मुंबई : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाप्रती असलेल्या वचनबद्धतेनुसार माहिती संकलन आणि प्रसाराची गुणवत्ता तसेच कार्यक्षमता सुधारण्यासह निर्धारित वेळेत कार्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने जनगणना 2027 व्यापक प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच स्व-गणना पध्दत सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून व्यक्तींना जनगणनेशी निगडित त्यांचा कौटुंबिक तपशील स्वतंत्रपणे ऑनलाइन पूर्ण भरता येईल, आणि सादर करता येईल.
देशात प्रथमच, 2027 च्या जनगणनेच्या माहितीचे संकलन डिजिटल पद्धतीने केले जाईल, ज्यामध्ये स्व-गणना हा देखील एक पर्याय असेल. महाराष्ट्र राज्यासाठी, घर-यादी आणि गृहगणनेचा कालावधी सुरू होण्यापूर्वी स्व-गणना करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून तो 1 मे 2026 ते 15 मे 2026 असा आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत, महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी माहिती दिली की, भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने एक समर्पित वेब पोर्टल विकसित केले असून हे पोर्टल म्हणजे जनगणनेत सहभागी होण्यासाठी एक सुरक्षित आणि सुलभ माध्यम आहे. अधिकृत पोर्टल https://se.census.gov.in येथे पाहता येईल.
कुटुंबातील कोणताही एक सदस्य अंदाजे 15-20 मिनिटांत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबाचा तपशील देऊ शकतो अशी माहिती महाराष्ट्र जनगणना कार्य संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यावर, एक स्व-गणना ओळखपत्र (एसईआयडी) तयार केले जाईल आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर/ई-मेलवर पाठवले जाईल. स्व-गणना प्रक्रियेदरम्यान कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
स्व-गणना करणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही. जर कोणी स्व-गणना केली नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही; माहिती गोळा करण्यासाठी/नोंदवण्यासाठी प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान प्रत्येक घरी भेट देतील असे डांगे यांनी सांगितले.
स्व-गणना पर्यायांतर्गत व्यक्ती त्यांची माहिती स्वतःच ऑनलाईन स्वरुपात https://se.census.gov.in येथे भरु शकतील. स्व-गणनेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक एसई आयडी येईल. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत जेव्हा गणनाकार तुमच्या घरी भेट देतील, तेव्हा हा एसई आयडी त्यांच्यासोबत सामायिक करणे आवश्यक आहे. गणनाकाराकडून एसई डेटाची पडताळणी/मान्यता झाल्यानंतरच घर-यादी आणि गृहगणनेसाठीची गणना पूर्ण मानली जाईल.
‘घर-यादी आणि गृहगणना’ या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात प्रगणक ज्यावेळी घरी भेट देतील त्यावेळी स्व-गणना डेटाची पडताळणी, पुष्टीकरण आणि तो अंतिमतः सादर करण्यासाठी एसई आयडी सामायिक करणे आवश्यक असेल. स्व-गणना पोर्टलद्वारे सादर केलेला सर्व डेटा एनक्रिप्ट केला जातो आणि कडक सायबर सुरक्षा आणि गोपनीयतेच्या उपाययोजनांसह सुरक्षित सरकारी सर्व्हरमध्ये संग्रहित केला जातो. प्रत्येकाने योग्य यूआरएल, म्हणजेच https://se.census.gov.in, ला भेट देत असल्याची खात्री करावी आणि एसएमएस/ई-मेल संवादांची सत्यता पडताळून पाहावी, असा सल्ला देण्यात येत आहे.
स्वगणना करणाऱ्या नागरिकांनी हे सुनिश्चित करावे की ते https://se.census.gov.in या योग्य युआरएल ऍड्रेसलाच भेट देत आहेत तसेच ज्या एसएमएस /ई-मेल श्रेणीतून वन टाइम पासवर्ड (ओटीपी ) प्राप्त झाला आहे, त्याची सत्यता पडताळून पाहावी.
एसएमएस /ओटीपी द्वारे प्राप्त झालेल्या जनगणनेशी संबंधित सर्व संदेशांमध्ये प्रेषकाच्या नावात RGICEN हा कीवर्ड असतो, उदा. AD-RGICEN-S, BD-RGICEN-S, RGICEN-G, JK-RGICEN-G इत्यादी.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील जनगणना २०२७ च्या स्वगणनेचा शुभारंभ
बीड: राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज जनगणना २०२७ अंतर्गत स्वगणनेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. त्यांनी https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः लॉगिन करून स्वतःची प्राथमिक माहिती भरत स्वगणनेचा शुभारंभ केला.
१ मे ते १५ मे दरम्यान होणाऱ्या स्वगणना व घरगणनेच्या प्रक्रियेचा यावेळी औपचारिक प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हाधिकारी मा. विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.जितीन रहमान व पोलीस अधीक्षक मा. नवनीत कावत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मा.शिवकुमार स्वामी व उपजिल्हाधिकारी मा. शैलेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा जनगणना कार्यालयाच्या वतीने उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे व जिल्हा समन्वयक आशिष शिंदे यांनी स्वगणनेची माहिती सांगितली. जनगणना ही देशाच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, सर्व नागरिकांनी स्वगणनेत सहभागी होऊन अचूक माहिती देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री मा.सुनेत्राताई पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षेसाठी अर्जाची मुदतवाढ
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन १४ मे २०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आयोगाने ९ एप्रिल २०२६ रोजी जाहिरात (क्र. ०११/२०२६) प्रसिद्ध केली होती. त्यानुसार अर्ज प्रक्रिया सुरू असताना काही उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे मिळण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अर्ज सादरीकरणाची अंतिम मुदत आता १४ मे २०२६, रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच, ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत १४ मे २०२६ पर्यंतच ठेवण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत काढण्याची अंतिम तारीख १६ मे २०२६ असून, चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम मुदत १८ मे २०२६ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, ९ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मूळ जाहिरातीतील इतर अटी व तरतुदींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. संबंधित शुद्धिपत्रक आणि मूळ जाहिरात आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध असल्याची माहिती उपसचिव सं. पां. देशमुख यांनी दिली आहे.
मुंबईतील बीकेसी येथे २ ते १४ मे दरम्यान महालक्ष्मी सरस चे आयोजन
मुंबई : महालक्ष्मी सरस महाराष्ट्रात महिलांच्या सक्षमीकरणाचे एक प्रभावी प्रतीक म्हणून उदयास येत आहे. राज्यात ५० लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’ सक्रिय आहेत. या महिला केवळ उद्योजिका नसून, त्या रोजगार निर्माण करणाऱ्या तसेच आपले कुटुंब व समाजाच्या आर्थिक प्रगतीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या ठरत आहेत. अशा महिला उद्योजकांचे ‘महालक्ष्मी सरस’ हे प्रदर्शन २ ते १४ मे या कालावधीत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन महिला उद्योजिकांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणारी आणि सर्वसामान्य नागरिकांना वेगळा अनुभव देणारे ठरेल, असा विश्वास ‘उमेद-एमएसआरएलएम‘चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मुंबई प्रेस क्लब येथे प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उमेदचे मुख्य परिचालन अधिकारी निखिल ओसवाल उपस्थित होते. यावेळी निलेश सागर म्हणाले की, उमेद अभियानांतर्गत महालक्ष्मी सरस आता एक व्यापक रूप धारण करत आहे. या माध्यमातून महिलांना रोजगारासोबत आत्मनिर्भरता, नेतृत्व आणि सामाजिक ओळख मिळत आहे. ही चळवळ ग्रामीण महिलांना संघटित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. महिला उद्योजिका आता पूर्वीप्रमाणे केवळ वाळवणीचे पदार्थ नव्हे तर ग्रामीण भागात शेतमाल आधारित प्रक्रिया उद्योगही उमेदीने करत आहेत. महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनसारख्या उपक्रमाद्वारे महिला उद्योजिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. आतापर्यंत महिलांना ५०,००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरित करण्यात आले आहे. केवळ मागील वर्षातच १०,००० कोटी रुपयांचे कर्ज महिला उद्योजिकांना देण्यात आले. महत्वाचे म्हणजे महिला उद्योजिकांचे कर्ज परतफेडीचे प्रमाण हे तब्बल ९८ टक्के आहे. राज्यात ५० लाखांपेक्षा जास्त लखपती दीदी निर्माण झाल्या असून, त्यांच्या उत्पन्नात सातत्य राहावे, यासाठीही शासन स्तरावर प्रयत्न सुरु असल्याचे निलेश सागर यांनी सांगितले.
या प्रदर्शनात एकूण ५०० स्टॉल्स उभारण्यात असून यात यामध्ये महाराष्ट्रातील २३०, इतर राज्यातील ६६, नाविन्यपूर्ण उपक्रम करणाऱ्या महिला गटांचे ६८ तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे (एफपीओ) ३४ स्टॉल्स समाविष्ट आहेत. याशिवाय नाबार्ड, माविम, खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई महानगरपालिका तसेच आदिवासी व कृषी विभागासह विविध शासकीय संस्थांचे २२ स्टॉल्सही यात आहेत. प्रदर्शनातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे ८० स्टॉल्सचा वातानुकूलित फूड कोर्ट, जिथे राज्यातील विविध भागातील महिलांनी तयार केलेले पारंपरिक व स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध असतील. तसेच हातमागाची वस्त्रे, वारली व बंजारा कला, लाकडी खेळणी, आकर्षक दागिने आणि इतर ग्रामीण उत्पादने खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. खरेदी केलेल्या सामानाच्या पिशव्या ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. उमेद परिवारात जवळपास ६५ लाख सदस्य आहेत. त्यांना येथे आपआपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे, असे निलेश सागर यांनी सांगितले.
पुढे म्हणाले की, यावर्षी महालक्ष्मी सरसमध्ये एआर फोटोग्राफी, अॅनामॉर्फिक वॉल्स आणि इन्फोग्राफिक वॉल्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि गर्भवती महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी २५ किलोमीटर परिसरात मोफत होम डिलिव्हरीची सुविधादेखील उपलब्ध आहे. येथे महाराष्ट्राव्यतिरिक्त केरळ, गुजरात, बिहार, तामिळनाडू, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश यासह अनेक राज्यांचे ६० पेक्षा जास्त स्टॉल्स राहतील.
ते पुढे म्हणाले की, महिलांना केवळ विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा शासनाचा उद्देश नाही, तर त्यांना संघटित, टिकाऊ आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उद्योजिका बनवण्याचे ध्येय आहे. महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ‘लोकल टू ग्लोबल’ ही संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. यावर्षी ‘कंटेनर’ या संकल्पनेद्वारे महिला उद्योजकता आता निर्यात, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि जागतिक संधींकडे झपाट्याने वाटचाल करत असल्याचा संदेश देण्यात आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म, ब्रँडिंग आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून महिलांना नवी ओळख मिळवून देण्यासाठी आणि त्यांची उत्पादने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी शासन शासन कटिबद्ध आहे, असेही श्री सागर यांनी यावेळी सांगितले.
महालक्ष्मी सरस आता केवळ वार्षिक उपक्रम न राहता दीर्घकालीन आर्थिक परिवर्तनाचे मॉडेल बनत आहे. हा पुढाकार ग्रामीण महिलांना आर्थिक समावेशन, डिजिटल सशक्तीकरण आणि ब्रँडिंगसारख्या महत्त्वाच्या घटकांशी जोडत आहे. आजची महिला उद्योजिका केवळ उत्पादने विकत नाही, तर आपल्या प्रदेशाची सांस्कृतिक ओळखही जागतिक स्तरावर पोहोचवत आहे. भविष्यात ई-कॉमर्स, निर्यात जाळे आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीद्वारे या उपक्रमाचा अधिक विस्तार होईल. यामुळे महिलांच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच महाराष्ट्राच्या एकूण अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल, असा विश्वास निलेश सागर आणि निखिल ओसवाल यांनी यावेळी व्यक्त केला.
‘आपले सरकार’ वेबपोर्टल लवकरच पूर्ववत ; तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम – मंत्री आशिष शेलार
मुंबई: राज्यातील नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा पुरविणारे ‘आपले सरकार’ वेबपोर्टल तांत्रिक अडचणींमुळे तात्पुरते बंद असले तरी ते लवकरच पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. या अडचणी दूर करण्यासाठी तज्ज्ञ समिती युद्धपातळीवर कार्यरत असून, प्रणाली अधिक सक्षम आणि सुरक्षित बनविण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
२७ एप्रिलच्या रात्रीपासून तांत्रिक कारणास्तव बंद पडलेल्या या पोर्टलमुळे जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती अर्ज तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज यांसारख्या सेवांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. दररोज लाखो नागरिक या पोर्टलचा वापर करत असल्याने निर्माण झालेली गैरसोय लक्षात घेऊन शासनाने तातडीने उच्चस्तरीय पावले उचलली आहेत.
या पार्श्वभूमीवर मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाआयटीचे पदाधिकारी उपस्थित होते. तांत्रिक अडचणींचे मूळ कारण शोधून त्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आयटी तज्ज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञान प्रमुखांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने प्राथमिक तपासणी पूर्ण केली असून आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
पोर्टल अधिक सुरक्षित, स्थिर आणि वेगवान करण्यासाठी सुधारणा करण्यात येत असून, मायक्रोसॉफ्ट, डेल आणि कॉमवॉल्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या भारतीय प्रतिनिधींशी समन्वय साधून मार्गदर्शन घेतले जात आहे. सर्व तांत्रिक यंत्रणा आणि तज्ज्ञ टीम्स २४x७ कार्यरत असल्याचेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.
दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून पोर्टल लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करत नागरिकांनी सहकार्य करावे व सेवा केंद्रांशी संपर्कात राहावे, असे आवाहन विभागाने केले आहे.
‘आपले सरकार’ हे राज्यातील नागरिकांसाठी सेवा वितरणाचे महत्वाचे डिजिटल व्यासपीठ आहे. सध्या उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून, प्रणाली अधिक सक्षम व सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे. पोर्टल लवकरच पूर्ववत सुरू करून नागरिकांना अखंडित सेवा देण्याच्या सूचना मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या विकासाचे प्रवेशद्वार गोंदिया जिल्हा : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे
गोंदिया : महाराष्ट्राच्या विकासाचे प्रवेशद्वार गोंदिया जिल्हा असून जिल्ह्यात विपुल प्रमाणात वनसंपदा आहे. या जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या अनेक संधी असल्याचे प्रतिपादन राज्याचे वस्त्रद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आज शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात केले.
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनाचा शासकीय सोहळा पोलीस मुख्यालय मैदान, कारंजा येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी श्री. सावकारे बोलत होते. या मुख्य शासकीय कार्यक्रमात आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, भारतीय वन सेवेचे अधिकारी पवन कुमार जोंग, यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री. सावकारे यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या देशभक्तांना अभिवादन केले. महाराष्ट्र संतांची, शूरवीरांची, समाजसुधारकांची भूमी असल्याने महाराष्ट्र देशात पुरोगामी म्हणून ओळखला जातो. याप्रसंगी त्यांनी नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन नागरिकांना विकसित महाराष्ट्र करण्यासाठी आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र अर्थव्यवस्थेत नक्कीच चांगली कामगिरी करीत असून भविष्यातही करणार असल्याचे म्हणाले.
श्री. सावकारे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत गोंदिया येथे तालुकास्तरीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील ३०९४० विविध शासकीय लाभांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. उर्वरित टप्प्यातील शिबिरे होणार असून नागरिकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा, असे ते यावेळी म्हणाले.
गतिमान प्रशासन योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये नवीन २५ तलाठी कार्यालय बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्यामार्फत निधी देण्यात आला असून यामुळे तलाठी साजामध्ये कामकाजाला वेग येईल आणि नागरिकांना त्यांच्या सेवा तात्काळ उपलब्ध करून देण्यात मदत होईल, असे यावेळी नागरिकांना आश्वस्थ केले.
भारतात जनगणना सुरू झाली असून जनगणनेमुळे लोकसंख्येची आकडेवारी कळते. अर्थव्यवस्था, साक्षरता, शिक्षण, निवास, घरगुती सुविधा, शहरीकरण, प्रजनन दर, अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या, भाषा, धर्म, स्थलांतर, दिव्यांगत्व इत्यादी माहिती प्राप्त करण्याचा हा विश्वासार्ह स्रोत आहे. जनगणना ही नागरिकांचे लाभासाठी विविध कल्याणकारी योजनांचे नियोजन करण्याकरिता अतिशय महत्त्वाची पायाभूत माहिती उपलब्ध करून देणारे व प्रत्यक्षात राष्ट्र निर्माणाच्या व्यापक कामाचा महत्त्वाचा भाग आहे. जनगणनेची नोंद व माहिती ही पूर्णपणे गोपनीय राहते. तरी आपण सर्वांनी जनगणना २०२७ च्या राष्ट्रीय कार्याला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी मंचावरून केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून ज्ञानभारतम् हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत ७५ वर्ष पूर्वीचा अभिलेख हस्तलिखित यांचा जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेमध्ये हा विषय मांडणे बाबत सूचित करण्यात आलेले आहे. सर्व संबंधित तलाठी, ग्रामसेवक व अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरोघरी जाऊन याबाबत विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत व भारताच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे, असे सांगून जिल्हयातील नागरिकांकडे असणारा हस्तलिखित वारसा उपलब्ध करून दिल्यास भविष्यातील पिढीला तो कळेल, असे ते याप्रसंगी म्हणाले.
जिल्ह्यातील आरोग्य विभाग चांगली कामगिरी करीत असून राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जिल्ह्यातील कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि देवरी ग्रामीण रुग्णालयाला मिळालेला आहे. राज्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबविण्यात येत असून गोंदिया जिल्ह्याला द्वितीय मानांकनामुळे क्षयरोग विभागास महाआरोग्य सन्मान २०२६ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचा त्यांनी उल्लेख केला.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा नागपूर ते गोंदिया विस्तार करण्यात येणार आहे. तसेच गोंदिया ते बल्लारशाह व गोंदिया ते जबलपूर या रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण होणार असल्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
श्री. सावकारे पुढे म्हणाले, रस्ते हे विकासाचे महामार्ग असतात. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वर्ष २०२४-२५ मध्ये भाग २ अंतर्गत गोंदिया जिल्ह्याला १२२.४८ कि.मी. लांबीचे २७ रस्ते मंजूर करण्यात आले असून त्यातील १५ कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित १२ कामे जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे आणि ही कामे विहीत वेळेत पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला.
यासह त्यांनी सहकार विभागामार्फत राज्यातील प्राथमिक कृषी पत पुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्यात येणार असल्याचे सांगून गोंदिया जिल्ह्यातील ३२९ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थापैकी १२१ सहकारी संस्थांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील नागरिकांना ऑनलाईन सुविधा पुरविण्याकरिता १२७ सेवा सहकारी संस्थांकडे सी.एस.सी. सेंटरचे कामकाज प्रत्यक्षात सुरु झालेले आहेत, असेही सांगितले.
ते पुढे म्हणाले, आदिवासी विकास मंडळामार्फत आणि उर्वरित भागात मार्केटिंग फेडरेशनद्वारे वर्ष २०२५-२६ मध्ये ३१ मार्च २०२६ पर्यंत एकूण एक लाख ७५ हजार ५२ शेतकऱ्यांकडून ३३.६७ लक्ष क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे.१७ एप्रिल २०२६ पर्यंत आदिवासी विकास महामंडळामार्फत आणि मार्केटिंग फेडरेशनमार्फत जिल्ह्यात एकूण एक लाख ६ हजार ९८ धान उत्पादक शेतकऱ्यांना ७८६.८९ कोटी रुपये रक्कम अदा करण्यात आली आहे. रब्बी हंगामात धान व मका लागवड केलेल्या शेतकऱ्यांची खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी, असे ते यावेळी म्हणाले.
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर ‘नमो शेतकरी महासन्माननिधी’ ही योजना राज्य शासन राबवित असून प्रतिवर्षी सहा हजार रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात येते. या आर्थिक वर्षात नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्यात ८५ कोटी ८९ लाख ५४ हजार रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १०१ लाभार्थी शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभाग चांगले काम करीत असून अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ (सुधारित अधिनियम २०१५) अंतर्गत कुटुंबातील एका पात्र वारसदारास शासनाच्या आस्थापनेवर घेण्यात येते. याअंतर्गत जिल्ह्यातील ०८ वारसदारांना नुकतेच नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले आहे. यामुळे त्या कुटुंबातील लोकांना आर्थिक आधार मिळालेला आहे असून यापुढे मुख्य प्रवाहात येऊन चांगल्या पद्धतीने जीवन जगतील अशा सदिच्छा दिल्या.
२०२६-२७ या वर्षामध्ये जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कामांच्या नियोजनाचे आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू करण्यात आलेली असून जास्तीत जास्त कुटुंबांना १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
गोंदिया जिल्हा हा शेततळ्यांचा जिल्हा आहे. या शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन मोठ्या प्रमाणात केले जाते, त्यातुन आर्थिक उत्पन्नही होत असते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना दिला जातो. विविध शासकीय योजनांशी जोडण्यासाठी राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेले आहे, यात जिल्ह्यात ८२७१ नोंदणी करण्यात आल्या असून या सर्व नोंदणी शासनाने मंजूर केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस दल उत्कृष्ट काम करीत आहे. केंद्र सरकारच्या गृह खात्याने ३१ मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण देशातून नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. जिल्ह्यात पोलिसांच्या प्रभावी उपाययोजनेमुळे १६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. पूर्वाश्रमीचे नक्षलवादी आता नवीन संवैधानिक आयुष्याला सुरुवात करीत आहेत. पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण प्रमाणपत्र बहाल करून त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबवलेल्या योजनांचा लाभ दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील अतिदुर्गम परिसरात विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी पूर्ण करण्याच्या उद्देशाने – पोलीस दादालोरा खिडकी योजनेंतर्गत ‘एक हात मदतीचा’ हा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. या वर्षभरात १३ योजनांचा लाभ ९८०७ नागरिकांना मिळवून दिला आहे, तर आतापर्यंत २२ उपक्रमांतर्गत ४४४७६ लाभार्थ्यांना शासनाच्या विविध कागदपत्रांचा लाभ मिळवून देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागामार्फत सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय व लोककल्याणकारी योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यात येत आहे. या वर्षापासून २८ एप्रिल हा दिवस लोकसेवा हक्क दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती मंजुश्री देशपांडे यांनी केले.
क्षणचित्रे :–
- प्रारंभीवस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व परेडचे निरीक्षण केले.
- जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ ला आजच झाली असून, यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या व कामगार दिनाच्या तसेच आज बुध्द पौर्णिमा असल्याने नागरिकांना श्री. सावकारे यांनी शुभेच्छा दिल्या.
- पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल देवरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारीविवेक पाटील, सर्वश्री पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पवनप्रसाद मिश्रा, नक्षलसेलचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे, सहायक पोलीस निरीक्षक संजय नाईक, सर्वश्री पोलीस हवालदार लियानार्ड मार्टीन, प्रकाश गायधने, अनिल कोरे, सर्वश्री पोलीस शिपाई भाष्कर हरिणखेडे, अतुल कोल्हाटकर यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सत्कार.
- महसूल विभागात उत्कृष्ट कार्याबद्दल तहसिल कार्यालय गोंदिया तलाठी रश्मी पारधी यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सत्कार.
- पथसंचलनात महाराष्ट्र राखीव बटालीयन पोलीस पथक, पुरुष पोलीस पथक, महिला पोलीस पथक, पुरुष होमगार्ड पथक, महिला होमगार्ड पथक, पोलीस बॅन्ड पथक, श्वान पथक, रुग्णवाहिका पथक व अग्नीशमन दल आदींचा समावेश होता.
- पूर्वाश्रमीचे नक्षलवादी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिन सोहळ्यात उपस्थित होते.
कामगारांच्या कष्टांवर महाराष्ट्राचे वैभव उभे – मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई : कामगारांच्या कष्ट आणि योगदानामुळेच महाराष्ट्राचे वैभव उभे राहिले असून राज्य प्रगतीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. ध्वजवंदनास जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापुरे, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, महेश हरिश्चंद्रे, महादेव किरवले, प्रशांत पानवेकर, भूमी अभिलेख अधीक्षक धनाजी धायगुडे, आणीबाणी काळात कारावास भोगलेले स्वातंत्र्यसेनानी तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुरक्षा रक्षक समीर कोळवणकर, सुरक्षा रक्षक कृष्णात पाटील आणि सुरक्षा पर्यवेक्षक प्रमोद महाले यांचा विशिष्ट सेवेसाठी कामगार विभागामार्फत मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महिला व बाल विकास विभागामार्फत सन 2020-21 वर्षीचा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार श्रीमती सीमा देशपांडे यांना, सन 2021-22 चा पुरस्कार शैलजा गंटूक यांना आणि सन 2022-23 चा पुरस्कार श्रीमती कुंदा फाटक यांना देण्यात आला. त्याचप्रमाणे क्रीडा विभागामार्फत सन 2021-22 करिता राही या सामाजिक संस्थेला आणि सन 2024-25 करिता ममता सामाजिक संस्थेला जिल्हा युवा पुरस्कार देण्यात आला. यावेळी विघ्नेश मुरकर यांनाही सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
लोकभवन येथे महाराष्ट्र दिन, राष्ट्रध्वजाला मानवंदना
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन, मुंबई येथे राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.यावेळी राष्ट्रगान, राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. राज्यपालांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मिठाई वाटप केले.
यावेळी राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस.राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ.निशिकांत देशपांडे, लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते.
सर्व नागरिकांनी स्व-गणनेत सहभाग घेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे -मंत्री जयकुमार गोरे
सोलापूर : जनगणना 2027 ही भारताची 16 वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना असून ही पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना आहे. सदर जनगणना ही केवळ लोकसंख्या व अनुषंगिक माहिती बाबत नसून ती एक भविष्यातील विकासाचे मापदंड ठरविण्याची प्रक्रिया आहे. आजपासून ते 15 मे 2026 पर्यंत स्व-गणनेस सुरुवात होत आहे. तरी जिल्हयातील सर्व नागरिकांनी स्व-गणनेत सहभाग घेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड येथे शासकीय राष्ट्रध्वजवंदन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महापालिका आयुक्त सचिन ओंबसे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्वातंत्र्य सैनिक, आणीबाणी विरोधी योद्धे, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी व अन्य मान्यवर विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील कृषी क्षेत्राने सन २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. जिल्ह्यातील शेतक-यांना शासनाच्या विविध योजनांचा मोठा लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत ४ लाख ८६ हजार लाभार्थ्यांना ९७ कोटी ३९ लाख रुपये थेट खात्यात जमा झाले आहेत. तसेच यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खते व बियाणे मुबलक व समप्रमाणात पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 या आर्थिक वर्षात 783 कोटी निधी मंजूर होता. या सर्व निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे घेण्यात आलेली असून 100% टक्के निधी खर्च झाला आहे. तर जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला 842 कोटी निधी मंजूर आहे. सदर निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कामे हाती घेता येतील. सोलापूर वासियांचे विमान सेवा सुरु करण्याचे अनेक दिवसाचे स्वप्न साकार झाले असून सध्या मुंबई, गोवा याठिकाणी विमानसेवा सुरु झाली असून नजीकच्या काळात तिरुपती हैद्राबाद व पुणे या सेवा सुरु होतील. सदर विमान सेवेमुळे सोलापूर मधील उद्योग व्यवसायास चालना मिळाली आहे. भविष्यामध्ये सोलापूर विमानतळामध्ये लवकरच नाईट लँडींगची सुविधा सुरु करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
सोलापूर येथील सुशिक्षित युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन IT पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु आहे. नवीन IT पार्कमुळे सोलापूरमधील उच्च शिक्षित युवकांना स्थानिक रोजगार मिळणार आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे सोलापूर शहरवासियांना नियमित, स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी 1378 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, असे पालकमंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर कॉरिडॉर उभारण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. अयोध्या, काशी विश्वेश्वर, उज्जैन यासारखी धार्मिक स्थळे जशी विकसित होत आहेत, त्याधर्तीवर विठूरायाच्या पंढरी नगरीचा विकास व्हावा हीच भावना या आराखडयामध्ये आहे. जगतगुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांचे मंगळवेढा येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने स्वत:च्या मालकीची १५ एकर जागा उपलब्ध करुन दिली असून स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. संत शिरोमणी सावता महाराज यांचे अरण येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने १५० कोटी निधीचा आराखडा मंजुर केला असून त्यापैकी १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे, अशी माहिती पालकमंत्री श्री. गोरे यांनी दिली.
आजच्या या मंगलदिनी मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या 105 हुतात्म्यांना तसेच महाराष्ट्र निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात महान विभूतींना पालकमंत्री श्री गोरे यांनी अभिवादन केले. या सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, कामगार, विद्यार्थी व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य सैनिक, अन्य मान्यवर नागरिक यांची भेट घेतली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत, वंदे मातरमचे गायन झाले. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन झाले व राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. परेड कमांडर विशाल नवले यांच्या समवेत पालकमंत्री गोरे यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक विजेत्या पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रमाणेच क्रीडा, महिला बाल विकास व अन्य विभागातील पुरस्कार प्राप्त अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
नाशिक जिल्हा रुग्णालयातील जळीत रुग्ण कक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण
नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शासकीय जिल्हा रुग्णालयात साकारण्यात आलेल्या विस्तारीत जळीत रुग्ण कक्ष टप्पा क्रमांक एक चे लोकार्पण राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलेश पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा रुग्णालयातील अत्याधुनिक अति दक्षता विभाग, आपत्कालिन कक्ष व आहार विभागास भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांना मिळणाऱ्या आहाराविषयी माहिती घेतली.
जिल्हा रुग्णालयातील या अत्याधुनिक जळीत रुग्ण कक्षामुळे गंभीर जळीत रुग्णांना सुरक्षित, स्वच्छ व उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या मॉड्यूलर जळीत रुग्ण कक्षात संसर्ग नियंत्रणासाठी आवश्यक सामग्री, 5 खाटा, स्वतंत्र आयसोलेशन सुविधा, ड्रेसिंग रुम, अत्याधुनिक उपचार साधने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सद्य:स्थितीतील जळीत रुग्ण कक्षातील रुग्णांना नव्याने विकसित आधुनिक सुविधा असलेल्या मॉड्यूलर जळीत कक्षात स्थालंतरीत करण्यात येणार आहे. मॉड्यूलर जळीत कक्ष टप्पा क्रमांक दोनच्या आधुनिकीकरणाचे काम तत्काळ सुरु करण्याचे रुग्णालय प्रशासनाचे नियोजन असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिंपी यांनी यावेळी सांगितले.



