७ सोप्या पायऱ्यांत पूर्ण करा जनगणना प्रक्रिया ![]()
आजच se.census वर जाऊन आपली माहिती नोंदवा ![]()
तुमची माहिती सुरक्षित, देशाच्या विकासासाठी महत्त्वाची! ![]()
#Census2027#SelfEnumeration#अहिल्यानगर
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज) यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीबरोबरच सेंद्रिय
शाश्वत आणि आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी नव्याने विकसित केलेल्या विविध उत्पादनांचे लोकार्पण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. महाबीजच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त महाबीजने नाविन्यपूर्ण अशी चार नवी उत्पादने विकसित केली आहेत. यामध्ये सेंद्रिय कीडनियंत्रण, जलद कचरा व्यवस्थापन, माती परीक्षण तसेच उच्च उत्पादनक्षम सोयाबीन वाणांचा समावेश आहे.
“महाबीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ दर्जेदार बियाणेच नव्हे, तर सेंद्रिय शेती, मातीची सुपीकता वाढविणारी उत्पादने आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. नव्याने विकसित करण्यात आलेली निमास्त्र, महास्पीड, महाबीज कर्बमापक व आर.व्ही.एस.एम. २०११-३५ ही उत्पादने शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसोबतच खर्चात बचत करून शेती अधिक समृद्ध करण्यास हातभार लावतील.” अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत विकासाच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्याला विकासाचे रोल मॉडेल बनवूया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर: भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्र राज्य या प्रगतीचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या या कर्मभूमीत आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्याला राज्याच्या नकाशावर विकासाचे रोल मॉडेल बनवूया, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, जैन अल्पसंख्यांक अर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन ललित गांधी, आमदार शिवाजी पाटील, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीत धूनचे वादन करण्यात आले. तसेच राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. यावेळी विविध विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हस्ते गौरविण्यात आले. पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, मान्यवर व्यक्ती, नागरिक, विद्यार्थी, पालक व पत्रकार यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच जिल्हावासियांना उद्देशून भाषण केले.
पालकमंत्री आबिटकर यांनी आपल्या भाषणात जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात मिळवलेला प्रथम क्रमांक ही अभिमानाची गोष्ट आहे. जिल्ह्यात आयटी पार्कच्या कामाला गती मिळत असून आता सर्किट बेंचही झाले आहे. पर्यटन, उद्योग, आरोग्य क्षेत्रात आपण गतीने पुढे जात आहोत. ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ आणि ‘सौर कृषी वाहिनी’च्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत आहोत. आरोग्य मंत्री म्हणून काम करताना ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ ही लोकचळवळ आपण उभारली असून, महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आता प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत. तसेच महसूल विभागातील ‘डीम्ड एनए’ आणि अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान पालकमंत्री महोदयांनी निरीक्षण जीपमधून संचलनाची पाहणी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्गनगरी: महाराष्ट्र दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा देत सिंधुदुर्गच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधा, पर्यटन, मत्स्यव्यवसाय, कृषी आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांमध्ये गती देण्यावर विशेष भर दिला जाईल, असेही पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी येथे पार पडला. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम साईल, जिल्हाधिकारी तृप्ती धोडिमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्य कार्यक्रमानंतर महाराष्ट्र राज्याच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थापना दिनानिमित्त कुडाळ येथील ‘चिमणी पाखरं’ या ग्रुपच्यावतीने नृत्याचे आयोजन देखील करण्यात आले होते.
पालकमंत्री श्री राणे पुढे म्हणाले की, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि कृतज्ञतेचा आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाला नवी ओळख मिळाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनेक हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले. महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि क्रांतिकारकांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ज्योत पेटवली, तर महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यासारख्या महान विभूतींनी समाजाला समतेचा आणि प्रगतीचा मार्ग दाखवला. याच दिवशी आपण कामगार दिनही साजरा करतो. कामगार हा देशाच्या प्रगतीचा खरा कणा आहे. आपण सर्वांनी कामगारांच्या सन्मानासाठी, त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही ते म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. या निर्णयाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. १ मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. याच तारखेला १९८१ साली आपला सिंधुदुर्ग जिल्हा अस्तित्वात आला. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्हा स्थापनेला ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. १ मे ही तारीख सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. मागच्या वर्षी याच दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा हा AI कार्यप्रणाली वापरणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरला. आपण AI टेक्नॉलॉजी ही आधुनिक यंत्रणा वापरून आणखी तत्पर झालो आहोत ही सिंधुदुर्ग वासियांसाठी आनंदाची बाब आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहणार आहे. दरडाई उत्पन्नामध्ये राज्यात अग्रस्थानी राहावा यासाठी विकासात्मक कामांना मी नेहमीच प्राधान्य देणार आहे. भारत सरकार तर्फे होणारी जणगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. या जनगणनेमध्ये प्रथमच नागरिकांना स्वगणना म्हणजेच स्वतःची माहिती स्वतः ऑनलाइन पध्दतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही स्वगणना १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत करावयाची असून आपली माहिती se.census.gov.in या संकेतस्थळावर भरावयाची आहे. १५ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या घरगणनेमध्ये सर्वांनी प्रशासकीय यंत्रणेस सहकार्य करावे असेही ते म्हणाले.
पालकमंत्री श्री. राणे पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सेवा पंधरवडा’ कालावधीत ५७ हजार ५०० विद्यार्थ्यांना शाळांमध्येच वय आणि अधिवास प्रमाणपत्र तर ७ हजार ८०० पात्र विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने सर्वोच्च महसूल वसुली केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने ध्वजदिन निधी संकलनात कोकण विभागात सर्वात प्रथम १०० टक्के संकलन पूर्ण केले. सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा वार्षिक योजनेतील २८२ कोटी रुपयांचा निधी वितरण व खर्चामध्ये आपला जिल्हा राज्यात प्रथमस्थानी राहिला आहे असेही ते म्हणाले.
पालकमंत्री श्री. राणे पुढे म्हणाले की, अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू पिकांना मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कोकणातील शेतकऱ्यांसाठी मदतीचे विशेष पॅकेज जाहीर केले. पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना २०२४-२५ मधील ३९ हजार ९०० आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना एकूण ९२ कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली आहे. आंबा पिक संरक्षणासाठी कायमस्वरूपी उपायासाठी बारामती येथील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून आधुनिक AI आणि ड्रोन प्रणालीचा वापर करून आंबा शेतीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी या अर्थसंकल्पात केंद्र शासनाने ३ हजार २४४ कोटींची तरतूद केलेली आहे. उर्वरीत ५० टक्के निधी राज्य शासन देणार आहे. १०८ किमी लांबीच्या या नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाचा डीपीआर देखील तयार झाला आहे. सिंधुरत्न समृद्ध योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ मिळाल्याने जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळणार आहे. चिपी विमानतळाला VGF सुविधा मिळाल्यामुळे आठवड्याचे सातही दिवस मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. INS गुलदार अंडरवॉटर आर्टिफिशियल रीफ प्रकल्पाला CRZ ची मान्यता प्राप्त झाली असून हा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा सबमरीन प्रकल्प पुढील 2 वर्षात पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. वेंगुर्ले येथे ६० कोटी रुपये खर्च करून लवकरच मत्स्यबीज केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने’चा आपल्या जिल्ह्यातील १२५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला असल्याचे ते म्हणाले.
भाषणातील महत्वाचे मुद्दे-
• जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज भासू नये यासाठी आता दर तीन महिन्यांनी भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत आहेत.
• प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आजपर्यंत ५ लाख २६ हजार ५६० एवढी कार्ड निर्मिती झालेली असून वय वंदन योजनेअंतर्गत ३१ हजार एवढे कार्ड निर्मितीचे उद्दिष्ट साध्य .
• प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०१६ पासून आतापर्यंत १५ हजार ११६ एवढ्या घरांचे उद्दिष्ट्य देण्यात आले असून त्यापैकी ८ हजार ५०० घरकुले पूर्ण झाली.
• सन २०२५- २६ मध्ये ३३ हजार महिलांना ‘लखपती दीदी’ योजनेचा लाभ.
• तीव्र कुपोषित म्हणजेच SAM श्रेणीतील मुलांची संख्या मार्च 2025 च्या तुलनेत मार्च 2026 मध्ये आपण 47 वरून 23 वर आणली. कुपोषण निर्मूलनासाठी शासन विविध योजना राबवत आहे.
• नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास पेट्रोलिंग सुरू आहे. ‘ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग’ या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयात जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक स्थिती आणि विस्तीर्ण किनारपट्टी लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सुरक्षेची भक्कम यंत्रणा उभारण्यासाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार.
“महाबीजची नवी उत्पादने शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग ठरतील” : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
वाशिम :“महाबीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ दर्जेदार बियाणेच नव्हे, तर सेंद्रिय शेती, मातीची सुपीकता वाढविणारी उत्पादने आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. नव्याने विकसित करण्यात आलेली निमास्त्र, महास्पीड, महाबीज कर्बमापक व आर.व्ही.एस.एम. २०११-३५ ही उत्पादने शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसोबतच खर्चात बचत करून शेती अधिक समृद्ध करण्यास हातभार लावतील.” अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज) यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीबरोबरच सेंद्रिय, शाश्वत आणि आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी नव्याने विकसित केलेल्या विविध उत्पादनांचे लोकार्पण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. महाबीजच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त महाबीजने नाविन्यपूर्ण अशी चार नवी उत्पादने विकसित केली आहेत. यामध्ये सेंद्रिय कीडनियंत्रण, जलद कचरा व्यवस्थापन, माती परीक्षण तसेच उच्च उत्पादनक्षम सोयाबीन वाणांचा समावेश आहे.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबीजने प्रथमच अशा प्रकारची चार नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित करून नवा इतिहास घडविला आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे कृषी विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत महाबीजला खाजगी कंपन्यांच्या स्पर्धेत सक्षमपणे उभे केले आहे. उद्या, दि. २ मेपासून ही उत्पादने शेतकऱ्यांसाठी बाजारात उपलब्ध होणार आहेत.
महाबीजने सादर केलेल्या उत्पादनांमध्ये निमास्त्र या अतिसूक्ष्म निंबोळी पावडरचा समावेश असून हे उत्पादन पिकांवरील किडींचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी उपयुक्त आहे. हे सेंद्रिय शेतीसाठी लाभदायक असून वापरण्यास सोपे आणि सर्वत्र माफक दरात उपलब्ध आहे. पर्यावरणपूरक नैसर्गिक संरक्षण म्हणूनही हे उत्पादन महत्त्वाचे मानले जात आहे.
तसेच महास्पीड हे जलद विघटक उत्पादन हिरव्या कचऱ्याचे दर्जेदार सेंद्रिय खतामध्ये जलद रूपांतर करते. यामुळे कचरा व्यवस्थापन सुलभ होऊन जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. रासायनिक खतांवरील खर्चात बचत होण्यासही हे उत्पादन उपयुक्त ठरणार आहे.
महाबीजने महाबीज कर्बमापक हे मातीतील सेंद्रिय कर्ब परीक्षण संचही बाजारात आणले आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतावरच सहज, सुलभ आणि जलद पद्धतीने मातीतील कर्ब तपासणी करता येणार आहे. यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज नसून हे उत्पादन अत्यंत माफक दरात उपलब्ध करण्यात आले आहे. याशिवाय महाबीजने ट्रायकोडर्मा विरेन्स या जैविक बुरशीनाशक व नेमॅटिसाइड उत्पादनाचीही निर्मिती केली असून हे उत्पादन पिकांच्या मुळांचे संरक्षण, रोग नियंत्रण आणि निरोगी वाढीसाठी उपयुक्त आहे.
निमास्त्र, महास्पीड व महाबीज कर्बमापक या उत्पादनांचे तंत्रज्ञान भाभा अनुसंधान केंद्र, मुंबई येथून प्राप्त करून या तीन उत्पादनांची निर्मिती करण्यात आली आहे.
सोयाबीन उत्पादकांसाठी महाबीजने आर.व्ही.एस.एम. २०११-३५ हे क्रांतिकारी सोयाबीन वाण सादर केले आहे. या वाणाची फुले पांढऱ्या रंगाची असून उत्पादन क्षमता प्रतिहेक्टर १० ते १२ क्विंटल आहे. याची कालावधी ९५ ते १०० दिवसांची असून यांत्रिक पद्धतीने काढणीसाठी हे वाण उपयुक्त आहे. तसेच दाण्यांचा रंग आकर्षक असल्याने बाजारमूल्य चांगले मिळण्याची शक्यता आहे.
“महाबीजच्या या नव्या उत्पादनांमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, जमिनीची गुणवत्ता सुधारणा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार असल्याचे” मत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम
पुणे: महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी याबाबतच्या जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, आमदार उमा खापरे, सुनील शेळके, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, एमएसआरडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, एमएसआरडीसीचे अधिकारी तसेच या प्रकल्पांतर्गत बोगद्याच्या बांधकामातील सहभागी नवयुगा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
याप्रसंगी गिनिज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डने या बोगद्याची रुंदी जगात सर्वाधिक 22.33 मीटर अशी जाहीर केली. तत्पूर्वी एमएसआरडीसीचे अधिकारी आणि नवयुगाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री आणि उपस्थित मान्यवरांना या बोगद्याच्या कामाबाबतची तांत्रिक माहिती दिली.
राज्यपालांच्या स्व-गणनेने राज्यातील जनगणनेचा आरंभ
मुंबई: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केलेल्या स्व-गणेनेने देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेचा ‘जनगणना 2027’ चा महाराष्ट्रातील औपचारिक आरंभ आज लोकभवन मुंबई येथे करण्यात आला.
महाराष्ट्र स्थापना दिनी जनगणना सुरु होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राज्यपालांनी राज्यातील जनतेला जनगणनेच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
ही स्व-गणना दिनांक 1 ते 15 मे या कालावधीत होणार असून त्यानंतर जनगणना कर्मचारी घरोघरी जाणार आहेत. ही स्व-गणना प्रत्येक नागरिकाला स्वतःला करायची असून त्यामध्ये 33 प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. अवघ्या दहा मिनिटात स्व-गणना करता येते असे सांगून राज्यातील 2.6 लाख कर्मचारी जनगणना करणार असल्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी दिली.
यावेळी राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उप महानिबंधक ए. एन. राजीव, उप महानिबंधक यशवंत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र लोकभवन येथे महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिन साजरा
मुंबई: बाल वारकऱ्यांनी केलेल्या ‘ज्ञानदेव – तुकाराम’ गजराच्या सुरांनी आज महाराष्ट्र लोकभवन परिसर दुमदुमला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा व त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी राज्यपालांचे स्वागत बाल वारकऱ्यांच्या दिंडीने व नामगजरात करण्यात आले.
एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांअंतर्गत शुक्रवारी (दि. 1 मे) महाराष्ट्र राज्य स्थापनेसह गुजरात राज्य स्थापना दिवस देखील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या मान्यवरांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
देश म्हणजे केवळ भौगोलिक सीमांनी वेढलेले क्षेत्र नसून देश हा विविध संस्कृतींचा सुंदर समूह असतो. एखाद्या राज्याला समजून घ्यायचे असेल तर तेथील संस्कृती समजून घेतली पाहिजे, असे यावेळी बोलताना राज्यपालांनी सांगितले. प्रत्येक राज्याची संस्कृती भिन्न असली तरीही त्यांमध्ये एकात्मतेचा धागा जुळलेला आहे असे त्यांनी नमूद केले.
अमरवाणी फाउंडेशन या संस्थेच्या सहकार्याने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात गायक शंतनू हेर्लेकर, गायिका उपग्ना पंड्या व कलाकार अभिमन्यू हेर्लेकर यांनी सुंदर मराठी व गुजराती लोकगीते व भक्तिगीते सादर केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.
महाराष्ट्र ही संतभूमी आहे. संतांचे कार्य ही समतेची चळवळ असते असे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या पुढाकाराने ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाची सुरुवात करण्यात आली. हे अभियान शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल असे राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी यावेळी जाहीर केले.
राज्यपालांच्या हस्ते पद्मभूषण उदय कोटक, उद्योजक पद्मश्री अशोक खडे, कलाकार पद्मश्री भिकल्या धिंडा, पद्मश्री जुझर वसी, कलाकार पद्मश्री आर माधवन, दिवंगत अभिनेते पद्मश्री सतीश शहा, पद्मश्री सत्यनारायण नुवाल आदींना यावेळी सन्मानित करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमात ‘सूर निरागस हो’, गुजराती लोकगीत, ‘वैष्णव जन तो’ व तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल हा अभंग सादर करण्यात आला. बाल वारकरी मुलांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्याने उपस्थितांचे मन जिंकले.
राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण व प्रास्ताविक केले, तर राजशिष्टाचार अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सूत्र संचलन व आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाला अमरवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. मदन महाराज गोसावी, उद्योजक निखिल मर्चंट, आयुक्त मत्स्य विकास प्रेरणा देशभ्रतार, राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे उपस्थित होते.
प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई: समाजासमोर असलेल्या विविध आव्हानांच्या पार्श्वभूमीवर प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण या मूल्यांचे जतन करण्याची गरज असून पुरस्कार विजेते हे या मूल्यांचे जिवंत उदाहरण आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.‘आफ्टरनून व्हॉइस’तर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित 18 व्या न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड्स 2026 कार्यक्रमात राज्यपाल श्री.वर्मा बोलत होते. यावेळी संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष पद्मश्री डॉ.संध्या पुरेचा, राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, ऑफ्टरनून व्हाईसच्या मुख्य संपादक डॉ.वैदेही तमन तसेच पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्यपालांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत उपस्थितांचे स्वागत केले. समाजातील लोकसेवा, कला-संस्कृती, पत्रकारिता, सामाजिक कार्य, शिक्षण आणि नवोन्मेष अशा विविध क्षेत्रांतील योगदानामुळे समाज समृद्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यपाल श्री. वर्मा यांनी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणारे “18 वे न्यूज मेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड्स 2026” हे व्यासपीठ समाजात उच्च आदर्श, जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीची भावना दृढ करणारे असल्याचे सांगितले.
यावेळी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे, राही भिडे, गायक हरिहरन, अभिनेत्री सुषमा देशपांडे, समाजसेवक दत्ता बारगाजे आणि अभिनेत्री झीनत अमान यांचे राज्यपालांनी विशेष अभिनंदन केले. तसेच 2026 मधील सर्व “न्यूजमेकर अचिव्हर्स” पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.
संगीताच्या माध्यमातून भारतीय संस्कृती समृद्ध करणाऱ्या हरिहरन यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगताना, माहिती अधिकाराद्वारे पारदर्शकता वाढविणाऱ्या विजय कुंभार यांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. तसेच योगेंद्र बांगर यांच्या ‘आजीबाईची शाळा’ या उपक्रमाचा उल्लेख करत शिक्षण कोणत्याही वयात व्यक्तीला सक्षम बनवू शकते, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राची परंपरा प्रगतिशील विचार, सामाजिक सुधारणा आणि सांस्कृतिक समृद्धीची असल्याचे अधोरेखित करत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आजही महाराष्ट्र उद्योग, प्रशासन आणि सामाजिक विकासात देशाचे नेतृत्व करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते गायिका उषा मंगेशकर, पद्मश्री गायक हरिहरन, पद्मश्री शेफ संजीव कपूर, अभिनेत्री सुषमा देशपांडे, पत्रकार राही भिडे आणि समाजसेवक दत्ता बारगजे यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
दिल्लीत ‘कोकण हापूस’चा सुगंध
नवी दिल्ली: दिल्लीच्या बाजारपेठेत अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध असतात, मात्र तो आंबा अस्सल देवगड किंवा रत्नागिरीचाच आहे का, याची शाश्वती ग्राहकांना नसते. हीच अडचण ओळखून आम्ही कोकणातील ‘जी.आय. टॅग’ मानांकित अस्सल हापूस थेट दिल्लीकरांसाठी उपलब्ध करून दिला आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यांनी केले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘कोकण हापूस आंबा महोत्सवाचे’ उद्घाटन आज त्यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी विशेष आयुक्त श्वेता सिंघल, निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल,सहसंचालक, कृषी विभाग शिवाजी आमले , सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, निवासी अभियंता आशुतोष दिवेदी, निवासी उपअभियंता जमुनाप्रसाद गंगवार आणि महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते उपस्थित होते.
उद्घाटनानंतर महोत्सवातील स्टॉल्सची पाहणी करताना श्रीमती आर. विमला म्हणाल्या की, कोकणच्या मातीत पिकलेला अस्सल हापूस आंबा ग्राहकांना मिळेल, याची आम्ही पूर्ण खात्री केली आहे.ग्राहकांना अस्सल हापूसची चव यनिमित्ताने मिळणार आहे.
श्रीमती आर. विमला यांनी दिल्लीकरांच्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता, पुढच्या वर्षी हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आणि जास्त दिवसांसाठी आयोजित करण्याचा मानस असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.



