नवी दिल्ली: भारतातील पर्यटन क्षेत्रासाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे राज्य ठरत असून, गेल्या तीन वर्षांत राज्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. सन २०२२ मध्ये महाराष्ट्रात १.५१२ दशलक्ष परदेशी पर्यटकांनी भेट दिली होती, हा आकडा २०२४ मध्ये वाढून ३.७०५ दशलक्षवर पोहोचला असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना दिली.
केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील परदेशी पर्यटकांचा ओघ सातत्याने वाढत आहे. २०२२ मध्ये १.५१२ दशलक्ष असलेला हा आकडा २०२३ मध्ये थेट ३.३८८ दशलक्षवर गेला आणि २०२४ मध्ये तो ३.७०५ दशलक्ष इतका नोंदवला गेला. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये भारतात आलेल्या एकूण परदेशी पर्यटकांपैकी १७.६९ टक्के पर्यटकांनी महाराष्ट्राला पसंती दिली असून, पर्यटनाच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक राहिला आहे.
जागतिक स्तरावर भारताला एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रस्थापित करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शने, परदेशी टूर ऑपरेटर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सहली, रोड शो आणि भारतीय खाद्य महोत्सवांचा समावेश आहे. हे सर्व प्रयत्न राज्य सरकारे आणि भारतीय दूतावासांच्या मदतीने केले जात असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.
पर्यटन स्थळांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून ‘स्वदेश दर्शन २.०’ आणि ‘प्रसाद’ (PRASHAD) सारख्या योजनांतर्गत आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांचा विकास आणि आध्यात्मिक वारसा स्थळांच्या संवर्धनावर भर दिला जातो. महाराष्ट्रातील पर्यटन विकासासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नियमितपणे चर्चा आणि समन्वय बैठका घेतल्या जातात, ज्यामुळे पर्यटनाला अधिक चालना मिळत आहे.
















