अहिल्यानगर- राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे यासाठी जिल्हा स्वीप समितीच्या वतीने “२३ एप्रिलचा लोकशाही जागर” हा व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.
मतदानाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून निर्भय, निष्पक्ष व सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन स्वीप समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संध्या गायकवाड यांच्या संकल्पनेतून दि. १८ ते २२ एप्रिल या कालावधीत राहुरी विधानसभा मतदारसंघातील शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, महिला बचत गट तसेच आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत दि. १८ एप्रिल रोजी मतदानाची शपथ दिली जाणार असून, १९ एप्रिल रोजी मतदान जनजागृतीसाठी डीपी स्टेटस ठेवणे, २० एप्रिल रोजी प्रसिद्ध व्यक्तींचे जनजागृतीपर व्हिडिओ प्रसारित करणे आणि २१ एप्रिल रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्भय मतदानासाठी आवाहन करणे इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच २२ एप्रिल रोजी मतदानाची तारीख, वेळ व आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती देण्यात येणार आहे.
यावेळी नागरिकांना “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निष्पक्ष व शांततापूर्ण निवडणुकीचे पावित्र्य राखू तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदान करू” अशी शपथ देण्यात येत आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांनी २३ एप्रिल रोजी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) आकाश दरेकर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) मीना शिवगुंडे, मतदारदूत डॉ. अमोल बागूल तसेच स्वीप समितीच्या इतर सदस्यांनी केले आहे.
#RahuriVotes#LokshahiJagar#SVEEP#Election2026#CentPercentVoting#VoterAwareness#RahuriByePoll#DemocracyFestival#BeAnEnlightenedVoter#EthicalVoting#GoVote#अहिल्यानगर#राहुरी#मतदान_जागर#लोकशाहीचा_उत्सव#निर्भय_मतदान
संघर्षातून उभारला ‘अद्विक गृहउद्योग’:आर्णीतील बोरगाव येथील उद्योजक जयश्री पुनवटकर यांची प्रेरणादायी वाटचाल
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील जयश्री जितेंद्र पुनवटकर यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अत्यंत कठीण परिस्थितीतून यशाचा मार्ग शोधला आहे. बारावी (कला) पर्यंत शिक्षण घेतलेल्या जयश्री पुनवटकर यांनी ‘अद्विक गृहउद्योग’ नावाने ‘हळद प्रक्रिया उद्योग’ उभारून केवळ स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही, तर इतरांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
जयश्री पुनवटकर यांचे कुटुंब मजूर वर्गातील होते. आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी कपडे शिवण्याचे काम सुरू केले होते, परंतु त्यातून महिन्याला केवळ ३ ते ४ हजार रुपये उत्पन्न मिळत होते. हा व्यवसाय स्थिर नव्हता आणि नियमित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण होत होते.
कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी नवीन आणि दीर्घकाळ टिकणारा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी निर्धार केला. “स्वतःचा उद्योग सुरू करायचा” हे त्यांचे ध्येय होते. या प्रवासात कुटुंबियांनी त्यांना साथ दिलीच, पण जिल्हाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील तज्ञांनीही मार्गदर्शन केले. विशेषतः राजहंस मॅडम आणि हिरोळकर सर यांच्या प्रशिक्षणामुळे त्यांना योग्य दिशा मिळाली.
पीएमएफएमई योजनेचा लाभ
जयश्री पुनवटकर यांनी आपल्या उद्योगासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजनेचा लाभ घेतला. या योजनेअंतर्गत त्यांना २ लाख ८० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. यासोबतच त्यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन घेतले, ज्यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य विकसित झाले.
सुरुवातीला त्यांनी ५० किलो मिरच्या खरेदी करून छोट्या प्रमाणात प्रक्रिया उद्योग सुरू केला. या क्षेत्राची पूर्वी कोणतीही माहिती नसल्यामुळे अनेक अडचणी आल्या, परंतु त्यांनी हार मानली नाही. आवश्यक यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी हळूहळू व्यवसाय उभा केला. आता त्या उच्च प्रतिचे मिरची पावडर, मसाला, चना, हळद आणि घना पावडरची विक्री करुन व्यवसायात वाढ करत आहेत.
यशाची कहाणी
जयश्री पुनवटकर यांच्या उत्पादनांना बाजारातून चांगला प्रतिसाद मिळू लागला. मागणी वाढली आणि नियमित ऑर्डर मिळू लागल्या. त्यांच्या मेहनतीमुळे आज त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पूर्वीच्या तुलनेत उत्पन्न दुप्पट-तिप्पट झाले आहे. याशिवाय त्यांनी इतरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
सामाजिक प्रतिष्ठा
त्यांच्या यशाची दखल गाव पातळीवर घेतली गेली असून त्यांचा सत्कार करण्यात आला. समाजात त्यांना मान-सन्मान मिळू लागला आहे.
सध्याची स्थिती व विस्तार
आज जयश्री पुनवटकर यांचा व्यवसाय उत्तम चालू असून त्या सातत्याने प्रगती करत आहेत. बाजारपेठ, प्रदर्शने, पॅम्पलेट व बॅनर यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. सध्या त्यांचे मासिक उत्पन्न ३० ते ४० हजार रुपये असून वार्षिक उत्पन्न लाखोंमध्ये पोहोचले आहे.
प्रेरणादायी संदेश
जयश्री पुनवटकर म्हणतात, “घरातून बाहेर पडल्याशिवाय आपल्याला जगाची ओळख होत नाही. कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. शासकीय योजनांचा योग्य वापर केल्यास यश मिळवणे सोपे होते.”
जयश्री पुनवटकर यांची ही यशोगाथा प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी आहे. योग्य दिशा, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते आणि यशस्वी उद्योजक बनता येते. हे त्यांनी दाखवून दिले आहे.
‘गाडी शिकणे ही आत्मनिर्भरतेची दिशा’: लांजाच्या छाया गांगण यांचा ‘अथर्व मोटार ट्रेनिंग’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा वसा
“गाडी शिकणे ही फक्त एक कला नसून ती आत्मनिर्भरतेची दिशा आहे,” हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून लांजा येथील छाया गांगण यांनी स्वावलंबनाचा एक आगळावेगळा उपक्रम यशस्वी केला आहे. आपल्या ‘अथर्व मोटार ट्रेनिंग स्कूल’च्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक महिला व पुरुषांना दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे रितसर प्रशिक्षण देऊन त्यांना खऱ्या अर्थाने ‘स्वयंपूर्ण’ बनविले आहे.
२०१९ मध्ये झाली सुरुवात
छाया गांगण यांनी २०१९ मध्ये अथर्व मोटार ट्रेनिंग स्कूलची स्थापना केली. विशेष म्हणजे, या क्षेत्रात महिलांचे प्रमाण अत्यंत कमी असताना, पती मंदार गांगण यांच्या प्रेरणा आणि सहकार्यामुळे त्यांनी हे आव्हानात्मक पाऊल उचलले. लग्नापूर्वी गाड्यांची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आज या क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. बी.कॉम पर्यंत शिक्षण झालेल्या छाया गांगण यांनी ‘काहीतरी नवीन’ करण्याच्या ध्यासातून सुरू केलेला हा प्रवास आज लांजातील अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
२५० हून अधिक महिलांना प्रशिक्षण
आजवर या ट्रेनिंग स्कूलमधून सुमारे २५० महिलांनी वाहन चालविण्याचे धडे घेतले आहेत. यामध्ये केवळ तरुणीच नव्हे, तर वयाची साठी ओलांडलेल्यांचाही समावेश आहे. ज्यांना साधी सायकलही चालवता येत नव्हती, त्यांना श्रीमती गांगण यांनी आत्मविश्वासाने गाडी चालवायला शिकविले आहे. यामध्ये नोकरदार महिला व शिक्षिका, अंगणवाडी सेविका, पिग्मी एजंट, गृहिणी या सर्वांचा समावेश आहे. महिलांनी केवळ गृहिणी न राहता स्वतःच्या पायावर उभे राहावे, हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे श्रीमती गांगण सांगतात.
एसटी बस चालविण्यापर्यंतची मजल
श्रीमती गांगण यांच्या प्रशिक्षणाचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण म्हणजे एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये कार्यरत असलेल्या महिलेने सेवानिवृत्तीला केवळ सहा महिने शिल्लक असताना प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्या केवळ दुचाकी-चारचाकीच नव्हे, तर वर्कशॉपमध्ये एसटी बसही पुढे मागे (Forward-Reverse) करु लागल्या. अनेक महिलांनी तर रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करत स्वतःचे छोटे-मोठे व्यवसायही सुरू केले आहेत.
रस्ता सुरक्षा अभियान आणि सन्मान
केवळ वाहन प्रशिक्षणच नव्हे, तर ‘रस्ता सुरक्षा अभियाना’अंतर्गत छाया गांगण यांनी विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम राबवले आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
कुटुंबाचे चाक हाती असणारी महिला मोटार ट्रेनिंग स्कूलचे चाकही यशस्वी पणाने हाती धरु शकते हे दाखवून देणाऱ्या श्रीमती गांगण यांची ही प्रेरणादायी गोष्ट आहे.
आगामी सार्वत्रिक व पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींसाठी नियमावली जाहीर
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग यांनी 2026 मधील आगामी सार्वत्रिक व पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर वार्तांकन करण्यासाठी माध्यम प्रतिनिधींना अधिकृत ओळखपत्र अनिवार्य आहे. तसेच निवडणूक आयोगाने अधिकारपत्र दिलेल्या माध्यम प्रतिनिधींचा ‘अत्यावश्यक सेवा’ श्रेणीत समावेश केल्यामुळे मतदानाच्या दिवशी कार्यरत असलेल्या पत्रकारांना टपाल मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, निवडणूक प्रक्रियेच्या कव्हरेजसाठी मतदान केंद्रांवर प्रसारमाध्यम व्यक्तींचा प्रवेश निवडणूक नियम, 1961 च्या नियम 32 मधील तरतुदींनुसार मतदान केंद्राध्यक्षांद्वारे काटेकोरपणे नियंत्रित केला जाईल. पारदर्शकता वाढवण्यासाठी बहुस्तरीय पडताळणी प्रणाली लागू करण्यात आली असून, माध्यम प्रतिनिधींना कव्हरेजसाठी केंद्र सरकारच्या पत्र माहिती कार्यालय किंवा संबंधित राज्याच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयामार्फत अर्ज करणे बंधनकारक राहील. प्राप्त अर्जांची तपासणी माहिती व जनसंपर्क किंवा पीआयबी यांच्या स्तरावर केली जाईल. पात्र माध्यम प्रतिनिधींची अंतिम शिफारस आयोगाकडे पाठविण्यात येईल. वरील सर्व संस्थाना यादीची योग्य छाननी करण्यात आली आहे, अर्जदार हे खरे माध्यम प्रतिनिधी आहेत आणि ते निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विहित निकष पूर्ण करत असल्याचे प्रमाणित करून द्यावे लागणार आहे.
शिफारस केलेल्या प्रसारमाध्यम व्यक्तींची एकत्रित यादी नंतर मंजुरीसाठी आयोगाकडे पाठवली जाईल. अधिकृत अधिकाऱ्याद्वारे योग्य प्रमाणीकरण केल्यानंतरच अधिकार पत्र जारी केले जाईल. पारदर्शकता आणि अखंडता राखण्यासाठी आयोगाने आदेश दिला आहे की या प्रक्रियेत कोणत्याही फॅसिमाइल (हुबेहूब स्वाक्षरी) आणि/किंवा रबर स्टॅम्पचा वापर केला जाणार नाही.
मतदान केंद्रांवर वार्तांकन करताना मतदानाची गोपनीयता अबाधित राखणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही माध्यम प्रतिनिधीस मतदान कक्षामध्ये प्रवेश करून चित्रीकरण किंवा छायाचित्रण करण्यास सक्त मनाई असेल. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित प्रतिनिधीवर कठोर कारवाई करण्यात येईल व त्यांचे अधिकृत पत्र रद्द केले जाणार आहे. लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता, शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी ही नियमावली लागू करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये अवैध एलपीजी गॅस वापर उघड; चेंबूर–देवनार येथे दोन गुन्हे नोंद
मुंबई : शहरातील एलपीजी गॅसच्या काळ्याबाजारावर आळा घालण्यासाठी नागरी पुरवठा विभागाने १८ एप्रिल रोजी राबविलेल्या विशेष धाड मोहिमेत डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये अवैधरित्या एलपीजी गॅसचा वापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या कारवाईत चेंबुर आणि अनुशक्तीनगर (देवनार) परिसरात दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई चंद्रकांत डांगे यांच्या निर्देशानुसार, उपनियंत्रक शिधावाटप ‘ई’ परिमंडळ श्रीमती रिना बसैय्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक नियंत्रक शिधावाटप रामकृष्ण कांबळे यांच्या अधिपत्याखालील पथकाने ही कारवाई केली. एलपीजी गॅसचा काळाबाजार व अनियमितता रोखण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती.
चेंबुरमधील कारवाई
चेंबूर परिसरातील पेस्तमसागर रोडवरील विश्वसंगम टॉवरमधील डॉमिनोज पिझ्झा सेंटरवर धाड टाकण्यात आली. शिधावाटप कार्यालय क्र. ३३ ‘ई’ चेंबुर येथील सहाय्यक शिधावाटप अधिकारी जितेंद्र देशमुख, अमर सकपाळ तसेच निरीक्षक भगवान वांडेकर, निलकंठ येसने आणि प्रकाश पराते यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपासादरम्यान एकूण ८ एलपीजी सिलेंडर्स विनाबिल अवैधरित्या प्राप्त करून वापरत असल्याचे आढळले. या प्रकरणी सुमारे २५,९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टिळकनगर (चेंबूर) पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवनारमधील कारवाई
देवनार परिसरातील अर्जुन सेंटर येथील डॉमिनोज पिझ्झा सेंटरवरही धाड टाकण्यात आली. शिधावाटप कार्यालय क्र. ४९ ‘ई’ अनुशक्तीनगर येथील शिधावाटप अधिकारी जगन्नाथ सानप, सहाय्यक अधिकारी श्रीमती सोनाली धांदरणेकर तसेच निरीक्षक देवयानी पवार, नंदिनी इंगोले, राकेश पाटील आणि सुनील आढाऊकर यांच्या पथकाने कारवाई केली. येथे एकूण १९ एलपीजी सिलेंडर्स विनाबिल वापरात असल्याचे आढळून आले. सुमारे ४९,११७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गोवंडी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
काळाबाजाराविरोधात कारवाई तीव्र
नागरी पुरवठा विभागाकडून एलपीजी गॅसच्या बेकायदेशीर साठवणूक व वापराविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.
महात्मा बसवेश्वर यांना राज्यपालांचे अभिवादन
मुंबई: महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले.यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई: महात्मा बसवेश्वर यांचा जयंतीदिन मंत्रालयात साजरा करण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार (प्र.ना.उ.सु.) यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, सविता शानभाग, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे, मंत्रालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जूनपासून नवीन अभ्यासक्रम होणार सुरु – मंत्री मंगलप्रभात लोढा
नागपूर:- नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विविध नाविन्यपूर्ण विकास योजना, पारदर्शकता व प्रशासकीय पातळीवर होणारा विलंब टाळण्यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस सारख्या शासनाच्या तत्पर धोरणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली. यातून औद्योगिक, सेवा, डिजिटल तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, सौर विद्युत तंत्रज्ञान क्षेत्रात अफाट रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. काळाशी सुसंगत नवनवीन आवश्यक असणारे कौशल्य शिक्षण व प्रशिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळावेत यासाठी येत्या जूनपासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करू असे कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केले.
कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व या संस्थेला शहीद हेमंत करकरे असे नामकरण राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. याचबरोबर माजी आ. देवराव रडके, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचानालयचे संचालक सतीश सूर्यवंशी व मान्यवर उपस्थित होते.
सौर ऊर्जा तंत्रज्ञान, याची उपकरणे व त्याची निगा, डिजिटल इंडियाला साकारणारे तंत्रज्ञान व सेवाक्षेत्र याला अधोरेखित करून ग्रामीण भागातील युवकांना या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीवर स्वार होता यावे यासाठी नवीन कोर्स, ट्रेड शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सुरु व्हावेत व यातील काही कोर्स कामठी येथे सुरु व्हावेत अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात केली होती. मंत्री श्री लोढा यांनी ही मागणी नम्रतेने स्वीकारत कामठी आयटीआय येथे नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यासह येथील प्रशिक्षण संस्थेच्या प्रगतीचा प्रत्येक महिन्याला आढावा घेऊन राज्यातील एक आदर्श शासकीय प्रशिक्षण संस्था म्हणून याला नावारूपास आणू असे सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (ITI) शहीद हेमंत करकरे यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कौशल्य विकास विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर अधिकाऱ्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा जागृत होईल असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
येत्या पाच वर्षात कोराडी येथील शैक्षणिक व प्रशिक्षण संकुल भक्तीसह सामाजिक उत्तरदायित्त्वाचे मोठे केंद्र म्हणून साकारेल
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या राजकीय जबाबदारींना समर्थपणे पेलत कोराडी येथील संस्थानाच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्त्वाचे मोठे कार्य केले आहे. या भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या दिशा मिळाव्यात यासह त्यांना गारमेंट, होजिअरी व इतर कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून धैर्य दिले आहे. याठिकाणी अत्यंत आदर्श असे कौशल्य विद्यापीठ साकारण्याची सर्व क्षमता आहे. त्यांनी दूरदृष्टी ठेवून नियोजन केले अशा शब्दात मंत्री श्री लोढा यांनी गौरव केला. कोराडी हे भक्तीसह सामाजिक उत्तरदायित्त्वाचे मोठे केंद्र म्हणून समोर असा विश्वास त्यांनी व्यक्त करून यासाठी शासन व इतर उपक्रमातून आम्ही निश्चित हातभार लावू असे सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही होईल लाभ – महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
बदलत्या काळाप्रमाणे रोजगार व स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण झाल्या आहेत. केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकासासाठी गत दहा वर्षात सातत्याने प्रयत्नरत राहून ग्रामीण भागात कौशल्य प्रशिक्षणासाठी शासकीय शैक्षणिक यंत्रणांना नवे रूप दिले आहे. औद्योगिक, सेवा व डिजिटल तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा क्षेत्रातील रोजगाराच्या अफाट संधीचा लाभ ग्रामीण भागातील युवकांना होण्यासाठी आणखी नव्या अभ्यासक्रमांची जोड आवश्यक आहे. या कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपले युवक जागतिक पातळीवर आपले कसब व कौशल्य सिद्ध करून दाखवतील असा विश्वास महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
वेदांमध्ये समृद्ध जीवनपद्धती सांगणारे ज्ञान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : जगातील सर्व संस्कृती जास्तीत जास्त ४ हजार वर्षे जुन्या आहेत, मात्र आधुनिक पद्धतीने काढलेले वेदांचे वय हे १२ हजार वर्षाहून अधिक आहे. जगातील सर्वात प्राचीन साहित्य असलेले वेद समृद्ध जीवन पद्धती सांगणारे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. घोगली येथे निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर (एनजेटी) वेद पाठशाळेचे उद्घाटन आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोविंद देव गिरी महाराज उपस्थित होते.
आपली प्राचीन परंपरा पुढे नेण्यासाठी सुरू करण्यात आलेला वेद पाठशाळेचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.ज्ञान विज्ञानाचा आधार वेदच आहेत. सनातन धर्म संपूर्ण मानव जातीचे कल्याण सांगतो. हिंदू जीवन ही जगातील आदर्श पद्धती असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
वेद हेच आपले मूळ धन असल्याचे सांगून गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, भारतीय संस्कृतीचा पायाच वेद आहे. जगातील सर्व संस्कृती आणि भाषांचा जन्म वेदांनंतर झाला आहे. वेद हे केवळ हिंदूंसाठी नाही तर मानव जातीच्या कल्याणासाठी असल्याचे गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितले.
प्रारंभी रोहन ठाकर यांनी प्रास्ताविक केले. आचार्य सागर शर्मा, नरेंद्र झा प्रभृती व्यासपीठावर उपस्थित होते.
सोशल मीडियावरील बेकायदेशीर मजकुरावर निवडणूक आयोगाची कारवाई
मुंबई : देशातील सार्वत्रिक निवडणुका व पोटनिवडणुका २०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील बेकायदेशीर व दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. सर्व संबंधितांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने व नैतिकतेने वापर करावा, असे आयोगाने सांगितले आहे.
माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००, आयटी नियम २०२१ आणि आचारसंहितेच्या तरतुदींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने तयार केलेला किंवा फेरफार केलेला कोणताही भ्रामक अथवा बेकायदेशीर मजकूर निदर्शनास आल्यानंतर संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी ३ तासांच्या आत कारवाई करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राजकीय पक्ष, उमेदवार आणि प्रचार प्रतिनिधींनी प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या AI-आधारित किंवा डिजिटलरीत्या बदललेल्या मजकुरावर “AI-Generated”, “Digitally Enhanced” किंवा “Synthetic Content” अशी स्पष्ट नोंद करणे आवश्यक असून, त्या मजकुराच्या मूळ स्त्रोताची माहिती देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पारदर्शकता आणि मतदारांचा विश्वास टिकवण्यास मदत होईल, असे आयोगाने नमूद केले आहे.
सध्या आसाम, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी आणि पश्चिम बंगाल राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकांदरम्यान सोशल मीडियावरील आचारसंहिता भंग करणारे, कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणू शकणारे किंवा मतदान प्रक्रियेविषयी चुकीची माहिती पसरवणारे पोस्ट्सवर संबंधित राज्यांच्या आयटी नोडल अधिकाऱ्यांमार्फत लक्ष ठेवून तात्काळ कारवाई केली जात आहे.
१५ मार्च २०२६ रोजी निवडणुकांची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत अशा ११ हजारांहून अधिक सोशल मीडिया पोस्ट्स/URL ओळखून त्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मजकूर हटविणे, गुन्हे नोंदविणे (FIR), स्पष्टीकरणे आणि खंडन जारी करणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे.
याशिवाय, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १२६ अंतर्गत मतदान संपण्यापूर्वीच्या ४८ तासांच्या शांतता कालावधीत कोणत्याही प्रकारचे निवडणूक प्रचार साहित्य प्रसारित करण्यास बंदी असल्याची तरतूदही आयोगाने पुन्हा अधोरेखित केली आहे. दूरदर्शन, रेडिओ, मुद्रित माध्यमे तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
दरम्यान, नागरिक, राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ECINET वरील C-Vigil अॅपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 15 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीत एकूण 3,23,099 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी 96.01 टक्के म्हणजेच 3,10,393 तक्रारींचे निकाली काढण्यात आले असल्याचे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.



