मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित लोकप्रिय ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतून ‘वंदे मातरम सुरक्षित तटम् समृद्ध भारतम्’ सायक्लोथॉन २०२६ या उपक्रमावर आधारित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) डेप्युटी कमांडंट विजय चकोर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या सायक्लोथॉन उपक्रमाअंतर्गत सीआयएसएफच्या ६५ सायकलपटूंचे पथक १० ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्राच्या किनारपट्टी मार्गावर प्रवास करणार आहे. वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सायक्लोथॉनद्वारे किनारी भागातील नागरिकांमध्ये अमली पदार्थ, शस्त्रास्त्र आणि स्फोटकांच्या तस्करीविरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, परंपरा तसेच किनारी सुरक्षेचे महत्त्व याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या सायक्लोथॉनच्या राज्यातील प्रवासादरम्यान तारापूर, गेटवे ऑफ इंडिया, कुरूळ, लोणेरे, अंजनवेल आणि रत्नागिरी येथे विविध सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर हे पथक पुढील प्रवासासाठी गोवा राज्याकडे रवाना होणार आहे. या उपक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी आणि रूपरेषा याविषयी विजय चकोर यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमधून सविस्तर माहिती दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातील ही मुलाखत मंगळवार, १० आणि बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार असून, ती ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवर देखील उपलब्ध राहणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येणार आहे.
स्वच्छ पर्यावरणासाठी सक्षम अभियानाचा संकल्प!
भारत सरकारच्या ऊर्जा सुरक्षितता, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘सक्षम २०२५-२६ (संरक्षण क्षमता महोत्सव)’ हे राष्ट्रीय अभियान १ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत (तेल आणि गॅस वाचवा, हरित ऊर्जा स्वीकारा)” या घोषवाक्यासह संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे त्यानिमित्त…
जागतिक पातळीवर वेगाने बदलणाऱ्या हवामानामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे मानवासमोर आज मोठे आव्हान उभे राहिले आहे. पारंपरिक इंधनांचा वापर दिवसागणिक वाढत गेल्याने निसर्गावर मोठा ताण पडत असून, त्याचे दुष्परिणाम आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर ठळकपणे दिसू लागले आहेत. भविष्यात हे संकट आणखी भयावह होवू नये यासाठी समाजाने स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जेकडे प्राधान्याने वळणे, ही काळाची गरज बनली आहे.
कोळसा, पेट्रोल, डिझेल यासारखी पारंपरिक इंधने मर्यादित स्वरूपाची आहेत. त्यांच्या ज्वलनामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड आणि इतर घातक वायू वातावरणात मिसळतात. यामुळे जागतिक तापमानवाढ, हवामानातील टोकाचे बदल, पावसाचे असमतोल स्वरूप तसेच आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. श्वसनविकार, हृदयविकार आणि त्वचारोग यांसारखे आजार याच प्रदूषणाशी थेट जोडलेले आहेत. यावर उपाय म्हणून नवी ऊर्जा क्रांती आकार घेत आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत, बायोगॅस, बायो-इंधन आणि हरित हायड्रोजन यांसारखे पर्याय आज प्रभावीपणे पुढे येत आहेत. या ऊर्जास्रोतांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे, ते अक्षय आहेत आणि पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचवता. पवन ऊर्जा निर्मितीमुळे इंधन आयातीवरील खर्च कमी होऊन देशाची आर्थिक बचतही होते. ऊसाच्या चिपाडापासून बनविल्या जाणाऱ्या इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाकडेही आपला देश गांभीर्याने पाहू लागला आहे.
अलीकडच्या काळाचा विचार केल्यास, वाहतूक क्षेत्रातही मोठे बदल होतांना दिसत आहेत. इलेक्ट्रिक वाहने, हायब्रिड वाहने आणि पर्यायी इंधनावर चालणारी वाहने यांचा वापर वाढत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्राधान्याने स्वच्छ इंधनाचा समावेश केल्यास प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते. यासोबतच इंधन बचतीच्या सवयी, कार पूलिंग, सायकलचा वापर आणि पायी चालण्यास प्रोत्साहन देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
घरगुती पातळीवरही स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवता येऊ शकतो. सौर पॅनल्सद्वारे वीज निर्मिती, बायोगॅस प्रकल्प, ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर आणि विजेचा अपव्यय टाळणे या छोट्या गोष्टी मोठा बदल घडवू शकतात. शाश्वत जीवनशैली स्वीकारणे म्हणजे केवळ पर्यावरणाचे संरक्षण नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य घडवण्याच्या दृष्टीने या ऊर्जा क्रांतिकडे पाहायला हवे.
या दिशेने केंद्र व राज्य सरकारांकडून विविध अभियानांद्वारे जनजागृती केली जात आहे. ‘सक्षम’सारख्या मोहिमा नागरिकांना पर्यायी इंधनांचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करत आहेत. उद्योग क्षेत्र, तसेच शहरे आणि ग्रामीण भागातही हरित ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली जात आहेत. यामध्ये संशोधन, नवतंत्रज्ञान आणि स्थानिक सहभाग आदिला विशेष महत्त्व दिले जात आहे.
स्वच्छ पर्यावरण हा केवळ सरकारचा किंवा एखाद्या संस्थेचा विषय नसून, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आज प्रत्येक स्तरावर घेतलेले छोटे निर्णय उद्याच्या मोठ्या संकटांना टाळू शकतात. पर्यायी ऊर्जेचा वापर, इंधन बचत, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारल्यास हरित, सुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठी आपण भक्कम पायाभरणी करू शकतो. हीच खरी ऊर्जा क्रांती असून तिच्यात आपण सर्वांनी सहभागी होणे, ही काळाची गरज आहे.
कामठी येथे पोलिस उपायुक्त कार्यालयासाठी मेट्रो स्टेशनजवळ पर्याप्त जागेबाबत तत्काळ प्रस्ताव तयार करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : नागपूर शहरासह जवळील ग्रामीण भागापर्यंत मेट्रोचे सक्षम जाळे व सेवा सुविधा आपण निर्माण केल्या आहेत. लवकरच रामटेकच्यादिशेने कामठीसह कन्हानपर्यंतचा टप्पा मेट्रोशी जोडला जाणार आहे. या विस्तारात सुरक्षिततेच्यादृष्टीने योग्य ती सुविधा व कामठी येथे पोलिस उपायुक्त कार्यालयासाठी पर्याप्त पुरेशी जागा कशी उपलब्ध होऊ शकेल याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. सद्यास्थितीत ऑटोमोटीव्ह चौकापर्यंत मेट्रो धावत असून कामठीपर्यंतचे काम पूर्णत्वास येत आहे.
जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीत आढावा घेतला. या बैठकीस आमदार कृष्णा खोपडे, महा मेट्रोचे महाव्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मलिक विराणी, डब्ल्यूसीएलचे वरीष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, संजय पवार व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वेणा प्रकल्पासाठी संपादीत झालेल्या जमिनीचे मूळ मालकांना हस्तांतरण कायद्याच्या चौकटीत झाले का हे तपासून योग्य तो न्यायनिवाडा करणे क्रमप्राप्त आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येऊन याबाबत आहे ती वस्तुस्थिती समितीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मौजा सुराबर्डी येथे पोलिस महासंचालनालय नक्षल विरोधी पथक यांना आवंटीत करण्यात आलेल्या शासकीय जमिनीचा नकाशा दुरुस्ती व रेखांकन करुन देण्याबाबत पालकमंत्री श्री.बावनकुळे यांनी निर्देश दिले. याचबरोबर झुडपी जंगलाच्या प्रश्नाचे सोडवणूक न्यायलीन आदेशान्वये तत्काळ करावी असे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरंभता की ‘अरदास’; जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
नवी मुंबई :- ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची आरंभता की ‘अरदास’ संत समाजचे प्रधान संत ज्ञानी हरनाम सिंघ जी, मुखी दमदमी टकसाल यांच्या हस्ते ओवे मैदान, सेक्टर 29, खारघर, नवी मुंबई येथे करण्यात आली.
अल्पसंख्याक विकास विभाग, राज्य समन्वय समिती आणि सिख, सिकलगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तथा भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय अशा नऊ समाजाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, लाखोंच्या संख्येने भाविक राज्य तसेच देशातून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी रवींद्र राठोड, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजा दयानिधी, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, अपर आयुक्त फरोग मुकादम, उपायुक्त विजय म्हसाळ, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, रश्मी नांदेडकर, वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे, हिंद दी चादर कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, क्षेत्रिय आयोजन समिती, नवी मुंबईचे अध्यक्ष अमरपाल सिंघ रंधावा, सुप्रीम कॉन्सील, नवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष जसपाल सिंघ सिद्धू, खारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग बल, महाराष्ट्र राज्य सिख समन्वय समितीचे चरणदीप सिंग (हॅप्पी सिंग), राज्यस्तरीय समितीचे निमंत्रक तथा महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष बल मिलकित सिंग, प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांच्यासह शीख, सिकलगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तथा भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.
संत ज्ञानी हरनाम सिंघजी यांनी ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या बलिदानाविषयीचे माहात्म्य सांगितले. पुढील पिढीपर्यंत श्री गुरु तेग बहादूर यांच्या शौर्याचा इतिहास पोहचवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून शहादतविषयी जागर करणे का महत्वाचे आहे, याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन दिले.
नागपूर आणि नांदेड या ठिकाणी “हिंद दी चादर” या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रशासनाच्या सहकार्याची खूप मोठी जोड होती. आणि आज खारघर, नवी मुंबई येथे देखील आरंभता की “अरदास” कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या उत्साहातून हे स्पष्ट होत आहे की, येथील कार्यक्रम देखील खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्याने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, खारघर येथे श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या 350 व्या शहीदी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कार्यक्रमासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून तयारी महिनाभरापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. रायगड व ठाणे जिल्हा प्रशासनाने 25 समित्यांची स्थापना करून विविध जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. नागपूर आणि नांदेड येथील यशस्वी कार्यक्रमांनंतर आता खारघर येथील कार्यक्रमाकडे देश-विदेशातील भाविकांचे लक्ष लागले आहे.
कार्यक्रमासाठी प्रशासन, पोलीस व महानगरपालिका यंत्रणा समन्वयाने दिवसरात्र कार्यरत असून भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सूर्यवंशी यांनी दिली.
गुरु नानक नामलेवा समिती, शीख समुदाय तसेच विविध समाजघटकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात पार पडणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी गुरु तेग बहादुरजी यांच्याशी लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तथा भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय यांच्याशी निगडीत असलेला इतिहास सांगितला. तसेच त्यांनी नागपूर आणि नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्व समाजबांधवांनी नि:स्वार्थ सेवाभाव ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
‘ओटीएम २०२६’; महाराष्ट्र पर्यटन दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई: वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे आशियातील सर्वात मोठा ट्रॅव्हल ट्रेड शो ‘आऊटबाऊंड ट्रॅव्हल मार्ट २०२६’चे (ओटीएम) आयोजन करण्यात आले होते. जागतिक स्तरावर पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी मुंबईत या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनात ४० हून अधिक पर्यटन भागधारकांनी सहभाग घेतला. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालक डॉ.बी. एन.पाटील,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे,महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यावेळी उपस्थित होते. दालनामध्ये उपस्थित असलेल्या पर्यटन भागधारकांशी संवाद त्यांनी साधला.
राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटनस्थळांची माहिती देखील ‘ओटीएम’च्या माध्यमातून देण्यात आली. महाराष्ट्र पर्यटन दालनाद्वारे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्र, त्या ठिकाणी जाण्याची सोय, उपलब्ध सेवा सुविधा इ. माहिती पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आली.
महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या युवा पर्यटन राजदूत नवेली देशमुख यांनीही ‘ओटीएम’ कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पर्यटन दालनाला भेट देऊन दालनामध्ये सहभागी झालेल्या भागधारकांशी संवाद साधला. तसेच नवेली देशमुख यांनी महाराष्ट्र पर्यटन दालनाला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत कौतुक केले.
पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे म्हणाले की, “‘ओटीएम’मधील सहभागाने निश्चितच महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेल. तसेच जगाच्या नकाशावर पर्यटनासाठी महाराष्ट्र नवी उंची गाठेल असा विश्वास आहे. या माध्यमातून पर्यटनाला गती मिळून अधिकाधिक रोजगाराची निर्मिती करण्यात येणार आहे. ‘ओटीएम’ने पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी दिलेल्या या व्यासपीठाबाबत आयोजकांचे आभार मानतो.”
पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन.पाटील म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात सध्या पर्यटनाचा वाटा ७ ते ८ टक्के आहे. भविष्यात तो १५ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे राज्यभरात विविध कार्यक्रम आणि उत्सव आयोजित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘आउटबाऊंड ट्रॅव्हल मार्ट’ (ओटीएम). राज्यातील पर्यटन उत्पादनांच्या प्रसारासाठी हे एक प्रभावी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ ठरले आहे. या कार्यक्रमाद्वारे भागधारकांना जगभरातील कंपन्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली. या उपक्रमांमुळे येत्या काळात महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रात जागतिक भरारी घेईल.”
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे म्हणाले की, “‘ओटीएम २०२६’ प्रदर्शन जागतिक पर्यटनाचे महाद्वार आहे. या प्रदर्शनाद्वारे पर्यटन व्यावसायिक क्षेत्राला नवे व्यासपीठ मिळाले आहे. जागतिक पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटनाच्या माध्यमातून राज्याचा सांस्कृतिक वारसा, गडकिल्ले, विविध पर्यटन स्थळे यांची नव्याने ओळख होईल. ‘ओटीएम’मधील सहभागामुळे निश्चितच महाराष्ट्रातील पर्यटनाला अधिक चालना मिळेल. शिवाय या माध्यमातून पर्यटनाला गती मिळण्याबरोबरच अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. जगाच्या नकाशावर महाराष्ट्र पर्यटनासंबंधित नवी उंची गाठेल असा आम्हाला विश्वास आहे”.
मुकेश अंबानी यांच्यावर ‘क्वांटम एआय’च्या कार्यक्रमात हल्ला झाल्याचा व्हायरल व्हिडिओ खोटा (Deepfake) आहे.
हा व्हिडिओ लोकांची फसवणूक करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. यात अंबानींच्या २०२३ मधील जुन्या भाषणात फेरफार करून खोट्या गुंतवणूक योजनेचा प्रचार केला जात आहे. मूळ व्हिडिओमध्ये असा कोणताही हल्ला झालेला नाही किंवा अशी कुठली गुंतवणूक योजनाही अस्तित्वात नाही.
सर्वोच्च न्यायालयाने १ जानेवारी २०२६ पासून फोटोवर आधारित ट्रॅफिक चलनांवर बंदी घातल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे.
न्यायालयाने असा कोणताही आदेश दिलेला नसून, मोटर वाहन (सुधारणा) कायदा, २०१९ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अन्वये डिजिटल पुरावे (फोटो/व्हिडिओ) कायदेशीररित्या पूर्णपणे वैध आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या नवीन नियमांनुसार वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे पुरावे अधिक अचूक करण्यासाठी फोटोसोबत आता व्हिडिओ रेकॉर्डिंगही अनिवार्य करण्यात आले आहे, ज्यामुळे ही प्रणाली अधिक प्रभावी झाली आहे.
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत कार्यालयाची वेबसाइट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व Blockchain चा शासकीय कामकाजात वापर आणि GIS चा कामात वापर अशा ७ सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांची निवड दि. २६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आली.
निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित ठेवलेला जिल्हा परिषद कार्यालये संवर्गाचा निकाल आज जाहीर होत आहे.
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे, सांगली, ठाणे, नागपूर व नाशिक जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या चमूंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हार्दिक अभिनंदन केले!
सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांना अभिवादन केले.
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, पार्थ अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रभादेवी, मुंबई येथील श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले.
खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, पार्थ अजित पवार, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



