
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ यांच्यात ‘सामंजस्य करार’ करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी आणि त्यांना अधिक चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे.
धर्मादाय संस्थांचे योगदान आणि शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून एकत्र येऊन एक आदर्श आरोग्य सहाय्य मॉडेल राज्यात उभे राहील. अशा धर्मादाय न्यासांच्या सहकार्याने विविध ‘त्रिपक्षीय सामंजस्य करार’ करण्यात येऊन त्याचा थेट लाभ रुग्णांना देणे शक्य होईल. सीएमआरएफच्या संकेतस्थळावर सर्व तपशील उपलब्ध आहे. त्यात सर्व संस्थानी सहभाग नोंदविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
या करारामुळे धर्मादाय रुग्णालये आणि विविध स्वयंसेवी संस्थांद्वारे मिळणारी मदत थेट आणि वेळेत रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखालील रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केले जातात. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची यंत्रणा जोडली जाणार आहे. रुग्णालयांच्या परिसरात नातेवाईकांसाठी निवारा, अल्पदरात, मोफत भोजन आणि वैद्यकीय मार्गदर्शनाची सोय अधिक प्रभावीपणे केली जाईल.
सर्वसामान्यांना आरोग्य सेवा मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि त्यांना प्रशासकीय प्रक्रियेत सुलभता मिळवून देणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. यामुळे राज्यातील हजारो गरीब आणि गरजू रुग्णांना व त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.















