अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासारखीच वीज ही आजच्या जीवनातील मूलभूत गरज बनली आहे. घरातील दिवा, पंखा, पाणीपुरवठा, मोबाईल चार्जिंग, रुग्णालये, उद्योगधंदे सगळे काही विजेवर अवलंबून आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला की जीवनाची गतीच थांबते. महाराष्ट्रातील कोट्यवधी नागरिकांच्या घराघरांत वीज पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित करत आहे. या विशाल यंत्रणेचा खरा कणा म्हणजे जनमित्र – आपले लाईनमन. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 4 मार्च हा दिवस ‘लाईनमन दिन’ म्हणून साजरा केला जातो.
अदृश्य पण अत्यावश्यक सेवा
वीज ही दिसत नाही, पण तिचे अस्तित्व प्रत्येक क्षणी जाणवते. विजेची निर्मिती, पारेषण आणि वितरण या टप्प्यांतून ती ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचते. या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात आव्हानात्मक टप्पा म्हणजे वितरण. शहरातील उंच इमारतींपासून ते दुर्गम डोंगराळ भागातील लहानशा वाड्यांपर्यंत अखंड वीजपुरवठा राखण्यासाठी जनमित्रांना 24 तास तत्पर राहावे लागते.
आपल्या घराचा वीजपुरवठा काही मिनिटांसाठी खंडित झाला तरी अस्वस्थता वाढते; परंतु त्या मागे लाईनमनना कोणत्या परिस्थितीत काम करावे लागते, याची जाणीव अनेकांना नसते. रात्री-अपरात्री, मुसळधार पावसात, कडाक्याच्या उन्हात किंवा वादळाच्या झंझावातातही ते उंच खांबांवर चढून दुरुस्ती करतात. वीजयंत्रणेत एक क्षणाची चूकही जीवघेणी ठरू शकते कारण छोट्याशा चुकीलाही वीज कधीच माफ करत नाही.
संकटातही अविरत सेवा
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राने अनेक नैसर्गिक संकटांचा सामना केला. निसर्ग व तौक्ते या चक्रीवादळांनी किनारपट्टीलगतच्या व राज्यातील इतर ठिकाणच्या वीजयंत्रणेचे मोठे नुकसान केले. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. अशा वेळी जनमित्रांनी जीवाची पर्वा न करता तुटलेल्या वाहिन्या दुरुस्त केल्या, पडलेले खांब उभे केले आणि लाखो घरांत पुन्हा प्रकाश आणला.
तसेच कोरोनाच्या संकटात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना नागरिक घरात सुरक्षित राहू शकले कारण वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी लाईनमन सतत कर्तव्य बजावत होते. रुग्णालये, आयसोलेशन केंद्रे, लसीकरण केंद्रे या सर्व ठिकाणी अखंड वीजपुरवठा करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.
विश्वविक्रमात मोलाचा वाटा
महावितरणतर्फे महाराष्ट्रात एकाच महिन्यात सर्वाधिक 49,911 सौर कृषिपंप बसवण्याचा विक्रम करण्यात आला. या विक्रमाची जगातील सर्वात प्रतिष्ठित ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ म्हणून नोंद झाली. कमी काळात मोठ्या संख्येने पंप बसवण्याचा भीमपराक्रम करण्यात महावितरणच्या अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. महावितरणच्या लाईनमन मंडळींनी प्रचंड मेहनत घेऊन सौर कृषिपंपांचे प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान पेलले आणि विश्वविक्रमास हातभार लावला. 5 डिसेंबर 2025 रोजी गिनीज विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यात बोलताना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनीही जनमित्रांच्या या कार्याची दखल घेतली. ‘लाईनमन ही महावितरणची लाईफलाईन आहे’, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
प्रकाश पेरणारी माणसं
महावितरणच्या ग्राहकसंख्येत दरवर्षी लाखोंची भर पडत आहे. वाढती वीजमागणी, नवीन उपकेंद्रे, हजारो किलोमीटरच्या वाहिन्या आणि वितरण रोहित्रे या सर्वांची देखभाल व दुरुस्ती करणे ही मोठी जबाबदारी आहे. यासोबतच नवीन जोडण्या देणे, थकीत बिलांची वसुली, वीजचोरीविरोधातील कारवाई अशा विविध ग्राहकसेवाही जनमित्र अर्थात लाईनमन पार पाडतात. त्यांच्या कामात शारीरिक कष्ट तर आहेतच, पण मानसिक तणावही कमी नाही. वेळेचे बंधन नाही आणि प्रतिकूल हवामानात काम सुरूच राहते. धोक्याची तर कायमच छाया. तरीही सुरक्षितपणे काम करत ग्राहकांच्या घरात प्रकाश राहिला पाहिजे या एकाच ध्येयाने ते कार्यरत असतात.
पडद्यामागचे नायक
आपण दिवा लावतो तेव्हा त्या प्रकाशामागे असलेल्या घामाची, परिश्रमाची आणि धैर्याची आठवण ठेवणे गरजेचे आहे. लाईनमन दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करण्याचा दिवस आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यावर अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे; परंतु त्या मागे झटणाऱ्या जनमित्रांच्या प्रयत्नांची दखल घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या समर्पणामुळेच आपले जीवन प्रकाशमान आहे. काळोखाशी झुंज देत आपल्या आयुष्यात उजेड आणणाऱ्या या माणसांना लाईनमन दिनानिमित्त कृतज्ञतापूर्वक मानवंदना.
महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा ‘नॅशनल लीडरशिप अवॉर्ड २०२६’ ने गौरव
नंदुरबार:महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत त्यांचा शुक्रवारी (दि. २७) आयोजित यंदाच्या नॅशनल लिडरशिप परिषदेमध्ये ‘इंडियाज बिझीनेस लिडर ऑफ एक्सलेन्स अवॉर्ड-२०२६’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मुंबई येथील स्टॉक एक्सचेंजच्या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन हॉलमध्ये टाइम्स एस्पायर या संस्थेच्या वतीने नॅशनल लिडरशिप शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत संस्थात्मक उत्कृष्ट नेतृत्व, पर्यावरण व शाश्वत ऊर्जा, नाविन्यपूर्ण उपक्रम, कौशल्य विकास, आधुनिक तंत्रज्ञान आदींवर सादरीकरण व चर्चा करण्यासाठी देशातील खासगी व सरकारी विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांना जाहीर झालेला पुरस्कार त्यांच्यावतीने संचालक (संचालन) श्री. सचिन तालेवार, विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश कोहाट यांनी स्वीकारला.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात परिर्वतन सुरु आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनात ऊर्जा परिवर्तनाला मोठा वेग दिला आहे. यामध्ये महावितरणने प्राधान्य दरांवर सर्व ऊर्जा स्त्रोतांमध्ये आतापर्यंत ८२ गिगावॅट क्षमतेच्या वीज खरेदीचे दीर्घकालीन करार (पीपीए) केले आहेत. यामध्ये ६५ ट्क्के अपारंपरिक ऊर्जेचा समावेश आहे. शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करणे, वीज खरेदीचा व पर्यायाने अनुदानाचा बोजा कमी करणे, औद्योगिक व व्यावसायिक वीजदर कमी करणे यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०’ व ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या दोन्ही योजनेतून सध्या १८ लाख ८२ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरु झाला आहे.
महावितरणकडून विजेच्या मागणीचा अंदाज व त्याचे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे विश्लेषण करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याद्वारे मागणीचा अचूक अंदाज व सर्वात कमी खर्चात वीज खरेदीचे व्यवस्थापन सुरू आहे. यासह ऊर्जा क्षेत्रातील विविध योजना, डिजिटल ग्राहकसेवेचे प्रभावी व्यवस्थापन व नाविन्यपूर्ण नेतृत्वासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी दिनेश लडकत, सरचिटणीसपदी डॉ.शिवाजी तिकांडे
जळगाव/धुळे/नंदुरबार : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशनचे 48 वे वार्षिक अधिवेशन लातूर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी पार पडले. यात नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी दिनेश लडकत (पुणे) यांची तर सरचिटणीसपदी डॉ.शिवाजी तिकांडे (छत्रपती संभाजीनगर) यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी : संघटन सचिव – प्रवीण गायकवाड (छत्रपती संभाजीनगर), कोषाध्यक्ष – प्रमोद कांबळे (अमरावती), कार्याध्यक्ष- महेश जाधव (महावितरण, नागपूर), नितीन सूर्यवंशी (महानिर्मिती, कोराडी), उपसरचिटणीस – विकास बांबल (महावितरण, अमरावती), नंदकिशोर सातकर (महानिर्मिती, खापरखेडा), सहसचिव – दिनेश ठाकूर (लातूर), ऋषिकेश गायकवाड (बारामती), संतोष आडुळकर (सोलापूर), अनंत ठवकर (कोराडी), महिला प्रतिनिधी – शिल्पा बारापात्रे (नागपूर), आद्यश्री कांबे (अमरावती), श्रद्धा पोवार (मुंबई). महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही शासकीय वीज कंपन्यांतील सर्व अतांत्रिक संवर्गातील अतांत्रिक अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन कार्यकारिणी अधिक जोमाने प्रयत्न करेल, असे नवनिर्वाचित सरचिटणीस डॉ.शिवाजी तिकांडे यांनी सांगितले.
महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामगिरीचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव
नंदुरबार:सर्वाधिक अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून देशात प्रथम क्रमांक पटकावण्याच्या महाराष्ट्राच्या कामगिरीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या महावितरणचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने मुंबई येथे बुधवारी (२५ फेब्रुवारी) गौरव करण्यात आला. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमात ९२.७ बिग एफएम या लोकप्रिय रेडिओ चॅनलच्या वतीने विविध क्षेत्रात कल्पकता व नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती रितू तावडे आणि अभिनेत्री ईशा देवोल यांच्या हस्ते महावितरणच्या वतीने कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता श्री. प्रवीण परदेशी, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. भारत पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. आशिष शेलार, जेष्ठ अभिनेते बोम्मण ईराणी यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती. पुरस्कार वितरणाच्या नेत्रदिपक कार्यक्रमाला तर सिनेसृष्टी, सामाजिक, राजकीय, उद्योग, कला क्षेत्रातील नामवंत उपस्थित होत्या.
ग्राहकांना अचूक बिलासोबत विविध सुविधा उपलब्ध करून देणारे ८८.५० लाख अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्याच्या या यशात महावितरणची कामगिरी प्रमुख आहे. शंभर टक्के अचूक बिल, ग्राहकांना दर तासाला मोबाईलवर विजेचा वापर समजण्याची सुविधा, सवलतीच्या वीजदराच्या काळात अधिक वीजवापराची उपकरणे वापरण्याचे नियोजन करणे व विजेचा वापर नियंत्रणात ठेवण्याची संधी असे अनेक लाभ असलेले स्मार्ट मीटर महावितरणकडून मोफत बसविण्यात येत आहेत. स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती वीज ग्राहकांना दिवसाच्या वीज वापराबद्दल प्रती युनिट ८० पैसे टीओडी सवलतही देण्यात येत आहे. तसेच औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांनाही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज वापरासाठी वीजदरात सवलत देण्यात येत आहे.
राज्यात ९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत स्मार्ट मीटर जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात आला. यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्मार्ट मीटरच्या लाभांबाबत राज्यभरात जनजागृती करण्यात आली.
कृषी क्षेत्रातील सौर ऊर्जेच्या कामगिरीसाठी महावितरणला बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड
नंदुरबार: राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणचा नवी दिल्ली येथे बुधवारी (दि. २४) २०२६ च्या बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्डने गौरव करण्यात आला. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्याहस्ते मुख्य अभियंता श्री. ज्ञानेश कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात तब्बल १६ हजार मेगावॅट विकेंद्रीत सौर ऊर्जा निर्मितीसाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० ची अंमलबजावणी सुरू आहे. राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनीही या योजनेला मोठी गती दिली आहे.
बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्डसाठी रस्ते, बंदरे, वीज, शहरी वाहतूक, पाणी आदी ८ क्षेत्रांतील पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात येते. यंदा देशातील सुमारे १४५ प्रकल्पांचे मूल्यमापन करून निती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखालील २५ सदस्यांच्या निवड समितीने पुरस्कारांसाठी प्रकल्पांची निवड जाहीर केली. यात वीज क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणची देशपातळीवर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
जगातील सर्वांत मोठा विक्रेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्प असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० मध्ये आतापर्यंत १९८५ कृषीवाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात आले असून राज्यातील तब्बल १० लाख २५ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. या योजनेमुळे ६५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ७० हजारांवर ग्रामीण रोजगार निर्मिती सुरू आहे. तसेच महावितरणच्या वीज खरेदीमध्ये १० हजार कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये १३ हजार ५०० कोटींनी वार्षिक बोजा कमी होणार आहे. तब्बल २३१ विकासकांकडून या योजनेमध्ये १६ हजार मेगावॅटचे विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प वेगाने उभारण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करणे, वीज खरेदीचा व पर्यायाने अनुदानाचा बोजा कमी करणे, औद्योगिक व व्यावसायिक वीजदर कमी करणे यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत
(नंदुरबार) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु तांत्रिक माहिती भरताना चूक झाली आहे, अशा महिलांना आता माहिती सुधारण्याची 31 मार्च, 2026 पर्यंत संधी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करताना काही महिलांकडून कुटुंबातील सदस्यांच्या नोकरीविषयक माहितीबाबत (उदा. सरकारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक) नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला गेला आहे. यामुळे अशा लाभार्थ्यांच्या पात्रतेवर परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दुरुस्तीची अंतिम मुदत 31 मार्च 2026 असून ज्यांनी 31 डिसेंबर, 2025 पर्यंत ई-केवायसी (e-KYC) केले आहे आणि ज्यांच्याकडून पर्यायांची निवड करताना चूक झाली आहे, अशाच महिलांना योजनेच्या अधिकृत पोर्टलवर ही सुधारणा करता येईल.
जिल्ह्यातील संबंधित महिलांनी या संधीचा लाभ घेऊन मुदतीत आपली ई-केवायसी (e-KYC) माहिती अचूक करून घ्यावी. यानंतर कोणत्याही परिस्थितीत सुधारणेसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
अनुसूचित जातींच्या समाज हितासाठी सरकारकडून विविध शैक्षणिक योजना राबविण्यात येत आहेत.
सुरक्षित निवासाची सुविधा मिळावी यासाठी शासकीय निवासी शाळा आणि शासकीय वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक वातावरण आणि संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या योजनांचा उद्देश सामाजिक समता प्रस्थापित करणे आणि विद्यार्थ्यांना सक्षम भवितव्य घडविण्यासाठी बळ देणे हा आहे.
#EmpowerWomen#SupportForWomen#सामाजिक_न्याय#SJSA#SocialJusticeMaharashtra
राज्य आपत्ती संचालन केंद्र (एसईओसी) येथून आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला.
आखातातील नऊ देशांमध्ये युद्धाचा भडका उडाल्यामुळे तेथील परिस्थिती गंभीर बनली असून महाराष्ट्र शासनाने या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, अडकलेल्या नागरिकांची सुरक्षितता व त्यांच्या मदतीसाठी सर्व आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली.
आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची अचूक माहिती मिळावी, त्यांच्याशी थेट संपर्क साधता यावा आणि गरज पडल्यास तातडीने मदत पोहोचवता यावी, यासाठी शासनाने विशेष ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे.
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ या ‘सहायता’ पोर्टलवर संबंधित नागरिक किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक माहिती भरावी, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले आहे.
संत परंपरेतील तेजस्वी संत, वारकरी संप्रदायाचे प्रेरणास्थान आणि अभंगवाणीने समाजाला भक्ती
समता व सदाचाराचा मार्ग दाखवणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.
संत तुकाराम महाराज बीज निमित्त त्यांच्या विचारांमधून समाजात सद्भाव, समता आणि भक्तीभाव वृद्धिंगत होवो हीच प्रार्थना. ![]()
नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी NDDB आणि जिल्हा प्रशासनामध्ये सामंजस्य करार
नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी National Dairy Development Board (NDDB) आणि जिल्हा प्रशासन, नंदुरबार यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हा करार NDDB अध्यक्ष डॉ. मीनेश शाह यांच्या आभासी उपस्थितीत पार पडला. यावेळी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि NDDB चे कार्यकारी संचालक S Rajeev यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
दुग्ध व्यवसायाच्या सर्वांगीण विकासावर भर:
या सहकार्याच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देण्यात येणार आहे. विशेषतः महिला नेतृत्वाखालील गावपातळीवरील दूध उत्पादक संस्थांना बळकटी देणे, दूध उत्पादनक्षमता वाढविणे, दूध संकलन व हाताळणी व्यवस्थेत सुधारणा करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनाला प्रोत्साहन देणे या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
दुग्ध विकासासाठी मोठी क्षमता:
यावेळी बोलताना डॉ. डॉ. मीनेश शाह यांनी नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध विकासासाठी मोठी क्षमता असल्याचे नमूद केले. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून NDDB सातत्याने कार्यरत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दुग्ध क्षेत्र मजबूत करण्याची गरज:
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध क्षेत्र अधिक मजबूत करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. NDDB कडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे दुग्ध विकासाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
मुजकुवा येथे प्रात्यक्षिक पाहणी:
या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गुजरातमधील मुजकुवा येथे भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली. यामध्ये दूध संकलन केंद्र (DCS), सौरऊर्जा व बायोगॅस उपक्रम तसेच NDDB चे Genomics आणि OPU-IVF Laboratory यांची माहिती घेण्यात आली.
या भेटीत उपायुक्त पशुसंवर्धन संजय खाचणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. तुषार गीते तसेच KPMG सल्लागार शशिकांत मराठे उपस्थित होते.
या सामंजस्य करारामुळे नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाच्या आधुनिक व शाश्वत विकासाला चालना मिळून महिला सक्षमीकरण, ग्रामीण उद्योजकता आणि शेतकरी उत्पन्नवाढीसाठी नवे दालन खुले होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Ministry of Fisheries, Animal Husbandry and Dairying
Ministry of Cooperation, Government of India



