचिकित्सक) यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की:
“तापमान वाढल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन, चक्कर येणे किंवा उलट्या होणे असे त्रास होऊ शकतात. असे कोणतेही लक्षण जाणवल्यास नागरिकांनी घरगुती उपचार करण्याऐवजी तातडीने जवळच्या उष्माघात कक्षाशी संपर्क साधावा.”
उन्हापासून बचावासाठी काय कराल?
१. जास्तीत जास्त पाणी प्या आणि शरीरातील हायड्रेशन टिकवून ठेवा.
२. दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो उन्हात फिरणे टाळा.
३. हलक्या रंगाचे आणि सुती कपडे वापरा.
४. बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा.
#नंदुरबार#उन्हाळा२०२६#उष्माघात#आरोग्यसल्ला#लोकमत#महाराष्ट्रबातम्या#NandurbarNews#HeatwaveSafety#StaySafe
वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला.
वरळी नाका येथील गणपतराव कदम मार्गावरील ‘सूरज वल्लभदास चाळ’ परिसरात गॅस सिलेंडरची अवैध साठेबाजी करून चढ्या दराने विक्री केली असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
यामध्ये एचपी गॅस कंपनीचे पाच किलोचे सहा भरलेले आणि ५८ रिकामे सिलेंडर हस्तगत करण्यात आले. तसेच सुपर गॅस कंपनीचे चार किलोचे ६४ भरलेले आणि १२ किलोचे १९ भरलेले सिलेंडर जप्त करण्यात आले. याशिवाय बारा, चार आणि दोन किलोचे विविध आकाराचे २५ रिकामे सिलेंडरही आढळून आले.
नियंत्रक शिधावाटप कार्यालयाच्या फिरत्या पथकाने आणि कार्यालय क्रमांक २१ च्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
मराठी साहित्यविश्वातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ कवी, लघुनिबंधकार व समीक्षक
विंदा करंदीकर यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
त्यांच्या शब्दांनी विचारांना दिलेली दिशा आजही प्रेरणादायी आहे.

#VindaKarandikar#MarathiSahitya#स्मृतिदिन#मराठीकवी
परिणाम समजून दिलेला नकार
विचार न करता दिलेल्या होकारपेक्षा कधीही चांगला.
त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा
मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात देश-विदेशातून करोडो भाविक येणार आहेत. कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताची पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे याच्या यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
त्र्यंबक-नाशिक सिंहस्थ कुंभमेळाकरिता करण्यात येत असलेल्या विविध कामांसाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात आयोजित कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील ५ हजार १४० कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ हजार ४१ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. कुंभमेळा निमित्त सुरू असलेली आणि प्रस्तावित असलेल्या कामांमध्ये कुणी वाईट हेतूने किंवा मुद्दाम विलंब होण्याच्या हेतूने अडथळा आणत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, आमदार सर्वश्री पंकज भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, राहुल ढिकले, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुंभमेळा निमित्ताने करण्यात येणाऱ्या कामांकरिता लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा. नाशिक वर्तुळ मार्गातील अडथळे दूर करीत विशेष बाब म्हणून ५० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी. कुंभमध्ये स्वच्छता अत्यंत महत्वाची असून या कामांमध्ये करण्यात येणारी शौचालय दर्जेदार असावी. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या परिसरातील स्थानकांची पायाभूत सुविधांची कामे रेल्वेच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये निफाड रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात यावा, याबाबत रेल्वेने पडताळणी करून कार्यवाही करावी.
कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक शिर्डी व शनिशिंगणापूरला निश्चितपणे जाणार आहेत. त्यामुळे शिर्डी ते नाशिक रस्त्याचे काम करण्यात यावे. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना संपर्कामध्ये कुठलीही अडचण होऊ नये, म्हणून मोबाईल संपर्काची व्यवस्था भक्कम असावी. त्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात यावी. द्वारका जंक्शन येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांमध्ये अंतर्गत रस्त्यांचा विचार करून परिसरातील रस्त्यांचा एकीकृत विकास करावा. नवीन घाटांच्या जागेकरिता शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, यासाठी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करावा. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त व नाशिक येथील गोदावरी नदीतील पाणी कुंभमेळा दरम्यान शुद्ध राहण्यासाठी यंत्रणांनी विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
नाशिक येथील काळाराम मंदिराचे काम करताना आजूबाजूच्या वाहतुकीला अडथळा होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. राम काल पथाच्या कामाला गती देण्यात यावी. शहरातील ऑप्टिकल फायबर केबलचे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पातील नादुरुस्त सीसीटीव्ही बाबत पडताळणी करून नवीन सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची मान्यता घ्यावी. अमृत स्नानांच्या दरम्यान शहरातील भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता महाविद्यालयांमधील जागा पार्किंग तसेच पोलिसांसाठी घेण्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून निर्णय घ्यावा. निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टच्या कामांचा समावेश करून पुढील कार्यवाही करण्यात यावी. नाशिक शहर व परिसरातील जवळपास दोन ते चार हजार मुलांना कुंभमेळ्याच्या निमित्ताने आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी प्रेरित करावे. महिला बचत गटांच्या कुंभमेळातील समावेशनाबाबत पडताळणी करून तशा पद्धतीचे बिझनेस मॉडेल उभारावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
बैठकीत नाशिक त्रंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सादरीकरण केले.
बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (गृह) मनिषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होत्या. तसेच नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा यांनी दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे बैठकीत सहभाग घेतला.



