Home मोबाईल रिचार्जची वैधता संपल्यानंतर ₹४४ मध्ये एक वर्षासाठी मोफत इनकमिंग कॉल्स आणि मेसेजेस रिचार्ज मिळत असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा

मोबाईल रिचार्जची वैधता संपल्यानंतर ₹४४ मध्ये एक वर्षासाठी मोफत इनकमिंग कॉल्स आणि मेसेजेस रिचार्ज मिळत असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा

अशा प्रकारची कोणतीही घोषणा TRAI किंवा दूरसंचार कंपन्यांकडून करण्यात आलेली नाही. अशा प्रकारच्या व्हायरल संदेशांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.

#TelecomNews#MobileRecharge#MobileUsers#RechargePlans

Home सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने आज गेट ऑफ इंडिया ते यशवंतराव चव्हाण सेंटरपर्यंत व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली.

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने आज गेट ऑफ इंडिया ते यशवंतराव चव्हाण सेंटरपर्यंत व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे या दिंडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, स्मिता अंबावडेकर आदी उपस्थित होते.

नवी पिढी ही देशाची संपत्ती आहे. मात्र, काही तरुण व्यसनामध्ये गुंतले आहेत, त्यांना बरबाद होण्यापासून वाचविण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. यासाठी राज्यभर लोकचळवळ उभी करून महाराष्ट्र व्यसनमुक्त करूया, असे आवाहन मंत्री शिरसाट यांनी केले

Home विधानपरिषदेचे माजी सदस्य व माजी मंत्री दिवंगत दत्तात्रय राघोबाजी मेघे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

विधानपरिषदेचे माजी सदस्य व माजी मंत्री दिवंगत दत्तात्रय राघोबाजी मेघे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सभापती प्रा.राम शिंदे यांनी माजी विधानपरिषद सदस्य व माजी मंत्री दिवंगत सदस्याच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्याच्या स्मृतींना उजाळा दिला.

#अर्थसंकल्पीयअधिवेशन

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६

#MahaBudgetSession

#MahaBudgetSession2026

Home राहुरी पोटनिवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालींचे प्रशिक्षण

राहुरी पोटनिवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालींचे प्रशिक्षण

अहिल्यानगर :- २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या विविध माहिती तंत्रज्ञान प्रणालींच्या वापराबाबत सर्वसमावेशक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पवन टेंभुर्णे तसेच ‘जिल्हा माहिती तंत्रज्ञान कक्षाच्या’ (डीआयटी) पथकाकडून देण्यात आले. तंत्रज्ञानाचा प्रभावी व अचूक वापर करून आगामी पोटनिवडणूक पारदर्शक व निर्दोषपणे पार पाडण्याच्या उद्देशाने या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षण सत्रामध्ये निवडणूक आयोगाच्या अत्यंत महत्त्वाच्या संगणकीय प्रणालींच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नागरिकांना थेट व जलद गतीने नोंदवता याव्यात, यासाठी विकसित केलेल्या ‘सी-व्हिजिल’ या भ्रमणध्वनी प्रणालीची (ॲपची) माहिती देण्यात आली. तसेच, निवडणूक प्रक्रियेतील अधिकृत संदेशवहन व्यवस्थापनासाठीची ‘ई-एसएमएस’ प्रणाली आणि उमेदवारांची माहिती व निवडणूक निकाल व्यवस्थापनासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ‘एन्कोअर’ प्रणालीच्या सर्व भागांचे सखोल प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.

याव्यतिरिक्त, संरक्षण दलातील व इतर पात्र मतदारांसाठी असलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वितरित टपाल मतदान व्यवस्थापन प्रणाली’ (ईटीपीबीएमएस) आणि प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील कामकाजासाठी मतदान केंद्राध्यक्षांकरिता तयार करण्यात आलेल्या विशेष संगणकीय प्रणालीच्या (पीआरओ ॲप्लिकेशन) वापराबाबतही अधिकाऱ्यांना अवगत करण्यात आले. या सर्व अद्ययावत तंत्रज्ञान प्रणालींच्या अचूक वापरामुळे आगामी निवडणूक प्रक्रियेत अधिक गतिमानता, सुलभता व पारदर्शकता येईल, असा विश्वास या प्रशिक्षणादरम्यान व्यक्त करण्यात आला.

#GovernmentOfMaharashtra#MaharashtraShasan#ElectionCommissionOfIndia#RahuriByElection2026#DigitalIndia#Ahilyanagar#ElectionTraining#ECI#TransparentElections

Home विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने कार्य करावे – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने कार्य करावे – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर: विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज विभागातील सर्व जिल्हाधिकारी व नगरपालिकांच्या मुख्याधिकारी यांची बैठक घेऊन नगरपालिका प्रशासनातील प्रलंबित मुद्यांचा सविस्तर आढावा घेतला. नगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधांची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला नगर प्रशासन विभागाचे सह आयुक्त देविदास टेकाळे उपस्थित होते. तर दुरदृश्य प्रणालीव्दारे विभागातील जिल्हाधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. पाणीपुरवठा, स्वच्छता, मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली, नागरी पायाभूत सुविधा, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 तसेच ‘नमो उद्यान’ स्पर्धा यांसह विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रलंबित प्रस्तावांची स्थिती, निधीचा वापर आणि अंमलबजावणीतील अडचणींचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कामकाजात गती आणण्याचे निर्देश देण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत मंजूर व प्रलंबित घरकुलांची माहिती तपासून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यावर भर देण्यात आला. जिओ-टॅगिंग व एमआयएस प्रणाली अद्ययावत ठेवून पारदर्शकता वाढविणे आणि लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा प्रभावी लाभ पोहोचविणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्तांनी नमूद केले. “सर्वांसाठी घर” हे उद्दिष्ट निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘नमो उद्यान’ स्पर्धेच्या अनुषंगाने विविध नगरपालिकांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून दर्जेदार व सुबक उद्याने विकसित करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे करा तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नगरपालिकांचा गौरव करत इतरांनीही स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी सांगितले.

मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीच्या बाबतीत अनेक नगरपालिकांमध्ये अपेक्षित प्रगती न झाल्याचे निदर्शनास आले. थकबाकी कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवून महसूल वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. नियमित व प्रभावी वसुलीद्वारे विकासकामांना आवश्यक निधी उपलब्ध होईल, असे विभागीय आयुक्त श्री पापळकर यांनी स्पष्ट केले.

नगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक रस्ते, पादचारी मार्ग, नाले व शासकीय जागांवरील वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर एप्रिलपासून विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे काढून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले.

Home कांदा उत्पादकांच्या मदतीसाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कांदा उत्पादकांच्या मदतीसाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: दरवर्षी कांद्याचा प्रश्न राज्यात उपस्थित होत असतो. या प्रश्नावर कायम स्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. सद्यस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी लागणार आहे. यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पणन विभागाचे सचिव यांची समिती स्थापन करण्यात येईल. या समितीने शेतकऱ्यांना तातडीने करता येणाऱ्या उपायोजना सुचवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी यंत्रणांनी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

कांदा प्रश्नी विधानभवनात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) गिरीश महाजन, पणन मंत्री जयकुमार रावल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कांदा व्यापारामध्ये होत असलेले गैरप्रकार रोखणे आणि कांद्याचे निर्यात वाढवून कांद्याचे दर स्थिर ठेवणे आदी केंद्र सरकारशी निगडित विषयांबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल. तसेच दीर्घकालीन उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात येईल. कांद्याचे उत्पादन निश्चितच वाढले आहे. वाढत्या उत्पादनाला बाजारपेठ निर्माण करून देणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांकडून व्यापारी कांदा घेऊन हा व्यापारीच कांदा नाफेड किंवा अन्य यंत्रणांना विक्री करीत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून हे कायमस्वरूपी थांबविणे गरजेचे आहे. नाशिक, पुणे, अहिल्यानगर व सोलापूर या जास्त कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये ‘क्रॉप डायव्हर्सिफिकेशन’ करता येईल का याबाबतही समितीने पडताळणी करावी. येणाऱ्या खरीप हंगामातच हा प्रयोग करण्यात यावा. कांद्यामध्ये पण ‘क्रॉप डायव्हर्सिफिकेशन’ करणे गरजेचे आहे. यामध्ये वाणांची निवड, होणारे उत्पादन आदी बाबी निश्चितच तपासल्या पाहिजेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांना कांदा पिकाला जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकाकडे वळवावे लागेल. पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये अशारीतीने कार्यपद्धती केल्यास कांद्याचे उत्पादन आणि पुरवठा हा शेतकऱ्यांना फायद्याचा होईल. सध्या कांद्याचे उत्पादन वाढवून शासनाला पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे शेतकऱ्यांना मदतही करावी लागते. यामध्ये शेतकऱ्याचे नुकसानच होते. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढायचे असल्यास दीर्घकालीन उपायोजना आवश्यक आहेत. या समितीने सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन अल्पकालीन उपायोजना सुचवाव्यात. तसेच पुढील दोन ते तीन महिन्यात दीर्घकालीन उपाययोजना निश्चित करून त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीला आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, दिलीप बनकर, राहुल आहेर, विक्रम पाचपुते, किशोर पाटील, शरद सोनवणे, राम भदाणे, काशिनाथ दाते, नितीन पवार, आशुतोष काळे, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कांदा निर्यातदार उपस्थित होते.

Home प्रलंबित प्रकरणे दोन महिन्यांत निकाली काढण्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

प्रलंबित प्रकरणे दोन महिन्यांत निकाली काढण्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर: शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आज विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत बिडकीन एमआयडीसी साठी संपादित करण्यात आलेल्या वर्ग-2 जमिनीच्या मोबदल्याचे वाटप तसेच शिल्लक प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ही सर्व प्रकरणे किमान दोन महिन्यांत अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला एम.आय.टी.एल., डी.एम.आय.सी. प्रकल्पग्रस्त समिती, बिडकीन लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

फळझाडे, विहिरी, बोरवेल व इतर मालमत्तांच्या मोबदल्याबाबत डी.एम.आय.सी.कडे निधीची मागणी करण्यात आली असून निधी प्राप्त होताच प्रलंबित खातेदारांना मोबदला वितरित केला जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

पोटखराब जमिनीच्या मोबदल्याबाबत शेतकरी काम बंद करत असल्याची बाब गांभीर्याने घेण्यात आली. पात्र लाभधारकांची महसूल अभिलेखातून माहिती काढून नियमानुसार मोबदला वाटप करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी पैठण/फुलंब्री यांना देण्यात आले.

संपादित जमिनीच्या 7/12 उताऱ्यात मुळ मालकांच्या नावांबाबत विसंगती आढळून आल्याने, पूर्वीच्या बक्षीसपत्रे व दानपत्रांच्या नोंदी महसूल अभिलेखात न झाल्याची बाब निदर्शनास आली. याबाबत आवश्यक दुरुस्तीची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पापळकर यांनी दिले.

निवाड्यातील शिल्लक क्षेत्राच्या मोबदल्याबाबत,  70 टक्के मोबदला वितरित झाला असून उर्वरित 20 टक्के मोबदला विनापरवानगी खरेदी-खत इत्यादी कारणांमुळे प्रलंबित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अशा सर्व प्रकरणांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पापळकर यांनी दिले.

करमाड गट क्रमांक 81 बाबत तात्काळ मोजणी करून हद्द व खुणा निश्चित करण्याचे निर्देश भूमी अभिलेख विभागाला देण्यात आले. तसेच गट क्रमांक 74 मधील संपादित जमिनीच्या मोबदला वितरणाबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीत इतर संबंधित विषयांवरही सखोल चर्चा झाली. औद्योगिक प्रकल्पांना गती देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सकारात्मक भूमिका घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी श्री. पापळकर यांनी दिले.

यावेळी संबंधित यंत्रणाचे प्रमुख उपस्थित होते.

Home महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार सोहळा मुंबईत २५ व २६ मार्च रोजी 

महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार सोहळा मुंबईत २५ व २६ मार्च रोजी 

मुंबई: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे देण्यात येणारा महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा २५ व २६ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे संपन्न होणार असल्याची माहिती प्रादेशिक उपायुक्त, बाळसाहेब सोळंकी यांनी दिली.

२५ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता गेटवे ऑफ इंडिया ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह दरम्यान व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर उद्घाटन सोहळा, व्यसनमुक्ती विषयावरील विविध चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले आहे. तसेच, २६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता पुरस्कार वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडणार आहे.

या पुरस्कार सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे तसेच विभागाच्या आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १०० व्यक्ती आणि १३ संस्थांना महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. यामध्ये लेखक, कवी, पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी आणि सेवाभावी संस्थांचा समावेश आहे.

Home दिव्यांग बालकांसाठी ‘अंगणवाडी प्रोटोकॉल’चे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते विमोचन

दिव्यांग बालकांसाठी ‘अंगणवाडी प्रोटोकॉल’चे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते विमोचन

मुंबई: दिव्यांग बालकांना सामान्य बालकांप्रमाणेच जीवन जगता यावे आणि समाजात त्यांच्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा, यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. दिव्यांग बालकांसाठी अंगणवाडी प्रोटोकॉल हा ० ते ६ वयोगटातील  बालकांसाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘प्रारंभिक शिक्षणातून विकसित भारताची पायाभरणी’ या विषयावर पूर्व प्राथमिक शिक्षण राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन एकात्मिक बालविकास सेवा योजनेतर्फे करण्यात आले होते. दिव्यांग बालकांसाठी अंगणवाडी प्रोटोकॉल’ विमोचन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

या परिसंवादात राज्यातील विविध तज्ज्ञ सहभागी झाले होते. मुख्य सचिव राजेश अग्रवाल, आयुक्त माधवी सरदेशमुख, उपायुक्त विजय क्षीरसागर, सहआयुक्त संगीता लोंढे तसेच रॉकेट लर्निंगचे सह-संस्थापक सिद्धांत सचदेवा यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात रॉकेट लर्निंगच्या ‘ई-आकार कुशल अंगणवाडी’ उपक्रमांतर्गत कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर व नागपूर विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.परिसंवादात धोरण ते अंमलबजावणी, बालकांच्या आयुष्यातील पहिले १००० सुवर्णमयी दिवस, तसेच परिणामकारकतेसाठी भागीदारी मॉडेल यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्यातील प्रत्येक गावापर्यंत अंगणवाडी सेवा पोहोचवून “पोषण भी – पढाई भी” हा उद्देश साध्य करण्यासाठी महिला व बालविकास विभाग कार्यरत आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार बालस्नेही वातावरणात शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. रॉकेट लर्निंगच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रशिक्षण दिले जात असून त्यामुळे शिक्षण अधिक प्रभावी आणि सुलभ होत आहे.दिव्यांग बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रोटोकॉलद्वारे अंगणवाडी सेविकांना अशा मुलांना शिक्षण देण्याची पद्धत, त्यांच्याशी समानतेने वागण्याचे महत्त्व आणि इतर मुलांमध्ये समावेशकतेची भावना निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच बालकांमधील व्यंग लवकर ओळखून उपचारासाठी मार्गदर्शन, योग्य पोषणाविषयी माहिती आणि बालस्नेही शिक्षण देण्यासाठी व्हिडिओ स्वरूपात शिक्षण आणि सामग्री सर्व अंगणवाड्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

याशिवाय, राज्यातील सर्व दिव्यांग बालकांची माहिती संकलित करून आरोग्य विभाग आणि दिव्यांग कल्याण विभागाशी समन्वय साधून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी राज्यातील शेवटच्या बालकापर्यंत पोषण व शिक्षण सेवा पोहोचवण्यासाठी अधिकाधिक प्रभावी व सर्वोत्तम उपाययोजना करण्यात येत असल्याचे व्यक्तव्य केले.

Home मुंब्रा गोळीबार प्रकरणी आरोपी अटकेत, पुढील तपास प्रगतीपथावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंब्रा गोळीबार प्रकरणी आरोपी अटकेत, पुढील तपास प्रगतीपथावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात झालेली गोळीबाराची घटना कोणत्याही संघटित टोळीच्या कारवाईचा भाग नसून गैरसमजातून घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत निवेदन करुन मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 7 मार्च 2026 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मुंब्रा येथील अलमास कॉलनी परिसरात नदीम मोईनुद्दीन खान यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर कारवर शहाबाज उर्फ शबू मुन्ना शमशाद कुरेशी आणि एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. नदीम खान हे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असून त्यांना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, आरोपी आचार गल्ली परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने पोलिसांवर आणि जमावावर गोळीबार केला. या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करुन त्यास पकडले. या घटनेत जखमी इसमांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून दोन पिस्तुल, काडतुसे, मॅगझिन तसेच वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, डीव्हीआर तसेच मोबाईल कॉल रेकॉर्ड्स तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असून शस्त्रांची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध दिल्लीमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि शस्त्र कायद्यांतर्गत सुमारे 12 गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. तो ऑगस्ट 2025 मध्ये तिहार कारागृहातून जामिनावर सुटून काही महिन्यांपासून मुंब्रा येथे राहत होता. नदीम खान यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याचा गैरसमज झाल्यामुळेच आरोपीने हा गोळीबार केल्याचे समोर आले आहे.

या घटनेत कोणत्याही टोळीचा सहभाग अद्याप आढळलेला नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंब्रा परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. या परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात आली असून ‘सुरक्षित ठाणे’ ॲपद्वारे देखील अधिक दक्षता घेतली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून ठाणे पोलीस आयुक्तांना विशेष लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

error: Content is protected !!