बुलढाणा : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केले.
पोलिस कवायत मैदान येथे १ मे महाराष्ट्राच्या ६७ व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.
कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन, शेततळे, फळबाग लागवड आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना दिली जात आहे. “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी”योजनेद्वारेही शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळत आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात “नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन” अंतर्गत चारा विकास प्रकल्प सुरू करण्यात आला असून, शेळीपालन व कुक्कुटपालन प्रकल्पांमुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होत आहे.
औद्योगिक क्षेत्रात जिल्ह्यात १ लाख १६ हजार ६२८ उद्यम नोंदणी होऊन २ लाख ४८ हजारांहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत. निर्यात क्षेत्रात बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर असून, जानेवारी २०२६ अखेरपर्यंत ८६८ कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. नवीन उद्योग, वाढती गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती यामुळे जिल्ह्याची आर्थिक घडी अधिक मजबूत होत आहे. मुख्यमंत्री व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत आपण १०० टक्के लक्षांक पूर्ण केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून ७२९ गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. सध्या १८ गावांना टँकरद्वारे तर ५९ गावांना विहीर अधिग्रहणातून पाणीपुरवठा केला जात आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ३०० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
“प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २” अंतर्गत १ लाख ३ हजार ५३७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात घरे पूर्ण झाली आहेत. महिला सक्षमीकरणासाठी “उमेद” अभियानांतर्गत २४ हजार स्वयं सहायता समूह स्थापन करून २ लाख २६ हजार कुटुंबांना जोडण्यात आले आहे. तसेच २ लाख ५२ हजारांहून अधिक “लखपती दीदी” निर्माण करण्यात आल्या आहेत.
आरोग्य क्षेत्रात “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” मोहिमेद्वारे ग्रामस्तरावर आरोग्य सेवा मजबूत करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृहे आणि विविध योजनांद्वारे सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे. डिजिटल सेवांमुळे शासन आणि नागरिकांमधील दरी कमी होत असून ऑनलाईन सेवा, सहज प्रणाली आणि चॅटबॉट्समुळे पारदर्शकता वाढत आहे. तसेच “महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण-२०२६” अंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व रोजगारनिर्मिती होणार आहे.
क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले असून, आर्चरी प्रशिक्षण केंद्रासारख्या सुविधा विकसित करण्यात येत आहेत. पर्यटन विकासासाठी लोणार सरोवर, सिंदखेड राजा आणि शेगाव या स्थळांचा विकास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
१ मेपासून देशभर “जनगणना २०२६” सुरु होणार असून देशाच्या विकासासाठी जनगणना अत्यंत महत्त्वाची आहे. यावेळची जनगणना आधुनिक आणि डिजिटल पद्धतीने होणार असून जनगणना दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात स्वगणना दि. १ ते १५ मे या कालावधीत तर दुसऱ्या टप्प्यात घरगणना दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी अचूक माहिती देत या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन ना. मकरंद पाटील यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र दिनाच्या मुख्य समारंभात पोलीस विभागाने शानदार पथसंचलन केले. कार्यक्रमाचे संचालन मंगेश मोरे यांनी केले.
पोलीस दलात केलेल्या प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस उपनिरिक्षक सुनिल राऊत व पोलीस हवालदार संजय नागवे यांना सन्मानित करण्यात आले. आदर्श तलाठी पुरस्कार सन 2025-26 साठी ग्राम महसुल अधिकारी अनुराधा लवंगे यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. माहिला व बालविकास विभागांतर्गत जिल्ह्यातल महिला व बालकांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आशा सिरसाठ, रजनी जुळे, वर्षा पालकर व वृषाली बोंदे या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पोलीस विभागासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या २७ नव्या वाहनांचे उद्घाटन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ही वाहने पोलीस विभागाला हस्तांतरित करण्यात आले.
या वाहनांमध्ये महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या दामिनी पथकांच्या ७ वाहनांचाही समावेश आहे. नव्या वाहनांमुळे पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे अधिक सुलभ होणार आहे.
उष्णतेची लाटेची शक्यता ; ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती व लहान मुलांसाठी सूचना
मुंबई : १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना समारंभ राज्यभरात सकाळी ८.०० वा साजरा करण्यात येणार आहे. तथापि, सद्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. सबब, दक्षता म्हणून ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती व लहान मुलांना उष्माघातामुळे आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम पाहता त्यांनी महाराष्ट्र दिन कार्यक्रमाला शक्यतो उपस्थित राहू नये, असे आवाहन जनतेस करण्यात येत आहे.
तसेच सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी, असे सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे
(नंदुरबार) ‘एल-निनो’च्या परिणामामुळे तापमानात वाढ होऊन उष्णतेची तीव्रता वाढल्याची पार्श्वभूमी असताना नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेऊन पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, पाणीटंचाई व चारा व्यवस्थापनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
ते आज पोलीस कवायत मैदानावर राज्याच्या 67 वा स्थापना दिनाच्या मुख्य ध्वजवंदन समारंभात जिल्हावासीयांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, माजी खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, कल्पना ठुबे, उषाराणी देवगुणे, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक आशित कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गणपत गावीत, विभागीय वन अधिकारी डॉ. प्रकाश गुजर, लेखाधिकारी संतोष पावले व विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख-कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सध्या एल-निनोमुळे जगभरात पावसात घट, तापमानात वाढ आणि शेती व जलस्रोतांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. यात आपल्या जिल्ह्यात कमाल तापमानाची नोंद झाली असून सध्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. शासकीय रुग्णालये व आरोग्य केंद्रांवर औषधांचा साठा उपलब्ध असून सार्वजनिक ठिकाणी पाणी व सावलीची व्यवस्था केली आहे. नागरिकांनीही उन्हापासून बचाव तसेच उपलब्ध पाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत जपून वापरण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा राबविण्यात येत असून जिल्हा परिषदेमार्फत ७२४ विहिरी प्रस्तावित करून टप्प्याटप्प्याने कामांना सुरुवात झाली आहे. ‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर भविष्यातील चारा टंचाई टाळण्यासाठी चारा बियाणे वाटप, गाळपेरा, नदीकाठ लागवड व मुरघास प्रकल्प राबविले जात आहेत.
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीतही गॅस, पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता साठेबाजी टाळावी. भारत सरकारच्या जनगणना २०२७ साठी जिल्हा सज्ज असून मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना होणार आहे. प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देऊन सहभाग नोंदवावा.
पुढे बोलतांना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्याच्या अर्थसंकल्पातून आदिवासी विकास, आरोग्य, शिक्षण, रस्ते व रोजगाराला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘बिरसा’ उपक्रम, डिजिटल आरोग्य व्यवस्था, ग्रामसडक योजना, सूक्ष्म उद्योग केंद्रे, ‘उमेद मॉल’ व हरित ऊर्जा उपक्रमांमुळे शाश्वत विकासाला चालना मिळेल. जिल्हा वार्षिक योजनेतून “प्रकाश वाटा IIT-JEE-NEET” प्रशिक्षण व “आमची अभ्यासिका पुन्हा फुलले” अंतर्गत १२५ गावांत अभ्यासिका सुरू झाल्या आहेत. तोरणमाळ फेस्टिव्हल व प्रकाशा येथे सिहस्थ पर्वणीसाठी सुविधा उभारल्या जात आहेत. आदिवासी उपयोजनेत मातृभाषेत सेवा देण्यासाठी बहुभाषिक उपकरण विकसित करण्यात आले आहे. आश्रमशाळा व वसतीगृहांमध्ये CCTV बसवून सुरक्षितता वाढवली असून ग्रामीण रुग्णालयांमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले आहेत. आकांक्षित जिल्हा व तालुका कार्यक्रमामुळे आरोग्य, शिक्षण, कृषी व कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे.
महसूल विभागाने ९९.९७ टक्के सेवा वेळेत देऊन पारदर्शकता वाढवली आहे. ई-ऑफिसमुळे कामकाज गतिमान झाले असून ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान’मध्ये ‘सेवांच्या हमी व सिकलसेल नियंत्रणासह जिल्ह्याने दुहेरी यश मिळवले आहे. याबद्दल जिल्हाधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन. नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा येथे नवीन अपर तहसील कार्यालयांमुळे सेवा अधिक सुलभ होणार आहे. जिल्हा पोलीस दलाने ई-बीट पॅट्रोलिंग, ड्रोन, डायल ११२, ‘मिशन सक्षम’ व समुदाय पोलीसिंगद्वारे कायदा-सुव्यवस्था प्रभावीपणे राखली आहे. एकलव्य क्रीडा संकुलामुळे पोलीस दलाची तंदुरुस्ती व क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली आहे. बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी १०९८ किंवा ११२ हेल्पलाईनवर माहिती द्यावी.
पुढे बोलतांना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषदेमार्फत पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व ग्रामीण विकासात प्रगती झाली असून जल जीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना व स्वच्छ भारत अभियानामुळे जीवनमान सुधारले आहे. “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानात सर्वांनी सहभाग घ्यावा. तसेच आरोग्य पोषण निर्देशांक वाढीसाठी याहा मोगी आरोग्य पोषण मिशनची तर शिक्षण क्षेत्रात मुलभूत साक्षरतेचा निर्देशांक वाढविण्यासाठी मिशन गरुडझेप या शैक्षणिक अभियानाची सुरुवात आपण करतो आहोत. जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. एचपीव्ही लसीकरणाद्वारे मुलींचे संरक्षण करण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा.
जिल्ह्यातील सुमारे १.७५ लाख शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. अॅग्रीस्टॅक व पीएम किसान अंतर्गत नोंदणी वाढली असून खरीपासाठी बियाणे व खतांचा साठा उपलब्ध आहे. भरारी पथके व नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासनाने निर्माण केलेल्या नाविण्यपूर्ण ‘अस्तित्व भिली एआय’ प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना मातृभाषेत मार्गदर्शन मिळत आहे. पायाभूत सुविधा, जलसंधारण, आरोग्य, शिक्षण व ग्रामविकासाच्या कामांमुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत विकासात तडजोड होणार नाही, याची मी ग्वाही देतो, असे सांगितले.
उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यांचा झाला सन्मान…
महसूल विभाग
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती कल्पना ठुबे. नायब तहसिलदार रमेश वळवी, निवडणूक नायब तहसिलदार भक्तराज सोनवणे, , ग्राम महसूल अधिकारी जयेश राऊळ, सहाय्यक महसूल अधिकारी, राहूल निकुंबे, रामदास पवार, महसूल सहाय्यक, संदीप शिंदे, जयप्रकाश पानपाटील, जगदीश मराठे, ग्राम महसूल अधिकारी गुलाब पाडवी, पोपट वाडेकर व शिपाई भटू भिल. यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.
पोलीस विभाग
पोलीस निरिक्षक अजून पटले, भगवान धात्रक, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राकेश वसावे, पोलीस हवालदास सुपडू राठोड, संजय माळी, सुभाष तमखाने, यांचा सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
जिल्हा महिला व बाल विकास विभाग
श्रीमती दिपमाला प्रकाश पाटील, रुपये 10 हजार 01 चा धनादेश शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र.
जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय
कुणाल सुनील वीर, सन्मान चिन्ह व गौरव
आशा सेविका
संगिता पाडवी, अनिला जगदेव व श्रद्धा वाडीले यांना मोबदला रक्कमेचा धनादेश देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जनगणना-2027 पहिला टप्पा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्राध्यापक माधव कदम यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन
(नंदुरबार) महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, कल्पना ठुबे, उषाराणी देवगूणे, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, विभागीय वन अधिकारी डॉ. प्रकाश गुजर, लेखाधिकारी संतोष पावले,आदि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना राज्याचा 67 वा स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
समृद्ध परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आपल्या महाराष्ट्राचा अभिमान बाळगूया.
#MaharashtraDay#महाराष्ट्रदिन#Nandurbar#DistrictAdministration#ProudMaharashtrian#1May#Maharashtra
जिल्हा नियोजन आढावा बैठकीत गुणवत्तापूर्ण कामांवर भर
नंदुरबार जिल्ह्यात आज राज्याचे मा.वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांची प्रगती तपासण्यात आली असून, सर्व यंत्रणांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
बैठकीदरम्यान मा.पालकमंत्र्यांनी सांगितले की, केवळ कामे पूर्ण करणे महत्त्वाचे नसून ती कामे गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ असणे अत्यावश्यक आहे. विकास योजनांची अंमलबजावणी करताना पारदर्शकता, वेळेचे नियोजन आणि परिणामकारकता यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीस खासदार मा.ॲड. गोवाल पाडवी, मा.विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, मा.किशोर दराडे, मा.विधानसभा सदस्य राजेश पाडवी व मा.आमशा पाडवी यांची उपस्थिती होती. तसेच जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., सहाय्यक जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पायाभूत सुविधा, सामाजिक विकास, आदिवासी विकास, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांतील योजनांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना ठोस कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय वाढवून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.

“गुणवत्तापूर्ण कामातूनच नागरिकांचा विश्वास जिंकता येतो,” असा संदेश देत विकासकामांना नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
#Nandurbar#DistrictPlanning#DevelopmentWorks#GoodGovernance#QualityWork#PublicService#Maharashtra#AdministrativeUpdate#InclusiveDevelopment
वाळूज महानगरात पायाभूत सुविधा तातडीने विकसित करा – अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता
छत्रपती संभाजीनगर : सिडको वाळूज महानगर परिसर छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाला असून, या परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा तातडीने विकसित करणे आवश्यक आहे. यासाठी विकास आराखड्यासह निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नगर विकास विभागाकडे त्वरीत सादर करावा, असे निर्देश नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिले.
सिडको वाळूज महानगर परिसराच्या विकासासंदर्भात मुंबई येथे असीमकुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस छत्रपती संभाजीनगर येथून विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, सहआयुक्त तसेच संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी गुप्ता यांनी वाळूज महानगर परिसराचा नकाशाव्दारे आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, वडगाव कोल्हाटी, वाळूज आणि बजाजनगर या भागांमध्ये वाढत्या लोकसंख्येला रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा सुनियोजित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाने सविस्तर विकास आराखडा तयार करावा. या आराखड्यासोबत आवश्यक निधीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असेही त्यांनी निर्देश दिले. तसेच या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांनी सातत्याने पाठपुरावा करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी वाळूज परिसरातील मोठ्या प्रमाणावर साचणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाकडेही लक्ष वेधले. पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच कचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मंत्रालयात अभिवादन
मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी मंत्रालय येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अवर सचिव रामदास कोळेकर, कक्ष अधिकारी निलेश हरड आणि मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राज्यपालांचे अभिवादन
मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
‘बार्टी’ कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना २५ हजारांचे आर्थिक साहाय्य
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) परीक्षेत यश मिळवून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आर्थिक साहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुलाखत परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी प्रती विद्यार्थी २५ हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन ‘बार्टी’ने केले आहे.
संघ लोकसेवा आयोगाने १७ एप्रिल रोजी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला असून या निकालात राज्यातील मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत पात्र उमेदवारांना मुलाखती पूर्वतयारीसाठी प्रवासखर्च, निवास, भोजन तसेच इतर शैक्षणिक साहित्याचा खर्च भागविण्यासाठी प्रति विद्यार्थी २५ हजार रुपये एकरकमी आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. योजनेचा सविस्तर तपशील, जाहिरात व अर्जाचा नमुना ‘बार्टी’च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी ‘बार्टी’च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
पात्र उमेदवारानी अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी http://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील NOTICE BOARD > UPSC CAPF Assistant Commandant Service-Personality Test Examination 2026 Financial assistance Scheme या लिंकवर क्लिक करावे.



