अमरावती : सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा पहिला टप्पा राबविण्यात येणार आहे. पाच टप्प्यात प्रत्येक महसूल मंडळात एक कार्यक्रम याप्रमाणे 95 कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
महाराजस्व अभियान मार्च ते मे या कालावधीत महसूल मंडळ आणि नगर परिषद, नगर पंचायत स्तरावर राबविले जाणार आहे. या अभियानात महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना एकाच दिवसात सेवा देण्यात येणार आहे. यात प्रलंबित आणि विवादग्रस्त फेरफार प्रकरणांचा तात्काळ निपटारा करणे, सातबारामधील चुका दुरुस्त करणे आणि डिजिटल सातबारा व आठ अ उतारे उपलब्ध करून देणे, उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रीमीलेअर यांसारखी महत्त्वाची प्रमाणपत्रे वितरीत करणे, अकृषिक परवानगीबाबत नवीन सुलभ तरतुदी, सनद प्रणाली रद्द झाल्याचे फायदे आणि सुधारीत तुकडेबंदी कायद्याची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.
अभियानाची सुरवात 7 मार्च रोजी होणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वलगाव येथे या अभियानाची सुरवात होणार आहे. 7 मार्च रोजी 18, 14 मार्च रोजी 17, 10 एप्रिल रोजी 18, 17 एप्रिल रोजी 14, 8 मे रोजी 17 आणि 15 मे रोजी 14 मंडळात समाधान शिबीर घेण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्याशी निगडीत जिवंत सातबारा, सामाजिक अर्थ सहायाच्या योजना, तुकडेबंदी, फेरफार, घरपोच सातबारा, सातबारावरील दुरूस्ती, पट्टेवाटप आदी सुविधांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. समाधान शिबिरात येणााऱ्या कोणत्याही नागरिकाला या प्रक्रियेत त्रास होणार नाही आणि सर्व सेवा पारदर्शकपणे पुरविल्या जातील याची दक्षता घेण्यात येणार आहे. शिबीराच्या ठिकाणी नागरिकांना पिण्याचे पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिली. यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी विवेक जाधव उपस्थित होते.
धुळे डाक विभागात 9 मार्च रोजी तिमाही डाक अदालतीचे आयोजन
(नंदुरबार) प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे यांच्या कार्यालयात 09 मार्च 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता प्रवर अधिक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे यांच्या कार्यालयात तिमाही डाक अदालतचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डाकघर धुळे विभागाचे प्रवर अधिक्षक हरि प्रसाद यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
पोस्टाच्या कार्यपद्धती किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण 6 आठवड्यांच्या आत झालेले नसेल, अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. या अदालतीमध्ये विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊन्टर सेवा, डाक वस्तू पार्सल, बचत बँक आणि मनी ऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील.
संबंधितांनी आपल्या डाकसेवेबाबतच्या तक्रारी प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे विभाग, धुळे 424001 या पत्त्यावर अतिरिक्त प्रतीसह 06 मार्च 2026 पर्यंत पोहचेल अशा रीतीने पाठवाव्यात तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलसह केलेला असावा, ज्यात मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्यास पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा व तक्रार पाठविल्याचा तपशील समाविष्ट असावा, असेही प्रवर अधिक्षक हरि प्रसाद यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
आपल्या देशात गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सुरक्षित व पक्के घर मिळावे
जीवनमान उंचावावे आणि प्रत्येक कुटुंबाला सन्मानाने राहण्याचा हक्क मिळावा यासाठी शासन विविध योजना राबवत असते. पण तुम्हाला माहिती आहे का पक्के घर बांधण्यासाठी थेट आर्थिक मदत देणारी योजना कोणती आहे? तुमचे उत्तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा.
#gramvikasvibhag#RuralProgress#mukhyamantrisamrudhapanchayatrajabhiyan#ruraldevelopment#RuralEmpowerment
अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम (STEP)
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा उपक्रम
अवैध धंदे मोडून काढण्यासाठी लवकरच विशेष ‘हेल्पलाईन’; ओळख गुप्त ठेवणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी:- कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्तींना मिळणारा आश्रय मोडून काढण्याची आवश्यकता असून, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समन्वयाने काम करणे अपेक्षित आहे. नागरिकांमधील भीती दूर करून त्यांना थेट प्रशासनाशी जोडण्यासाठी लवकरच एक विशेष ‘हेल्पलाईन क्रमांक’ कार्यान्वित करण्यात येईल. याद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींमध्ये नागरिकांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवून प्रशासनामार्फत योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, अशा शब्दांत जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरिकांना आश्वस्त केले.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या व पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ६४ निवासस्थानांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस दलासाठी अत्याधुनिक चार फॉरेन्सिक लॅब व्हॅनचे लोकार्पणही करण्यात आले. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, नगराध्यक्ष पराग संधान, गोदावरी दूध संघाचे संचालक राजेश परजणे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, राज्य शासनाच्या धोरणानुसार पोलिसांच्या कल्याणासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यात आली असून, जिल्हा मुख्यालयात ३२२ निवासस्थानांचे काम सुरू आहे. तसेच कोपरगाव (४८) व पाथर्डी (५४) येथील निवासस्थानांचे काम पूर्ण झाले असून, राहाता व शिर्डी येथे अद्ययावत पोलीस ठाण्यांच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय व समृद्धी महामार्गांमुळे वाढणारी अंमली पदार्थांची तस्करी व गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दलाचे मनुष्यबळ वाढवणे अत्यावश्यक आहे. याकरिता ५०० अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी शासनाकडे नोंदवण्यात आली आहे.
गुन्हेगारी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे विस्तारण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन मंडळामार्फत सर्व महाविद्यालयांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन करण्यात आले असून, ग्रामपंचायतींनीही लोकसहभागातून आपापल्या गावांमध्ये सीसीटीव्ही बसवून २४ तास लक्ष ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, गुन्ह्यांचा तपास वेगाने व्हावा आणि न्यायदानात विलंब होऊ नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर अत्याधुनिक ‘फॉरेन्सिक व्हॅन’ उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याद्वारे घटनास्थळीच जलद तपासणी करणे शक्य होऊन तपासाला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार श्री. काळे म्हणाले की, तालुक्यातील अवैध धंदे व गावठी दारूविक्री यांसारख्या बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असून समाजात चुकीची माहिती पसरवून दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी.
कोपरगाव पोलीस ठाण्याच्या सुसज्ज इमारतीमुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात पाच पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांना गृह संकुलाच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या.
प्रास्ताविक पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले, तर आभार पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी मानले.
#KopargaonPolice#LawAndOrder#RadhakrishnaVikhePatil#PoliceWelfare#CrimePrevention#ForensicVan#CCTVNetwork#SafeDistrict#AhilyanagarPolice#CitizenSafety#NewPoliceStation#PoliceHousing#ZeroTolerance#DigitalSecurity
एसबीआय आरसेटी नंदुरबार येथे परिवर्तनात्मक अध्ययन भेट यशस्वी
SBI RSETI Nandurbar येथे परिवर्तनात्मक प्रवास आणि अनुकरणीय उत्तम पद्धती समजून घेण्याच्या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व RSETI संचालक श्री. गणेश पाठारे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन भेट यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हा व्यवस्थापक (Financial Inclusion) यांसह एकूण ४९ जणांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमास Vikas Gupta, उपमहाव्यवस्थापक, एसबीआय तसेच Naresh Kumar, सहाय्यक महाव्यवस्थापक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
परिसर भेट व औपचारिक सत्र:
कार्यक्रमाची सुरुवात संपूर्ण आरसेटी परिसराच्या भेटीने झाली. सहभागी अधिकाऱ्यांनी इमारत व पायाभूत सुविधा, वसतिगृह व्यवस्था, प्रशिक्षण पद्धती, नोंदवही व दस्तऐवजीकरण प्रणाली तसेच एकूण व्यवस्थापनाचा आढावा घेतला.
यानंतर वर्गखोलीत औपचारिक सत्र पार पडले. आरसेटीचे संचालक श्री. गणेश पाठारे यांनी उपस्थित मान्यवर व सहभागींचे स्वागत केले. श्री. सुनील कस्तुरे यांनी अध्ययन भेटीचा उद्देश स्पष्ट करताना यशस्वी मॉडेलमधून शिकून ते इतर आरसेटींमध्ये कसे अमलात आणता येईल यावर भर दिला. भारती यांनी एसबीआय आरसेटी नंदुरबारच्या विकासकामे व कामगिरीचे सादरीकरण केले. नियोजनबद्ध कार्यपद्धती, शिस्त आणि प्रभावी समन्वयामुळे सातत्यपूर्ण यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
परिवर्तनात्मक कार्याचे कौतुक:
आपल्या मनोगतात श्री. विकास गुप्ता यांनी आरसेटी टीमच्या परिवर्तनात्मक कार्याचे कौतुक केले. ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्याच्या या कार्यासाठी एसबीआयकडून सातत्यपूर्ण सहकार्य राहील, अशी त्यांनी ग्वाही दिली.
तसेच या अध्ययन भेटीचे आयोजन केल्याबद्दल Maharashtra State Rural Livelihoods Mission यांचे आभार मानण्यात आले.
परिवर्तनात्मक प्रवासाचे सादरीकरण:
संचालक श्री. गणेश पाठारे यांनी संस्थेच्या परिवर्तनात्मक प्रवासावर सविस्तर सादरीकरण केले. यात पायाभूत सुविधा विकास, प्रशिक्षण गुणवत्ता, सेटलमेंट कामगिरी तसेच विविध घटकांशी प्रभावी समन्वय या बाबींचा समावेश होता.
मुक्त संवादातून कल्पनांची देवाणघेवाण:
मुक्त संवाद सत्रात सहभागी अधिकाऱ्यांनी एसबीआय आरसेटी नंदुरबार येथे पाहिलेल्या उल्लेखनीय पद्धती, स्वतःच्या आरसेटींमधील उत्तम उपक्रम आणि पुढील काळात अमलात आणता येणाऱ्या सुधारणा यावर सखोल चर्चा केली. हे सत्र समाधानकेंद्रित ठरले.
जिल्हाधिकारी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन:
कार्यक्रमाला मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे मार्गदर्शन लाभले. आपल्या प्रेरणादायी भाषणात डॉ. मिताली सेठी यांनी ‘आदर्श’ आरसेटीची संकल्पना,, उद्योजकतेचा खरा अर्थ काय आहे, स्थानिक साधनसंपत्तीपासून गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करून त्यांचे प्रभावी विपणन कसे करावे यावर मार्गदर्शन केले.
तसेच ‘आपल्याला सर्व काही माहिती आहे’ अशी भावना टाळून सातत्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी उत्पादनांवर आधारित नव्या उद्योगसंधींचा विचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे सहभागी अधिकाऱ्यांनी नियमित कामकाजापलीकडे जाऊन नवोपक्रम, स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर आणि शाश्वत उद्योजकता विकासाकडे लक्ष देण्याचा संकल्प व्यक्त केला.
ही अध्ययन भेट केवळ निरीक्षणापुरती न राहता, ग्रामीण उद्योजकतेसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरली.
#collectorofficenandurbar#rseti#drmittalisethi
बॅंकांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज द्यावे — पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
परभणी: बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत, सुलभ आणि पारदर्शकपणे कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. तसेच, बँकांनी प्राधान्य क्षेत्रातील कर्जवाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, पात्र लाभार्थ्यांना सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. प्रलंबित प्रस्तावांचा तातडीने निपटारा करून शेतकरी, उद्योजक व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचनांही पालकमंत्री यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या.बैठकीस जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अग्रणी बँक व्यवस्थापक रामचंद्र अकुलवार, विविध बँकांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील कर्ज वितरण विशेषतः पीक कर्ज, कृषी कर्ज आणि इतर प्राधान्य क्षेत्रातील कर्ज, जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखडा, स्वयंरोजगार योजनांची अंमलबजावणी, महिला बचत गटांना कर्जपुरवठा तसेच शासनाच्या विविध योजनांच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील शेतकरी, लघु उद्योजक आणि सर्व वर्गांना मजबूत आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी प्रशासन आणि बँकिंग क्षेत्र एकत्रितपणे कार्यरत आहे. या बैठकीच्या माध्यमातून केलेल्या सूचनांमुळे जिल्ह्यात कर्ज वितरण प्रक्रियेला नवीन गती मिळेल, शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ होईल आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल, असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी जिल्ह्यातील बँकिंग कामकाजाचा आढावा सादर करून कर्जवाटप व उद्दिष्टपूर्तीबाबत माहिती दिली. बैठकीत विविध बँकांच्या कामगिरीचे परीक्षण करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
प्रारंभी जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालयामार्फत अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या पिएमईजीपी/ सीमएईजीपी/ विश्वकर्मा योजनेतअंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या उद्योजकांना कर्ज मंजूरीपत्रे पालकमंत्री यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
तसेच परभणी जिल्ह्यातील येलदरी जलाशयामध्ये मासेमारी करणारे परवानाधारक मच्छिमार दिवंगत अशोक हरिभाऊ वाकळे यांचा मासेमारी करताना मृत्यु झाला होता. त्यांच्या वारसास प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत अपघात गट विमा योजनेतून 5 लक्ष रुपये विमा थेट डीबीटी द्वारे वितरीत करण्यात आला. याबाबतचे मंजुरीपत्र त्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते देण्यात आले.
उल्लेखनीय कार्य करणारे विविध बॅंक शाखाधिकारी यांचाही पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यामध्ये रमन कुमार सौदागर (बँक ऑफ बडोदा), सुर्यकांत केंद्रे (बँक ऑफ इंडिया), ज्ञानेश्वर दापकर (युनियन बँक ऑफ इंडिया), श्री.वानखेडे (स्टेट बँक ऑफ इंडिया), सुर्यकांत हेडाऊ (महाराष्ट्र ग्रामिण बॅक), रामचंद्र अकुलवार (लिड बँक अधिकारी) यांचा समावेश आहे.
परभणीच्या विकासाला नवी दिशा देणारे स्वतंत्र नियोजन भवन – पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर
परभणी: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या नियोजन भवन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते पार पडले.
राऊळगाव स्फोटातील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट
नागपूर:राऊळगाव स्फोटातील जखमींची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल या स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी स्फोट होऊन १९ श्रमिकांचा मृत्यू झाला, तर जवळपास २३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सायंकाळी ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथे जखमींची भेट घेऊन डॉक्टरांशी संवाद साधला. या घटनेतील सर्व जखमींवर आवश्यक ते सर्व उपचार करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी जखमींच्या कुटुंबियांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांना धीर दिला, तसेच शासन तुमच्यासोबत असल्याचा विश्वास दिला.
बारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे नाव
मुंबई: पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे नामकरण ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांच्या नावाने करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या 3 जानेवारी 2013 च्या शासन निर्णयान्वये बारामती येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 रुग्णखाटांचे संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर 20 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व 100 रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालयही सुरू करण्यात आले.
या दोन्ही संस्था ग्रामीण व अर्धनगरी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्यकेंद्र ठरली आहेत. येथे विशेषज्ञ वैद्यकीय सेवा, आपत्कालीन उपचार, शस्त्रक्रिया सुविधा तसेच आयुर्वेद उपचार स्थानिक स्तरावर उपलब्ध होत आहेत. परिणामी, पुणे शहरावरील तृतीयस्तरीय आरोग्यसेवेचा ताण कमी होऊन परिसरातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण व परवडणारी सेवा मिळत आहे.
यापूर्वी 31 मे 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामतीचे नामकरण “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती” असे करण्यात आले होते. आता त्याच अनुषंगाने शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे नामकरण “स्व. अजित (दादा) पवार सर्वोपचार रुग्णालय, बारामती” असे करण्यात येणार आहे. तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, बारामती व शासकीय आयुर्वेद रुग्णालय, बारामती यांचे नामकरण अनुक्रमे “स्व. अजित (दादा) पवार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, बारामती” असे करण्यात येणार आहे.
दिवंगत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री तसेच विविध विभागांचे मंत्री म्हणून कार्य करताना राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले होते. जिल्हास्तरीय वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत करणे, नवीन वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालयांची स्थापना, आधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता आणि ग्रामीण भागात तृतीयस्तरीय आरोग्यसेवेचा विस्तार या बाबींमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे बारामती परिसरातील आरोग्य व शैक्षणिक विकासाला गती मिळाल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
नामाधिकरणानंतर संबंधित संकेतस्थळे, अभिलेखे, नोंदवही, फलक, अधिकृत पत्रव्यवहार व इतर कागदपत्रांमध्ये आवश्यक ते बदल करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबईचे आयुक्त तसेच संबंधित संस्थांचे अधिष्ठाता यांच्यावर सोपविण्यात आली आहे.



