Home महाराष्ट्र इंधनाचा वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा – मंत्री शंभूराज...

इंधनाचा वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा – मंत्री शंभूराज देसाई

0
Public transport should be used to reduce fuel consumption – Minister Shambhuraj Desai

सातारा : पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचत, परकीय चलन संवर्धन तसेच ऊर्जा कार्यक्षमतेस प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजनाबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ   १५ मे २०२६ रोजी होत आहे. या प्रसंगी सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत सातारा येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे. ज्यामध्ये घरातून काम करण्याची मुभा, अनावश्यक सोने खरेदी टाळणे, पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करणे, खाद्य तेलाचा वापर करणे, रासायनिक खतांवर अवलंबित्व कमी करुन नैसर्गिक शेती करणे, स्वदेशी उत्पादनाचा वापर वाढविणे व परदेश दौरे टाळणे आदी बाबींचा समावेश आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्हा प्रशासनाने सर्व शासकीय कार्यालयांच्या विभाग प्रमुखांना व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी  शक्य तितक्या प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याबाबत निर्देश द्यावेत. तसेच एकत्रित दौऱ्यांकरिता कारपूलिंगचा अवलंब करावा, अनावश्यक वाहन वापर टाळावा व इंधन बचतीबाबत जनजागृती करावी. सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असेही निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले आहेत. या निर्देशांचे काटेकोरपणे पालन सर्व यंत्रणांनी करावे तसेच प्रधानमंत्री महोदयांनी नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार सर्व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच शासनातर्फे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या निर्देशांचे पोलीस विभागाने काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कडूकर यांनी यावेळी दिले.