Home ‘इंडिया स्किल्स’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; ४ सुवर्ण पदकांसह एकूण १७ पदक केली प्राप्त

‘इंडिया स्किल्स’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; ४ सुवर्ण पदकांसह एकूण १७ पदक केली प्राप्त

मुंबई:  ‘वर्ल्ड स्किल्स’ स्पर्धेसाठी रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या ‘इंडिया स्किल्स २०२५-२६’ स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी ४ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची अशी एकूण १७ पदके प्राप्त केली आहेत. उत्तर प्रदेश येथे ग्रेटर नोएडा मधील इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट येथे ही स्पर्धा पार पडली. आगामी २०२७-२०२८ ची ही स्पर्धा मुंबईत होण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. या यशाबद्दल कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संपूर्ण चमूचे आणि विजेत्या खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केले आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ पार पडला आहे. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये अफाट कौशल्य आहे, हे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जागतिक स्तरावर भारताचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्या तरुणांमध्ये आहे. पदके जिंकणाऱ्या सर्व उमेदवारांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांचे मी अभिनंदन करतो. आगामी वर्ल्ड स्किल्स स्पर्धेतही महाराष्ट्र अशीच उत्तुंग कामगिरी करेल, याची मला खात्री आहे. महाराष्ट्र २०२७ मध्ये राज्यस्तरीय महिला कौशल्य चॅम्पियन्स ही स्पर्धा सुरू करणार आहे.

कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, उद्योग भागीदार व तांत्रिक संस्था यांनी हे यश मिळवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून विशेष मेहनत घेतली होती. सुमारे १५,२७५ नोंदणीकृत उमेदवारांमधून जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावरील चाळणी परीक्षेतून ५४ सर्वोत्तम उमेदवारांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली होती. स्पर्धेपूर्वी या उमेदवारांना तज्ज्ञांमार्फत विशेष ‘बूटकॅम्प’ प्रशिक्षण आणि मानसिक तयारीसाठी समुपदेशनही देण्यात आले होते. इंडिया स्किल्स स्पर्धेतील या विजयामुळे महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. २०२६ मध्ये चीनमधील शांघाय येथे सप्टेंबर मध्ये होणाऱ्या ‘वर्ल्ड स्किल्स’ स्पर्धेसाठी आता या विजेत्यांच्या प्रशिक्षणाची पुढील फेरी लवकरच सुरू होणार आहे.

Home डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ०३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असून, यावर्षीही विविध विभागांच्या समन्वयातून तो अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरा करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल, २०२६ रोजीच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस बैठकीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी राज्यमंत्री भाई गिरकर, माजी आमदार प्रकाश गजभिये, मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, भन्ते डॉ. राहूल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी यांच्यासह विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यामागील उद्देश केवळ औपचारिकता नसून त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे असा आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक असून, त्यातील समावेशकतेच्या तत्त्वामुळे भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. समाजाला मिळणाऱ्या संधी, हक्क आणि प्रगती यामागे कोणाचे योगदान आहे, हे नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे. त्यामुळे जयंती सोहळा हा केवळ उत्सव न राहता विचारांचा प्रसार करणारा पर्व ठरतो.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.१४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायी आणि नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची सर्वंकष व्यवस्था करण्यात यावी. उष्णतेपासून संरक्षण मिळावे यासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात यावेत. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध ठेवावी. तसेच, दादर आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून नियंत्रण ठेवावे, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.

नागरिकांना मार्गदर्शन होण्यासाठी विविध ठिकाणी सूचना फलक लावावेत. बेस्ट प्रशासनाने दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी दरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशासह जगभर मोठ्या प्रमाणावर साजरी होत असल्याचा उल्लेख करत, हा सोहळा अधिक उत्तम पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मंत्री संजय शिरसाट म्हणाले,भारतीय संविधान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम विभागामार्फत हाती घेण्यात आला असून, जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वसतिगृहांची उभारणी करण्यात येत आहे. जयंती सोहळ्याच्या निमित्ताने यावर्षी काही विशेष उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ड्रोनच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित भव्य ड्रोन शो चैत्यभूमी परिसरात सादर करण्यात येणार आहे.

या बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, लोकराज्य मासिकाचा विशेषांक, शासकीय जाहिरात व प्रसिध्दी याबाबत चर्चा झाली व याबाबत निर्देश देण्यात आले.

बैठकीत मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

Home पतसंस्थांच्या प्रगतीसाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा लवकरच – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पतसंस्थांच्या प्रगतीसाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा लवकरच – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: सहकार क्षेत्रात महिलांचे योगदान अमूल्य असून, सत्कारमूर्ती महिला भविष्यातील या क्षेत्राच्या ‘आयडॉल’ आहेत. महिलांच्या माध्यमातून सहकार चळवळीला नवी गती देण्यासाठी राज्य शासन आणि फेडरेशन एकत्रितपणे प्रयत्नशील असून, पतसंस्थांच्या प्रगतीसाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा लवकरच केल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य नागरी पतसंस्था फेडरेशन, मुंबई आणि भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महिला सहकार मेळावा’, एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आणि ‘सहकार सम्राज्ञी सक्षम महिला, सक्षम सहकार पुरस्कार’ वितरण सोहळा सायबर कॉलेज येथील आनंद भवन सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पालकमंत्री आबिटकर यांनी सहकार क्षेत्रातील महिलांच्या वाढत्या प्रभावाचे कौतुक केले. याप्रसंगी कोल्हापूर महापालिकेच्या महापौर रूपाराणी निकम, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा उर्फ काका कोयते, भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, सहसचिव भारतीताई मुथा, संचालिका नीलिमा बावणे, उपकार्याध्यक्ष अंजलीताई पाटील, गोदावरी अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांसह राज्यभरातील पतसंस्थांच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सहकारी पतसंस्थांच्या बळकटीकरणावर भर देताना पालकमंत्री पुढे म्हणाले की, राज्यातील पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. नागरी सहकारी पतसंस्थांकडून सोने तारण कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना ‘नाममात्र सभासद’ करून त्यांच्याशी व्यवहार सुलभ करण्यासाठी सहकार कायद्यात आवश्यक त्या सुधारणांचा प्रस्ताव सहकार आयुक्तांमार्फत शासनास सादर झाला आहे. तसेच तरलता निधीची गुंतवणूक जिल्हा बँकांव्यतिरिक्त अन्य बँकांमध्ये करण्याची मुभा मिळावी, यासाठीही पाठपुरावा सुरू असून लवकरच या संदर्भात शासन निर्णय जाहीर केला जाईल.

बचत गटांच्या चळवळीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या युनूस खान यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी अधिक सक्षम व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, यावेळी भागीरथी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना ‘सहकार श्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महापौर रूपाराणी निकम यांनी महिलांच्या मानसिक स्वास्थ्यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, महिलांना सध्याच्या काळात मोठे स्वातंत्र्य मिळत आहे, मात्र आर्थिक सक्षमीकरणासोबतच मानसिक संतुलन राखणेही महत्त्वाचे आहे. उद्योग-व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सातत्य आणि चिकाटीचा मंत्र त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमात अरुंधती महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महिलांच्या आर्थिक विकासासाठी अशा चर्चासत्रांचे आयोजन महत्त्वाचे आहे. ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी मोठ्या संधी उपलब्ध होत असून, प्रशिक्षणाच्या जोरावर जिल्ह्याच्या विकासामध्ये महिलांचा वाटा निश्चितच वाढणार आहे.

Home छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे नूतनीकरण पूर्ण करून १ मे रोजी लोकार्पणासाठी सज्ज करूया – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे नूतनीकरण पूर्ण करून १ मे रोजी लोकार्पणासाठी सज्ज करूया – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर: छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सी. पी. आर. चे नूतनीकरणाचे काम पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आलेले आहे. ही सर्व कामे एप्रिलअखेर पूर्ण करून १ मे रोजी महाराष्ट्रदिनी लोकार्पणासाठी सज्ज करूया, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण देणार असल्याची माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी  दिली.

मंत्री श्री. मुश्रीफ यांनी शेंडा पार्कमध्ये सीपीआरसह राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय, शासकीय ग्रामीण रुग्णालय पथक- कागल, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय -मौजे सांगाव, शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालय -पिंपळगाव खुर्द, शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय- उत्तुर या विविध शासकीय संस्थांची  आढावा बैठक घेतली.

 यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,  शेंडा पार्कमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात आल्यानंतर परदेशातील एखाद्या प्रगत देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात आल्यासारखे वाटले. हे संपूर्ण संकुल विकसित होईपर्यंत निधी तीन हजार कोटींच्या घरात जाईल.

सीपीआरच्या इमारतींसह भौतिक सेवासुविधा आणि यंत्रसामुग्रीसाठी २०० कोटीहून अधिक निधीतून नुतनीकरण होत आहे. या आढावा बैठकीत सीपीआरच्या मुख्य हेरिटेज इमारतीसह दूधगंगा इमारत, वेदगंगा इमारत, हिरण्यकेशी इमारत, सरस्वती इमारत येथील नूतनीकरणाची बहुतांशी कामे पूर्ण झाल्याचे सादरीकरण केले. हॉस्पिटलच्या आवारातील सर्व काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच; आठ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स पूर्ण झाली आहेत. मोठ्या इमारतींच्या टेरेसवर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी तयार केलेली १६ पैकी आठ निवारा शेड्स पूर्ण झाली आहेत,  आठ अंतिम टप्प्यात आली आहेत. बाह्यरुग्ण विभाग दुसऱ्या मजल्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

शेंडा पार्कमधील राजर्षी  छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील कामांबाबत माहिती देताना सदानंद भिसे यांनी सांगितले की, मुख्य प्रशासकीय इमारतीसह ऑडिटोरियम, शवागार, ग्रंथालय, परीक्षा भवन या इमारतींची सर्व कामे सेवा-सुविधांसह पूर्ण झाली आहेत. मुलींचे वस्तीगृह पूर्ण झाले आहे तर मुलांचे वस्तीगृह अंतिम टप्प्यात आले आहे.  या परिसरातील ६०० बेड्सचे सामान्य रुग्णालय, २५० बेड्सचे कॅन्सर रुग्णालय आणि २५० बेड्सचे अति विशेषोपचार (सुपर स्पेशलिटी) रुग्णालय यांची कामे पूर्ण करण्याची मुदत मार्च २०२७ अखेर आहे. या ईमारतींचे अकराव्या मजल्यापर्यंतचे काम पूर्ण होत आले आहे. उर्वरित सर्व कामे दि. ३१ मार्च २०२७ पर्यंत करावयाचे आहेत.

हेरिटेजचे सौंदर्य अबाधित…..!

सी. पी. आर. ची ऐतिहासिक जुनी मुख्य बिल्डिंग हेरिटेज म्हणजेच वारसास्थळ म्हणून जतन केली आहे. या इमारतीचे मूळ सौंदर्य तसेच ठेवून नूतनीकरण केल्याबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी कंत्राटदाराचे या बैठकीत कौतुक केले.

या बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलचे शासकीय शासकीय ग्रामीण रुग्णालय पथक, मौजे सांगाव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय तसेच उत्तुर येथील योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालय या संस्थांचाही आढावा घेतला. ही सर्वच कामे प्रगतीपथावर असून येत्या दोन वर्षात ही सर्व कामे पूर्ण होतील अशी माहितीही या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली.

   या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, मौजे सांगावच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता आयुर्वेदीक डॉ. अभिजीत अहीरे, उत्तुरच्या योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.भाग्यश्री खोत, डॉ.  गिरीश कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.

Home प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी अमरावती विभागात ‘महा-साधना सप्ताह’ – विभागीय आयुक्त नयना गुंडे

प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी अमरावती विभागात ‘महा-साधना सप्ताह’ – विभागीय आयुक्त नयना गुंडे

अमरावती : केंद्र शासनाचा क्षमता विकास आयोग (CBC) आणि ‘कर्मयोगी भारत‘ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.2 ते 8 एप्रिल, 2026 या कालावधीत देशभरात ‘साधना सप्ताह‘ आयोजित करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्यभर ‘महा-साधना सप्ताह’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे ठरवले आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या अंगभूत कर्मक्षमतेचा विकास व्हावा आणि त्यांच्या निरंतर ज्ञानसंवर्धनातून प्रशासकीय कार्यात गुणात्मक वाढ व्हावी, हा या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. यानुषंगाने विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘महा-साधना सप्ताहात’ सक्रियरित्या सहभाग नोंदवून ‘iGOT कर्मयोगी‘ पोर्टलवर उपलब्ध असलेले विविध अभ्यासक्रम पूर्ण करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

या सप्ताहाअंतर्गत अमरावती विभागातील सर्व शासकीय, निमशासकीय विभागांच्या अधिनस्त कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘iGOT कर्मयोगी‘ पोर्टलवर उपलब्ध असलेले विविध अभ्यासक्रम पूर्ण करणे अपेक्षित आहे. हे अभ्यासक्रम देशातील नामांकित संस्थांकडून तयार करण्यात आले असून ते विनामूल्य उपलब्ध आहेत. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने ‘iGOT कर्मयोगी‘ पोर्टलवर नोंदणी करुन उपरोक्त कालावधीत (दि.2 ते 8 एप्रिल 2026) किमान 4 तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.

या प्रशिक्षणांमुळे प्रशासनात तंत्रज्ञान (Technology), परंपरा (Tradition) आणि दृश्यमान परिणाम (Tangible Outcomes) या त्रिसूत्रीचा प्रभावी अवलंब होईल. प्रत्येक शासकीय विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पूर्ण केलेल्या प्रशिक्षणांचा विभागीय आुयक्तांनाकडून आढावा घेण्यात येणार आहे. विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या व्यावसायिक क्षमतेचा आणि ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी राज्य शासनाव्दारे आयोजित या ‘महा-साधना सप्ताहात‘ उर्त्स्फुतपणे सहभाग घेऊन प्रशिक्षण पूर्ण करावे, असे  आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे यांनी केले आहे.

Home पोलीस दलाची कार्यक्षमता व बौद्धिक वाढीसाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार – केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय

पोलीस दलाची कार्यक्षमता व बौद्धिक वाढीसाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार – केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय

नागपूर : पोलीस दलातील तांत्रिक ज्ञान आणि तपासाचे कौशल्य या मेळाव्यामुळे अधोरेखित झाले असून तपासातील गुणवत्ता व कार्यक्षमता वाढीसाठी हे आयोजन महत्त्वपूर्ण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकसीत भारतासाठी आंतरिक सुरक्षिततेची भक्कम जोड असणे आवश्यक आहे. ती जोड अशा मेळाव्यातून साध्य होत असल्याचे गौरोद्गार केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी काढले.

अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळावा 2025-26 च्या औचित्याने दिनांक 29 मार्च ते 3 एप्रिल कालावधीत पार पडलेल्या विविध स्पर्धांचा समारोप आज केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांच्याहस्ते पार पडला. नागपूर सिटी पोलीस मुख्यालयाच्या शिवाजी स्टेडियम येथे हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात देशभरातील 29 राज्यांतील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह केंद्रीय दलांचाही त्यात सहभाग होता. यावेळी विविध स्पर्धांमध्ये अव्वल आलेल्या राज्यांच्या संघांना गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आले.

या समारोपीय कार्यक्रमास पोलीस महासंचालक सदानंद दाते, अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, मधूकर पांडे, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, अप्पर पोलीस महासंचालक प्रविण साळूंखे, पोलीस महानिरिक्षक निसार तांबोळी, विशेष पोलीस महानिरिक्षक संदीप पाटील, इंटलिजेन्ट ब्युरोचे उपनिदेशक प्रदीप शेज्युळ आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय गृह राज्यमंत्री रॉय म्हणाले की, या मेळाव्यात लघु भारत दिसत असून देशभरातील पोलीस दल यात समाविष्ठ आहेत. या आयोजनात प्रतिभा व अनुशासनाचे प्रदर्शन दिसून येत असून देशासाठी या स्पर्धा प्रेरणादायी ठरतील असा विश्वास यांनी व्यक्त केला. पोलीस दलाने आधूनिक तंत्रज्ञानाची कास धरुन एआयद्वारे महत्वपूर्ण भूमिका साकारली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांचे अभिनंदन केले. तपास प्रक्रियेत स्वान स्कॉडची भूमिका पोलीस दलात महत्वपूर्ण ठरत आहे. अनेक गुन्ह्यात त्यांची भूमिका योग्य ठरली असून आधूनिक क्षमता दर्शविण्यातही ते पात्र ठरले आहेत.

अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धेत सर्वोच्च विजेता तेलंगना संघ ठरला. त्याचप्रमाणे कॉम्प्युटर अवेअरनेस अंतर्गत ‘ऑफिस ऑटोमेशन’ स्पर्धेत तेलंगना संघ विजेता तर बीएसएफ संघ उपविजेता ठरला. सायंटिफिक एज टू इन्व्हेस्टिगेशन या प्रकारात तामिळनाडू अ संघ विजेता ठरला. उपविजेता तेलंगना संघ ठरला असून कास्यपदकाचा मानकरी तामिळनाडू ब संघ ठरला. पोलीस फोटोग्राफी स्पर्धेत बीएसएफ संघ विजेता ठरला असून उपविजेता तेलंगना संघ ठरला. ‘अँटी सबोटाज चेक’ या स्पर्धेत तेलंगना संघ विजेता ठरला असून उपविजेता महाराष्ट्र संघ ठरला. पोलीस व्हिडिओग्राफी स्पर्धेत तेलंगना विजेता ठरला असून उपविजेता महाराष्ट्र संघ ठरला. कॉम्प्युटर अवेअरनेस या स्पर्धेत तेलंगना संघ विजेता तर बीएसएफ संघ उपविजेता ठरला. वेस्टआयटी स्पर्धेत आयटीबीपी संघाचे मनोजसिंग बिस्ट व अविन विजेता तर महाराष्ट्र संघाचे अकोलाचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व मजिद खान पठाण उपविजेते ठरले.
पोलिस डॉग स्पर्धा व डॉग बॉबी या दोन्ही स्पर्धेत सीआरपीएफ विजेते ठरले.

या मेळाव्यात ‘कॉम्प्युटर अवेअरनेस’, ‘पोलिस डॉग स्पर्धा’, ‘पोलिस व्हिडिओग्राफी’, ‘अँटी सबोटाज’ तपासणी, ‘सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन’ आणि ‘पोलिस फोटोग्राफी’ अशा सहा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विशेष म्हणजे या स्पर्धांनी पोलीस दलातील तांत्रिक ज्ञान आणि तपासाचे कौशल्य अधोरेखित केले आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनिल रामानंद यांनी उपस्थितांचे आभार मानले. नागपूरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य श्रीमती रिना जनबंधू तसेच गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षक पल्लवी बर्गे यांच्यासह वरीष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Home भाविक व पर्यटकांसाठी सुविधा अधिक दर्जेदार करण्याचे नियोजन करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

भाविक व पर्यटकांसाठी सुविधा अधिक दर्जेदार करण्याचे नियोजन करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या पांडवलेणी येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी सुविधा अधिक दर्जेदार करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिल्या.आज सकाळी मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी त्रिरश्मी डोंगरावरील पांडवलेणी व परिसराची पाहणी केली. यावेळी कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, उप वनसंरक्षक (पूर्व) राकेश सेपट, उपजिल्हाधिकारी शरद घोरपडे, मकरंद दिवाकर, वन प्रकल्प विभाग नाशिकचे विभागीय व्यवस्थापक सुजित नेवसे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक अधिक्षक अभियंता हेमंतकुमार हुकरे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संवर्धन संतोष महाजन, अभ्यासक रमेश पडवळ, पुरतत्व विद्यावेता धनश्री निगुडकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य सचिव श्री अग्रवाल यांनी पाहणी दरम्यान अभ्यासकांकडून लेण्यांचा इतिहास जाणून घेत २२ गुंफाची पाहणी केली. लेणी परिसरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, संवर्धन व पर्यटन विकासाच्या कामांचा आढावा घेतला. परिसरातील पायाभूत सुविधा, प्रवेशमार्ग, पायऱ्या, सुरक्षा व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे व माहितीफलक यांची पाहणी करून मार्गदर्शक सुचना केल्यात. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन या  सुविधा अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या ऐतिहासिक वारसा स्थळाचे जतन व संवर्धन करताना पुरातत्त्वीय महत्त्व अबाधित ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. लेणी परिसरात पार्किंग व्यवस्था, मार्गदर्शक फलक, प्रकाशयोजना आणि डिजिटल माहिती प्रणाली विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यानी यावेळी दिल्या.

Home अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी ‘महा-साधना सप्ताह’; ८ एप्रिलपर्यंत व्यापक प्रशिक्षण मोहीम

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी ‘महा-साधना सप्ताह’; ८ एप्रिलपर्यंत व्यापक प्रशिक्षण मोहीम

छत्रपती संभाजीनगर: शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी केंद्र शासनाच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत २ ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘महा-साधना सप्ताह’ राबविण्यात येत असून, या उपक्रमात विभागातील सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

भारत सरकारचा क्षमता विकास आयोग (CBC) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष प्रशिक्षण उपक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘iGOT कर्मयोगी भारत’ पोर्टलवर लॉग इन करून किमान ४ तासांचे अभ्यासक्रम पूर्ण करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय यंत्रणेला अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानस्नेही आणि परिणामकारक बनविणे हा आहे. डिजिटल गव्हर्नन्स, वेळ व्यवस्थापन, निर्णयक्षमता वाढविणे, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित साधनांचा प्रभावी वापर या बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे.

“सतत नवीन शिकणे आणि स्वत:ला अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज आहे. महासाधना सप्ताह हा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी मोठी संधी आहे. सर्वांनी नियोजनबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवून यशस्वी करावा,” असे पापळकर यांनी नमूद केले.

या सप्ताहात सहभागी होत असताना अधिकारी व कर्मचारी आपले नियमित कामकाज सांभाळूनच ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणार असल्याने कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, तर उलट कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी केला.

यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे तीन अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना ‘एआय दक्ष’ बॅज, तर मार्केटप्लेसवरील विस्तारित अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना ‘कर्मयोगी उत्कर्ष’ बॅज देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना ‘TECH-वारी 2.0’ मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर शासकीय कार्यालयांनी या उपक्रमात १०० टक्के सहभाग सुनिश्चित करून विभागाची कामगिरी अधिक भक्कम करावी, असेही आवाहन श्री. पापळकर यांनी केले आहे.

Home पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ या परीक्षेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणी पूर्वी प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. आता सुधारित कार्यक्रमानुसार ही शारीरिक चाचणी १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ या परीक्षेचा निकाल ९ मे २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता. परीक्षेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणी पूर्वी प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती.

आता सुधारित कार्यक्रमानुसार ही शारीरिक चाचणी १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे. चाचणी नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर १७, कळंबोली येथे पार पडणार असून ती डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे.

उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या तयारीच्या दृष्टीने याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. चाचणीचा सविस्तर कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

Home महाराष्ट्र पोलिसांतर्फे आयोजित ६९ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा (२०२५-२०२६)

महाराष्ट्र पोलिसांतर्फे आयोजित ६९ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा (२०२५-२०२६)

मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व तसेच राज्यमंत्री @adv._ashish_jaiswal, खासदार @shyambarve5 आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.

या मेळाव्यात गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस संशोधन व विकास ब्युरो तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचा सहभाग होता. यावेळी संशोधन आणि संगणकविषयक जनजागृती यांवर सखोल चर्चा करण्यात आली, तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.

#आपले_मपो

error: Content is protected !!