मा. डॉ. मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प दिशा अंतर्गत जांगठी ग्रामपंचायत कार्यालय येथे बहु-सेवा वितरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
यावेळी मा. जिल्हाधिकारी, डॉ. मित्ताली सेठी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, गरजा तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या सेवा एकाच ठिकाणी आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात जन्म-मृत्यू दाखले, उत्पन्न व जात प्रमाणपत्रे, विवाह नोंदणी, आधार नोंदणी व अद्ययावत सेवा, आरोग्य तपासणी (सिकल सेल, ॲनिमिया, ANC/PNC, SAM/MAM), पीएम-किसान व अॅग्रीस्टॅक नोंदणी, महाडीबीटी सेवा, रेशन कार्ड, संजय गांधी व सामाजिक सुरक्षा योजना, तसेच बँकिंग सेवा (e-KYC, नवीन खाते उघडणे इ.) उपलब्ध करून देण्यात आल्या.
विविध शासकीय योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व लाभांचे वितरणही करण्यात आले.
दुर्गम व वंचित भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या सेवा थेट पोहोचवून सर्वसमावेशक, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दिशेने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले.
#प्रकल्पदिशा#Nandurbar#DistrictAdministrationNandurbar#DrMittaliSethi#GoodGovernance#PublicServiceDelivery#InclusiveDevelopment#TribalDevelopment#GovernmentServices#Jangthi#NandurbarDistrict#CitizenCentricGovernance#ViksitNandurbar#ServiceAtDoorstep
तळोदा येथे घरगणना कार्याची प्रत्यक्ष पडताळणी; अचूक माहिती संकलनावर भर
(तळोदा) घरगणना प्रक्रियेची अचूकता आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा अनय नावंदर, यांनी तळोदा नगर परिषद हद्दीतील विविध भागांना भेट देऊन प्रगणकांकडून सुरू असलेल्या घरगणना कार्याची प्रत्यक्ष पडताळणी केली.
यावेळी प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देऊन मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलित करत असल्याची पाहणी करण्यात आली. घरगणना प्रक्रियेदरम्यान माहितीची अचूक नोंद, नागरिकांशी संवाद तसेच निर्धारित मार्गदर्शक सूचनांचे पालन याबाबतही आढावा घेण्यात आला.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राबविण्यात येत असलेल्या या प्रक्रियेमुळे माहिती संकलन अधिक पारदर्शक, वेगवान आणि विश्वासार्ह होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
घरगणना ही प्रशासनाच्या नियोजन आणि विकास प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने नागरिकांनीही योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
#HouseListing#CensusSurvey#Taloda#Nandurbar#DigitalSurvey#GoodGovernance#DistrictAdministration#तळोदा#घरगणना#डिजिटलघरगणना#नंदुरबार#जिल्हाप्रशासन#सुशासन#माहितीसंकलन
‘मिशन सक्षम’ अंतर्गत युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणखी एक पाऊल; प्रशिक्षणार्थींची तुकडी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना
नंदुरबार जिल्ह्यातील सुशिक्षित युवक-युवतींना कौशल्य, रोजगार आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन सक्षम’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मा. जिल्हाधिकारी, नंदुरबार, मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत आज दिनांक 9 जून 2026 रोजी मा. जिल्हा नियोजन अधिकारी आणि मा. सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षणार्थी युवक-युवतींच्या दुसऱ्या तुकडीला छत्रपती संभाजीनगर येथे कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात आले.
प्रशिक्षणाद्वारे युवकांना आधुनिक उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार आवश्यक कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, रोजगाराभिमुख प्रशिक्षण तसेच करिअर मार्गदर्शन दिले जाणार आहे. यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना रोजगारक्षम बनविणे आणि स्वावलंबनाकडे वाटचाल घडवून आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘मिशन सक्षम’च्या माध्यमातून अनेक युवक-युवतींना त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळत असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासालाही गती मिळत आहे.
कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांचे सक्षमीकरण करून त्यांना रोजगार व उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना या उपक्रमामुळे अधिक बळ मिळणार आहे.
प्रशिक्षणासाठी रवाना झालेल्या सर्व युवक-युवतींना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
#MissionSaksham#SkillDevelopment#YouthEmpowerment#Nandurbar#Employment#CareerDevelopment#PrathamFoundation#DistrictAdministration#SelfReliance#FutureReadyYouth#मिशनसक्षम#कौशल्यविकास#युवकसक्षमीकरण#नंदुरबार#रोजगार#आत्मनिर्भरभारत#करिअर#जिल्हाप्रशासन#उज्ज्वलभविष्य
‘लोकमत सरपंच अवार्ड’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न; १४ उत्कृष्ट सरपंचांचा गौरव
(नंदुरबार) ग्रामविकास, लोकसहभाग आणि प्रभावी प्रशासनाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील उत्कृष्ट सरपंचांचा ‘लोकमत सरपंच अवार्ड’ देऊन गौरव करण्यात आला. रविवारी आयोजित या विशेष सोहळ्यात मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १४ सरपंचांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, आमदार राजेश पाडवी, ‘लोकमत’ समूहाचे अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी विकासकामे, स्वच्छता, जलव्यवस्थापन, सामाजिक उपक्रम आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून आदर्श कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘लोकमत’तर्फे उत्कृष्ट सरपंचांचा सन्मान करण्यात आला.
या गौरवामुळे ग्रामविकासासाठी कार्यरत लोकप्रतिनिधींना प्रेरणा मिळून ग्रामीण विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
#LokmatSarpanchAward#Nandurbar#GramVikas#SarpanchAward#DrMittaliSethi#NamanGoyal#RajeshPadvi#RuralDevelopment#GoodGovernance#नंदुरबार#लोकमतसरपंचअवार्ड#ग्रामविकास#उत्कृष्टसरपंच#जिल्हाप्रशासन#ग्रामीणविकास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या परिणाम साध्यतेच्या मूल्यमापनाचा आढावा
शालेय शिक्षणात गुणवत्तावृद्धी घडवत विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संवादकौशल्य आणि चांगल्या नागरिकत्वाचे गुण विकसित करण्यासाठी मूल्य शिक्षणाला विशेष महत्त्व असून सजग आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी मूल्य आधारित शिक्षण काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची (२.०) अंमलबजावणी व्यापक स्तरावर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक हेमंत वसेकर यांच्यासह एसबीआय बॅंक, बंधन बॅंक फाउंडेशन तसेच फिरोदीया फाउंडेशन आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन या भागीदार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात अभ्यासक्रमासोबत शिक्षकांची अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची क्षमता आणि त्यांच्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना दिले जाणारे प्रशिक्षण विद्यार्थ्यांमधील भीती, संकोच आणि शंका दूर करण्यास मदत आणि ज्ञानार्जनाची प्रक्रिया अधिक प्रभावी बनवत आहे. हे लक्षात घेऊन कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यांची अधिक प्रभावी अमंलबजावणी करावी. शिक्षण विभाग, प्रशिक्षण संस्था आणि भागीदार संघटनांनी समन्वयाने काम करून शिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत. मूल्य शिक्षणाची चळवळ येत्या काळात व्यापक करण्याची गरज आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
०००
या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग वाढत असून शाळांमध्ये लक्षणीय बदल घडत आहे. शिक्षकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याची राज्यासह देशपातळीवर दखल घेतली जात आहे – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
रावलापाणी पर्यटन विकासासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व आमदार राजेश पाडवी यांचा पाहणी दौरा
(नंदुरबार) आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या रावलापाणी परिसराचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने सर्वांगीण आढावा घेण्यासाठी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि मा. आमदार राजेशदादा पाडवी यांनी संयुक्त पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान परिसरातील पर्यटन क्षमता, मूलभूत सुविधा आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
सातपुड्याच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले रावलापाणी हे आदिवासी संस्कृती, लोकपरंपरा आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनमोल ठेवा आहे. या परिसराला पर्यटनाच्या नकाशावर अधिक प्रभावीपणे स्थान मिळावे, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच आदिवासी सांस्कृतिक वारसा जतन करत शाश्वत विकास साधता यावा, या उद्देशाने पाहणी करण्यात आली.
यावेळी रस्ते, वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा, परिसर सुशोभीकरण तसेच पर्यटन विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांना समन्वयाने काम करून आवश्यक प्रस्ताव व नियोजन सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
या पाहणी दौऱ्यास उपवनसंरक्षक तळोदा सुहास चव्हाण, सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा अनय नावंदर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जल जीवन मिशन, पंचायत समिती तळोदा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग (इलेक्ट्रिकल व बांधकाम), निवासी नायब तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यटन विकासाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार, स्वयंरोजगार आणि आर्थिक प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
#Ravalapani#TourismDevelopment#Nandurbar#DrMittaliSethi#RajeshPadvi#TribalCulture#Satpuda#EcoTourism#SustainableDevelopment#NandurbarDistrict#रावलापाणी#पर्यटनविकास#आदिवासीसंस्कृती#नंदुरबार#डॉमित्तालीसेठी#राजेशदादापाडवी#सातपुडा#ईकोटुरिझम#शाश्वतविकास
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
बारामती: बारामती आगारात नव्याने दाखल दहा ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक स्मार्ट बससेवेचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील पायाभूत सुविधा विकासाला नेहमीच प्राधान्य दिले. त्यापैकीच एक आणि देशात मॉडेल बनलेल्या बारामती बसस्थानकाचा परिसर, बसमधील स्वच्छता राखणे, बस वेळेवर सोडण्यासह प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांच्या समस्या सोडविण्यावर राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) भर द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी दिले.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २०२५’ मध्ये अव्वल स्थान पटकावल्याबद्दल बारामती बसस्थानक येथे आयोजित एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अभिनंदन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, बारामती ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, एसटी महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया, गट विकास अधिकारी किशोर माने, न.प. मुख्याधिकारी पंकज भुसे, विभागीय कामगार अधिकारी सचिन भुजबळ, आगार व्यवस्थापक प्रविण शिंदे, माजी सहाय्यक वाहतूक अधिक्षक घनश्याम सदाशिव शिंदे यांच्यासह महामंडळाचे कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २०२५’ मध्ये अव्वल स्थान पटकावल्याबद्दल बारामती बसस्थानकाला रुपये १ कोटींचे बक्षीस आणि स्मृतिचिन्ह मुंबई येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीकोनातून बारामती तालुक्यात विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. या कामांची निगा राखत तालुका विकासाच्या बाबतीत कायम प्रथमस्थानी राहण्यासाठी प्रयत्नशील राहावे. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या बसस्थानकाला राज्यास प्रथम बक्षीस मिळणे ही संपूर्ण बारामतीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे आता बारामतीच्या मानात आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे. या बक्षीसाच्या माध्यमातून नागरिकांची जबाबदारी वाढलेली आहे, असे सांगून त्यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बारामतीकरांचे आणि महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
मेहकर बसस्थानकाचे लोकार्पण; एसटीच्या आधुनिकीकरणाचा नवा टप्पा सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
बुलढाणा: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आधुनिकीकरण मोहिमेला आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत आज मेहकर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बसस्थानकाचे लोकार्पण परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवाशांना सुरक्षित, आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकार्पण समारंभास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, सिद्धार्थ खरात, मेहकर नगरपालिका अध्यक्ष किशोर गारोडी, माजी आमदार संजय रायमुलकर, प्रादेशिक व्यवस्थापक रोहन पलंगे, विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाठ, कार्यकारी अभियंता राहुल मोडक, महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, मेहकर हे विदर्भातील एक महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक आणि धार्मिक केंद्र असून दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करतात. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन हे नवीन बसस्थानक उभारण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
सन २०१९ मध्ये या प्रकल्पाला ३ कोटी ९ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. विविध तांत्रिक अडचणी आणि कोविडसारख्या अभूतपूर्व संकटांवर मात करत हा प्रकल्प आज पूर्णत्वास आल्याचे त्यांनी सांगितले. नवीन बसस्थानकात सहा व्यावसायिक गाळे, चालक-वाहक विश्रांतीगृह, महिला व पुरुष प्रवासी विश्रांतीगृह, अधिकारी विश्रांतीगृह, आरक्षण व चौकशी कक्ष, हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी स्वतंत्र रॅम्प व स्वच्छतागृह, आधुनिक प्रसाधनगृहे, उपाहारगृह, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पोलीस चौकी आणि पार्सल कक्ष अशा विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
याशिवाय बसस्थानकाच्या वाहनतळाच्या काँक्रीटीकरणासाठी मंजूर करण्यात आलेल्या ४ कोटी २२ लाख रुपयांच्या कामाचीही यशस्वी पूर्तता झाली असून बचत झालेल्या निधीतून मेहकर आगार परिसरातील अतिरिक्त काँक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे बसस्थानक परिसर अधिक सुबक, स्वच्छ आणि टिकाऊ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सरनाईक यांनी राज्यभर सुरू असलेल्या एसटीच्या आधुनिकीकरण मोहिमेची माहिती देताना सांगितले की, केवळ नवीन इमारती उभारणे हा उद्देश नसून प्रवाशांना विमानतळाच्या धर्तीवर स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे हे राज्य शासन आणि एसटी महामंडळाचे ध्येय आहे.
राज्यभर राबविण्यात येत असलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, १ जूनपासून राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात आली आहेत. बसस्थानके, बसेस, परिसर आणि चालक-वाहक विश्रांतीगृहांची नियमित स्वच्छता राखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत आहे.
३० नवीन बसेस लवकर उपलब्ध होणार
येथील सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार मेहकर आगारालाही लवकरच नवीन ३० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केली.
राज्यभर ई-बस सेवा विस्तारण्याचा महामंडळाचा निर्धार
“वर्ष २०३५ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हे स्वप्न पूर्ण झाल्यास देशातील संपूर्णपणे इलेक्ट्रिक बससेवा देणारे पहिले राज्य परिवहन महामंडळ म्हणून महाराष्ट्र एसटीची ओळख निर्माण होईल,” असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यभर एसटी डेपो, बसस्थानके आणि कार्यशाळांमध्ये चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारले जात असल्याचे त्यांनी सांगितले. एसटीच्या बसेस चार्ज करण्याबरोबरच या सुविधा इतर इलेक्ट्रिक वाहनांसाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ऊर्जा स्वावलंबनाकडे वाटचाल करताना सौरऊर्जेचा वापर वाढविण्यावरही महामंडळ भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. काही डेपोच्या छतांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले असून ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा उपलब्ध आहे, तेथे ‘सौर शेती’ प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या माध्यमातून इंधन व वीज खर्चात बचत होण्याबरोबरच अतिरिक्त वीज विक्रीतून महसूलही मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित ऊर्जा आणि पर्यावरणपूरक वाहतूक धोरणाला अनुसरून एसटी महामंडळ ठोस पावले उचलत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मेहकरच्या नागरिकांनी नवीन बसस्थानकाची स्वच्छता, सुरक्षितता आणि देखभाल यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करताना सरनाईक म्हणाले, “ही वास्तू केवळ एसटी महामंडळाची नसून मेहकरकरांची सामूहिक संपत्ती आहे. तिचे जतन आणि संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.” कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी प्रकल्पाच्या उभारणीत योगदान देणारे अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार आणि सर्व संबंधितांचे अभिनंदन करत, “प्रवाशांची सेवा हेच आमचे ध्येय आणि आधुनिक, सुरक्षित, स्वच्छ एसटी हीच आमची वचनबद्धता आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मेहकर डेपोचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, चार तालुक्यांतील प्रवासी या डेपोवर अवलंबून असल्याने येथे बससेवेची मोठी गरज आहे. नव्या बसस्थानकामुळे सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील. एसटी महामंडळ हे सुरक्षित व विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक साधन असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी विविध सवलतीच्या योजना राबविल्या जात असून त्याचा लाभ प्रवासी घेत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर एसटी सेवेचा वापर करत असल्याने त्यांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत नव्या बसस्थानकामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती देण्यात आली.
‘स्फोटके नियम २००८’ मध्ये सुधारणेसाठी केंद्राला प्रस्ताव सादर करणार
नागपूर: नागपूर जिल्ह्यात मागील अडीच वर्षात स्फोटकांच्या कंपन्यांमधील अपघातांमध्ये जीवितहानीच्या घटना लक्षात घेता ‘स्फोटके नियम २००८’ मध्ये सुधारणा सुचविणारा प्रस्ताव राज्य शासन केंद्राला सादर करणार आहे. या प्रस्तावाच्या मसुद्यात जीवितहानी टाळण्यासाठी कंपन्यांमध्ये स्वयंचलित प्रक्रियेसह सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा अवलंब करण्याच्या शिफारसी सुचविण्यात आल्या आहेत.
आज रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासगटाने या मसुद्याचे सादरीकरण केले. यात राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे तज्ज्ञ तसेच स्फोटके निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींचा प्रामुख्याने समावेश होता. अभ्यासगटाने प्रस्तावाच्या मसुद्यात अनेक शिफारसी सुचविल्या आहेत. त्यात प्रामुख्याने स्फोटकांच्या निर्मिती प्रक्रियेतील जोखीम कमी करण्यासाठी ती जास्तीत जास्त प्रमाणात स्वयंचलित करण्यात यावी व त्यासाठी रोबोट्सचा वापर करावा, प्रत्यक्ष जोखमीच्या प्रक्रियेच्या जागी कमीतकमी मनुष्यबळ उपस्थित राहील, हे सुनिश्चित करावे, तसेच त्यासाठी सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा आधार घेण्यात यावा, या प्रमुख शिफारसींचा समावेश आहे. या शिफारसींना अनुसरून स्फोटके नियम २००८ मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या जाणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील स्फोटकांच्या कंपन्यांमधील अपघातांच्या घटनांची अत्यंत गंभीर दखल घेऊन स्फोटकांशी संबंधित नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्याचे सूतोवाच केले होते. याअनुषंगाने अभ्यास करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना दिल्या होत्या. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वातील अभ्यासगटाने यासंदर्भात विविध घटकांशी चर्चा करून नियमातील प्रस्तावित सुधारणांचा एक मसुदा तयार केला आहे. या प्रस्तावित मसुद्याचे सादरीकरण आज मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सादरीकरण केले. यावेळी अभ्यास गटाचे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे संचालक ए.आर. सोनटक्के, सहाय्यक संचालक गगन उपाध्याय आणि कंपन्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
नागरी प्रशासनाने लोकांचा विश्वास जिंकून ‘सुरक्षेची पोकळी’ भरून काढावी – मुख्य सचिव राजेश अग्रवाल
गडचिरोली : सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांना मागे हटण्यास भाग पाडल्यानंतर आता त्या भागात निर्माण झालेली प्रशासकीय पोकळी नागरी प्रशासनाने प्रभावी सेवा, विकासकामे आणि जनसंपर्कातून भरून काढणे आवश्यक आहे. येत्या दहा वर्षांत गडचिरोलीचा चेहरामोहरा बदलण्याची ऐतिहासिक संधी उपलब्ध असून प्रशासनाने लोककेंद्रित दृष्टिकोन स्वीकारत आदिवासी समाजाचा विश्वास जिंकण्यावर भर द्यावा, असे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी गडचिरोली येथे मार्गदर्शन करताना सांगितले.
महाराष्ट्रातील नक्षलवादग्रस्त जिल्ह्यांच्या नक्षलोत्तर परिवर्तनासंदर्भातील राज्यस्तरीय आढावा बैठक आज गडचिरोली येथे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. नक्षलवादाच्या खात्म्यानंतर दुर्गम भागांमध्ये विकास, प्रशासन आणि मूलभूत सेवांचा प्रभावी विस्तार करून नागरिकांचा शासनावरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीस राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, अपर पोलीस महासंचालक छेरिंग दोरजे, पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, विभागीय अपर आयुक्त माधवी खोडे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा पोलीस अधीक्षक एम रमेश व इतर संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिव पुढे म्हणाले की, जंगलातील संसाधनांचे खरे मालक आदिवासी बांधव असून वन विभाग आणि नागरी प्रशासनाने मालक म्हणून नव्हे तर ‘सुलभक’ म्हणून काम करावे. नागरिकांच्या गरजा समजून घेत संवेदनशीलतेने सेवा दिल्यास शासन आणि समाज यांच्यातील दरी आणखी कमी होईल.
स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षणाची गरज
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक, स्टील प्रकल्प, रेल्वे, विमानतळ आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू होत आहेत. या संधींचा लाभ स्थानिक युवकांना मिळावा यासाठी व्यापक कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या. अन्यथा उच्च पदांवर बाहेरील मनुष्यबळ येईल आणि स्थानिक युवकांना मर्यादित रोजगार मिळेल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
रेल्वे, महामार्ग आणि खाण प्रकल्पांना गती
सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोलीत रेल्वे पोहोचत असून समृद्धी महामार्गाचा विस्तार नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत करण्यास शासनाने मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. खाण प्रकल्पांच्या मंजुरी आणि जमीन संपादन प्रक्रिया कायदेशीर चौकटीत राहून वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
दिवसा वीजपुरवठा आणि सौरऊर्जेवर भर
शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागू नये यासाठी दिवसा वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील ३३ हजार कृषी पंपांचे सौरऊर्जीकरण सुलभ करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पुढाकार घेऊन सेवा द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
बँकिंग, आरोग्य आणि वाहतूक सेवांवर भर
ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचविण्यासाठी महाआयटीमार्फत ५० हजार बँक मित्रांची नियुक्ती करण्यात येणार असून सर्व सीएससी केंद्रे बँकिंग प्रतिनिधी म्हणून विकसित करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. शिक्षक, परिचारिका आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दुर्गम भागात एसटी बस सेवा नियमित चालविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी राज्यात ५ हजार नवीन पदांना मंजुरी देण्यात आली असून मोबाईल हेल्थ युनिट्स गावागावांत पोहोचविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
आधार, ई-केवायसी आणि वनहक्क दाव्यांवर विशेष लक्ष
आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी जोडले नसल्यामुळे अनेक लाभार्थी योजनांपासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आणून देत वृद्ध, दिव्यांग आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी गावपातळीवर विशेष आधार नोंदणी मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वनहक्क कायद्यांतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणावर वनपट्टे वितरित करण्यात आले असून उर्वरित दावेही जलदगतीने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले. पट्टाधारकांच्या वारसांची नोंद सुलभ करण्यासाठी स्वतंत्र अध्यादेश काढण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.
मोह, बांबू आणि तेंदूपत्त्यातून उत्पन्नवाढ
मोह संकलनासाठी आधुनिक जाळी तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, वन धन केंद्रांद्वारे साठवण सुविधा उपलब्ध करणे आणि बांबू व तेंदूपत्ता आधारित मूल्यवर्धन उद्योगांना चालना देण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.
शाळाबाह्य मुलींना १८ वर्षांपर्यंत शिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नक्षलवादाविरोधातील लढ्याला ऐतिहासिक यश – सदानंद दाते
पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी गेल्या तीन दशकांतील नक्षलविरोधी लढ्याचा आढावा घेताना सांगितले की, १९८० पासून सुरू असलेल्या सशस्त्र चळवळीला निर्णायक धक्का देण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. हा भारतीय लोकशाहीचा आणि संविधानिक व्यवस्थेचा मोठा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले.
या संघर्षात महाराष्ट्रातील २४४ पोलीस जवान आणि ६०९ नागरिकांनी बलिदान दिल्याची माहिती त्यांनी दिली.
‘सी-६०’ मधून एलिट फोर्सची निर्मिती
सी-६० दलातील निवडक जवानांमधून अत्याधुनिक प्रशिक्षणप्राप्त विशेष ‘एलिट फोर्स’ तयार करण्यात येत असून त्याचा उपयोग राज्य व देशपातळीवरील विशेष मोहिमांसाठी केला जाईल. उर्वरित जवानांना शिक्षण आणि कौशल्यविकासाच्या माध्यमातून नव्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पारंपरिक पोलीस व्यवस्थेची नवी आव्हाने
नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता गडचिरोली पोलीस दलास कौटुंबिक हिंसाचार, चोरी, घरफोडी, वाहतूक व्यवस्थापन आणि अन्य पारंपरिक गुन्हेगारी नियंत्रणावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहीदांच्या स्मृतीसाठी ‘लिव्हिंग मेमोरियल’
नक्षलवादाविरोधातील संघर्षाचा इतिहास जतन करण्यासाठी गडचिरोली येथे अत्याधुनिक ‘लिव्हिंग मेमोरियल’ आणि संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती त्यांनी दिली. या स्मारकातून शहीद जवानांच्या बलिदानाची प्रेरणा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलोत्तर परिवर्तन आराखड्याचे सादरीकरण केले. गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी गोंदिया जिल्ह्याचा आढावा मांडला, तर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सुरक्षा परिस्थिती आणि विकासात्मक उपक्रमांची माहिती सादर केली.
बैठकीला जिल्हा नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली येथील वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते.