परिषदचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी ६०० हून अधिक सहभागींना मार्गदर्शन करत उद्योजकतेचे महत्त्व, नवकल्पनांची गरज आणि युवकांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. देशातील २० राज्यांमधून उद्योजक, नवउद्योजक, महिला उद्योजक, विद्यार्थी तसेच देश-विदेशातील तज्ज्ञांनी परिषदेला उपस्थिती नोंदवून उद्योजकतेसंबंधी सूक्ष्म व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
तीन दिवस चाललेल्या या परिषदेत महिला व युवकांमध्ये उद्योजकता विकसित करणे, स्टार्टअप्स घडवणे तसेच समाज व अर्थव्यवस्थेतील उद्योजकांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली होती. बिझनेस पिचिंग कॉम्पिटिशन हे या परिषदेचे प्रमुख आकर्षण ठरले.
परिषदेत विक्री प्रदर्शन (Exhibition) देखील भरविण्यात आले होते. देशातील २० राज्यांतील उद्योजकांनी आपले स्टॉल्स उभारून नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना, उत्पादने व स्टार्टअप मॉडेल्स सादर केली. यामुळे उपस्थितांना विविध क्षेत्रांतील नवउद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
नंदुरबार जिल्ह्याचा उल्लेखनीय सहभाग:
नंदुरबार जिल्ह्यातून एकूण २७ उद्योजकांनी या राष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवला. आयोजकांच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यासाठी विशेष स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला. या स्टॉलवर पुढील उद्योजकांनी आकर्षक पद्धतीने आपली उत्पादने मांडली—
मयुरी खाकरा – सक्षम गृह उद्योग
शिवशक्ती हळदी पावडर
नर्मदा पुनर्वसन मशरूम उद्योग
राजेश्वरी मिरची पावडर
मोगी भोग मोहा लाडू
विश्वाची परिवार तांदूळ विक्री व्यवसाय
कालो कुणबी सेवाभावी संस्था
श्री बद्री केदार प्रायव्हेट लिमिटेड
विशाल ट्रायबल पावडर
सूर्यदर्शन फार्म प्रोड्युसर कंपनी
वेद ऊर्जा हेअर ऑइल सोल्युशन
समर्थ ग्रुप उद्योग – पुरणपोळी रिमिक्स
प्रतीक चार्टकोण – मिलेट चार्ट (झिरो वेस्ट)
मीनाक्षी आर्ट अँड क्राफ्ट
बिझनेस पिचिंग स्पर्धेत नंदुरबारची घवघवीत कामगिरी:
नंदुरबार जिल्ह्यातून १५ उद्योजकांनी बिझनेस पिचिंग स्पर्धेत सहभाग घेतला. यामधून फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील पुढील तीन उद्योगांची निवड करण्यात आली—
मयुरी मिलेट्स – रागी लड्डू : मयुरी राजेश निकुंबे
श्री बद्रीकेदार प्रायव्हेट लिमिटेड : वैभव रघुवंशी
विशाल ट्रायबल पावडर : विशाल माधव वसावे
वरील तिघांनी विजेतेपद पटकावले. स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर सर्व उद्योजकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या उपक्रमास जिल्हा प्रशासन नंदुरबार, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार, महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर, नंदुरबार, निती आयोगचे विशेष सहकार्य लाभले.
या संपूर्ण उपक्रमाचे नंदुरबार जिल्हा समन्वयक व टीम लीडर शिवाजी परमार, NITI Fello वैष्णवी रामदोहकर, CYDA, YEFi, Youthaid Foundation यांनी प्रभावी नेतृत्व केले. National YESummit 9th ही परिषद युवकांसाठी प्रेरणादायी ठरली असून ग्रामीण व आदिवासी भागातील उद्योजकांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणारी एक महत्त्वपूर्ण पायरी ठरली आहे.
#NationalYesummit#YouthEntrepreneurs#WomenEntrepreneurs#DrMittaliSethi#MSME#TribalEntrepreneurship#collectorofficenandurbar
ग्रामविकास संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय बामखेडे त.त. ता.शहादा जि.नंदुरबार
पारंपरिक माती मणी उद्योगातील इंधनटंचाई, बाजारपेठेचा अभाव व शासनमान्यतेअभावी येणाऱ्या अडचणी संशोधनातून पुढे आणल्या. MSFDA आणि Indian Institute of Technology मुंबई यांच्या “आपले प्रश्न – आपले विज्ञान” उपक्रमांतर्गत नर्गुस मन्यार व मोगी वळवी या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून प्रशासनासमोर मांडणी केली.
महाविद्यालयाच्या पुढाकारामुळे प्रशिक्षण कार्यक्रमास चालना मिळाली तसेच उद्योगाला “नवीन उद्योग” म्हणून मान्यता मिळविण्यासाठी Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University येथील KCIIL विभागाशी स्टार्टअप प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात १७ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान तोरखेडा येथे टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असून मत्स्य व्यवसाय करणाऱ्या ग्रामीण युवक-युवतींना पूरक उपजीविकेचा पर्याय उपलब्ध करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
प्रशिक्षणाचे आयोजन महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था आणि ATMA नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून ग्रामविकास संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडे येथील नवोपक्रम व इनक्युबेशन कक्षाचा महत्त्वाचा पुढाकार आहे.
या प्रशिक्षणातून कौशल्य, सर्जनशीलता आणि उद्योजकता यांची सांगड घालत ग्रामीण युवक-युवतींना शाश्वत उत्पन्नाचे पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सिंगपूर (ता. अक्कलकुवा) येथे महिला दिन उत्साहात साजरा; ग्रामीण महिलांना स्वावलंबनाचा संदेश
अक्कलकुवा तालुक्यातील सिंगपूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे, महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे तसेच शासकीय योजना, प्रक्रिया उद्योग आणि आर्थिक स्वावलंबनाबाबत मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त यशपालभाई पटेल उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून रविंद्र मोरे (डीडीएम, नाबार्ड) व नंदकुमार पैठणकर (जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, नंदुरबार) उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून दीपक पटेल (प्रकल्प संचालक, आत्मा नंदुरबार) व कांता गौरी बनकर (जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार) यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास ग्रामसेवक वसावे तसेच शाळेचे मुख्याध्यापक भामरे सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. आरती देशमुख (विषय विशेष तज्ञ – गृह विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार) यांनी केले. त्यांनी जागतिक महिला दिन २०२६ ची थीम, महिला सक्षमीकरणाचे महत्त्व तसेच ग्रामीण महिलांसाठी मूल्यवर्धित अन्नपदार्थ व प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या संधी याविषयी सविस्तर माहिती दिली. महिलांनी आपल्या कौशल्याच्या आधारे लघुउद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असा संदेश त्यांनी दिला.
नाबार्डचे डीडीएम रविंद्र मोरे यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग सुरू करून उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण करण्याचे आवाहन केले. त्यांनी सोया टोफू या पौष्टिक पदार्थाविषयी माहिती देत त्याचे महत्त्व सांगितले तसेच उपस्थित महिलांना सोया टोफूचे वितरण केले.
जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर यांनी महिलांसाठी बँकमार्फत उपलब्ध असलेल्या विविध बचत योजना, विमा योजना आणि आर्थिक सुविधांबाबत माहिती दिली. महिलांनी बचत व विमा यावर भर देऊन आर्थिक सुरक्षिततेकडे पावले टाकावीत, असे त्यांनी सांगितले.
आत्मा नंदुरबारचे प्रकल्प संचालक दीपक पटेल यांनी आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शेतकरी गट, महिला गट आणि अभ्यास सहली याबाबत माहिती देत महिलांनी शेती व शेतीपूरक उद्योगांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक कांता गौरी बनकर यांनी बचत गटांचे महत्त्व, दूध संकलन व्यवसाय तसेच महिलांच्या आर्थिक उन्नतीमध्ये बचत गटांची भूमिका स्पष्ट केली. महिलांनी एकत्र येऊन बचत गटांच्या माध्यमातून उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी मनोरंजनात्मक उपक्रम आणि खेळ देखील आयोजित करण्यात आले. विशेषतः संगीत खुर्ची यांसारख्या खेळांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने कार्यक्रमात आनंददायी वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना सीएमआरसीच्या व्यवस्थापक सौ. ज्योती वळवी यांनी सुंदर पद्धतीने केले, तर शैलजा पाडवी यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमातून महिलांना विविध शासकीय योजना, आर्थिक संधी, प्रक्रिया उद्योग आणि महिला सक्षमीकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. ग्रामीण महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
#WomenEmpowerment#MahilaDin#KrishiVigyanKendra
छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे प्रती किलोवॅट १५ हजाराची बचत, वीज ग्राहकांचा फायदा
नंदुरबार: महिना शंभर युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणने मागविलेल्या टेंडरमध्ये एक किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची किंमत सुमारे ४५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. सध्या सौरऊर्जा पुरवठादार आकारत असलेल्या साठ हजार रुपये या दराच्या तुलनेत नवा दर १५ हजार रुपये कमी असल्याने योजनेच्या लाभार्थी ५ लाख छोट्या ग्राहकांची खूप मोठी बचत होणार आहे. तसेच साठ हजारच्या ऐवजी ४५ हजार रुपयात एक किलोवॅटचा छतावरील सौरऊर्जा बसविता येत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आगामी काळात असे प्रकल्प बसविणाऱ्या सर्व गरजू ग्राहकांना लाभ होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गरीब ग्राहकांसाठी स्मार्ट योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी महावितरणला अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मुंबईत झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्मार्ट योजनेच्या टेंडरला मान्यता देण्यात आली. बैठकीस राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला उपस्थित होत्या.
राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलार (स्मार्ट) योजनेच्या शासननिर्णयात प्रति किलोवॅट पन्नास हजार रुपये खर्च गृहित धरला आहे. सध्या व्यवहारात सोलर पुरवठादार व्यावसायिक ग्राहकांकडून प्रती किलोवॅट सुमारे साठ हजार रुपये आकारत आहेत. पण महावितरणने आज मंजूर केलेल्या टेंडरमध्ये प्रती किलोवॅट ४५,४५० रुपये इतकी रक्कम स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेत ग्राहकाने भरायच्या हिश्श्याच्या रकमेत आता मोठी कपात होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये घरगुती वीज ग्राहकांना छतावरील सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी एक किलोवॅटला तीस हजार रुपये, दोन किलोवॅटला साठ हजार रुपये व तीन किलोवॅटला ७८ हजार रुपये थेट अनुदान मिळते. ऊर्वरित खर्च ग्राहकाने करायचा असतो. एक किलोवॅटच्या प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. ग्राहकाच्या गरजेपेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य येते व ग्राहकाला अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या योजनेत राज्यातर्फे आणखी अनुदान देऊन दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाच लाख ग्राहकांसाठी स्मार्ट योजना आणली आहे. प्रत्येकी एक किलोवॅटचे सौरऊर्जा प्रकल्प या योजनेत बसविण्यात येतील.
महावितरणने स्मार्ट योजनेसाठी मागवलेल्या टेंडरमध्ये एक किलोवॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी ४५,४५० रुपये इतका कमी दर निश्चित झाल्यामुळे आता अन्य गरजू वीज ग्राहकांनाही लाभ होणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सरकारी अनुदानाशिवाय ऊर्वरित रक्कम ग्राहकाला भरावी लागते. या रकमेत मोठी घट झाल्यामुळे छोट्या गरजू वीज ग्राहकांना योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे होईल.
सौरऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या सूचिबद्ध पुरवठादारांची यादी महावितरणने आपल्या वेबसाईटवर आणि स्मार्ट योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध केली आहे.
देशाच्या औद्योगिक प्रगतीचे रक्षण करणाऱ्या आणि महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा
सुनिश्चित करणाऱ्या ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल’ च्या सर्व जवानांना स्थापना दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !तुमची शिस्त, अतुलनीय समर्पण आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा ही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.
लोकनेते बाळासाहेबदेसाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुंबई येथील मेघदूत निवासस्थानी अभिवादन केले.
विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
निलजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १ अंतर्गत पैठण तालुक्यातील महसूल मंडळ निलजगाव येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराला विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, भूमी अभिलेख उपअधीक्षक भास्कर खरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नायब तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच कृषी सहायक उपस्थित होते.
नागरिकांशी थेट संवाद साधत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. शिबिरात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि विविध अर्ज स्वीकृतीसाठी एक खिडकी योजना प्रभावीपणे राबविण्यात आली.
या शिबिरात एकूण ७४ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ७ अर्ज जागेवरच निकाली काढण्यात आले, तर उर्वरित अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांकडे वर्ग करण्यात आले. तसेच विविध विभागांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
ई-फेरफार अंतर्गत प्राप्त सर्व फेरफार अर्ज निकाली काढण्यात आल्याची माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली. या शिबिरात ग्रामपंचायत, कृषी, भूमी अभिलेख, आरोग्य विभाग, सेतू सुविधा केंद्र, बचत गट, अनुलोम विभाग तसेच तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या विविध विभागांचा सहभाग होता.
संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देत अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. महसूल मंडळ निलजगावच्या मंडळ अधिकारी भारती मादनकर यांनी मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व संबंधित विभागांच्या सहकार्याने शिबिराचे सुयोग्य नियोजन केले.
प्रशासनाचा समन्वय आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १ अंतर्गत निलजगाव येथील हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी दिली.
दरम्यान, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी तुर्काबाद (गंगापूर) येथेही भेट देत महसूल विभागात गेल्या काही वर्षांत आणि चालू वर्षात करण्यात आलेल्या विविध सुधारणांबाबत माहिती दिली. तसेच शिबिराच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन काही समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यात आले.
विभागीय लोकशाही दिनात तेरा प्रकरणांवर सुनावणी
अमरावती: विभागीय लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या प्रकरणांवर विहीत कालमर्यादेत कार्यवाही करुन अंतिम अहवाल सादर करणे तसेच संबंधित अर्जदारास केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करणे आवश्यक आहे. यानुसार प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करुन प्रकरण नस्तीबध्द करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले. लोकशाही दिनात दाखल एकूण तेरा प्रकरणांवर चर्चा करुन त्यानुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.
विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात श्रीमती सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे कामकाज आज पार पडले. यावेळी उपायुक्त रविंद्र हजारे, उपायुक्त संतोष कवडे, उपायुक्त राजू फडके यांच्यासह महसूल, पोलीस, महापालिका, सहकार, कृषी, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी प्रत्यक्षरित्या तर पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.
यावेळी विभागीय लोकशाही दिनात दाखल एकूण तेरा प्रकरणांवर चर्चा करण्यात आली असून दोन प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर उर्वरित प्रकरणांवर पंधरा दिवसांत आवश्यक कार्यवाही करुन अंतीम अहवाल सादर करण्याच्या सूचना श्रीमती सिंघल यांनी संबंधित विभागप्रमुखांना केल्या.
विभागीय लोकशाही दिनासाठी सामान्य प्रशासन विभागाव्दारे एकूण 13 प्रकरणांवर लोकशाही दिनात चर्चा करण्यात आली. ही प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांनी स्थळ पाहणी, मुद्देनिहाय चौकशी, पडताळणी करुन सुस्पष्ट अंतीम अहवाल तत्काळ सादर करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले. विभागीय महिला लोकशाही दिनांतर्गत एकही प्रकरण दाखल झाली नाही, अशी माहिती महिला व बालविकास विभागाव्दारे देण्यात आली.
यावेळी लोकशाही दिनासाठी अमरावती विभागातून उपस्थित राहिलेल्या तक्रारदारांचे म्हणने ऐकूण घेण्यात आले. मागील लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे नवीन लोकशाही दिनात सुनावणीसाठी येवू नये. न्यायप्रविष्ट किंवा अर्धन्यायिक प्रकरणांसंदर्भात तत्काळ अहवाल सादर करण्यात यावा. लोकशाही दिनासाठी दाखल होणाऱ्या तक्रार अर्जांवर वेळेत कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागाने जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, अशा सूचना श्रीमती सिंघल यांनी यावेळी केल्या.
मेळघाटच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ; उद्योग मंत्री उदय सामंत व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाही
अमरावती: मेळघाटातील आरोग्य, पाणी पुरवठा आणि इतर समस्या. शासन स्तरावरून सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या सर्व उपाययोजना तातडीने अंमलात आणण्यात याव्यात, यासाठी येत्या आठवड्यात बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधला.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वात कर्जमुक्ती आठवण व मेळघाट संघर्ष यात्रेचा समारोप चिखलदरा येथे झाला. या यात्रेच्या निमित्ताने उद्योग मंत्री उदय सामंत आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी आनंदराव अडसूळ, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधला. मेळघाटमधील प्रश्नांची जाण असून येत्या काळात विशेष बैठक बोलविण्यात येईल. यामध्ये आरोग्य, पाणीपुरवठा, सिडको, स्कायवॉक आदी सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येईल. यात धोरणात्मक निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडेही दाद मागण्यात येईल. सध्या शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांना न्याय मागण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. सरकारकडून सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले राज्य शासनाने दोन लाख रुपयांची कर्जमुक्ती केली आहे. आदिवासींच्या प्रश्नांची दखल शासनाने घेतली असून हे प्रश्न लवकरच सोडविले जातील.आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले चुरणी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि 30 खाटांवरून 50 खाटांचे रुग्णालय करण्यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. या ठिकाणी सेवा देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र बजेट देण्यात येईल. राज्य शासनाने सिकलसेलमुक्त अभियान हाती घेतले आहे. नागरिकांनी तपासणीसाठी सहकार्य करावे. मेळघाटातील विविध समस्यांवर योग्य उपाययोजना करून कार्यवाही करण्यात येईल.
यावेळी बच्चू कडू यांनी चिखलदरा आणि मेळघाट परिसरातील विविध समस्यांची माहिती दिली.
विधानसभा इतर कामकाज
मुंबई: महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासन विविध धोरणे आणि योजना प्रभावीपणे राबवत आहे. बचतगटांना प्रोत्साहन तसेच महिलांची सुरक्षा, कौशल्य प्रशिक्षण व सायबर साक्षरतेवर राज्य शासन भर देत असल्याचे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विधानसभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना केले.
महिला दिनानिमित्त विधानसभेत विशेष प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर विधानसभेतील महिला आमदारांबरोबरच पुरुष आमदारांनीही सहभाग घेऊन चर्चा केली.
महिला व बाल विकास विभाग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, महिला व पुरुष लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे महिलांच्या समानतेसाठी प्रयत्न केल्यास समाजात सकारात्मक बदल अधिक वेगाने घडू शकतात.
महिला दिनाच्या निमित्ताने अनेक महिला आमदारांनी महिलांच्या विकासासंदर्भात विविध सूचना मांडल्या असून काही पुरुष आमदारांनीही या चर्चेत सहभाग घेतल्याचा आनंद असल्याचे सांगून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने केलेल्या उपक्रमांना सर्वांचे सहकार्य मिळाल्यास समाजात समानतेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या इतिहासात महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान
महाराष्ट्र ही संतांची आणि पुरोगामी विचारांची भूमी असल्याचे सांगताना मंत्री तटकरे यांनी महिलांच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख केला. राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले, अहिल्याबाई होळकर यांनी उत्तम प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. राणी लक्ष्मीबाई यांनी स्वातंत्र्यलढ्यात पराक्रम गाजवला. स्त्रीशिक्षणाचा पाया घालणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि त्यांना साथ देणाऱ्या फातिमा शेख यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. तसेच भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी यांचे योगदानही असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बचतगटांसाठी ‘उमेद मॉल’ पायलट प्रकल्प
महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ‘उमेद मॉल’ हा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला ११ जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला हा प्रकल्प आता १३ जिल्ह्यांमध्ये विस्तारण्यात आला आहे. या मॉलमध्ये बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असून प्रशिक्षणासाठी स्वतंत्र हॉलचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. हे मॉल तालुक्याच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रस्तावित ‘शक्ती कायदा’ संदर्भात केंद्र सरकारने काही कायद्यांमध्ये बदल केले असल्याने त्यानुसार राज्य शासन आवश्यक सुधारणा प्रस्तावित करून केंद्राकडे सादर करणार असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. तसेच मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर लिंगनिदानाच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह आणि आरोग्य विभागासोबत स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी शासकीय तसेच खासगी कार्यालयांमध्ये लैंगिक छळविरोधी समित्या स्थापन करण्याबाबत शासन कडक भूमिका घेत असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.
कौशल्य विकास व आर्थिक सक्षमीकरणावर भर
ग्रामीण भागातील महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यासाठी कौशल्य विकास विभागासोबत समन्वय साधला जाणार आहे. महिला बचतगटांना कमी व्याजदरात कर्जसुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग सुलभ करणे आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांमध्ये वाढत्या कॅन्सरच्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर तपासणी, उपचार आणि औषधोपचारासाठी आर्थिक मदतीचा प्रस्ताव आरोग्य विभाग तयार करत आहे. तसेच लसीकरणाबाबतही आवश्यक पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सायबर साक्षरता आणि डिजिटल प्रशिक्षण
महिलांवरील सायबर गुन्हे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सायबर साक्षरता वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. महिलांना डिजिटल व्यवहार आणि वित्तीय साक्षरतेचे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम तयार करण्यात येत आहे. सोशल मीडियावर महिलांविरोधात होणाऱ्या अपमानास्पद टिप्पणी आणि मानसिक छळाच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यासाठी गृह विभागासोबत समन्वय साधला जाणार असल्याचेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. सायबर गुन्ह्यांबाबत शाळा तसेच ग्रामपंचायत स्तरापर्यंत प्रशिक्षण देण्याचा विचार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
ग्रामीण महिलांसाठी विविध सुविधा
असंघटित क्षेत्रातील बांधकाम व ऊसतोड कामगार महिलांसाठी शिष्यवृत्ती, आरोग्य सेवा आणि कौशल्य विकास कार्यक्रम अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ग्रामीण विद्यार्थिनींसाठी एसटी बसच्या फेऱ्या वाढवण्याबाबत परिवहन विभागाशी चर्चा केली जाईल. महिला बचतगटांना बँक कर्ज सुलभ पद्धतीने मिळावे यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. तसेच आदिवासी व दुर्गम भागातील ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठीही संबंधित विभागांना सूचना दिल्या जातील, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले.
वर्किंग वुमन हॉस्टेलची संख्या वाढवणार
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, कामानिमित्त शहरांमध्ये येणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित निवासाची गरज लक्षात घेऊन वर्किंग वुमन हॉस्टेलची संख्या वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील. तसेच जिल्हास्तरावर फूड प्रोसेसिंग युनिट्सना प्रोत्साहन देण्यासाठी समित्या स्थापन करण्याचा विचार आहे.
चौथे महिला धोरण अधिक लवचिक
राज्यात लागू करण्यात आलेले चौथे महिला धोरण लवचिक स्वरूपाचे असून योजनांची परिणामकारकता पाहून त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. विविध विभागांना महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशिष्ट उद्दिष्टे देण्यात आली असून त्या आधारे योजनांचे मूल्यमापन केले जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
महिलांच्या खात्यात थेट लाभ
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजनांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यावर शासनाचा भर आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे सुमारे ५० लाख महिलांची बँक खाती प्रथमच उघडली गेली असून योजनांचा लाभ थेट महिलांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.



