ठाणे: अंबरनाथ तालुक्यात उसाटणे परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’च्या मोठ्या साठ्यावर राज्य दक्षता पथकाने रविवारी धडक कारवाई करत सुमारे एक कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात संबंधित आरोपींविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अवैध इंधन साठवणूक आणि काळाबाजाराविरोधातील ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.
नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे (भा.प्र.से.) यांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे राज्य दक्षता पथकाने अंबरनाथ येथील उसाटणे भागातील न्यूओ लॉजिस्टिक पार्क परिसरात, राज्यस्तरीय प्लॉट क्रमांक २० समोर छापा टाकला. कारवाईदरम्यान टँकरचे सील तोडून ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ची बेकायदेशीर साठवणूक व देवाणघेवाण सुरू असल्याचे उघडकीस आले. दोन व्यक्ती या प्रकारात प्रत्यक्ष सहभागी असल्याचे आढळून आले.
पथकाने घटनास्थळी तपासणी केली असता GJ-12 BY-7560 क्रमांकाचा टँकर पूर्णपणे भरलेला आढळला. या टँकरमध्ये सुमारे २९ हजार ७०० किलो मिक्स हायड्रोकार्बन ऑईल असल्याचे निदर्शनास आले. तसेच MH-43 E-190 क्रमांकाचा आणखी एक टँकर घटनास्थळी उभा असून त्यामध्ये इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने इंधन साठवण्याचे काम सुरू असल्याचे आढळले.
याशिवाय MH-46 C-1282 क्रमांकाच्या टेम्पोमध्ये २०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बॅरलमध्ये तेलाची बेकायदेशीर साठवणूक सुरू होती. या वाहनात २२० लिटर क्षमतेचे २० रिकामे प्लास्टिक बॅरल्स देखील आढळून आले.
घटनास्थळी जमिनीवर आणखी ८० रिकामे बॅरल्स, एक इलेक्ट्रिक मोटार आणि एक एअर ऑपरेटेड डायाफ्राम (AOD) पंप जप्त करण्यात आला.
या सर्व साहित्य, वाहने आणि इंधनासह एकूण सुमारे एक कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संबंधितांकडे आवश्यक परवाने किंवा वैध कागदपत्रे नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच अवैध इंधन साठवणूक, वाहतूक आणि काळाबाजाराशी संबंधित इतर बाबींचाही तपास केला जाणार आहे.
ही कारवाई नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य दक्षता पथकाचे सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी योगेश जंगले, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे तसेच शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, विकास नागदिवे, रवींद्र राठोड, राजेश सोरते, देवानंद थोरवे, पवन कुंभले, राहुल इंगळे आणि अरुण काते यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
दरम्यान, इंधनाच्या अवैध साठवणुकीमुळे महसूल नुकसान होण्याबरोबरच सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर साठवणूक, वाहतूक आणि काळाबाजाराविरोधातील मोहिमा आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
‘टेन्शन घ्यायचं नाही, बिंधास्त अभ्यास करा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागवल्या पालिकेच्या शाळेतील आठवणी
ठाणे:-“नवीन वर्गात आल्यावर मनात शिक्षणाची किंवा वातावरणाची कोणतीही भीती बाळगू नका. ‘टेन्शन गया पेन्शन देनेको’ असे समजा आणि कोणत्याही दडपणाशिवाय बिंधास्तपणे अभ्यास करा. तुमची जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतच तुम्हाला आयुष्यात उत्तुंग यश मिळवून देईल,” असा मोलाचा आणि आश्वासक सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
उन्हाळ्याची मोठी सुट्टी संपल्यानंतर आज ठाणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव‘ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. किसननगर येथील पालिका शाळा क्रमांक २३ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवा कोरा गणवेश, हातात पुस्तके आणि गुलाबपुष्प देऊन बालचमूला शालेय प्रवासाच्या पहिल्या दिवशी अनोखी पावती देण्यात आली.
या दिमाखदार सोहळ्याला ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक राम रेपाळे, नगरसेविका संध्या मोरे, सुखदा मोरे, एकता भोईर, डॉ. दर्शना भोईर, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, शिक्षणाधिकारी शेषराव बढे आणि मुख्याध्यापक दीपक मोराणकर यांच्यासह ठाण्यातील अनेक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, पालक व बालचमू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वाढत्या स्पर्धेच्या युगात सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांनी मनात अजिबात न्यूनगंड बाळगू नये. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, थोर शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ही मोठी व्यक्तिमत्त्वे सरकारी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनच शिकून पुढे आली आहेत. शाळेची इमारत वातानुकूलित असण्यापेक्षा किंवा तिथली फी जास्त असण्यापेक्षा तिथे दिले जाणारे शिक्षण आणि शिक्षकांची बांधिलकी सर्वात महत्त्वाची असते, असे मत त्यांनी मांडले. केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता मुलांचा बौद्धिक, सामाजिक, मानसिक आणि शारीरिक विकास होणे गरजेचे असून, मैदानी खेळ आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर शिस्त व संस्कार घडवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, मातृभाषेतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता अधिक वाढते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
या सोहळ्यादरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. मी देखील याच किसननगर येथील शाळा क्रमांक २३ चा माजी विद्यार्थी असून मला या शाळेचा सार्थ अभिमान आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. पूर्वी ही शाळा एका चाळीसारखी होती, ज्याला दरवाजेही नव्हते. आम्ही स्वतः वर्गाची साफसफाई करून तिथे अभ्यासाला बसायचो, पण त्या वेळचा आनंद काही वेगळाच होता, अशी आठवण त्यांनी सांगितली. आपल्या जुन्या गुरुजनांचे आभार मानताना त्यांनी रघुनाथ परमगुरुजी, निकम सर, पाठक सर, राणे गुरुजी आणि राऊत बाई अशा सर्व शिक्षकांची नावे आदराने घेतली. महापालिकेच्या शाळेत शिकलेली मुले आज राज्याच्या सर्वोच्च पदांवर काम करत आहेत, याचे उत्तम उदाहरण स्वतः मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेला हा तुमचा ‘बापूसो’ म्हणजेच मी स्वतः तुमच्या समोर उभा आहे, असे सांगताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.
शिक्षकांच्या खांद्यावर देशाचे भवितव्य घडवण्याची मोठी जबाबदारी असल्याचे अधोरेखित करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सुप्रसिद्ध विधानाचा दाखला दिला. वकिलाची, इंजिनिअरची किंवा डॉक्टरची चूक एका मर्यादेपर्यंत लपून राहू शकते, परंतु शिक्षकाने केलेली एक चूक संपूर्ण समाजात आणि देशात पिढ्यानपिढ्या प्रतिबिंबित होते, त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी अत्यंत संवेदनशील आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांवरील दप्तराचे ओझे कमी केले असून शालेय पोषण आहारातही मोठ्या सुधारणा केल्या आहेत, असे सांगत त्यांनी शिक्षकांना पहिल्या बेंचपासून शेवटच्या बेंचवरील प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देण्याची सूचना केली. नाशिकमधील एका जिल्हा परिषद शाळेचा दाखला देत, तिथली मुले दोन्ही हातांनी इंग्रजी व मराठी लिहीत होती आणि त्यांना ३०० पर्यंत पाढे तोंडपाठ होते, असा अनुभव सांगून शिक्षकांनी बदलत्या काळानुसार स्वतः ‘टेक्नोसॅव्ही’ होऊन विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील ज्ञान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
शाळेचे वातावरण प्रसन्न आणि आरोग्यदायी असण्यावर भर देत उपमुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना कडक निर्देश दिले. शहरातील महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ‘व्हिजिलन्स स्कॉड‘ (सतर्कता पथक) पाठवून तिथली स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वच्छतागृहांची पाहणी करण्यात यावी आणि कुठेही त्रुटी आढळल्यास त्या तात्काळ दूर कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या सुखसोयींसाठी आणि शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. भाषणाचा शेवट करताना त्यांनी, “उडान भरनी है, तो परों को मजबूत करो, सपने देखने से पहले आँखों को जागृत करो, राह में कांटे है तो क्या डरना, फूलों की मांग के लिए मेहनत तो करो…” या प्रेरक ओळी सादर करत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि शिक्षकांना भावी पिढी घडवण्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
अमरावती विभागात पहिल्यांदाच होणार ‘पीएलएफएस’ आणि ‘अेएसयूएसई’ सर्वेक्षण; विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते सर्वेक्षणांचा शुभारंभ
अमरावती: केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय (MoSPI) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ‘मित्रा’ (MITRA) व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने अमरावती विभागात दोन अत्यंत महत्त्वाचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राज्यात पहिल्यांदाच ‘नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षण’ (PLFS) आणि ‘असंघटीत क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण’ (ASUSE) एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत राबविले जाणार आहे. या राष्ट्रीय कार्यात विभागातील नागरिकांनी सर्वेक्षणासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची आखणी करण्यासाठी ही सर्वेक्षणे अत्यंत मोलाची ठरणार आहेत.
या सर्वेक्षणांचे स्वरूप आणि उद्दिष्टे:
नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षण (PLFS) अंतर्गत निवडक कुटुंबांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे श्रम बाजाराचे महत्त्वाचे निर्देशांक तयार केले जातील. यामध्ये प्रामुख्याने श्रम शक्ती सहभाग दर (Labour Force Participation Rate-LFPR), कामगार-लोकसंख्या गुणोत्तर (Worker Population Ratio- WPR), बेरोजगारी दर (Unemployment Rate-UR) या घटकांची अचूक आकडेवारी संकलित केली जाईल, ज्यामुळे भविष्यातील रोजगार धोरणांना दिशा मिळेल.
असंघटीत क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) अंतर्गत राज्यातील उत्पादन, व्यापार आणि इतर सेवा क्षेत्रातील असंघटीत व बिगर-कृषि आस्थापनांच्या आर्थिक आणि कार्यात्मक वैशिष्ट्यांची आकडेवारी गोळा केली जाणार आहे. यामुळे असंघटीत क्षेत्रातील उद्योगांच्या विकासासाठी योजना आखणे सोपे होईल.
सर्वेक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती:
या सर्वेक्षणांची माहिती गोळा करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयांतर्गत ‘Ipsos Research Private Limited’ या नामांकित संस्थेची शासनाने निवड केली आहे. या संस्थेमार्फत नियुक्त केलेले अन्वेषक (Investigators) आणि पर्यवेक्षक (Supervisors) केवळ ‘नमुना पद्धतीने’ (Sample Method) निवडलेल्या ग्रामीण भागातील गावांना आणि शहरातील विशिष्ट वॉर्डांमधील कुटुंबांना व आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देऊन विहित प्रपत्रात माहिती गोळा करणार आहेत.
या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंब प्रमुख आणि उद्योग/आस्थापना प्रमुख यांच्या उपलब्धतेसाठी नियुक्त कर्मचारी रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशीही भेटी देऊ शकतात. सर्वेक्षणादरम्यान नागरिकांकडून किंवा उद्योगांकडून मिळालेली वैयक्तिक व व्यावसायिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. त्याचा वापर केवळ सांख्यिकी उद्देशांसाठी आणि शासकीय योजनांच्या नियोजनासाठीच केला जाईल.
विभागीय आयुक्तांचे जाहीर आवाहन:
“या राष्ट्रीय महत्त्वाच्या सर्वेक्षणाचा दर्जा हा नागरिकांनी दिलेल्या अचूक माहितीवर आणि सहकार्यावर अवलंबून आहे. अमरावती विभागातील ज्या कुटुंबांना किंवा उद्योगांना या सर्वेक्षणांतर्गत अधिकारी-कर्मचारी भेट देतील, त्यांनी कोणतीही भीती न बाळगता त्यांना योग्य व अचूक माहिती देऊन या शासकीय कार्यात आपले मोलाचे योगदान द्यावे,” असे आवाहन अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
‘गुणसागर निर्गुणी’ मधून उलगडणार गुरुवर्य पं. नीळकंठ अभ्यंकर यांच्या अमूल्य संगीत रचनांचा सुरेल ठेवा
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ज्येष्ठ संगीतकार गुरुवर्य पं. नीळकंठ अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘गुणसागर निर्गुणी – अमूल्य संगीत रचनांचा जागर’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३२ गुणवंत गायक, गायिका आणि लोकप्रिय कलावंतांच्या संचातील हा अभिनव सांगीतिक आविष्कार बुधवार, १७ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी, मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे रसिकांच्या भेटीला येणार आहे.
गुरुवर्य पं. नीळकंठ अभ्यंकर यांनी आपल्या प्रतिभासंपन्न संगीत रचना, चिंतनशील सांगीतिक दृष्टिकोन आणि अभिजात संगीताच्या माध्यमातून भारतीय संगीतविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांच्या रचनांमधील भावस्पर्शी सूर, आध्यात्मिक विचार आणि कलात्मक समृद्धी आजही रसिकांना मंत्रमुग्ध करतात. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून त्यांच्या अमूल्य संगीत वारशाला कृतज्ञ अभिवादन करण्यात येणार आहे.
‘गुणसागर निर्गुणी’ या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन डॉ. वर्षा भावे यांनी केले असून, संगीत संयोजनाची जबाबदारी कमलेश भडकमकर यांनी सांभाळली आहे. या कार्यक्रमात ३२ गुणवंत गायक, गायिका आणि लोकप्रिय कलावंत पं. अभ्यंकर यांच्या निवडक आणि अजरामर संगीत रचनांना आपल्या सुरेल आवाजातून नव्याने सादर करणार आहेत.या कार्यक्रमात वाद्यसाथीसाठी अर्चिस लेले, निषाद करगीलकर, हनुमंत रावडे, अमोघ दांडेकर, भरत भडकमकर, दर्शना जोग, दीप वझे, प्रणव हरिदास आणि कमलेश भडकमकर हे नामवंत वादक सहभागी होणार असून त्यांच्या सुरेल साथसंगतीमुळे कार्यक्रमाची रंगत अधिक खुलणार आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध सांगीतिक परंपरेचे जतन व संवर्धन करून हा सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम साकार होत आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून संगीतप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुवर्य पं. नीळकंठ अभ्यंकर यांच्या अमूल्य संगीत रचनांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडेयांनी केले आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने शाळेत स्वागत
मुंबई : शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव डॉ. माणिक गुरसाळ यांनी ताडदेव येथील व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या अंध विद्यालयाला भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
डॉ. गुरसाळ यांनी विद्यालयातील विविध वर्गांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी डॉ. गुरसाळ यांना आयएएस परीक्षा कशी असते, त्यासाठी कोणती तयारी करावी लागते यासंदर्भात प्रश्न विचारले. डॉ. गुरसाळ यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अत्यंत सहजतेने उत्तरे देत मार्गदर्शन केले व शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे उपसचिव विष्णुदास घोडके, अवर सचिव साईप्रसाद मुकदाडवार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तथा सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण विभाग समाधान इंगळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी रूपाली पाटील, व्हिक्टोरिया मेमोरियल अंध महाविद्यालयाच्या प्राचार्या रजनी हिरमेठ; तसेच संस्थेच्या अध्यक्षा मीना देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.
दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शतकाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या संस्थेने समाजात शिक्षण आणि स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे. सन 1902 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेत दृष्टिहीन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह निवास, भोजन, संगणक प्रशिक्षण, संगीत, क्रीडा आणि विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.
मुंबईतील ताडदेव परिसरात असलेल्या या संस्थेने हजारो दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ग्रंथालय सुविधा; तसेच अन्य विविध कौशल्यविकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत.
शाळेतील पहिल्या दिवसाच्या स्वागताचा उत्सव : ‘शाळा प्रवेशोत्सव’
राज्यातील सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे तसेच शाळेच्या पहिल्या दिवसाचे उत्सवात रूपांतर करणे या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शालेय शिक्षणाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण असल्याने या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत आनंददायी वातावरणात केल्यास त्यांचा उत्साह द्विगुणित होईल आणि शैक्षणिक वर्षाची सुरूवात अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात होईल. यासाठी विदर्भातील शाळा वगळता उर्वरित महाराष्ट्रात यंदाचा ‘शाळा प्रवेशोत्सव’ 15 जून 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. या पार्श्वभूमीवर शाळा प्रवेशोत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण करणे, पालकांचा विश्वास दृढ करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबाबत सकारात्मक वातावरण तयार करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रवेशोत्सवासाठी व्यापक नियोजन केले असून राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी राज्यभरातील विविध शाळांना भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.
मागील वर्षी राबविण्यात आलेल्या शाळा प्रवेशोत्सवामुळे शाळांमधील पटसंख्येतील घट कमी होण्यास मदत झाली. काही जिल्ह्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत पटसंख्येत वाढही दिसून आली. या सकारात्मक परिणामांच्या आधारे यंदा अधिक व्यापक आणि परिणामकारक पद्धतीने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शाळा प्रवेशोत्सवांतर्गत प्रत्येक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे. ‘पहिले पाऊल’ या संकल्पनेअंतर्गत इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा घेऊन त्याची प्रत पालकांना दिली जाणार आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वितरण करण्यात येणार असून शाळेचा पहिला दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जाणार आहे.
या उपक्रमात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची सक्रिय भूमिका निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्याने किमान एका शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करायचे असून संबंधित अधिकाऱ्यांनी शाळा वर्षभरासाठी ‘दत्तक शाळा’ म्हणून स्वीकारून तेथील शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घ्यायचा आहे. यामुळे शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी परिसरातील अंगणवाडी व बालवाडी केंद्रांना भेट देऊन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची माहिती संकलित करावी, पालकांशी संवाद साधावा आणि शासकीय शाळांमधील विविध सुविधा, शिष्यवृत्ती, नाविन्यपूर्ण उपक्रम यांची माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. समाजमाध्यमे, ग्रामस्तरीय जनजागृती, दवंडी आणि पालकांच्या व्हॉट्सॲप गटांद्वारेही शाळा सुरू होण्याबाबत व्यापक प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे.
यंदाच्या प्रवेशोत्सवासाठी जिल्हास्तरावर विशेष नियंत्रण व्यवस्था उभारण्यात आली असून ‘शाळा प्रवेशोत्सव कक्ष’ स्थापन करून कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवले जाणार आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या शाळा भेटींची माहिती, छायाचित्रे आणि अहवाल ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदविले जाणार आहेत.
शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. शाळा प्रवेशोत्सव 2026 हा उपक्रम विद्यार्थ्यांचे शाळेशी नाते अधिक दृढ करण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण, वाढती उपस्थिती आणि सक्षम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शासन, प्रशासन, शिक्षक, पालक आणि समाज यांच्या संयुक्त सहभागातून प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात यावे, हा या उपक्रमामागील मूलभूत हेतू असून त्याद्वारे ‘शिक्षणसमृद्ध महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल टाकले जात आहे.
राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचा पाणी पुरवठा निश्चित करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पुणे : राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसेच धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नागरीकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. बेकायदेशीर पाणी उपश्यावरही तातडीने कडक कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी विभागाच्या आधिकाऱ्यांना दिल्या.
सिंचन भवनामध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा, अगामी मान्सुनची परिस्थिती या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीला कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनमंत धुमाळ, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयवंत गवळी यांच्यासह मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
सद्य परिस्थितीत राज्यातील धरणांमधील एकुण उपयुक्त जलसाठा ३५७.५ टिएमसी (२५ टक्के) असून, तो गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे निदर्शनास आले. यावर्षीचे पर्जन्यमान आतापर्यंत अत्यल्प झाल्यामुळे धरणात पाणी आले नाही हे त्यामागील प्रमुख कारण आहे. विशेषत: पुणे विभागातील उपयुक्त जलसाठा गतवर्षीच्या तुलनेक कमी असल्याने परिस्थिती गांभिर्याने हाताळावी असे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रातील सुमारे ८५ लाख नागरीकांना ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध राहण्यासाठी आवश्यक असलेले पाणी राखीव ठेवण्याच्या सुचना या बैठकीत मंत्र्यांनी प्राधान्याने दिल्या आहेत. मराठावाडा आणि कृष्णा महामंडळाच्या अंतर्गत येणारे सर्व धरणं, जलाशय व प्रमुख जलस्त्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घ्यावा, त्यावर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचा विचार करुन पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक राखीव कोटा निश्चित करण्याबाबतही बैठकीत जलसंपदा मंत्र्यानी सुचित केले. जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पाणीपुरवठा यंत्रणा यांच्यात प्रभावी समन्वय ठेवून पाणी व्यवस्थापनाचा कृती आराखडा तातडीने तयार करण्याचे निश्चित करण्यात आले.
नाशिक, अहिल्यानगर व मराठवाडा विभागातील जलसाठ्याचा आढावा घेताना नाशिक विभागात सध्या २६ टक्के तर मराठवाडा विभागात २८ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध असून, दोन्हीही विभागातील प्रकल्पांमध्ये अपेक्षित प्रमाणात पावसाची नोंद झालेली नाही. विशेषत: मराठवाडा आणि अहिल्यानगर विभागात पिण्याच्या पाण्याच्या गरजांना प्राधान्य देवून उपलब्ध जलसाठ्याचे काटेकारपणे नियोजन करण्याबातही गांभिर्याने कार्यवाही करण्यास आधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
नाशिक, अहिल्यानगर, पुणे, मराठवाडा विभागातील जलशयांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची नवीन आवक सुरु होईपर्यंत असलेल्या पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा. अगामी मान्सुनच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करतानाच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, ग्रामीण व शहरी भागातील टंचाई निवारण आणि जलस्त्रोतांचे संरक्षण करण्यावर भर देण्याबातही बैठकीत ठरविण्यात आले.
अहिल्यानगर जिल्ह्यासह गोदावरी खोऱ्यातील विविध प्रकल्पांची स्थिती लक्षात घेता स्थानिक प्रशासन, जलसंपदा विभाग व पाणीपुरवठा यंत्रणांनी समन्वयाने काम करुन पाण्याचे नियोजन करावे, उपलब्ध जलसाठ्याचा वापर अत्यावश्यक गरजांसाठी करण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही मंत्री विखे पाटील यांनी या बैठकीत आधिकाऱ्यांना केले आहे.
उपलब्ध पाण्याचा वापर सर्वप्रथम पिण्यासाठी करण्यात यावा, बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी विशेष माहीम राबवण्यासाठी महसूल, पोलिस आणि जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त पथकांमार्फत कठोर करावाई करण्याबाबतही स्पष्ट आदेश मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिले आहेत.
कणकवलीत ‘गावठी आठवडा बाजारा’चा शुभारंभ; ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार नवी उभारी – मंत्री नितेश राणे
सिंधुदुर्गनगरी: ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघुउद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या ‘गावठी आठवडा बाजारा’चे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उपक्रमामुळे स्थानिक उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, ग्रामीण अर्थकारणावर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न अवलंबून असते. या गावठी बाजारपेठेमुळे नागरिकांना स्थानिक स्तरावर दर्जेदार, ताज्या आणि विश्वासार्ह उत्पादनांची उपलब्धता होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी, महिला बचत गट आणि स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी थेट व्यासपीठ मिळणार असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या उपक्रमाचे अनुकरण जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांनीही करावे. अशा बाजारपेठांमुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील थेट संबंध दृढ होतील आणि स्थानिक उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होईल, असेही श्री. राणे म्हणाले.
शुभारंभानंतर पालकमंत्री श्री. राणे यांनी बाजारातील विविध स्टॉलना भेट देत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या भाज्या, फळे, सेंद्रिय शेतीमाल, घरगुती खाद्यपदार्थ आणि स्थानिक उत्पादनांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी आणि विक्रेत्यांशी संवाद साधून उत्पादनांची माहिती जाणून घेतली. तसेच या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल शेतकरी, महिला बचत गट आणि विक्रेत्यांचे अभिनंदन केले.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
मुंबई: पर्यावरण वाचवणे आणि भूजल पातळी टिकवण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूगर्भात मुरवणे आणि वाहून जाणारी माती थांबवणे ही गरज ओळखून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.
मृद व जलसंधारण विभाग गेल्या काही वर्षांपासून राज्यभर भरीव काम करीत आहे. सध्या आम्ही ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मंत्री श्री.राठोड यांनी दिली.
मंत्री श्री.राठोड म्हणाले की, राज्यातील तलावांमध्ये, बंधारे व धरणांमध्ये गेल्या काही वर्षांपासून भरपूर गाळ साचला आहे. हा गाळ म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोनं आहे. ते नैसर्गिक कंपोस्ट खत आहे. जर आपण धरणातील हा गाळ काढून शेतात टाकला, तर दोन फायदे होतात. धरणातील गाळ निघाल्यामुळे धरणात अधिक पाणी साठा निर्माण होईल आणि तो अधिक दिवस टिकेल. तर हा गाळ शेतात टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढून उत्पादन वाढेल आणि शेतकरी सुखी होईल.
छोटे-छोटे बंधारे बांधणे, नाल्यांचे खोलीकरण-रुंदीकरण करणे, पावसाचे पाणी अडवणे ही कामे आज राज्यभर सुरू आहेत. पण हे काम फक्त शासनाचे नाही, या कामात समाजाचेही योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्येक गावाने, प्रत्येक शेतकऱ्याने या मोहिमेत सहभाग घ्यावा. आपण जर आज पाणी अडवले, माती अडवली, तर उद्याची पिढी आपल्याला धन्यवाद देईल. पर्यावरण वाचवायचे असेल, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणायचा असेल, तर जलसंधारणाशिवाय पर्याय नाही, असे ही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोवा बांद्रा सी लिंक (पॅकेज-A) आणि वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड यांना जोडणाऱ्या ‘मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर’च्या कामाची पाहणी
‘मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर’च्या गोरेगाव–मुलुंड लिंक रोड (GMLR), अमरनाथ टॉवर, वर्सोवा (पॅकेज-A), लोखंडवाला रोटरी मिल्लतनगर नर्सरी (पॅकेज-A), माइंड स्पेस इंटरचेंज, मालाड (पॅकेज-B), मरिना एन्क्लेव्ह, चारकोप (पॅकेज-C&D) आणि सेक्टर-८, चारकोप (पॅकेज-E) येथील कामाचीही पाहणी त्यांनी केली.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार अमीत साटम व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.