नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्याने शुभारंभ झाला आहे. आगामी कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित व भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन, साधू-संत, महंत, विविध सामाजिक, धार्मिक संघटना आणि नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
श्री गंगा गोदावरी पंचकोठी (तीर्थ) पुरोहित संघ, नाशिकच्यावतीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामाच्या जयघोषात आणि वेद मंत्रोच्चारात सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा आज सकाळी कमला एकादशीच्या पर्वावर पवित्र रामकुंड, नाशिक येथे कुंभमेळा मंत्री श्री. महाजन यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, माजी आमदार बाळासाहेब सानप, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांच्यासह विविध आखाड्यांचे प्रमुख साधू-संत, महंत उपस्थित होते.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, पुढील वर्षी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत असून मागील कुंभमेळ्यापेक्षा चार ते पाच पट अधिक, म्हणजेच 12 कोटींपेक्षा जास्त भाविकांच्या आगमनाची अपेक्षा आहे. त्यामुळे कुंभमेळा यशस्वी करण्याची जबाबदारी शासन, प्रशासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाची आहे. गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी विविध संघटनांनी आणि भक्तगणांनी पुढाकार घेतला असून ही स्वच्छता केवळ एका दिवसापुरती नसून सातत्याने राखली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी प्रत्येक नाशिककराने स्वयंसेवक बनून पुढाकार घ्यावा.
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि जिल्ह्यात विविध विकासकामांना वेग आला आहे. रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि नागरी सुविधांसाठी सुमारे 35 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची अंमलबजावणी सुरू आहे. या विकासकामांमुळे पुढील वर्षी नाशिकचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कुंभमेळ्याच्या तयारीत साधू-संत, महंत, आखाडे, लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगून मंत्री श्री. महाजन यांनी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे नमूद करुन त्यांनी कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, संजयदत्त महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी दिगंबर आखाड्याचे महंत वैष्णवदास महाराज, मंगल पीठाधीश्वर माधवाचार्य महाराज, निर्वाणी आखाड्याचे महंत मुरलीधरदास महाराज, महंत मोहनदास महाराज, महंत राजेंद्रदास महाराज, महंत रामजीदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, रामकिशोरदास शास्त्री महाराज, महंत रामस्नेहीदास महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे संत-महंत, भाविक, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजा करुन गंगा गोदावरीचे पूजन करण्यात आले. शंखनाद आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन समारंभ भक्तीमय वातावरणात पार पडला. पुरोहित संघाच्या सदस्यांनी मंत्रोच्चार केले.
‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’द्वारे व्यापक जनजागृती, अन्न व औषध प्रशासनाचा सुरक्षित अन्न, निरोगी समाजासाठी पुढाकार
मुंबई: ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ या विशेष उपक्रमांतर्गत बृहन्मुंबई परिसरात १ ते १५ जूनपर्यंत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांमध्ये सुरक्षित अन्नाविषयी जागरूकता निर्माण करणे, अन्नभेसळीमुळे होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी आवश्यक खबरदारीची माहिती देणे आणि जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, रेल्वे स्थानके आणि इतर गर्दीच्या परिसरांमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. फिरत्या अत्याधुनिक प्रयोगशाळेद्वारे विविध अन्नपदार्थांचे ६९ नमुने जागेवरच तपासण्यात आले. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, अन्नविक्रेते आणि अन्न व्यवसायिक यांच्याशी थेट संवाद साधून अन्न सुरक्षा, स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी, अन्न साठवणूक, अन्नपदार्थांवरील लेबलची माहिती, कालबाह्य अन्नपदार्थ टाळण्याचे महत्त्व तसेच भेसळयुक्त अन्न ओळखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
राज्यात अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याबरोबरच जनतेमध्ये अन्न सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती करण्यावर विशेष भर दिला जात आहे. केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता नागरिकांना मार्गदर्शन, शिक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून सुरक्षित अन्नाच्या संकल्पनेशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून अन्न व औषध प्रशासनामार्फत राबविले जात आहे.
कार्यक्रमादरम्यान दुग्धजन्य पदार्थ, मसाले, खाद्यतेले आणि इतर अन्नपदार्थांमधील संभाव्य भेसळ ओळखण्यासाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. घरच्या घरी करता येणाऱ्या प्राथमिक चाचण्यांची माहिती नागरिक, विद्यार्थी आणि अन्नविक्रेत्यांना देण्यात आली. त्यामुळे अन्नभेसळीविषयी जागरूकता वाढण्यास आणि सुरक्षित अन्न निवडण्याबाबत मदत होईल.
याशिवाय विविध दूध संकलन केंद्रांना भेटी देऊन दूधाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीच्या माध्यमातून दूधाची गुणवत्ता, शुद्धता आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात आली तसेच भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या सुरक्षा मानकांचे पालन करण्याबाबत बृहन्मुंबई विभागाचे सहआयुक्त म. ना. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली.
मोहिमेदरम्यान नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्नपदार्थांची निवड करणे, अन्नपदार्थ खरेदी करताना उत्पादन व कालबाह्यता दिनांक तपासणे, शिजविलेले अन्न योग्य तापमानात साठवणे, वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे आणि अन्न सुरक्षा संदर्भातील तक्रारी संबंधित यंत्रणेकडे नोंदविणे याबाबत विशेष आवाहन करण्यात आले.
‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ हा उपक्रम केवळ विशेष मोहिमेपुरता मर्यादित नसून बृहन्मुंबई परिसरात सातत्याने राबविण्यात येत आहे. आगामी काळातही विविध भागांमध्ये अशाच जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून अधिकाधिक नागरिक, विद्यार्थी आणि अन्न व्यवसायिकांपर्यंत अन्न सुरक्षा विषयक माहिती पोहोचविण्यात येणार आहे.
अन्न सुरक्षा नियमांचे पालन आणि जनसहभाग यांमधूनच सुरक्षित व निरोगी समाजाची निर्मिती शक्य असल्याने प्रत्येक नागरिकाने अन्न सुरक्षेबाबत सजग राहून सुरक्षित अन्नाचा स्वीकार करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
साने गुरुजी पुण्यतिथी
“प्रेमाचा धडा देणारे हात थांबले,
पण मानवतेची शिकवण आजही जिवंत आहे.”
साने गुरुजींना भावपूर्ण अभिवादन. ![]()
जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार
#सानेगुरुजी#पुण्यतिथी#भावपूर्णअभिवादन#मानवता#करुणा#विनम्रअभिवादन
माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परिक्षा शुल्क भरण्यासाठी 18.06.2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1981 कलम 6 अन्वये स्थापित विविध सुरक्षा रक्षक मंडळे व महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1969 कलम 6 अन्वये स्थापित विविध माथाडी मंडळे यांचे आस्थापनेवरील सेवाप्रवेश नियम शासन परिपत्रक क्र.युडब्लूए-2016/प्र.क्र.01/कामगार-5, दिनांक 11 फेब्रुवारी, 2021 नुसार खालील संवर्गातील एकूण 22 माथाडी मंडळे व 12 सुरक्षा रक्षक मंडळांतर्गत निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक संवर्गातील पदांच्या सरळसेवा पध्दतीने गट-क मधील रिक्त पदे भरती जाहिरात 13.05.2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
त्यानुसार उमेदवारांचे अर्ज 11.06.2026 रोजी 23.55 वाजेपर्यंत यशस्वीपणे दाखल झाले असतील अशा उमेदवारांना अर्जाचे परीक्षा शुल्क भरण्याकरिता 12.06.2026 रोजी 23.55 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेली होती. तथापि, शुल्क भरण्याकरिता काही तांत्रिक अडचणी उमेदवारांना येत असल्यामुळे शुल्क भरण्याच्या कालावधीमध्ये 18.06.2026 रोजी23.55 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. ही मुदतवाढ 11.06.2026 रोजी पर्यंत अर्ज भरण्यात आलेल्या उमेदवारांना केवळ शुल्क भरण्याकरिता देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी, असे सह आयुक्त कामगार तथा सदस्य सचिव, माथाडी व सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया समिती, मुंबई यांनी कळविले आहे.
अधिक माहितीकरीता https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे
मिशन वात्सल्य योजना
सुरक्षित बालपण… उज्ज्वल भविष्य!
अकोला जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगाम २०२३-२४ आणि खरीप हंगाम २०२४-२५ मधील पीक विमा भरपाई संदर्भातील तक्रारींचा जिल्हाधिकारी यांचा अहवाल शासनाला सादर करावा
निर्देश देत या प्रकरणासंदर्भात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकींचे इतिवृत्त मागवून चौकशी करण्याचे आदेश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एचडीएफसी इरगो इन्श्युरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणेबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत प्रशासनाला दिले.
अकोला जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगाम २०२३ आणि खरीप हंगाम २०२४ मधील पीक विमा भरपाई प्रक्रियेतील त्रुटी, शेतकऱ्यांचे आक्षेप आणि विमा कंपनीच्या कार्यपद्धती तपासा. या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कोणत्याही परिस्थितीत विमा कंपन्यांच्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत. याबाबत आतापर्यंत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकांचे व इतिवृत्ताचे अहवाल राज्य शासनाकडे सादर करावेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येऊन आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेण्याबाबतचे निर्देश कृषिमंत्री भरणे यांनी दिले.
एचडीएफसी इरगो इन्श्युरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणेबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीस कामगार मंत्री आकाश फुंडकर, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार हरीष पिंपळे, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, (दूरदृश्य प्रणालीद्वारे) कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी बाळासाहेब गोपाळ, भारतीय किसान संघाचे प्रांत उपाध्यक्ष राहुल राठी आदी उपस्थित होते.
क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल जयंती
बलिदान अमर आहे, प्रेरणा अखंड आहे.
विनम्र अभिवादन.
#रामप्रसादबिस्मिल#क्रांतिकारी#जयंती#विनम्रअभिवादन#नंदुरबार#महाराष्ट्रशासन
नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्याही विकासाला नवी क्रांतिकारी दिशा मिळाली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सदनात माध्यमांशी संवाद साधताना काढले. देशाचे निर्वाचित प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ सलग सेवा देण्याचा ४ हजार ३९९ दिवसांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केल्याबद्दल श्री.मोदी यांचे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन केले.
‘विकास भी और विरासत भी’ या ध्येय वाक्याला केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान मोदी यांनी विकास आणि सांस्कृतिक वारसा यांचा समतोल साधण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारताच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/203568/
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या एमआरआय
सीटी स्कॅन आणि पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांच्या प्रगतीचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सविस्तर आढावा घेतला. मुंबई आणि नागपूर क्लस्टरमधील विविध प्रकल्पांमध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना रुग्णांना दर्जेदार व अत्याधुनिक निदान सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
एमआरआय, सीटी स्कॅन आणि पीईटी सीटी स्कॅन या सुविधा राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी शासन आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे. रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सुविधा विस्तार, देखभाल आणि कार्यक्षम अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात येत आहे. सर्वसामान्य रुग्णांना गुणवत्तापूर्ण आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध होतील, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.
बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी, ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, दूरदृष्य प्रणालीद्वारे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे, छत्रपती संभाजीनगर, मिरज, कोल्हापूर, बारामती, पुणे, नांदेड, लातूर, सोलापूर, चंद्रपूर, अंबाजोगाई, सिंधुदुर्ग, नागपूर, यवतमाळ, अकोलाचे अधिष्ठाता उपस्थित होते.
मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम;9 कोटी 86 लाख मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी होणार
(नंदुरबार) भारत निवडणूक आयोगाने देशव्यापी स्तरावर मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (Special Intensive Revision – SIR) घेण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र राज्याचा समावेश करण्यात आला असून, राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख 44 हजार 413 मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
20 वर्षांनंतर ‘विशेष सखोल पुनरिक्षण’
देशात यापूर्वी 1952-56, 1957, 1961, 1965-66, 1983-84, 1987-89, 1992-95 आणि शेवटचे 2002-2004 या वर्षांमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आले होते. गेल्या 20 वर्षांत केवळ दरवर्षी ‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण’ घेतले गेले, परंतु सखोल पुनरिक्षण झाले नव्हते. या 20 वर्षांच्या काळात झपाट्याने झालेल्या शहरीकरणामुळे लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. अनेकांनी नवीन ठिकाणी नावे नोंदवली, मात्र जुन्या ठिकाणची नावे वगळली नाहीत; ज्यामुळे मतदार याद्यांमध्ये दुबार नावे वाढली आहेत. ही दोषनिवारण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
एक लाखाहून अधिक ‘बीएलओ’ उतरणार मैदानात
राज्यातील संपूर्ण तपासणी प्रक्रियेसाठी 1,00,253 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (BLO) नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या जनगणनेच्या कामात व्यस्त असलेल्या क्षेत्रीय यंत्रणेचा विचार करून निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी तिसऱ्या टप्प्याचे विशेष वेळापत्रक निश्चित केले आहे.
‘असे’ असेल पुनरीक्षणाचे सविस्तर वेळापत्रक:
निवडणूक आयोगाने जाहीर केलेले अधिकृत वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
• 20 ते 29 जून 2026: गणना अर्जांची छपाई आणि ‘बीएलओ’ (BLO) यांना प्रशिक्षण.
• 30 जून ते 29 जुलै 2026: ‘बीएलओ’ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेतील.
• 5 ऑगस्ट 2026: प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी.
• 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026: प्रारुप यादीवर दावे व हरकती नोंदवणे.
• 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत: प्राप्त दावे व हरकती निकालात काढणे.
• 7 ऑक्टोबर 2026: अंतिम मतदार याद्यांची अधिकृत प्रसिद्धी.
घरोघरी जाऊन होणार ‘प्री-फिल्ड’ प्रपत्रांचे वाटप
दिनांक 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत ‘बीएलओ’ घरोघरी जाऊन (House to House visit) मतदारांना ‘प्री-फिल्ड’ (आधीच माहिती भरलेले) गणना प्रपत्र वाटप करतील. यात मतदाराची सध्याची माहिती असेल. तसेच संबंधित मतदाराची किंवा त्याच्या आई-वडील/आजी-आजोबांची 2002-2004 मधील जुन्या सखोल पुनरिक्षणातील माहिती आधीच भरलेली असेल किंवा मतदाराला ती स्वतः भरता येईल. मतदारांना आपले नवीन छायाचित्र देण्याची सुविधाही असेल.
गृहभेटीदरम्यान घर बंद आढळल्यास ‘बीएलओ’ किमान 3 वेळा संबंधित घराला भेट देतील व त्याची नोंद ठेवतील. मतदारांना हे प्रपत्र ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकत्व पडताळणी आणि आधारचा वापर
संविधानाच्या कलम 326 नुसार मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी व्यक्ती भारताचा नागरिक असणे व वयाची 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. मतदार व्यक्ती भारतीय नागरिक आहे याची खातरजमा करण्याची जबाबदारी आयोगाची आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ‘आधार’ हे ओळख पुरावा म्हणून वापरले जाईल. तथापि, आधार ॲक्ट, 2026 च्या कलम 9 प्रमाणे आधारकार्ड हे ‘नागरिकत्वाचा पुरावा’ म्हणून मानले जाणार नाही.
त्रुटी असल्यास मिळतील नोटीस
ज्या मतदारांच्या नोंदी जुन्या मतदार यादीशी जुळणार नाहीत किंवा त्यात त्रुटी असतील, अशा व्यक्तींना मतदान नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत नोटिसा पाठवल्या जातील. तसेच अशा नावांची यादी संभाव्य कारणांसह स्थानिक स्वराज्य संस्था, तहसीलदार कार्यालय, तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. मतदारांना त्यांची 2002-2004 मधील माहिती आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ व नाव टाकून सहज मिळवता येईल.
राजकीय पक्षांना ‘बीएलए’ नेमण्याचे आवाहन
या मोहिमेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर आपले ‘मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी’ (BLA) नियुक्त करणे आवश्यक आहे. राज्यात सध्या राजकीय पक्षांनी फक्त 1,13,558 प्रतिनिधी नेमले आहेत. मतदार यादीतून दुबार व मृत व्यक्तींची नावे काढण्यासाठी राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त प्रतिनिधी नेमावेत, असे आवाहन करण्यात आले असून यासाठी लवकरच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक आयोजित केली जाणार आहे.
मतदार याद्या दोषविरहीत, अचूक व पारदर्शक करण्यासाठी आणि सर्व पात्र व्यक्तींचा समावेश करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती ठुबे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.